शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

गांझोल्यांचा पोळा





 - डॉ. सुधीर रा. देवरे

            मागच्या दारातून पुढच्या दारी येण्यासाठी एक बोळ होता. ओसरीत पाव्हणे रावळे असले तर मागच्या दाराने निघून पुढच्या दारी येता येत असे. ओसरीत आण्णा असले तर खेळायला जाण्यासाठी मागच्या दाराने मी हळूच निघून जात असे. ह्या बोळातून तसे खूप लोक वापराचे. विशेषत: स्त्रिया. बोळाच्या दोन्ही बाजूच्या भिंती मातीच्या रद्दयाच्या म्हणून त्या भिंतीना मोठमोठे नळे आणि भगदाड पडलेले होते.
      अशाच एका नळ्यात गाझोंल्यांचा (गांधील माश्यांचा) पोळा तयार झाला होता. हा नळा मोठ्या माणसांच्या डोक्याइतक्या उंचीवर होता. होता होता या गांझोल्यांचा पोळा खूपच वाढला. बोळातून वापरणार्‍यांना गांझोल्यांनी नको नको करून सोडले होते. कोणाच्या हाताला माशी चावायची तर कोणाच्या मानेला. कोणाच्या कानाला चावत असे तर कोणाच्या ओठाला. तिकडून वापरणार्‍यांची संख्याही कमी होऊन गेली. लोक फिरून फारून लांबच्या रस्त्याने वापरायला लागलेत.
      मी गोट्या गोट्या खेळण्यासाठी बोळातूनच हळूच सटकून जायचो. एकदा मलाही गांझोल्यांनी मानेवर डंख मारला. त्या डंखामुळे मी त्या दिवसापासून गांधीलमाश्यांच्या मागे लागून गेलो. त्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी येताजाता त्या नळ्याला मी दगड मारत रहायचो. एकदा शेनच मारून फेकले. पण त्या तिथून काही जात नव्हत्या. थोड्या उठायच्या. इकडे तिकडे गोल गोल उडत रहायच्या आणि पुन्हा नळ्यात येऊन बसायच्या.
      एकदा मला एक युक्‍ती सुचली. चिखलाचा गोळा तयार करून नळा हळूच बाहेरून लिंपून देऊ असे मला सुचले. मी ही युक्‍ती लगेच अमलात आणली. दुपारची वेळ होती. आजूबाजूला कोणी नव्हतं. मी चिखलाचा गोळा तयार करून नळ्याजवळ गेलो. हळूच चिखलाचा गोळा नळ्यात दाबायला लागलो. पण नळा माझ्या उंचीपेक्षा वर असल्याने माझा हात नीट पुरला नाही. अर्ध्या नळ्यापर्यंत चिखल गेला आणि वरचा अर्धा नळा उघडाच राहिला.
       काय होतंय हे कळायच्या आत सर्व गांधीलमाश्या घोंघावत झपकन बाहेर निघाल्या आणि माझ्या संपूर्ण तोंडावर येऊन बसून कडाकड चावू लागल्या. मी जोरजोरात ओरडत होतो. दोन्ही हातांनी तोंडावरच्या गांझोल्या काढून खाली फेकायला लागलो. म्हणून हातांनाही त्यांनी चावले. कोणीच मदतीला आलं नाही. दुपारची वेळ असल्याने जवळपास कोणी नव्हत. चावून चावून केव्हातरी त्या थकून उडून गेल्या. संपूर्ण तोंडाची खूप आग व्हायला लागली. तसाच धडपडत मागच्या दाराने घरी गेलो. आरश्यात तोंड पाहिल तर मी मलाच ओळखू येत नव्हतो. तोंड सुजून फुगून लाल झालं होतं. मी कोणाला दिसणार नाही असं कपड्यांच्या बंगळीवर येऊन झोपून घेतलं. मी असा का झोपलो म्हणून आईने पाहिलं. माझं सुजलेलं तोंड पाहून ती ही घाबरली. गांझोल्यांनी चावलं म्हणून आईने माठाखालचा गाळ काढून माझ्या तोंडाला लावला. तेव्हा कुठे थोडासा थंडावा वाटला. पण तोपर्यंत तोंडातून गरम वाफा बाहेर येत आहेत असं मला वाटत होतं. तीन चार दिवस शाळा बुडवली. घरीच राहिलो. चारपाच दिवसात सुज थोडी कमी होत होत उतरली.
