रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

सांस्कृतिक भारत (संक्षिप्त)





-         डॉ. सुधीर रा. देवरे

            भारत देशाची राजधानी दिल्ली असून भारताचे सर्वात मोठे शहर मुंबई हे आहे. भारताची आर्थिक राजधानी सुध्दा मुंबईच आहे. देशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,287,263 चौरस किमी इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1,210,854,977 इतकी आहे. (आजची-2017 ची लोकसंख्या 1,293,057,000 इतकी असावी.) भारताची साक्षरता 86.43 टक्के असून राष्ट्रीय अधिकृत भाषा हिंदी आणि इंग्रजी या असल्या तरी देशात त्या त्या राज्यात त्या त्या प्रांतीय भाषा अधिकृत मान्यताप्राप्त आहेत. दंतकथेतील भरत वंशावरून देशाचे नाव भारत झाले असा समज.
            भारताचा प्रागितिहास प्रचंड प्रमाणात आहे, पैकी बराच भाग अज्ञात आहे म्हणून तो समूळ उलगडता येत नाही. वेदकालापासून भारताचा ज्ञात इतिहास आहे. ख्रिस्तपूर्व 3101 हा वेदकाल समजण्यात येतो. भारताचा प्राचीन कालखंड इ.स. पूर्व  400 इ. स 1000 आहे. प्राचीन काळात सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, चक्रधरांचा महानुभाव पंथ व ज्ञानेश्वर यांचा समावेश करता येईल. ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून अर्वाचीन इतिहास म्हणता येईल. विसाव्या शतकात भारतात खूप वेगाने घटना घडत होत्या.
            अनेक राज्यांमध्ये विभागलेला हा देश होता. भारतात अनेक संस्थानात अनेक राजे राज्य करत होते. परकियचक्र येऊन अनेक राजांनी स्थानिक राजांना हरवून भारताच्या विविध भागात आपले बस्तान बसवले होते. इंग्रजांची सत्ता ही भारतावर शेवटची सत्ता होती. भारतातील विविध स्थानिक राजांची राज्य खालसा करून इंग्रजांनी एकछत्री अंमल सुरू केला. इंग्रजांनी जवळ जवळ दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर अनेक स्वांतत्र्य सैनिकांच्या चळवळीने आणि बलिदानाने शेवटी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगष्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. आणि 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून भारत जगात ओळखला जातो. 15 ऑगष्ट 1947 ला भारत दोन देशात विभागला गेला. भारताच्या राजकारणात असलेल्या जिन्हा यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने भारतातून पाकिस्तान हा मुस्लीम धार्जिना देश निर्माण झाला. तरीही जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुस्लीम लोकसंख्या आज भारतात आहे. पाकिस्तान ज्या धार्मिक पायावर स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला तो आज विफल झाला असून जगातला अविश्वसनीय देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. जगातील अनेक दहशतवादी पाकिस्तानात राजरोसपणे वास्तव्य करू शकतात.
            भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर तर उत्तरेला हिमालय पर्वत आहे. भारताच्या वायव्य ते पूर्व दिशेपर्यंत अनुक्रमे पाकिस्तान, चीन, तिबेट, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार (ब्रम्हदेश) या देशांच्या सीमा आहेत.
            भारत हा देश लोकसत्ताक गणराज्यांचा असून विविध वंश, जाती, धर्म मिळून येथील लोक गुण्यागोविंदाने राहतात. औद्योगिक राष्ट्रात भारताचा दहावा क्रमांक लागतो. भारताची तटीय रेखेची लांबी 7516.6 किमी. (अंदमान, निकोबार व लक्षव्दिपसह) आहे. प्राकृतिकरीत्या भारताचे पाच विभाग पडतात. ते पुढीलप्रमाणे: 1) उत्तरेकडील हिमालय पर्वत श्रेणी, 2) उत्तरेचा मैदानी प्रदेश, 3) व्दिपकल्पांचे पठार, 4) तटीय मैदानी प्रदेश, 5) बेटे. असे हे पाच विभाग.
