शनिवार, २२ मार्च, २०१४

मते कुणाला? भारताला !


                             -         डॉ. सुधीर रा. देवरे


            तुम्ही हिं‍दु धर्मात जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त हिंदुत्व आहे अशा नेत्याला मते देऊ नका. तुम्ही मुस्लीम धर्मात जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त मुस्लीम असणे आहे अशा नेत्याला मते देऊ नका. तुम्ही शीख धर्मात जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त शीखत्व आहे अशा नेत्याला मते देऊ नका. तुम्ही बौध्द धर्मात जन्माला आलात वा बौध्द धर्म स्वीकारला म्हणून ज्याचे कतृत्व फक्त बौधुत्व आहे अशा नेत्याला मते देऊ नका. हीच गोष्ट प्रत्येक धर्मिय बांधवांना सांगता येईल.
            तुम्ही मराठा जातीत जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त मराठा जात मिरवणे आहे, अशा नेत्याला मते देऊ नका. तुम्ही माळी जातीत जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त माळी जात मिरवणे आहे, अशा नेत्याला मते देऊ नका. तुम्ही ब्राम्हण जातीत जन्माला आलात म्हणून ज्याचे कतृत्व फक्त बाम्हण्य पाळणे आहे, अशा नेत्याला मते देऊ नका. हीच गोष्ट इथल्या प्रत्येक जातबाधंवांना सांगता येईल.
            भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. कोणी भारताला धर्मातीत देश असल्याचे सांगतो, ते सुध्दा खरेच आहे. पण धर्मातीत देश असणे म्हणजे आपापल्या धर्माची मते आपापल्या धर्मातील नेत्यालाच द्या असा याचा अर्थ नाही. खरं म्हणजे धर्म हा भारताच्या लोकशाहीचा आधारच नाही. देश धर्मातीत आहे याचा अर्थ ज्या त्या धर्माने आपापली कर्मकांडे आपापल्या घरात करायला हरकत नाही हा आहे. धर्माच्या नावाने मते मागून संसदेत कायदे करण्यासाठी या, अशा या धर्मातीत असण्याचा अर्थ नाही. म्हणून जातीच्या नावाने आणि धर्माच्या नावाने जे लोक मते मागतील त्यांना त्या त्या जाती धर्माने मते तर देऊच नयेत, उलट निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आणून देणे गरजेचे आहे.
            भारताच्या नागरीकांनी ही पथ्ये पाळली तर इथे जातीयवाद वाढणार नाही. धर्मांधता फोफावणार नाही. चांगले धर्मनिरपेक्ष लोक निवडून येऊन संसदेत जातील आणि मग रोज रोज घडणारे विविध कांडे कमी होत जातील. आपल्या जाती धर्मांच्या लेबलने आपल्या जातीधर्माचे लोक आपल्याला मते देत नाहीत हे आता नेत्यांच्या लक्षात आले की ते जातीय तेढीचे आणि धर्मांधतेचे राजकारण सोडून विकासाच्या वाटेवर चालण्याची अपेक्षा आपण करू शकतो.
            म्हणून प्रश्न आता असा निर्माण होतो की आपण मते द्यायची कोणाला? आपण भारताचे नागरीक आहोत म्हणून आपण सार्वभौम भारताला मते दिली पाहिजेत. म्हणजेच ज्या उमेदवाराचे भारताबद्दलची मते उदारमतवादी आहेत. भारताच्या उज्वल भवितव्याची ज्याला आस आहे, जो भ्रष्टाचारी नाही, निष्कलंक आहे, अभ्यासू आहे, ज्याच्याजवळ वैचारिकता आहे आणि मुख्य म्हणजे ज्याच्याजवळ स्वधर्माचा आणि स्वजातीचा फाजील अहंकार नाही अशा नेत्याला आपण मते दिली पाहिजेत. मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो.
            अनेक नेते निवडणूक काळात मतदारांसाठी पार्ट्या देतात. नेत्यांनी ठेवलेल्या पार्ट्यांना अनेक लोक जातात, कोणी नेत्यांकडून मतांच्या बदल्यात पैसे घेतात. कोणी दारू घेतो. कोणी मतदानाच्या दिवशी नेत्यांच्या गाडीने मतदान केंद्रावर जातो. असे होत असेल तर आपला नेता आपल्यासारखाच भ्रष्ट राहणार आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.
      (यातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)


- डॉ. सुधीर रा. देवरे            
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा