बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

संस्कार म्हणजे काय (भाग- दोन)




- डॉ. सुधीर रा. देवरे

               एखाद्या घटनेला कसे सामोरे जायचे हे अनुभवी व्यक्‍तीने नवशिक्याला समजावून सांगणे म्हणजे संस्कार, अशी संस्काराची ताप्तुरती व सुटसुटीत व्याख्या करता येईल. संस्काराची व्याख्या कोणी कशीही केली तरी मनाची पाटी कोरी घेऊन जन्मलेल्या मुलाला वाढत्या वयात त्या त्या वेळी त्याच्या आयुष्यात (आई, वडील, पालक, गुरूजी यांनी) वडीलधार्‍यांनी समाज, परंपरा, वागणे, बोलणे, राहणे, प्रतिक्षिप्ततेची जाणीव करून देणे, त्याच्या आयुष्याला वळण लावणे म्हणजे संस्कार करणे असे आपल्या सर्वांना अभिप्रेत असते.
               अलिकडे राजकारणात व समाजकारणात धार्मिक पुनरूज्जीवनवादाने तोंड वर काढले असून जिकडे तिकडे धर्म, संस्कृती, संस्कार अशा संज्ञांचे पेव फुटले आहे. रोज नवनवीन पंथ उदयास येत असून सर्व प्रमुख संत वर्षातून सरासरी अकरा महिने पाश्चात्य देशात वास्तव्य करतात व त्यांचे शिष्य भारतात जागोजागी तथाकथित संस्कारांचे सत्संग करत राहतात.
               अशा एकंदरीत वातावरणामुळे आता घराघरात संस्कार ही संज्ञा चलणी नाण्यासारखी वापरली जाते. आपल्या मुलांवर कसे चांगले संस्कार आहेत आणि अमूकच्या मुलांवर कसे वाईट संस्कार आहेत, याची चर्चा गावात दिवसभर ओट्याओट्यांवर होत असते.
                  चांगले संस्कार म्हणजे काय? कायम संस्कार संस्कार म्हणणार्या लोकांना कोणते संस्कार अभिप्रेत असतात, हे ही त्यांच्या चर्चांवरून सहज लक्षात येते.  मुलं जर एखाद्या बुवाच्या नादी लागून सत्संग करत असतील तर तो चांगला संस्कार. आपले मूल जर रोज एखाद्या मंदिरात जात असेल तर तो चांगला संस्कार. मुलं जर काही श्लोक, प्रार्थना, गीतापाठ, त्रिकालसंध्या,  पसायदान, शुभम करोती आदी तत्सम काही पाठांतर करत असतील तर ते चांगले संस्कार. आपले मूल जर रोज देवपूजा करत असेल, धार्मिकतेचे चिन्हे अंगावर मिरवीत असेल तर तो चांगला संस्कार. अशा या लोकांची संस्काराबद्दल समजूत आहे. यात संस्कार अधिक अभ्यास या त्रांगड्यात बर्‍याच मुलांची त्रेधातिरपीट उडते, ते वेगळेच.
                मात्र आपल्या मुलांसमक्ष बाप लाच घेत असेल तर आपण मुलांवर कोणता संस्कार करत आहोत याची टोचणी बापाला लागत नाही. आपण आपल्या मुलांसमक्ष एखाद्याची अकारण निंदा करत आहोत, यावर आपण आपल्या मुलांवर कोणते संस्कार करत आहोत याची बोचणी बापाला नसते. अकारण व्देष, मत्सर, पर दु:खाने आनंद होणे, कोणाच्या व्यंगावर बोट ठेवणे वा व्यंगावरून उल्लेख करणे अशा गोष्टी लहान मुलांसमक्ष सर्रास केल्या जातात. एखादे काम आपण कसे अनैतिक मार्गाने करून आणले हे सांगताना आपण मुलांवर कुसंस्कार करीत आहोत, असे पालकांना का वाटत नाही. खोटे बोलताना आपण मुलांवर वाईट संस्कार करीत आहोत याचे भान वडिलधार्‍यांना रहात नाही.