            भारतात अनेक खनिजे, वने आणि वनस्पती आढळतात. बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र होते. भारत हा प्रचंड मोठा देश असल्याने देशात भौगोलिक विविधता दिसून येते. कुठे असाह्य असे प्रचंड ऊन- उष्णता तर कुठे कडाक्याची थंडी, कुठे एप्रिल महिण्यातही पडणारे बर्फ, कुठे रोज पडणारा पाऊस तर कुठे भाजून टाकणारे वाळवंट. अशा असमान वातावरणात प्रचंड तफावतीचा भारत हा देश आहे.
            हिंदू 79.8%, इस्लाम - 14.2% , ख्रिश्चन - 2.3%, शिख -1.7%, बौध्द -0.7%, जैन - 0.4%, आणि 0.9% इतर धर्मिय लोक. जगातील सर्व प्रमुख धर्माचे लोक भारतात राहतात. भारत हे निधर्मी राष्ट्र असून भारतातील लोक सहिष्णु आहेत. या व्यतिरिक्‍त अनेक पंथ, संप्रदाय आपापल्या परंपरा पाळताना दिसतात. जात व्यवस्था वाईट असली तरी भारतातील जात व्यवस्था (जी प्रचंड प्रमाणात आहे.) अजून संपत नाही.
            भारताचा देश पातळीवरील कारभार हिंदी आणि इंगजी या भाषेत पाहिला जात असला तरी भारतीय राज्यघटनेने काही प्रांतीय भाषांना मान्यता दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेत ‍अधिसूची -8 मध्ये भारतीय प्रमुख भाषांचा समावेश केला आहे. त्या भाषा अशा: आसामी, बंगाली, गुजराती, हिन्दी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मलयालम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजावी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगु, उर्दु अशा एकूण अठरा भाषांना प्रांतीय भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे. आता एकूण बावीस भाषांना मान्यता आहे. पैकी तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र भारतात खूप भाषा बोलल्या जातात.            भारताच्या भाषा, बोलीभाषा आज 1500 पर्यंत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत 1800 होत्या. दिवसेंदिवस बोली भाषा मरताहेत. अनेक आदिवासी भारतात वास्तव्य करतात आणि त्यांच्या स्वतंत्र बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
            भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यात धार्मिक, पुरातत्वीय, नैसर्गिक, वास्तु आदी वर्गवारी करावी लागेल. चार धाम यात्रा, बारा ज्योर्तिलिंगे, कुंभमेळे (हरिव्दार, प्रयाग, उज्जैन, नाशिक- त्र्यंबकेश्वर.), अष्टविनायक, प्रमुख धार्मिक पीठे: शृंगेरी, व्दारका, पुरी, जोशीमठ, कांचीपुरम,अहोबिलम, मेलकोटे, उडुपी आदी धार्मिक पर्यटन स्थळे आहेत.
            वुलर, डल (जम्मू- काश्मीर), पुष्कर, सांभर, जयसमंद, सिलिसाड, पिचोला (राजस्थान), नारायण, नलसरोवर (गुजरात), चिल्का (ओडिशा), पुलिकत, कोल्लेरू (आंध्र प्रदेश), लोणार (महाराष्ट्र), बेब्मनाड, अष्टमुडी, कायनकुलम (केरळ), लोकटाक (मणिपूर) आदी सरोवरांचे पर्यटन हजारो पर्यटक करत असतात.
            युनेस्कोने गौरविलेली भारतातील बत्तीस जागतिक वारसा ठिकाणे आहेत: आग्रा किल्ला, ताजमहाल, फत्तेपूर सिक्री (उत्तर प्रदेश), ‍ अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, घारापुरी लेणी, छ‍त्रपती शिवाजी टर्मिनस (महाराष्ट्र), महाबलिपुरम, बृहदिश्वर मंदिर- तंजावर (तामिळनाडू), सूर्य मंदिर- कोणार्क (ओडिशा), ऐतिहासिक चर्च ओल्ड गोवा (गोवा), हंपी, पट्टदकल येथील मंदिरे (कर्नाटक), खजुराहोची प्राचीन मंदिरे, सांची येथील स्तुप, ऐतिहासिक भित्तिचित्र- भीमबेटका (मध्यप्रदेश), हुमायुनची कबर, कुतुबमिनार, लाल किल्ला (दिल्ली), भारतातील पर्वतीय रेल्वे (निलगिरी, तामिळनाडू, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल), महाबोधी मंदिर- बुध्दगया (बिहार), चंपानेर पावागड, राणी की वाव (गुजरात), जंतर मंतर जयपूर , राजस्थानातील किल्ले, केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान (राजस्थान), काझीरंगा, मानस वन्यप्राणी अभयारण्य (आसाम), सुंदरबन राष्ट्रीय उद्यान (पश्चिम बंगाल), नंदादेवी व पुष्पघाटी (उत्तराखंड), पश्चिम घाट (गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू), ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान (हिमाचल प्रदेश).
            भारतीय लोकसंगीत हे उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण कर्नाटकी म्हणून प्रामुख्याने ओळखले जाते.
            पंजाबचा भांगडा, आसामचा बिहु, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडचा चाहु, गुजरातचा गरबा आणि दांडिया, राजस्थानचा घुमार आणि महाराष्ट्राचा लावणी हे आठ लोकनृत्य मिथक कथांवर आधारीत आहेत.
            इंडियन नॅशनल अॅकेडेमी ऑफ म्युझिकने ज्या लोकनृत्यांना अभिजात दर्जा दिला आहे ते नृत्य: नृत्य, नाट्य आणि लोकसंगीत या तिघांचा मेळ ज्यात असतो, ते नृत्य म्हणजे तमिळनाडूचे भरतनाट्यम, उत्तर प्रदेशचे कथक, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम, आंध्र प्रदेशचे कुचिपुडी, मणिपुरचे मणिपुरी, ओडिशाचे ओडिशी आणि आसामचे सत्रिया हे अभिजात नृत्य आहेत.
            गुजरातचे भवाई, पश्चिम बंगालचे जत्रा, उत्तर भारतातील नौटंकी आणि रामलिला, महाराष्ट्राचा तमाशा, आंध्रप्रदेशाचा बुराकथा, तमिळनाडूचा तेरूकुट्टू आणि कर्नाटकचा यक्षगाण हे अभिजात नाट्य आविष्कार आहेत.
            भारतीय प्राचीन साहित्य हे संस्कृत भाषेत आढळून येते. त्यापूर्वी कोणत्या भाषेत साहित्य लिहिले जात होते हे अज्ञात आहे. रामायण आणि महाभारत हे प्राचीन महाकाव्ये आहेत. इलियड सोबत हे दोन महाकाव्ये जागतिक महाकाव्ये समजली जातात. असे एकूण तीन महाकाव्ये. कालिदासाचे शाकुंतल नाटकही अभिजात आहे. कामसूत्र हा सुध्दा एक प्राचीन महत्वाचा ग्रंथ आहे. भक्‍त संप्रदायातले अनेक संतकवी आजही प्रख्यात आहेत. कबीर, तुलसिदास, गुरूनानक आदी. विसाव्या शतकातील रविंद्रनाथ टागोर या कवीवर्यांना गितांजली या काव्याबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला.
            भारतातील ठळक ऐतिहासिक पुरूषांची नावे घ्यायची झाली तर छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, विवेकानंद, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आदींचे नावे सांगता येतील.
            हिमालय, विंद्य, सह्याद्री, पूर्व घाट, पाश्चिम घाट, सातपुडा अशा काही महत्वाच्या पर्वत रांगा भारतात असून गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा, गोदावरी, कृष्णा, चंद्रभागा, कावेरी, नर्मदा, तापी, कोसी, हुगळी, सतलज, झेलम आदी अनेक प्रमुख नद्या भारतातून वाहतात आणि भारतीय शेतीव्यवस्था समतोल ठेवतात.
