रविवार, ३१ जानेवारी, २०१६

माध्यम: लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का?





-         डॉ. सुधीर रा. देवरे
    वृत्तपत्रे, नियतकालिके, पत्रकार, पत्रकारीता़, न्यूज एजन्सीस, विविध टीव्ही न्यूज चॅनल्स या सर्वांमिळून माध्यम म्हणजेच मीडिया तयार होतो आणि या मीडियाला आपण आज आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ समजतो. मीडियाची ताकद खूप मोठी आहे. आतापर्यंत अनेकदा राजकीय नेत्यांची भ्रष्ट प्रकरणे मीडियाने बाहेर काढून लोकांना वेळोवेळी दिलासा दिला आहे. न्यायालय हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ. पण न्यायालयाला ठोस पुराव्यांशिवाय कोणाला सहजासहजी दोषी ठरवता येत नसल्याने न्याय मिळायला उशीर होतो. (आणि काही वेळा गुन्हेगार पुराव्या अभावी निर्दोष ठरतो.) म्हणून मीडियाचे महत्व अनन्यसाधारण व निर्विवाद ठरू पाहते. अशा पार्श्वभूमीवर माध्यमातलेही काही वाईट प्रकार, प्रवृत्ती डोके वर काढू लागल्यात. त्यांच्यावर बोलणेही आज तितकेच गरजेचे झाले आहे.
      अलिकडे अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर वाचायला मिळतात की ज्यांना कोणतेही बातमीमूल्य नसते. अशा बातम्या वाचून आपल्याला अचंबा वाटतो. या बातम्यांबाबत संशय येतो. ही बातमीच आहे की बातमी बनवण्यामागे काही देवघेव आहे असे वाटू लागते. एखाद्या कंपनीच्या एखाद्या वाहनाबद्दलचे कौतुक या बातमीत असते आणि त्याच वाहनाची मोठी जाहिरात आतील पानांवर पहायला मिळते. अथवा कुठल्यातरी निवडणुकीला उभ्या राहणार्‍या उमेदवाराचे स्वच्छ चारित्र्य त्याच्या फोटोसह या बातमीत विस्तृतपणे कथन केलेले असते. आणि दुसर्‍या दिवशी त्याच जागेवर त्याच्या विरोधी उमेदवारालाही तशाच पध्दतीने नावाजण्याची किमया या वर्तमानपत्रातून होताना दिसते. पेड न्यूज ही मिडियाला कलंकीत करणारी बाब आहे. याचा अर्थ मात्र असा नव्हे की संपूर्ण मिडिया आज अजिबात विश्वासार्ह राहिला नाही.
      व्यवसायाच्या अंगाने मोठी देवाणघेवाण आता टीव्ही चॅनल्समध्ये सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक चॅनल आणि उद्योजक यांच्यातील देवघेवीचा वाद चव्हाट्यावर आला. बातमी देण्यासाठी जसे पैसे लागतात तसे बातमी दडपण्यासाठीही पैसे लागतात अशाही काही बातम्या आहेत. आता वार्ताहर- पत्रकार नव्हे तर चॅनल आणि वृत्तपत्राचे संपादक-मालकच सौदा करतात आणि तोही काही कोटींचा असतो, अगदी करारपत्र करून.     चॅनल्स- वृत्तपत्रे म्हणजेच समग्र पत्रकारीता वा माध्यम. माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जात असला तरी तो आता शंभर टक्के विश्वासार्ह राहिला नाही. तिथेही अनैतिक आणि भ्रष्ट लोक घुसलेच. आता वृत्तपत्रे वाचायची की नाहीत आणि चॅनल्सवर बातम्या पहायच्या- ऐकायच्या की नाहीत इथून विचार करावा लागतो.