                  लाच, चोरी, लबाडी, नालस्ती, फसवणूक अशा गोष्टी करताना आपले तथाकथित संस्कार कुठे जातात? आदर्श, नैतिकता या गोष्टी चांगल्या संस्कारांशी का जोडल्या जात नाहीत?
                  कोणी चुकून एका घसरत्या क्षणी वासनेच्या आहारी जातो आणि हातून वाईट गोष्ट करून बसतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या स्त्रीचा अनावधानाने विनयभंग होतो. काही वेळा तात्पुरत्या वासनेला शरण जाऊन जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा प्रयत्न होतो. या बाबी आक्षेपार्ह व गुन्हे आहेतच. अशा गोष्टी जगजाहीर होताच त्या व्यक्‍तीची सर्वत्रिक छी थू होते. हा विषय बातमीचा होतो. कायद्याचा होतो. विषय निषेधाच्या चर्चेचा होतो. अशा व्यक्‍तिंकडे अनैतिक म्हणून पाहिले जाते. त्याच्या- तिच्या चरित्राबद्दल खुलेआम चर्चा होते.
               उलट जी व्यक्‍ती आपल्या कार्यालयात खुलेआम गरीब लोकांना लुबाडून लाच घेतल्याशिवाय त्यांचे कामे करत नाही. दुसरीकडे शासनालाही खोटे बिले सादर करून देशाचे पैसे लुबाडत असते. अशी व्यक्‍ती मात्र शुध्द चारित्र्याची समजली जाते. त्याची सर्वत्र छी थू होत नाही. समाजात अशी कृत्ये एखादा उघडपणे करूनही तो उजळ माथ्याने वावरतो. त्याला प्रतिष्ठा असते. त्याच्या नोकरीत त्याला कशी वरची खाद आहे अशा अभिमान बाळगणार्‍या चर्चा सुरू असतात. नातलग त्याचे कौतुक करतात.
                        अशा भ्रष्ट व्यक्‍तीही धार्मिक लोकांप्रमाणेच देव देव करण्यात पुढे असतात, धर्म पाळतात, सत्यनारायण घालतात, सत्संग करतात. अशा अनैतिक पध्दतीने पैसे कमावणार्‍या एका व्यक्‍तीने मिळणार्‍या पैशांचेही धार्मिकतेआडून सहज समर्थन केले आहे, ते त्याच्याच शब्दात सांगतो, ‘मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे आणि अमूक बाबाचा परम भक्‍त आहे. म्हणून ते या मार्गाने मला लक्ष्मी प्राप्त करून देतात.’ म्हणजे आपल्या पापकर्मात विशिष्ट देव वा बुवा सामील असल्याचे ते स्वत: कबूल करतात. मात्र आधी दिलेल्या उदाहरणांच्या तुलनेने म्हणजे विवाहबाह्य संबंध, विनयभंग यांच्या पार्श्वभूमीवर लाच खाणारी व्यक्‍ती समाजात नैतिक समजली जाते.
                              खरं तर लाच घेणार्‍या व बलात्कार करणार्‍या व्यक्‍ती एकाच नैतिक लायकीच्या पंक्‍तीत बसणार्‍या असतात. बलात्कार करणारा तुरूंगात जातो तर लाच घेणारा समाजात प्रतिष्ठित होतो. आणि असे होत असेल तर आपले तथाकथित संस्कार एकदा पुन्हा तपासून घेतले पाहिजेत.
                              परंपरेने एखाद्या विशिष्ट वर्गाने आपल्यावर असे संस्कार बिंबवले असतील तर ते त्वरीत फेकून दिले पाहिजेत, त्यांतला नकलीपणा लक्षात आणून दिला पाहिजे व समाजाच्या उत्थापनेसाठी नव-संस्कार निर्माण केले पाहिजेत. अशा नवसंस्कारात सत्य, अहिंसा, सद्‍भावना, समता, बंधुभाव, सहिष्णुता, सदाचार, शुध्द आचरण, स्वच्‍छता,‍ सुशिक्षित होणे, ज्ञान संपादन करणे, जलसंस्कार, प्रदुषणाविरूध्द संस्कार, (जल, वात, ध्वनी, प्रदुषण), कर्तव्य, वाचन, कला, भाषा, परतत्व, लोकसंस्कृती जतन, प्रज्ञा, शील, करूणा आदी गोष्टींचा नवसंस्कारात समावेश करत ते शाळा कॉलेज, मंदिर, आश्रमातून शिकवले गेले पाहिजेत. अशा संस्कारांसाठी आजचे सर्व तथाकथित संत कुचकामी आहेत, असे नाईलाजाने म्हणावे लागते.