      (पुण्याच्या मेनका प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या सास्कृतिक भारत या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

'संस्कृती आणि समाज’


- डॉ. सुधीर रा. देवरे

          आज संस्कृती हा शब्द कोणी नुसता उच्चारला तरी आपण त्या व्यक्‍‍तीकडे चमकून पहावे अशी या शब्दाची जादू वा दहशत निर्माण झाल्याचे लक्षात येते. देशात किमान ज्या बाबींचे राजकारण होऊ नये असे वाटते त्या गोष्टींचेही राजकारण होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक  व्यक्‍तिगत बाबींचे राजकीयकरण होऊन त्यावर राजकारण करणे सोपे झाले आहे. आज संस्कृती या संज्ञेचेही राजकीयकरण अगदी ठरवून होत असल्याचे लक्षात येते, नव्हे संस्कृती हा राजकारणाचा प्रमुख मुद्दा होऊ पहातोय की काय अशी शंका येऊ लागते. त्यामुळे एखाद्या विचारवंताला, कलावंताला वा साहित्यिकाला हा शब्द उच्चारताना आपण प्रतिगामी तर ठरणार नाही ना अशी भीती वाटू लागली, ही वस्तुस्थिती आहे.
            जगात आज भौतिक विकास, तंत्रज्ञान आणि नवनवीन वैज्ञानिक शोध यांचे ज्या पध्दतीने झपाटीकरण होत आहे, जगातील सर्व नागरिक अशा विकासामुळे जसजसे सुखासीन होताना दिसतात त्याच वेगाने ते आपल्या कालबाह्य पूर्व परंपरांना अतोनात चिकटताना दिसतात. या मागे धार्मिक कट्टरता, मूलतत्ववादी दूराभिमान, सनातनी विचारसरणी कार्यरत आहे. अशा तथाकथित तत्वज्ञानाचा जे लोक प्रचार आणि प्रसार करतात ते सुध्दा जगातील अव्वल विकसित सायन्स आत्मसात करूनच दहशतवादाचा आसरा घेताना दिसतात. आपल्या धार्मिक, सनातनी आणि कालबाह्य विचारांचा आग्रह करताना आपण जी शास्त्रीय तंत्रासह शस्त्रास्त्रे वापरतो आहोत ती मात्र आपल्या धर्माची नाहीत - आपल्या संस्कृतीने आपल्याला ती बहाल केलेली नाहीत तरीही आपण त्याचा अंगिकार करतो याची त्यांना सुतराम जाणीव नसावी का? उलट ज्यांच्या विरूध्द आपण ही शस्त्रास्त्रे वापरतो त्यांच्यापैकी काहींची ही निर्मिती असूनही ती शस्त्रास्त्रे अशा जहालवादी संस्कृती रक्षकांची कवचकुंडले असल्यासारखी ते कायम आपल्याजवळ बाळगतात. आणि आपल्या विचारधारेच्या विरूध्द असलेल्या लोकांना अमानुषपणे मारण्यासाठी त्यांचा वापर करतात.
            ही गोष्ट उदाहरणे देऊन जास्त स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, एखादी तालिबानी वा आयएसआयएस संघटना ठरवते की मुलींनी शिक्षण घेऊ नये, पाश्चात्य कपडे घालू नयेत, सार्वजनिक पार्ट्यांना जाऊ नये, मोबाईल फोन वापरू नयेत, वगैरे वगैरे. मात्र त्याचवेळी हे दहशतवादी लोक स्वत: पाश्चात्य एके 47 बंदूका वापरतात. पाश्चात्य बाँब वापरतात. अत्याधुनिक मोबाईल फोन वापरतात. प्रवासाला पाश्चात्य गाड्या वापरतात, विमाने वापरतात. हेच उदाहरण भारतातील काही सनातनी लोकांना लागू होईल. तथाकथित सनातनींचे म्हणणे आहे की भारतात वैदिक शिक्षण द्यावे. गुरूकुल पध्दत असावी. मात्र हे सनातनी स्वत: पाश्चात्य शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित असतात. आपल्या आश्रमरूपी महालात एसी वापरतात. पाश्चात्य लोकांनी शोध लावलेली विजेची उपकरणे- दिव्याचा प्रकाश वापरतात. सारांश, जगाच्या पाठीवर जे तथाकथित संस्कृतीचे रक्षक म्हणून वावरतात तेच मुळात ढोंगी आणि लबाड असल्याचे लक्षात येते.