      बिहार विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एका जबाबदार आणि दरवर्षी पुरस्कार मिळवणार्‍या राष्ट्रीय न्यूज चॅनलवर बिहारची जातीय वर्गवारी एखाद्या संशोधन अहवालासारखी सांगितली जात होती. कोणत्या जातीचा कल कोणत्या पक्षाकडे राहील आणि मुस्लीम बहुल मते कोणकोणत्या भागात आहेत हे मोठ्या अभ्यासकाच्या आविर्भावात आणि नकाशावर खुणा करून मांडले जात होते.
      दुसरी गुजरात विधानसभेचा प्रचारादरम्यानची गोष्ट: विविध चॅनल्सवर कोण सत्तेत येईल यावर चर्चा झडत होत्या. एका चॅनलवर अशाच एका चर्चेत एक जेष्ठ पत्रकार गुजरातच्या मतदारांचे विश्लेषण करत होते. त्या विश्लेषणाचा मतितार्थ पुढील प्रमाणे होता:
      गुजरातमध्ये काँग्रेसच्या मतदानाची टक्केवारी घसरली आहे. ती वाढवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न करायला हवा. गुजरात मधला ‍दलित वर्ग काँग्रेसला मतदान करतो, मुस्लीमवर्ग काँग्रेसला मतदान करतो. पण अमूक अमूक क्षेत्रातला क्षत्रिय वर्ग जो मोठ्या प्रमाणात आहे तो काँग्रेसने जर आपल्याकडे वळवला तर काँग्रेसची टक्केवारी वाढू शकते... असे हे भाष्य आणि विश्लेषण. ते ही एका पत्रकाराचे. हे सगळे ऐकून सदर गृहस्थ पत्रकार आहेत की कोणी जातीयवादी नेता, अशा संभ्रमात आपण पडू शकतो. असे जातीयवादी आणि धर्मवादी विश्लेषण आज सर्रास सुरू आहे. खरे तर या पत्रकाराने असे सांगायला हवे होते, की काँग्रेस आपले म्हणणे तिथल्या नागरिकांना पटवून देण्यास असमर्थ ठरते. त्यांनी आपल्या जाहीरनाम्याचा प्रचार व्यवस्थितपणे करून मतदार वाढवावेत... असे काही म्हटले असते तर ते आपल्या संविधानाला धरून होते. पत्रकारच जर जातीय आणि धर्मिय विश्लेषण करू लागले तर भारताच्या लोकशाहीत हा अधर्म ठरतो.
      ज्याचा समाजकारण वा राजकारण यांच्याशी काहीही संबध नाही असा एखादा हिंदू धर्मगुरू एखाद्या व्यासपीठावरून नागरिकांना हुकूम देतो, की अमूकला मतदान करा आणि चॅनल्स अशा धर्मगुरूचा जनाधार न तपासता त्याला पुन्हा पुन्हा प्रसिध्दी देत राहतात. या उद्‍गारावर चर्चाही घडवून आणतात. एखादा मुस्लीम धर्मगुरू एखाद्या व्यासपीठावरून नागरिकांना हुकूम देतो की अमूकला मतदान करा आणि चॅनल्स अशा धर्मगुरूच्या वक्‍तव्यालाही पुन्हा पुन्हा दाखवत राहतात. या उद्‍गारावरही चर्चा घडवून आणतात. विविध धर्मातले धर्मांधळे लोक अधूनमधून आपली मुक्‍ताफळे उधळीत असतात. ती टीव्हीवरून प्रसारित होताच दंगलीसदृश्य वातावरण तयार होते. यावर न्यूज चॅनल्सवर पुन्हा चर्चा घडवून आणली जाते. उदाहरणार्थ, अलिकडेच एका शंकराचार्यांनी वक्‍तव्य केलं की, शनी हा देव नसून एक ग्रह आहे म्हणून त्याची पूजा करू नये. या दुर्लक्ष करण्याजोग्या भडक वक्‍तव्यावरही एका राष्ट्रीय चॅनलने ऊपरवाला देख रहा है या कार्यक्रमात आपला एक तास खर्च केला. या चर्चेत जे तथाकथित धार्मिक संत सहभागी झाले होते त्यांचा धुडगूस संसदेतल्या असभ्य आरडाओरडीपेक्षा तसूभरही कमी नव्हता.