      आता मी गांझोल्यांचा काटा काढण्यासाठी वेगळी युक्‍ती काढली होती. गोट्या गोट्या खेळण्यात मी तरबेज होतोच. गपकन नेम धरून ढाई मारून देत होतो. म्हणून माझ्याजवळ भरपूर गोट्या साचल्या होत्या. मी सर्व मित्रांना सांगितलं, जो इथल्या जितक्या गांझोल्या मारेल त्याला मी तेवढ्या गोट्या देईन. लगेच या घोषणेचा परिणाम झाला. पुढच्या दाराच्या गटाराजवळ माशा एकेक करत पाणी प्यायला यायच्या. ज्या मुलांची पोळ्याजवळ जायची हिमंत होत नव्हती, ते गटारीजवळ माशी दिसली की मारायचे आणि माझ्याकडून गोटी घ्यायचे. तेव्हापासून चारपाच दिवसातच दहा बारा माशा मित्रांनी मारल्या होत्या.
      हे माझे गांझोल्या मारण्याचे फर्मान मित्रांकडे जिकडे तिकडे होऊन गेलं होतं. हे दुसरी गल्लीतल्या कैलासच्या कानावर गेलं. आणि तो आमच्या गल्लीत आला. बोळात जाऊन तो पोळाही पाहून आला. अणि मग मला म्हणाला, मी सगळा पोळा काढी टाका ते तू माले काय दिशी बोल?
मी म्हटलं, वीस गोट्या देईल. तो म्हणाला, पंचवीस देशील का बोल? मी म्हणालो, हो. पण तो नळाही चिखलाने तुलाच बुजवून द्यावा लागेल. तो म्हणाला, हा चाल माले कबूल शे. मी थोड्या वेळात येतो असे सांगून तो निघून गेला. आम्ही गोट्या गोट्या खेळायला लागलोत. तेवढ्यात तिकडून कैल्या लगेच आला. चंद्रयाच्या फाटीला दोन तीन फडके बांधून त्यावर रॉकेल ओतून ते तो हातात घेऊन आला होता. दुसर्‍या हातात काडीपेटी होती. त्याच्या खांद्यावर फाटका टवेल होता. त्याने तो टेंभा आमच्या समोर पेटवला. तोंडावर टॉवेल टाकून घेतला आणि गेला बोळातील नळ्याजवळ. आम्ही दुरून गमंत पहात होतो. त्याने टेंभा नळ्यावर धरला आणि चर चर असा आवाज करत पोळा जळायला लागला. गांझोल्या पेटून जळत जळत खाली पडायला लागल्या. काही उडून गेल्या. कैलासने सर्व नळा टेंभ्याने शेकून काढला. खाली अर्धवट जळालेल्या आणि अर्ध्याअधिक जळून मरून पडलेल्या गांझोल्यांचा असा गंज पडला होता. हे काम आटपून कैलासने गटारमधलाच गाळ काढून त्याने तो मातीत कालवला आणि त्या चिखलाने नळा बुंजून दिला. इतके सारे त्याने एकट्याने करूनही त्याला एकही माशी चावली नाही हे पाहून मला आश्चर्य वाटलं.
      त्याला मी पंचवीस गोट्या लगेच मोजून दिल्या. आता तिथे गांझोल्यांचा पोळा नाही, असं ज्याला ज्याला कळलं तो तो त्या बोळाने पुन्हा वापरायला लागला.
      आजच्या दहशतवादी बातम्या ऐकल्या की मला तो लहानपणातला गांझोल्यांचा पोळा आठवतो. तो पोळा म्हणजे आजचा दहशतवाद. तेव्हा आमच्या गावाला ग्रामपंचायत होती. पण हा पोळा पंचायतीने काढला नाही. त्यांनी काढावा असा विचारही आमच्या मनात आला नाही. आम्ही तसा अर्ज दिला नाही. किंबहूना अस काम ग्रामपंचायतीच असत, अस माझ्या वयाएवढ्या मुलालाच काय पण मोठ्या माणसांनाही माहीत नव्हत. मी तो स्वयंस्फुर्तीने काढला. तसा आजचा दहशतवाद निपटून काढण्यासाठी सरकारवर आपण किती अवलंबून रहायच? आपल्याने जेवढ जिथे जिथे होईल तसा आपण दहशतवाद निपटण्याचा प्रयत्न करून पाहू. मग सरकारच कामही थोडेस सोप होऊन जाईल.
            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