                              (याच नावाचा ब्लॉग 15 मार्च 2015 प्रकाशित झाला होता. त्याचा हा  दुसरा भाग. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

सांस्कृतिक भारत : गोवा





- डॉ. सुधीर रा. देवरे
            गोमांचल, गोपाकापट्टम, गोपकपुरी, गोवापुरी, गोमांतक इत्यादी प्राचीन गोव्याची पूर्वीची नावे आहेत. गोवा हे ऐतिहासिक संचित स्थान म्हणून ओळखले जाते.
            उत्तर काळात गोव्याचा उज्वल इतिहास दिसून येतो. इसवी सनच्या पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्य होते. नंतर कदंब, महालखेडच्या राष्ट्रकुट राजाचे अधिपत्त्य. चालुक्य व पुढे सिल्हारांचेही राज्य. 14 व्या शतकाच्या शेवटी यादवांचे राज्य. नंतर दिल्लीच्या खिलजीची स्वारी. गोव्यावर मुसलमानी अंमल सुरू झाला. वास्को द गामा यांनी 1498 मध्ये पोर्तुगाल ते भारत समुद्रमार्ग शोधला, गोव्यावर वारंवार छोट्यामोठ्या स्वार्‍या होत राहिल्या, अनेक पोर्तुगिज नागरिक भारत भूमीवर हळूहळू वस्ती करून राहू लागले. 1510 मध्ये अल्फान्सो द अल्ब्युकर्क याने विजयनगरच्या सम्राटाच्या मदतीने गोव्यावर स्वारी करून गोवा जिंकले. ख्रिस्ती पाद्री फ्रांसीस झेव्हिअरचे आगमन झाले. 1542 ला गोव्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतरास सुरूवात झाली. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात शिवाजी राजांनी गोव्याच्या आजूबाजूचा भूभाग जिंकला. 1947 भारतीय स्वातंत्र्यानंतरही गोवा पोर्तुगिजांकडे होते. गोवन नागरिकांनी गोवा मुक्‍ती आंदोलन करून 19 डिसेंबर 1961 ला गोवा पोर्तुगिजांच्या अधिपत्त्यातून मुक्‍त केले. गोव्याला दिव, दमन सोबत केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले गेले. 30 मे 1987 ला गोव्याला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली. गोवा भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम किनार्‍यावर स्थित आहे. गोव्याच्या उत्तरेस महाराष्ट्र व गोवा वेगळे करणारी तेरेखोल नदी आहे. दक्षिणेकडे कर्नाटकाचा कनारा जिल्हा, पूर्वेकडे पश्चिमघाट, पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. पणजी, मार्मा गोवा, वास्को, म्हापसा व पोंडा ही गोव्याची महत्वाची गावे आहेत. गोव्यात जवळजवळ 450 वर्ष पोर्तुगिज नियम होते.
            गोव्यात अनेक प्रकारची पारंपरिक लोकगीते प्रचलित आहेत. कोकणी गीते अभिजात अशा चार गटात दिसून येतात. या गीतात फुगडी आणि ढालो आहेत. दुसरा प्रकार देखणी हा आहे. हा नृत्य प्रकार पाश्चात्य आणि स्थानिक अशा सरमिसळीतून निर्माण झाला आहे. तिसरा प्रकार दुलपोड, चौथा मांडो. यात संगीत पाश्चात्य असते तर लय कोकणी दिसते. जवळजवळ 35 प्रकारच्या कोकणी गीतांत लोकगीतांचे वर्गीकरण करता येईल. त्यात वर ‍निर्दीष्ट केलेल्या गीतांसह बनवार्‍ह, दुवलो, फुगडी, कुन्नबी, लाऊनीम, ओवी, पालन्नम, ता‍घरी, तीयत्र, झागोर, झोती अशा प्रकारचे गीते आहेत.