      खरे तर अशा धर्मांध लोकांकडे चॅनल्स अ‍ाणि वृत्तपत्रांनी दुर्लक्ष करायला हवे. अशा लोकांना आणि त्यांच्या उद्‍गारांना प्रसिध्दी देऊ नये. त्यांची प्रक्षोभक विधाने वा भारताच्या सविंधानाला धक्का लागेल अशा भाष्याला प्रसिध्दी मिळायला नको. अमूक धर्मियांनी अमूकांना मतदान करावे असा फतवा काढणे हे आपल्या संविधान विरूध्द आहे. अशा भडक प्रक्षोभक आणि जाती- धर्माचा गैरफायदा घेणार्‍या लोकांना आपण अप्रत्यक्षरित्या मदत करत आहोत हे मीडियाच्या लक्षात यायला हवे. पण आपला टीआरपी वाढवण्यासाठी अशा आक्रस्ताळी विधानांना प्रसिध्दी देण्यासाठी चॅनल्समध्ये चढाओढ पहायला मिळते हे आपले दुर्दैव.
     मीडियातल्या काही वाईट प्रवृत्ती अधोरेखित करण्यासाठी हा लेख आहे. सलमान असो, संजय दत्त असो, जयललिता असो, अजून कोणी सेलिब्रिटी असो, जातीयवादी नेता असो की एखादा राजकीय नेता असो. अशा लोकांना शिक्षा झाली तर आपण कायद्याविरूध्द आहोत हे आपण आपल्या वागण्यातून रस्त्यांवर सिध्द करीत असतो. आणि त्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा मीडियाही सामील असतो ही अजून दुर्दैवी बाब आहे. अर्थात मीडियात सर्वत्र वाईटच आहे असे इथे दूरान्वयानेही सुचित करायचे नाही. मीडियामुळे अनेक वाईट गोष्टी उजेडात येऊन भ्रष्ट्राचाराला वाचा फुटली आहे. अशा चांगल्या गोष्टींसाठी मीडिया अभिनंदनासही पात्र आहे. त्यातील वाईट प्रवृत्तींवर आणि विरोधाभासी पत्रकारीतेवर प्रकाश टाकावासा वाटला म्हणून हा लेख प्रपंच.
      (लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

देह देवाचे मंदिर




- डॉ. सुधीर रा. देवरे

     देव कुठून येतात? देव कसे तयार होतात? देव हे आधी माणूस म्हणून जन्माला येतात का? चारचौघांसारखी जन्माला आलेली माणसं, देव होऊन असे कसे अजरामर होऊन जातात? देव ही प्रतिभावान माणसाची निर्मिती आहे का? देवाच्या नावाने प्रश्नच प्रश्न. पण हे प्रश्न प्रत्येकाला सतावत नाहीत, हाच खरा मोठा प्रश्न आहे.
