सोमवार, ३० जून, २०१४

प्रमाणपत्र कोणाकडे मागावे?



 
- डॉ. सुधीर रा. देवरे

       समजा तुम्ही प्रामाणिक, निर्व्यसनी, निष्कलंक आणि आपल्या तत्वांशी तडजोड न करणारी व्यक्‍ती आहात. तुमच्या आजूबाजूला सगळेच नाही, मात्र काही संधीसाधू लोक आहेत. स्वार्थासाठी ते कोणत्याही तडजोडी करायला तयार असतात. म्हणून अशा लोकांपासून तुम्ही कायम सुरक्षित अंतर ठेऊन असता. अशा लोकांनाही तुम्ही कायम थोडे दूर राहिलेले सोयिस्कर असते. तुम्ही या सर्व लोकांबरोबर व्देषाने नव्हे, पण तार जुळत नसल्यामुळे दूरत्वाने वागता. यामुळे तुमच्यामध्ये साहजिकच भावनिक अंतर वाढत जाते. हे अंतर कमी होण्याऐवजी गैरसमजातून दिवसेंदिवस वाढत राहते.
         अशा वेळी तुमच्या कुटुंबातील एखादा नाजूक संबंध घडताना तुमचा एखादा असा सहकारी अचानक तुमच्याजवळ येतो. आणि तुम्हाला सांगतो. अमूक एका नंबर वरून मला एक फोन आला होता आणि ती व्यक्‍ती मला तुमच्याबद्दल विचारत होती की अमूक एक व्यक्‍ती म्हणजे तुम्ही कसे आहात? तुमचा स्वभाव कसा आहे? यावेळी अशा एखाद्या व्य‍‍‍क्‍तीकडून हे ऐकून तुमच्या मनाची अवस्था काय होईल? तुम्ही काय सांगितले त्यांना? असे विचारण्याची हिम्मत तरी करू शकाल का तुम्ही? ज्या व्यक्‍तीशी आपल्या विचारांची तार कधीच जुळली नाही. उलट आपली चिडचिडच वाढली आहे, अशी व्यक्‍ती आपल्याबद्दल कोणाला चांगले सांगू शकेल का? चांगले सांगूही शकेल पण त्या चांगल्याचे प्रमाण काय राहील? आणि वाईटाचे प्रमाण काय असेल?
         सोबत दारू पिणारे, सोबत पार्ट्या करणारे, सोबत तंबाखू खाणारे, सोबत भ्रष्टाचार करणारे, सोबत निंदानालस्ती करणारे, स्वस्त प्रसिध्दीसाठी उथळ कार्यक्रम करणारे, टाइमपाससाठी गेट टुगेदर करणारे वा चालता बोलता फालतू राजकारण खेळणारे लोक एकमेकांना सांभाळून घेतात. अशा संबधांच्या वेळी एकमेकांबद्दलची ते चांगली माहिती देऊ शकतात. पण तुम्ही त्यांच्या टोळक्यात नसल्यामुळे तुमच्या बाबत कोणाला चांगले सांगितले जाईलच याची खात्री नाही. कारण त्यांच्या मते तुम्ही त्यांच्यासारख्या लोकांत मिसळत नाहीत, म्हणजे त्यांच्यानुसार तुम्ही समाजात मिसळत नाहीत.
         आणि आपल्या बाजूने विचार केला तर ज्याला आपण आपल्या सोबत घेण्याचाही कधी विचार करणार नाही अशा व्यक्‍तीकडे तुमच्या चांगुलपणाचे प्रमाणपत्र कोणी मागत असेल तर तुमची मनोवस्था काय होईल? अशा माणसांनी यापुढे तरी आपल्याबद्दल कोणाजवळ चांगले बोलावे म्हणून यावेळी तुम्ही तडजोड करण्याचा विचार करू शकता. पण या मागच्या काळात झालेल्या तुमच्या नुकसानाचे काय करायचे? हा प्रश्न मागे उरतोच. खरे तर अशी अवस्था आपल्या शत्रूचीही कधी होऊ नये.
         शिखराएवढ्या उंच माणसाच्या स्वभावाविषयीचे प्रमाणपत्र कोणी एखाद्या मुंगीएवढ्या खुज्या माणसाकडे मागितले तर काय होईल? माणसाला माणसासारखा माणूस समजणे तर सोडाच, त्याच्या विशालपणाचा आवाका न कळल्यामुळे ही मुंगी माणसाला राक्षसही समजू शकते!
         कोणाचे प्रमाणपत्र कोणाकडे मागावे याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. आणि प्रमाणपत्र देणार्‍यानेही ते विचारपूर्वक दिले पाहिजे. पण विचार असला तरच ते विचारपूर्वक दिले जाऊ शकते ना.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १४ जून, २०१४