            जे वैश्विक ठरतात त्यांनाच संस्कार म्हणता येतील. तसेच ज्या संस्कृतीचे गोडवे गाताना जगातील कोणत्याही कानाकोपर्‍यात आपल्याला संकोच वाटणार नाही ती खरी संस्कृती असते. जगातील कोणतीही उदार संस्कृती कोणालाही हवीहवीशी वाटते. म्हणूनच आपण भारतीय असूनही इजिप्त आणि ‍ग्रीक संस्कृती आपल्याला परकीय वाटत नाही. मूळ भारतीय वा सिंधू- हिंदू संस्कृती अशीच सहिष्णु आहे की जगातील कोणत्याही कानाकोपर्‍यात तिचा अभ्यास करावासा वाटावा. जिथे दहशती पाशवी बळजबरी असते, ती संस्कृती नसून विकृती ठरते.
            प्रत्येक कलात्मक आविष्कारावर स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले असते. राजा इडिपस हे ग्रीक नाटक तत्कालीन संस्कृती, श्रध्दा, समज, चालीरीती या गोष्टींवर उभे आहे. तत्कालीन संस्कृतीचे काही मूल्य नसते तर या नाटकात दाखविल्याप्रमाणे एवढी मोठी शोकांतिका घडली नसती. सारांश, या नाटकातून तत्कालीन ग्रीक संस्कृतीवर प्रकाश पडतो. शेक्सपियर यांच्या नाटकातूनही तत्कालीन युरोपियन संस्कृती दृगोचर होते. शेक्सपियरकालीन समाजातील लोकरूढी, लोकश्रध्दा, सांस्कृतिक अंत:प्रवाह, सामाजिक स्तरभेद यांचे आकलन होते. व्हॅन गॉफ आणि गोगां या चित्रकारांच्या चित्रातून, त्यांनी ज्या आदिवासींमध्ये वास्तव्य केले त्या बेटांवरचे सांस्कृतिक दर्शन आपल्याला होते. थोडक्यात, शिल्पकला, चित्रकला, वाड्‍मय यातून त्या त्या काळातील जीवनदर्शन चिन्हांकित झालेले दिसते. ही चिन्हे उलगडली तरी त्याकाळच्या समाजजीवनाच्या सांस्कृतिक स्वभावाचे दर्शन आपल्याला घडू लागते.
            पंथ, संप्रदाय यांचा कलाविष्कारांशी येणारा संबंध फार जवळचा असतो. प्राचीन आणि अर्वाचीन कला तर कुठल्यातरी धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या प्रसारासाठीच अस्तित्वात आल्या असे त्यांच्या अभ्यासावरून सहज लक्षात येते. भव्य मंदिरे, मशिदी, ताजमहाल, चर्च, स्तूप अशा वेगवेगळ्या धर्माच्या धार्मिक वास्तू या उत्कृष्ट कलाकृती वा वास्तुकला आहेत.
            भारतातील जातककथांवर आधारलेली वेगवेगळी शिल्पे पाहिलीत की त्या कशा उत्तम दर्जाच्या कलाकृती आहेत हे स्पष्ट होते. उदा. घारापूरी, अजिंठा, वेरूळ, कार्ले, अमरावती इत्यादी. ओरिसातील सूर्यमंदिर, जगन्नाथ मंदिर, मध्यप्रदेशातील खजुराहो, दक्षिण भारतातील अनेक हेमाडपंथी मंदिरे ही उत्तम कलाकृतीची उदाहरणे आहेत. तीच गोष्ट वाड्‍मयात दिसते. जगातील आद्य वाड्‍मय कुठल्यातरी मताच्या प्रचारासाठी लिहिले गेले आहे, असे म्हटले तर अतिशयोक्‍‍त होणार नाही. पण या प्रचारात उदारमतवादी दृष्टीकोन होता. रामायण, महाभारत आणि इलियड ही जागतिक महाकाव्ये आहेत. हे ग्रंथ निखळ काव्य निर्माण करण्यासाठी लिहिली गेली नाहीत. तसेच गीता, कुराण, त्रिपिटीक, बायबल, झेंद, अवेस्ता (पारशी), झेन, ताओ, अरण्यके, पिटके, जैन आगमे (जैन), गुरू ग्रंथसाहेब हे ग्रंथही केवळ काव्य नाहीत तर वास्तव जीवनाच्या तत्वज्ञानाने ते ओतप्रोत भरलेले आढळतात.