      हा लेख लिहीत असताना एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली. प्रथितयश देवांनी कधीही जनसमुदायासमोर मोठमोठी प्रवचने दिली नाहीत. भाषणे केली नाहीत. खूप मोठे उपदेश कोणाला केले नाहीत. त्यांच्या घरात वा चौकात आठवडी वा मासिक सत्संगाचे कार्यक्रम आयोजित केल्याची कुठे नोंद नाही. त्यांनी स्वत: कीर्तने केली नाहीत. लेख लिहिले नाहीत. ओव्या लिहिल्या नाहीत. अभंग लिहिले नाहीत. ग्रंथ लिहिले नाहीत. (तरी ते ग्रंथांचे विषय झाले.) संस्कार शिबीरे घेतली नाहीत. आपला धर्म संकटात आहे, असे त्यांना वाटले नाही. आणि त्यांच्या मृत्यूनंतर मंदिर बांधून तिथे दानपेट्या ठेवा असेही त्यांनी सांगितले नाही. तरीही ते देवत्वाला पात्र ठरले. देवत्वाच्या पदापर्यंत पोचले. लोकांनी त्यांना देवत्व बहाल केले. लोक त्यांना देव म्हणू लागले. ते का? असे नेमके काय काय घडत गेले त्यांच्या आयुष्यात की ते माणसाचे देव झाले. त्यांच्या मृत्यूनंतर नव्हे, त्यांच्या हयातीतच ते देव झाले होते. म्हणजे हयात असतानाच लोक त्यांना देव म्हणू लागले होते, ते जेव्हा सर्वसामान्य माणसांसारखे चालते बोलते फिरते व्यक्‍तिमत्व होते. ते कुठल्या मंदिरात जाऊन राहात नव्हते. हिमालयात जाऊन राहात नव्हते की कुठे जाऊन तपश्चर्या करून परत आले नव्हते. समाधी लाऊन बसत नव्हते. यज्ञ याग करत नव्हते. भगवे कपडे परिधान करत नव्हते. दाढी- डोक्याचे केस वाढवून संतत्वाचे प्रदर्शन करत नव्हते. मग ते लोकमानसात देव का ठरावेत? काही देव अतिमाणुष असल्याचेही आढळते.
      प्रथितयश देव हे त्यांच्या दैनंदिन कृतीतून विकासपावत देव होत गेले. देव घडले.  हे खरे सत्य आहे. आपल्या कृतीतून त्यांनी लोकांना देवत्वाचा वास्तव दृष्टांत दिला. परोपकार आपल्याला देवत्वाकडे घेऊन जातो. माणसाला आपल्या आयुष्यातील काही कृतीतून देवत्वापर्यंत पोचता येते हेच त्यांनी सर्वसामान्य लोकांना आणि तथाकथित देवाचे देव्हारे माजवणार्‍यांनाही दाखवून दिले हे सत्य आहे. असे कृतीतून देव होत जाणे साधी सोपी गोष्ट नाही. (पण आपण काय केले? अशा देव माणसांचे मंदिरे बांधून मोकळे झालो. मंदिरांतून कधीही मंदी नसलेला व्यवसाय सुरू केला.)  
      माणसाला एकुलते एक आयुष्य मिळते. त्यातील जवळजवळ निम्मे आयुष्य माणूस झोपेत असतो. त्यातील काही बालपणात निघून जाते. उरलेल्या निम्या आयुष्यात माणसाला स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही. काहीतरी मिळवणे हे ध्येय. उद्याचे सुख मिळवण्यासाठी रोज दुखं पचवायचे असे हे आयुष्य. मोहाने माणूस माणूसपणात राहात नाही. देव ही तर फार लांबची गोष्ट झाली. इथे देव व्हायला कोणाला वेळ आहे. वयात येताच वासना डंख मारते. अहंकार मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही. कोणाला जातीचा अहंकार असतो. कोणाला धर्माचा अहंकार असतो. कोणाला सत्तेचा अहंकार असतो तर कोणाला श्रीमंतीचा अहंकार असतो. काहींना तर आपल्या ज्ञानाचा सुध्दा अहंकार असतो. अहंकार पचवणे ही साधी सोपी गोष्ट नाही. अहंकार पचवला तो देव झाला.
      व्देषावर विजय मिळवणे ही साधी सोपी गोष्ट नाही. माणूस व्देषाला पावलोपावली बळी पडू शकतो. चारचौघातल्या व्देषाविषयी मी मुळीच बोलत नाही. व्देष हा खूप आत दबा धरून बसलेला असतो आणि तो उथळ कारणानेच उफाळतो असेही नाही. अगदी आतल्या आणि सबळ कारणाने व्देष मानसिक पातळीवर फणा काढू शकतो. अशा व्देषाला बाहेर निघायला जागा सापडली नाही तर भयंकर विकृत घटना घडू शकतात. क्रोधाचेही तसेच. क्रोधाने जगात अनेक वाईट घटना घडतात. त्या आपण वर्तमानपत्रातून आणि न्यूज चॅनल्सवरूनही रोज वाचतो- पाहतो. वरवरचा असलेला क्रोध मनुष्य टाळू शकतो पण आत साचलेला क्रोध कशानेही नाही जाऊ शकत.