सत्ता सर्वत्र पुज्यते




-डॉ. सुधीर रा. देवरे

      विव्दान सर्वत्र पुज्यते! असा सुविचार आपल्याला सर्वत्र वाचून-ऐकून बालपणापासून पाठ असतो. संस्कृतीचे गोडवे गातानाही हे ब्रीद नेहमी अधोरेखीत केले जाते. मात्र वास्तवात सर्वत्र विव्दान पुजला जात नाही हे सत्य आहे. निदान याचा प्रत्यय तुलनेने तरी निदर्शनास येत असतो. सत्ता सर्वत्र पुज्यते! हा अनुभव मात्र सर्वत्र सर्वदूर दिसून येईल. बालपणाच्या पोपटपणातून आपण जसजसे वयाने, अनुभवांनी, विचारांनी आणि ज्ञानाने मोठे होत जातो तसतसे आपल्याला वास्तवाचे भया रूप दिसू लागते आणि आपण सुविचारांच्या भोळ्या भाबड्या जगातून खडबडून जागे होतो. सर्वत्र सत्ताच पुजली जाते हे कटू सत्य आहे. शिकून विव्दान झालेल्या माणसाला समाजात स्थान नाही. तो आपल्या पोटापाण्यासाठी कोणती नोकरी वा कोणता व्यवसाय करतो याला जास्त महत्व दिले जाते. मग त्या व्यवसायाचा आणि प्रत्यक्ष त्याच्या सामाजिक भूमिकेचा ती व्यक्‍ती जाणीवपूर्वक काहीही संबंध येऊ देत नसली तरी समाज नेहमी खुर्चीला शरण जात असतो.
            एखादा युवक आयएएस, आयपीएस वा एमपीएससी असला तरी समाजात त्याचा सर्वत्र सत्कार केला जाईल. समाजात त्याच्याबद्दल आदर निर्माण होतो. तो सन्माननिय ठरत असतो. मग तो युवक कितीही आत्मकेंद्रीत आणि पोटार्थी असो. सामाजिक बांधिलकीशी त्याला काहीही देणेघेणे नसो वा तो आपल्या नोकरीत भ्रष्ट कामे करीत असो. या उलट एखादा युवक ज्ञानाने उच्चविद्याविभूषित होऊन प्रपंचासाठी तृतीय-चतुर्थ श्रेणीतील नोकरी वा अन्य व्यवसाय पत्करून सामाजिक उत्थापनासाठी काही कार्य करीत असेल, समाजाला नवीन दृष्टीको देत असेल, प्रबोधन करीत असेल तर अशा माणसाला समाजात - या व्यवस्थेत मानाचे स्थान मिळत नाही. याचे कारण त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची तथाकथित सत्ता नसते. विचारवंताला आपल्या व्यवस्थेत स्थान नाहीच. उलट विचारवंत जाणीवपूर्वक अलक्षित-दुर्लक्षित केले जातात.
            एखाद्या संशोधकाने वीस-पंचवीस वर्ष सखोल अभ्यास करून एखादे सैध्दांतिक मत मांडले वा संशोधनात्मक प्रबंध लिहिला तर वृत्तपत्रात पाचव्या-सहाव्या पानावर त्यांची पाच- सहा ओळीत संक्षिप्त अशी काहीतरी बातमी छापून दखल घेतल्यासारखे दाखवले जाते. अशी बातमी दूरचित्रवाणींच्या वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होणारच नाही, झालीच तर ती कोणाला कळणार नाही, इतक्या संक्षेपाने होईल. मात्र-
            एखाद्या दुय्यम-तिय्यम राजकीय पुढार्‍याने एखाद्या प्रचार सभेत एखादे भडक वा विवादास्पद विधान केले तर वृत्तपत्रे ती बातमी पाहिल्या पानावर अर्धेपान देऊन छापून अशा शिवराळपणाला अनाठायी प्रसिध्दी देतील. अनेक टीव्ही चॅनल्सवर तावातावाने अशा उद्‍गारावर चर्चा होतील.