            ज्ञानेश्वरीही केवळ काव्यासाठी लिहिली गेली नाही, तुकारामाची गाथा केवळ काव्य नाही. या दोन्ही ग्रंथांत काव्य, तत्वज्ञान, तत्कालिन सामाजिकता, तत्कालिन बोली भाषेचे बळकट भान उपयोजित झाल्याचे लक्षात येते. आणि सर्वसामान्य माणसालाही ह्या संतकाव्यात देव दिसतो. लिळाचरित्र हा ग्रंथ उत्तम वाड्‍मयीन आविष्कार आहे, पण तो उदयास येण्याचे कारण महानुभाव पंथाचा प्रसार हे आहे. यातून असे स्पष्ट होते की, पंथ, संप्रदाय, धर्म, संस्कृती यांचा कलाविष्कारांशी नुसता वरवरचा संबंध नसतो तर तो खूप खोल आणि घनिष्ट असतो. आधी कलाबाह्य उद्दिष्टे आणि मग कलात्मकता प्रतीत झालेल्या अनेक कला अभ्यासांती आपल्या निदर्शनास येतात.
            जगात सर्वत्र कलावंत आणि राजकारणी यांच्यात नेहमी वैचारिक युध्दे होत असतात. राजकारणी सुसंस्कृत असतील तर ते साहित्यिकांच्या कलाने राज्यव्यवहार चालवतात. राजकारणी लोकांना कलावंतांशिवाय पुढे जाता येत नाही. राजकारणी कलावंतांना- साहित्यिकांना डावलून आपला अजेंडा राबवायला लागलेत की समजावे आपण हुकुमशाहीकडे निघालोत. विशिष्ट हेतूने संस्कृतीच्या रक्षकांनी दहशतवादाचा पुरस्कार केल्याने त्यांची संस्कृती तर वाढत नाहीच पण दुसर्‍या संस्कृतीवर दहशत निर्माण झाल्यामुळे परसंस्कृतीतील जाणकार आणि सुजान लोक ह्या संस्कृतीसाठी आपली दारे बंद करतात, अशा पाशवी वा दहशती बळाचा वापर करणार्‍या संस्कृतीपासून सुज्ञ लोक भयाने लांब जातात. आद्य कलावंतांनी, धर्मप्रसारकांनी आपल्या धर्माचा- संस्कृतीचा जगभर प्रसार व्हावा या हेतूनेच ग्रंथ निर्मिती केली, चित्रे- शिल्पे यांसारखी कला उपयोजित केली तरी ती काळाला पुरून उरून आज सर्वत्र चिरंजीव झाल्याचे दिसते. जगभरातले महत्वाचे काही चर्च, काही मशिदी, काही मंदिरे, काही स्तूप याची साक्ष देतात. काही कोरीव लेण्या, शिल्पकला आणि विविध चित्रकलाही याची साक्ष देतात. महाभारत, रामायण, इलियड, कुराण, त्रिपिटीक, ‍गीता अशी  वाड्‍मयीनदृष्ट्या श्रेष्ठ महाकाव्यही जगात वाचली जातात. याचे कारण त्यांच्यामध्ये उपयोजित झालेली विशाल मानवी संवेदनशीलता. मग वाचणारी व्यक्‍‍ती कोणत्याही धर्माची असो. दिवाळीच्या रात्री सर्वत्र प्रकाशाचा शीतल झगमगाट असतो, जो जगातील कोणत्याही कोपर्‍यातल्या माणसाला आनंद देईल. पण जाळपोळीत होरपळणार्‍या लोकांचा आक्रोश आणि अशा आगींच्या ज्वाळांचा प्रकाश जगातील कोणत्याही माणसाला आनंद देणार नाही.