            गोव्यातल्या कला आणि लोककला लक्षवेधी ठरतात. गोव्याला पूर्व जगातले रोम म्हटले जाते. गोव्याची लोकसंस्कृती, लोकगीते आणि ख्रिश्चन आर्कीटेक्चर मन वेधून घेते. घोडे मोंडी नावाचा नृत्य प्रकार हा हातात तलवारी घेऊन आणि पायाला घुंगरू बांधून ढोल आणि ताशांच्या नादावर केला जातो. या नाचातूर शूरवीरतेचे प्रदर्शन केले जाते. आपले पुर्वज कसे लढावू आणि शूर होते हे प्रदर्शित करण्यासाठी हा नाच असतो. मांडो हा भावनिक नृत्य प्रकार आहे. भजन, आरती आदी प्रकारात असणारा हा नृत्य प्रकार आहे. देखणी हा गाणे आणि नाचाचा संमिश्र प्रकार आहे. यात फक्‍त स्त्री नर्तिका असते. हा गीतबध्द नृत्य प्रकार घुमट या वाद्यावर होत असतो. या व्यतिरिक्‍त धनगर नृत्य, मुसळ नृत्य गोव्यात प्रचलित आहेत.
            गोव्यातील लोकवाद्य म्हणजे ढोल, मृदंग, तबला, घुमट, मादलेम, शहनाई, सुर्त, तासो, नगारा आणि तंबोरा हे आहेत. पोर्तुगिजांकडून आलेले पियानो, मांडोलीन आणि व्हायोलिन.

            गोव्याचे मुख्य अन्न तांदूळ आहे. डाळी, रागी व इतर धान्यांची लागवड होते. मुख्य पिक नारळ, काजू, ऊस, सुपारी आदी असून पोफळी, अननस, आंबे व केळी ही फळे गो्व्यात मोठ्या प्रमाणात पिकतात. अशा  उत्पादनातून अर्थलाभ होतो. गोव्याला भरपूर वनसंपदा लाभली आहे.
            राज्याच्या मुख्य केंद्रात कोलबा, कलंगुट, वाग्टोर तोर बागा, हरमाल, अंजुना, मिरा मार, समुद्र किनारा, बॉन जिझसचा बासिलिका, जुन्या गोव्यातील कॅथेड्रल चर्चेस, काविलम, मारडोल, मंगेशी, बंडोरदेवळे, अग्वादा, तेरेखोल, चापोरा, कागो द समा किल्ला, दूध साखर व हरवलेम हे धबधबे तसेच मायेम तलावाचा सुरम्य व देखणा परिसर आहे. चराओ येथील डॉ. सलीम अली पक्षी संग्रहालय पाहण्यासारखे आहे. तेरेखोल, चपोरा, बागा, मांडवी, झुआरी, साल, सालेरी, तालपोना व ‍‍गोलगीबाग या नऊ नद्या गोव्याच्या प्रमुख नद्या आहेत. पणजी, मडगाव हे गोव्याचे प्रमुख समुद्र किनारे असून जवळ जवळ एकुण 47 बीचेस गोव्याला लाभले आहेत. सर्वच बीचेसवर पर्यटक कायम गर्दी करत असतात.
            गोव्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3702 चौरस किमी असून राज्याची राजधानी पणजी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गोव्याची लोकसंख्या 1,457,723 इतकी आहे. गोव्याच्या प्रमुख भाषा कोकणी व मराठी या दोन्ही असून काही लोकभाषाही बोलल्या जातात.
            (या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात. महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या वेबसाईटवर महाभ्रमंती या विभागात सांस्कृतिक भारत या नावाचे माझे साप्ताहीक सदर सुरू झाले आहे. दिनांक 27 जून 2016 ला  प्रसिध्द झालेला हा लेख. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
संदर्भ सूची:
1) मराठी विश्वकोश, वार्षिकी 2005, प्रमुख संपादक: डॉ. श्रीकांत जिचकार, प्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
2. आंतरजालावरून (Internet) शोधलेली माहिती.
3. ढोल नियतकालिक, (अहिराणी, अंक क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि मराठी वार्षिकांक, दिवाळी 2002), संपादक: डॉ. सुधीर रा. देवरे
4. संदर्भ शोध सहाय्य: दर्शना कोलगे.