            राजकीय पुढार्‍यांनी साहित्य संमेलनांपासून - संमेलनांच्या मंचापासून दूर रहावे असे दुर्गा भागवतानी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ठणकावून सांगितले नसते तर आज साहित्य संमेलनातील व्यासपीठे साहित्यिकांपेक्षा राजकीय नेत्यांनीच व्यापलेल दिस असत. यदाकदाचित राजकीय नेत्यांतले किंश्चिंत साहित्यिक लोकच अध्यक्ष म्हणून निवडून आले असते. नाहीतरी आजही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बर्‍याचदा दुय्यम दर्जाचा निवडून येतो. म्हणून काही व्रतस्थ आणि तत्वाधिष्ठित साहित्यिक अशा अध्यक्ष पदाच्या भानगडीत पडत नाहीत.
            गावागावात होणार्‍या इतर छोट्या मोठ्या साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांचीच प्रामुख्याने व्यासपीठांवर हजेरी लागल्याचे दिसते. मान्यवर साहित्यिक श्रोत्यांमध्ये बसलेले दिसतात तर स्थानिक राजकीय सत्ताधारी, लोकप्रतिनिधी, थातूरमातूर संस्थेचे अध्यक्ष आणि देणगी देणारे दानशूर यांनी साहित्य संमेलनाचा मंच व्यापलेला दिसतो.
            अशा दुय्यम -तिय्यम राजकीय पुढार्‍यांची उपस्थिती सदर कार्यक्रमाला नसली तर सत्तेतली दुसरी फळी व्यासपीठावर बसवून व्यासपीठाला तथाकथित वजन आणण्याचा प्रयत्न केला जातो. या दुसर्‍या फळीत प्रशासकीय सवेतील ‍अधिकारी असतात. म्हणजे दुय्यम का होईना व्यासपीठावर प्रशासकीय सत्ताकेंद्राचा समावेश होतो. सारांश, ज्यांच्याकडे सत्ता आहे वा नावाबरोबर सत्ताकेंद्राचा उल्लेख करता येईल अशी खुर्ची आहे, अशांना अनाठायी महत्व प्राप्त होऊन कलाक्षेत्रातल्या वा साहित्य क्षेत्रातील व्यासपीठांवर त्यांचा उदोउदो केला जातो. अशा सत्ताकेंद्राचा फायदा संमेलने आयोजित करणार्‍या आयोजकांना वेगळ्या प्रकारे करून घ्यायचा असतो आणि तो करून घेण्यासाठी ते मागेपुढे पहात नाहीत. अशा फायद्यासाठीच आपल्याला निमंत्रित करण्यात आले होते, म्हणून आयोजकांचे काम करून देणे आपले कर्तव्यच आहे, अशा समजातून सत्ताकेंद्रही त्यांना अधिकारबाह्य सहकार्य करतात. थोडक्यात, हे जग दिल्याघेतल्याचे आहे. एकतर्फी इथे काही दिले जात नाही. आपण हे दिले तर तिकडून काय मिळेल यावर देणार्‍याचा डोळा असतोच. म्हणून काही घेतांना आपल्याला कोणती किंमत मोजावी लागेल याचे भान साहित्यिकांनी- कलावंतांनी- विचारवंतांनी ठेवायचे असते.
            सारांश, आज विद्वान पुजला जात नसून सर्वत्र सत्ता पुजली जाते हे सत्य पावलोपावली अधोरेखित होत राहते.
            (सहज उडत राहिलो या पुस्तकातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

कॅशलेस



देशभक्‍ताची व्याख्या या ब्लॉगचा ताजा कलम:

- डॉ. सुधीर रा. देवरे

            1975-77 च्या आसपासचा काळ. तेव्हाही माझ्या लहानपणी आमचं गाव बर्‍यापैकी कॅशलेस होतं. दुकानात कोणाला काही घ्यायला जायचं असलं की घरातलं धान्य- बाजरी, गहू, नागली, हरभरा, मका असं दुकानात घेऊन जायचं. दुकानदार तो त्याच्या मापाने मोजायचा. माप भरून भरपूर धान्य खाली पडू द्यायचा. आणि त्याच्या हिशोबाने सांगायचा, इतके इतके पैसे झाले. काय देऊ? मग रोज लागणार्‍या जिनसा गुळ, दाळ, चहा, साखर, तेल असं थोडं थोडं खरेदी करायचं. हिशोब जास्त व्हायला लागला तर काही वस्तू दुकानदाराला परत करून घरी यायचं.
            शेतात सालदार ठरवायचा तोही कॅशलेस. वर्षाचे दोन पोते बाजरी, दोन पोते गहू, शेतात रहायला झ्याप, आखाजी दिवाळीला घरादारासह सगळ्यांना कपडेलत्ते. शेतीसाठी अवजारं तयार करून देणार्‍या सुतारालाही वर्षभराचे धान्य ठरवलं जायचं. याच पध्दतीने लोहार, शिंपी, न्हावी अशा बारा बलुतेदारांना धान्य दिलं जायचं. मागायला येणार्‍या भिक्षुकांनाही धान्यच दिलं जायचं.
                        चावडी जवळ काही कोकणा बाया बोरं, करवंदं, शिताफळं, आवळा अशी फळं ‍ विकायला बसाचची. ही फळं कांद्यांच्या बदल्यातही मिळायची. चार पाच कांदे देऊन दोन चार फळं मिळायची. आपल्याला प्रश्न पडला असेल की हे सर्व सांगण्याचं कारण काय? काल गावागडचा विद्यार्थी आला. त्याला म्हटलं, गावात व्यवहार कसे होताहेत? लोकांकडे पैसे आहेत का? तो म्हणाला, हातात चालणारे पैसे नाहीत म्हणून लोक धान्याच्या बदल्यात वस्तू खरेदी करताहेत.
            पुन्हा जुन्या पध्दतीने व्यवहार सुरू झाले. लोक घरातले धान्य दुकानात देऊन किराणा आणायला लागले. बॅक टू नेचर. बॅक टू प्रिमिटीव्ह. पूर्वी ग्रामीण भाग असाच कॅशलेस व्यवहार करत होता आणि आता ते दिवस पुन्हा आले पहा. या धान्याचं मूल्य बाजारभावानेच असतं की नाही याचा विचार ग्रामीण अशिक्षित लोक करत नाहीत. आपली नड भागण्याशी मतलब. म्हणून ही प्रगती का अधोगती असं कोणी विचारू नये!                      
                        (देशभक्‍ताची व्याख्या या ब्लॉगचा ताजा कलम. ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

देशभक्‍ताची व्याख्या!



 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

      8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांना उददेशून केलेल्या भाषणात 1000 आणि 500 च्या नोटा आता कागदाचे तुकडे झाल्याची घोषणा केली. पण नागरिकांना आपल्याकडचे हे चलन बदलायला पन्नास दिवसांची मुदत दिल्याने सर्वत्र आनंद झाला. त्यांच्या या निर्णयाचे देशभर स्वागत झाले. निर्णयावर टीका केली तर आपण काळा पैसा बाळगणारे आहोत असा संदेश जाईल की काय या भीतीनेही बरेच लोक निर्णयाचे स्वागत करू लागले.

      आपण अर्थतज्ञ नाही. चलनवाढ, काळापैसा, स्मगलींग, नकली नोट यातले आपल्याला काही कळत नाही. मात्र दैनंदिन गरजांसाठी आपल्याला चलन हवे असते आणि ते कमवण्यासाठी आपण नोकरी, विविध प्रकारची कामे, उद्योग करत असतो. अशा चलनाबद्दल जेव्हा विशिष्ट निर्णय घेतले जातात त्यावर हा सर्वसामान्य माणूस आपल्या अनुभवातून काही प्रतिक्रिया देऊ लागतो. तशीच ही माझी सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे.