पर्यावरण दिन उरला शुभेच्छा देण्यापुरता




- डॉ. सुधीर रा. देवरे

       नुकत्याच येऊन गेलेल्या पर्यावरण दिवसाच्या मुहुर्तावर मला एक एसेमेस आला: जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!  एसएमएस वाचून मी उडालोच. पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा? फक्त शुभेच्छा? शुभेच्‍छा दिल्या की आपले काम संपले. मग त्या पर्यावरणाचे वास्तवात काहीही होवो. वर्षातून फक्त एक दिवस जागृत राहून जागतिक पर्यावरण टिकेल काय?
         एका न्यूज चॅनलने गंगा शुध्दीकरण अभियानासाठी अशीच एसेमेस का फक्‍त मिस कॉल योजना राबवली आहे. आतापर्यंत किती मिस कॉल आलेत हे सांगताना ते चॅनल म्हणते, आजपर्यंत अमूक इतके लोक गंगाशुध्दीकरणाशी जोडले गेलेत!. मिस कॉल दिला की आपले काम संपले. फक्‍त एका मिस कॉलने गंगा शुध्द करता येत असेल तर आतापर्यंत शासनाने काही हजार कोटी रूपये खर्च करण्याचे कारण काय? आणि तरीही गंगा अजून अशुध्दच आहे. आपल्या फुकटच्या मिस कॉलने गंगा आता शुध्दच झाली असे समजणारे लोक आणि चॅनल वरून अमूक इतक्या लोकांचा मिस कॉल आकडा सांगितला की झाले आपल्या चॅनलचे काम. इतके हे पर्यावरणाचे काम सर्व बाजूने सोपे आणि स्वस्त झाल्याचे दिसते.
         पर्यावरण दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्र्याने सर्व मंत्र्यांना रोपट्यांची एकेक कुंडी भेट दिली. पंतप्रधानांना सुध्दा कुंडी भेट ‍देताना चॅनलवाल्यांनी दाखवले. पण त्या कुंड्यांचे पुढे काय झाले हे कोणालाच कळले नाही.
         आज सर्वत्र चमको संस्कृती रूजल्यामुळे दाखवण्यापुरते म्हणजेच प्रसिध्दीपुरते काम चमकवले जाते. नंतर त्या कामाचे काय होते याचे प्रसिध्दी मिळवणार्‍यांना जसे घेणे देणे नाही तसे प्रसिध्दी देणार्‍यांना देणे घेणे नाही. पर्यावरण दिवसाच्या मुहुर्तावर वृक्षरोपण करायचे आणि त्याचे संगोपन वार्‍यावर सोडून द्यायचे असे सर्वत्र चित्र दिसते. या पार्श्वभूमीवर मात्र जे लोक खरोखर पर्यावरण टिकवण्यासाठी प्रयत्न करतात ते अशा स्वस्त प्रसिध्दी पासून कितीतरी कोस लांब राहतात आणि त्यांचा प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिन असतो. मात्र अशा लोकांची दखल आपण होऊन मिडिया कधीच घेत नाही.
         सारांश, पर्यावरण दिन आता फक्त शुभेच्छा देण्यापुरताच उरला असे दिसते! म्हणून आपल्या जवळपास कायम चांगले पर्यावरण असो अशा शुभेच्छा देऊन थांबतो.


   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/