      या सगळ्या गोष्टींना सहज हद्दपार करणारा माणूस देव होत जातो. ही हद्द पार करणे ज्याला शक्य होते, जो मरणात जीवन जगतो. म्हणजे आपण पुढच्या क्षणाला अस्तित्वात राहणार नाही तर आपल्या खिशातले हे हजार रूपये आपल्याला काय उपयोगाचे, हा विचार करता आला पाहिजे. जो आपल्याला करता येत नाही. आपण पुढच्या क्षणाला अस्तित्वात नसणार आणि आपली मुलं कोण सांभाळेल ही चिंता ज्याला नाही. खरे तर आपल्याला पुढच्या क्षणाची शाश्वती नाही आणि आपण उद्याच्या आर्थिक व्यवहारांचा विचार का करीत असतो. माझ्याकडे जो याचक आला आहे, तो आता या क्षणाला भुकेला आहे आणि मी सेवानिवृत्तीनंतर माझ्याकडे मृत्यूपर्यंत कसे पैसे शिल्लक राहतील म्हणजे मी कोणाकडे हात न पसरता दोन वेळचे जेवण जेऊ शकेल याचे नियोजन करतोय, म्हणून मला देव होणे कदापि शक्य होणार नाही.
      राजकारण हा ही एक घटक आपल्याला देवत्वापासून रोधून धरतो. राजकारण म्हणजे काय? राजकीय पक्षांचे जे राजकारण चालते त्याबद्दल नाही बोलत. दोन माणसांच्या संबंधात जे राजकारण चालते त्या राजकारणाबाबत बोलतोय. मला एखाद्या मित्राचे वागणे पटत नाही तरी मी त्याला तोंडावर सांगतो की तुझा स्वभाव छान आहे, हे राजकारण आहे. एखाद्याचे वागणे बोलणे मला मनापासून आवडते पण मी ते कबूल करत नाही हे राजकारण आहे. एखाद्याचे यश मला हुलकावणी देते. त्याचे यश माझे दुख आहे आणि तेच यश जर मला मिळाले असते तर लोकांना ते आवडावे असे मला वाटते हे राजकारण आहे. जे मान्य करू नये ते मी मान्य करतो आणि जे मान्य करायला हवे ते मान्य करत नाही, हे राजकारण आहे. मी कोणाला दुखवू नये म्हणून त्याला नावाजत राहतो, हे राजकारण आहे. आणि ज्याला दुखवायला नको त्याला दुखावले जाते हे राजकारण आहे. या राजकारणातून माणूस देव होऊ शकत नाही. माणूस फक्‍‍त माणूस राहतो. खरे तर तो नैसर्गिक माणूसही राहत नाही मुळात. माणसाची बुध्दी ही यावेळी वरदान नव्हे तर शाप ठरत असते. बुध्दी नसलेला माणूस वा फक्‍‍त आजचाच विचार करणारा माणूस नैसर्गिक जीवन छान जगताना दिसतो. त्याच वेळी बुध्दीवान माणूस आतल्याआत आपणच दाह निर्माण करत जगताना दिसतो. ज्या गोष्टींचा कधी विचार करू नये, ज्यांचा कधी हेवा करू नये त्या गोष्टी करत राहणे हे राजकारण आहे. वासनेचेही तसेच. सारांश, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ या षड्‍ रिपूंच्या पाशात पूर्णपणे अडकलेल्या माणसाला देव होणे कदापि शक्य नाही.