      चेकने व्यवहार करावे असे शासनातर्फे सांगितले जाते. म्हणून सर्वत्र चेकचा वापर करायचे ठरवले: दुध वाल्याला चेक देऊन पाहिला, त्याने घेतला नाही. पेपर वाल्याला चेक देऊन पाहिला, घेतला नाही. भाजी वाल्याला चेक देऊन पाहिला, घेतला नाही. इथंपर्यंत आपण समजू शकतो, पण डॉक्टरांना अनेकांनी चेक दिला, त्यांनीही चेक घेतला नाही. जुन्या नोटा घेतल्या नाहीत आणि काहींनी तर रूग्णांवर उपचारच केले नाहीत. मोठे व्यवहार चेकने करणे ठीक. पण किरकोळ व्यवहार आपण चेकने करू शकणार नाही हे पावलोपावली लक्षात येते. उदाहरणार्थ, एखादा गरीब माणूस चारपाचशे रूपयाचा किराणा घ्यायला गेला आणि दुकानदाराला तेवढ्या रकमेचा चेक देऊ लागला तर? प्रत्येक चेकला स्लीप भरून बँकेत जमा करावा लागतो. म्हणून संपूर्ण व्यवहार पारदर्शक असूनही वेळेच्या नियोजनासाठी आपल्याला छोट्याशा रकमेसाठी हे नको असते. प्रत्येक व्यवहार आपण चेकने करू लागलो तर चेकच देशाचे चलन होईल. चेकचा अतिवापरही पैशांच्या देवाणघेवाणीपेक्षा धोकादायक ठरू शकेल. नोटा नकली येऊ शकतात तर चेक नकली होणे फार सोपी गोष्ट आहे. नकली चेकने व्यवहार करणारे स्मगलर पकडले जाऊ शकणार नाहीत. अविश्वास वाढत जाईल. असे वारंवार होऊ लागले की आधी अनोळखी लोकांकडून कोणी चेक स्वीकारणार नाही. नंतर हा विश्वास ओळखीच्या ग्राहकांवरही दाखवला जाणार नाही. क्रेडीट कार्डस् काढू म्हटलं तर त्यासाठी जिल्ह्याला जावे लागते. तालुका स्तरावर कार्डस् मिळत नाहीत, असे स्टेट बँकेकडून आताच समजले. (सगळ्याच प्रकारच्या कार्डसची विश्वासार्हता किमान आज भारतात तरी अजून नाही.) पेटीएम वॉलेट सारख्या सुविधा सरसकट कुठेही वापरता येत नाहीत. म्हणजे चलन हेच विश्वासार्ह आणि खणखणीत असणे गरजेचे आहे. आज भारतातील फक्‍त 6 टक्के लोक कॅशलेस व्यवहार करतात. बाकी 94 टक्के लोक रोखीत व्यवहार करतात. याचा अर्थ 94 टक्के लोकांजवळ बेहिशोबी पैसा आहे असे म्हणता येत नाही. भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्येच्या देशात, ग्रामीण भागात, डोंगराळ भागात व अतिदुर्गम भागात 100 टक्के कॅशलेस व्यवहार होणे शक्य नाही. म्हणून इतर छोट्या छोट्या आणि कमी लोकसंख्येच्या देशांशी तुलना आपल्याला करता येणार नाही.