            सारांश, कोणतीही संस्कृती जशी बंदूकीच्या धाकाने वाढणार नाही, तशी तत्कालीन मतांच्या फायद्याने निवडून येण्यासाठी कोणत्याही देशाच्या राजकारणात दिर्घकाळ टिकणार नाही. अशा गोष्टींचा सामान्यातल्या सामान्य माणसालाही एक दिवस उबग येईल. यापुढे अशीच संस्कृती टिकेल की जी वैश्वीक धर्माचा पुरस्कार करील. जिचा कल मानवतावादाकडे झुकेल. संस्कृतीचा जिथे जिथे संकुचित कारणासाठी कोणी आसरा घेईल तिथे तिथे ती नाकारली जाईल हे निश्चित.
            जेव्हा व्हॅटीकन सिटीतले पोप भारतातील मदर तेरेसांना संत म्हणून घोषित करतात तेव्हा ते कितपत बरोबर आहे वा चूक या फंदात आपण पडत नाही. कारण ही संत म्हणून घोषित करण्याची परंपरा त्या व्यक्‍तीच्या चमत्कारांवर अवलंबून आहे, आणि आपण चमत्कारांचे उदात्तीकरण करणार नाही की अंध्दश्रध्देचे समर्थन करणार नाही. पण मदर तेरेसांच्या सा‍माजिक कामांना आपल्याला कमी लेखता येणार नाही मग त्यांचा उद्देश कोणताही असो. म्हणून संतत्वापेक्षा त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर होते त्यावेळी आपणा सर्वांना जो आनंद झाला होता, ती खरी संस्कृती असते. ताजमहालला जगातील सात आश्चर्यांमध्ये स्थान मिळाल्यावर जो आपल्याला निखळ आनंद मिळतो ती खरी संस्कृती असते. धर्मांध दंगलीत एखादा हिंदू एखाद्या मुस्लीमाचा जीव वाचवतो वा एखादा मुस्लीम एखाद्या हिंदूचा जीव वाचवतो ती खरी मानवतावादी वैश्विक संस्कृती असते.
      (‘सावाना 2017 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

आजारी पडणे मना आहे!




-         डॉ. सुधीर रा. देवरे

      कोणत्याही माणसाला कोर्ट, पोलिस स्टेशन आणि रूग्णालयाची पायरी चढावी लागू नये, असे म्हटले जाते. जनमानसात अशा भितीदायक प्रतिमा तयार व्हायला त्या त्या क्षेत्रातली कठोर वागणूक जबाबदार असते. एखादा आजार उद्‍भवला तर रूग्णालयात जायचे म्हणून अशिक्षित लोकांच्याच नव्हे तर उच्चशिक्षित- सुशिक्षित लोकांच्याही अंगावर सर्रकन काटा येतो. आजाराचे निदान चुकीचे होईल वा आपण अतोनात लुबाडले जाऊ, हा समज या मागचे कारण असते. म्हणून अनेक लोक आपले दुखणे एकतर अंगावर काढतात वा स्वत:च डॉक्टर असल्यासारखे मेडिकल स्टोअर्समधून त्या त्या आजाराच्या गोळ्या मागवून घरी बरे होण्याचा प्रयत्न करतात. यामुळे काही वेळा अनेकांवर जीव गमावण्याचीही पाळी येते.
      या वर्षात खाजगी रूग्णालयांतील ज्या चार घटना सामोर्‍या आल्या त्या भयानक आहेत: एका गर्भवती महिलेच्या बाळंतपणाला रूग्णालयाने एक कोटी बील आकारले. तरीही त्या महिलेच्या बालकाला रूग्णालय वाचवू शकले नाही. एक माणूस साध्या आजारासाठी रूग्णालयात गेला. त्याला अॅडमिट करून आयसीयूत ठेवले. तो वारला. बील झाले तेरा लाख रूपये. एका माणसाला डेंग्यू झाला. आठ दिवस रूग्णालयात. वारला. बील झाले सात लाख. आणि चौथी परवाची ताजी घटना: फोर्टिस रूग्णालयात आद्या नावाची सात वर्षाची मुलगी डेंग्यूने पंधरा दिवस आयसीयूत अॅडमिट होती. वारली. बील झाले सोळा लाख रूपये. म्हणजे प्रत्येक दिवसाला ह्या मुलीला सरासरी एक लाख रूपये खर्च झाला.