      आपल्याला झाडांत देव पाहता येतो. निसर्गात देव पाहता येतो. माणसात देव पाहता येतो. एखाद्या माणसाच्या चरित्रातही देव पाहता येतो. ऐतिहासिक पुरूषात देव दिसू शकतो. संतांच्या कृतीत तर देव असतोच. देवाच्या मुर्तीतच फक्‍‍त देव असतो असे नाही. मंदिरातच फक्‍‍त देव असतो असे नाही. पूजेतच फक्‍‍त देव असतो असेही नाही. रोज मंदिरात जाणार्‍यांना, रोज पूजा करणार्‍यांना, देवाला फुले अर्पण करणार्‍यांना- मुर्तीला अभिषेक करणार्‍यांना, पारायणे करणार्‍यांना, यज्ञ विधी करणार्‍यांना, कपाळावर गंधटिळा लाऊन मिरवणार्‍यांना, सत्यनारायण घालणार्‍यांना, चारीधाम करणार्‍यांना, वा देवाच्या दानपेटीत पैसे टाकणार्‍या आदी लोकांनाच फक्‍‍त आपण आस्तिक म्हणतो की काय? असे क्रिया- विधी करणारे लोक कदाचित आस्तिक असतीलही, पण असे कर्मकांड न करणारे लोकही आस्तिक असतात.
      दररोज कर्मकांड करत देव भजणारे लोक विशिष्ट प्रकारच्या भीतीने ग्रस्त होऊन देवपूजा करतात की काय. भीतीमुळे कोणी देव भजत असेल तर तोही एक स्वार्थच असतो. देवा मला सुखी ठेव, असे म्हणताना इतरांचे काहीही होऊ दे असा प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येऊ शकतो. इथे देवाला भजणारा माणूस फक्‍‍त स्वत:साठी भजतो. लोकांसाठी नव्हे. आपण सगळ्या वरवरच्या व्यवहाराला पहात असल्याने आपल्या आस्तिकतेच्या कल्पना संकुचित झाल्या आहेत. कर्मकांडाच्या जखड्यात अडकलेल्यांना आपण आस्तिक म्हणतो आणि बाकीच्यांना नास्तिक ठरवून मोकळे होतो. संतांच्या आणि देवांच्या चमत्कारातही देवत्व नसते. देवत्व हे वागण्यातून- कृतीतून दिसत असते. एखादा थोर माणूस त्याच्या कर्माने देव पदाला पोचतो आणि नंतरचे त्याचे भजनी मंडळ आपल्या पोटासाठी त्याच्या देवपणाची जाहिरात करू लागते.
      माणूस देव होत जातो तेव्हा त्या हाडामांसाच्या माणसात काय बदल होत असतील? त्यावेळी त्याच्या मेंदूपासून हृदयापर्यंत सगळे काही ठीक नसणारच. माणूस देव होतो तेव्हा माणसाच्या त्यागाची कल्पनाही करवत नाही. सगळे माणूसपण गुंडाळून देवपणाला सामोरे जाणे ही साधीसुधी घटना नाही. अहंकार, वासना, लोभ, सत्ता, राजकारण (सूक्ष्म अर्थाने), विकार, विचार, विवेक, बौध्दीक क्षमता, प्रतिकार क्षमता यांचा त्याग करणे म्हणजे दुसरा मृत्यूच. देहात राहून विदेही होत वैदेही वावरणे हे एखाद्या शतकात कधीतरी कोणाला तरी कुठेतरी जमते. ह्या रोज रोज होणार्‍या घटना नसतात. आणि म्हणूनच अशा विशेष मानवासमोर सर्वसामान्य माणसाचे दोन हात नमस्कारासाठी आपोआप जोडले जातात. ज्याला हात जोडले जातात आणि जो हात जोडतो त्या दोघांच्या देहात देव आहे. देह देवाचे मंदिर असते.
      अशा अनेक विशेष देव माणसांचे देवपण ओळखून त्यांना देवपण देणारा या पृथ्वीतलावरचा माणूसही मनाने तितकाच थोर आहे, हे ही आपल्याला मान्य करावे लागेल.
      (लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/