      1978 मध्ये मोरारजी देसाईंनी हजारांच्या नोटा बंद केल्या होत्या तेव्हा आमच्या गावात हजाराची एकही नोट नव्हती. ती कशी असते हे ही गावातल्या लोकांना माहीत नव्हतं. म्हणून त्या निर्णयाचा सर्वसामान्य माणसावर अजिबात परिणाम झाला नाही. (आणि तेव्हाही काळ्या पैशाला आळा बसला नाही. ज्या ज्या देशांनी आपले चलन बदलले त्यांचे अनुभव वाईट आहेत.) नरेंद्र मोदींनी ज्या नोटा बंद केल्या, आज खेड्यापाड्यातल्या मजुरांजवळही फक्‍त त्याच नोटा आहेत! कारण 86.5 टक्के व्यवहार या नोटांनी होत होता. पंतप्रधान जेव्हा या नोटा बंद करण्याची घोषणा करत होते त्या वेळी सुध्दा एटीएम मशीन मधून 500 - 1000 च्याच नोटा बाहेर येत होत्या. आणि भाषण ऐकल्याबरोबर या नोटा (मध्यरात्रीपासून नव्हे तर त्याच वेळेपासून) कोणी स्वीकारत नव्हतं.

      पश्चिम बंगाल मधील मालदात अनेक गरीब लोकांच्या खात्यात त्यांच्याच हाताने कोणाचे तरी पैसे लाखांच्या आकड्यांत जमा होत आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रोजंदारीने लोक कामाला लावले जाताहेत. 8 नोव्हेंबर नंतर पहिले तीन दिवस (रात्रभर सुध्दा) दुपटीच्या भावाने सोने चांदी खरेदी होत होती. कोणी लांब पल्ल्याच्या रेल्वेची एसी तिकीटे खरेदी करून दोन दिवसांनी रिफंड (नवीन चलनात) मागत होते. सरकारी दवाखाने, मेडीकल स्टोअर्स, पेट्रोलपंप, घरपट्टी- पाणी पट्टी भरणे, इतर बिले आदी ठिकाणीही पैसे बदलण्याच्या उद्देशानेच गर्दी होत होती. आज कोणी डॉलर खरेदी करताना दिसतोय. कुणी घर खरेदीत अडकवताना दिसतो. कोणी हिरे खरेदी करतो तर कोणी विविध प्रकारच्या इस्टेटीत पैसे अडकवू लागला. काही खाजगी बडे लोक आणि शासनाशी या ना त्या निमित्ताने संबंधीत असलेले लोक तीन तीन कोटी रूपये बदलून देण्याचे आश्वासन देताना स्टींग ऑपरेशनमध्ये दिसू लागलीत. यात खाजगी बँकर्स पण आहेत. हिस्सारहून विमानाने अडीच कोटी रूपये पूर्वोत्तर भारतात पाठवले गेलेत आणि ते विशिष्ट संस्थेचे आहेत म्हणून प्रमाणपत्र पुढे केले गेले. रक्कम पकडली तरी (हा काळा पैसा होता) शासन काहीच करू शकले नाही. आज सापडलेले काळे पैसे हे फक्‍त हिमनग असू शकतं. यापेक्षा कितीतरी पट पैसा जिरवला गेला असेल. जिरवला जातोय. 

      एका गावातील एका व्यक्‍तीकडे (शेतकरी नव्हे) रूमभर 1000 आणि 500 च्या नोटा आहेत. (ही अफवा नसून त्या व्यक्‍तीकडे काम करणार्‍या नोकराने सांगितलेली घटना.) रोज एक पोते भरून नोटा काढल्या जातात. त्या नोटा 90 नोकरांच्या आणि त्यांच्या पत्नींच्या खात्यावर रोज विभागून रांगा लाऊन खात्यात जमा केल्या जाताहेत. काही नोटा याच पध्दतीने बदलल्या जात आहेत. म्हणजे काळा पैसा अशा पध्दतीने पध्दतशीरपणे जिरवला जातोय. ही गोष्ट उघड झाली नाही तर तो पैसा पांढरा होऊन उजळमाथ्याने व्यवहारात येईल. 2000 च्या नोटेत पुन्हा साठवला जाईल.