      मी व्हायरल न्युमोनियाने आजारी होतो. नाशिकच्या एका रूग्णालयात दोन ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर (2017) पर्यंत आयसीयूत अॅडमिट होतो. तीन तारखेच्या सकाळी डॉक्टरांनी माझ्या नातेवाईकांना बोलवून सांगितले: केस क्रिटीकल आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण दिसते. तीच ट्रिटमेंट सुरू आहे आता. कदाचित व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. पंधरा ते वीस लाख खर्च येऊ शकेल. कदाचित पन्नास लाखही लागू शकतात. तुमची एवढी तयारी आहे का? तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही की तुम्ही इतका भार पेलू शकाल. डिचार्ज मिळाल्यानंतर हे काही दिवसांनी मला नातेवाईकांनी सांगितले. मी सावध होतो. मला तिसर्‍याच दिवशी बरं वाटायला लागलं होतं. तरीही पंधरा दिवस रूग्णालयात होतो. बील झाले चार लाख. अँटीबायोटीक्सच्या मार्‍याच्या अशक्‍तपणामुळे मला अजूनही चालता येत नाही.  
      एका पेशंटच्या नातेवाईकाने सांगितले की, ज्या मेडिसिनची किंमत बाहेर सहा हजार रूपये आहे ती मेडिसिन विशिष्ट रूग्णालयात 25,850 रूपयाला मिळाली. अनेक मेडिसिन पाच पट, दहा पट आणि वीस पटीच्या वाढीव किमतीत खाजगी रूग्णालयात विकल्या जातात. (जेनेरिक औषधे लपवून बॅन्डेडच्या फुगवलेल्या एमआरपीची शिफारस केली जाते.) भारतात सरकारी रूग्णालयांमध्ये पेशंटकडे दुर्लक्ष होते. नीट ट्रिटमेंट मिळत नाही आणि खाजगी रूग्णालयांमध्ये अतोनात लुबाडले जाते. पेशंट रेफर करणे, कट प्रॅक्टीस, मेडिकल कमिशन, पॅथालॉजी कमिशन या सगळ्या गोष्टीत भरडला जातो तो पेशंट. मेडिक्लेम या इंश्युरन्सच्या कंपन्यांमुळेही अशी बीले भडकायला मदत होत असावी. आयुष्यभर नोकरी वा कामधाम करून माणूस जितके पैसे कमवत नाही,  ‍त्यापेक्षा जास्त पैसे एका वेळच्या आजारपणाला खर्च करावे लागत असतील तर लोक नाईलाजाने रूग्णालयात जाणे टाळतात.
      आजची आरोग्यसेवा भारतीयांच्या आवाक्याबाहेर आहे. पेशंट कोणीही असो, आजार कोणताही असो आणि हॉस्पिटल खाजगी असलीत तरी  हॉस्पिटल बीले आणि मेडिकल बीले यात इतका फुगवटा यायला नको. वाजवी बीले आकारायला हवीत. खाजगी रूग्णालये, मेडिसिन विक्रेत्यांवर शासनाचे नियंत्रण असायला हवे. वैद्यकीय क्षेत्रात या सगळ्या अनिष्ट प्रवृत्ती कार्यरत आहेत, हे इंडियन मेडिकल असोसिएशन मान्य करते. कोणी तक्रार केली तर त्याला शिक्षाही ठरलेली आहे. मात्र सर्वसाधारण माणूस जो यात भरडला जातो त्याला हे सिध्द करून दाखवणे खूप कठीण जात असते. सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्नांनी ही वैद्यकीय सिस्टिम बदलण्यासाठी कायदेशीर आवाज उठवायला हवा.  
      डॉक्टरकी पेशा हा आज पेशा राहिला नाही. तो व्यवसाय झाला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक डॉक्टर बरबटलेला आहे आणि तो अनैतिकच वागत असतो. वैद्यकीय क्षेत्रात असेही अनेक लोक दाखवून देता येतील की ते माणुसकीने पेशंटला हाताळतात. पण दुर्दैवाने अशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
      (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/