      बँकांमध्ये खात्यांवर प्रचंड प्रमाणात पैसा जमा होत आहे. पण हा पैसा सर्वसामान्य लोकांनी घरात ठेवलेला पैसा आहे. हात खर्चासाठी साठ सत्तर हजार रूपये आपल्या जवळ ठेवणे हा गुन्हा नक्कीच नाही. म्हणून याला काळा पैसा म्हणता येणार नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचे अजूनही कोणत्याच बँकेत खाते नाही. लोक पैसा जवळ ठेवतात. पण हा पैसा त्यांच्या कष्टाचा असतो. काळा पैसा बाहेर काढता येत नाही तरी सामान्य लोकांजवळच्या पांढर्‍या पैशाने बँका भरून गेल्या. काळा पैसा बाळगणारे लोक सरकारपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. काळा पैसा बाहेर काढण्याचा नोटाबंदी हा प्रामाणिक प्रयत्न असेलही. परंतु हा प्रयत्न भाबडा ठरू नये. ज्यांनी या आधीच काळा पैसा जमिनीत गुंतवला त्याचे काय? ज्यांनी याआधीच सोन्यात गुंतवला त्याचे काय? ज्यांनी याआधीच घरांमध्ये- भूखंडांमध्ये- हिर्‍यांमध्ये गुंतवला त्याचे काय? आणि आता जो काही काळा पैसा असेल तो कशापध्दतीने जिरवला जातोय हे काही चॅनल्सच्या स्टींग ऑपरेशन्समधून दिसून येत आहे. (स्टींग ऑपरेशन्सपेक्षा कितीतरी पटीने लोक हे पैसे सर्वत्र जिरवत असतील, त्यांची गणती नाही. नोटा बदलण्याचेही रोज नियम बदलतात. ज्याच्याकडे काळा पैसा सापडेल त्याला 200 टक्के दंड होईल असे आधी सांगीतले गेले आणि परवा संसदेत अशा लोकांचे 50 टक्के कापण्याचे बील सादर केले. 200 टक्के वरून 50 टक्यावर येण्याचे कारण काय? सर्वसामान्य लोकांकडे 30 डिसेंबर नंतर एखादी नोट शिल्लक राहिली तर ती कागदाचा तुकडा होईल. पण बेईमान लोक या कायद्याच्या आधाराने 1 जानेवारी 2017 नंतरही आपल्या नोटा 50 टक्के देऊन पांढर्‍या करून घेतील. अशी सवलतीने काळापैशावाल्यांना सांभाळून घ्यायचे होते तर नोटाबंदीचे फलीत काय?) एकंदरीत देशातील काळा पैसा फुकट जाण्याऐवजी बर्‍यापैकी जिरताना दिसतो आहे. मात्र पाकिस्तानात छापल्या जाणार्‍या आणि बांगलादेश व नेपाळमार्गे वितरीत होणार्‍या पैशाला ताप्तुरता लगाम बसला हे नक्की. हा लगाम कायमस्वरूपी बसू शकेल का हा ही प्रश्न आहेच. नोटाबंदीनंतर दोन तीन दिवस काश्मीरातील दगडफेक थांबली होती. पण ती आता पुन्हा सुरू झाली. दहशवाद्यांकडे दोन हजारच्या खर्‍या नोटाही सापडू लागल्या. 2000 च्या नकली नोटा तर तिसर्‍या दिवसापासून सुरू झाल्या. केवळ पाकिस्तान मधून येणारा नकली पैसा आपण रोखू शकत नाही आणि देशातील काळा पैसा कायदेशीरपणे पकडू शकत नाही म्हणून सव्वाशे कोटी लोकांचे चलन बंद करण्याएवढा मोठा निर्णय घ्यावा लागला असे म्हणावे तर ही आपली नामुष्की आहे. आपण हे युध्द हरलोत असेच म्हणावे लागेल. डोंगर पोखरून फक्‍त उंदीर निघणार असेल तर हे सर्व भयानक आहे!...

      एका सर्वेनुसार रद्द केलेल्या नोटांचे वापरातील प्रमाण 86 टक्के होते. देशात सुमारे 17 लाख कोटी रूपयांच्या नोटा वापरात आहेत. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार सुमारे 400 कोटी रूपयांच्या नोटा बनावट आहेत. केवळ 400 कोटी रूपयांच्या बनावट नोटा नष्ट करण्यासाठी 17 लाख कोटी रूपयांच्या नोटांचा वापर थांबवण्याची गरज होती का असे प्रश्न विचारले जात आहेत. आज जी यंत्रणा चलन बदलासाठी वापरली गेली तीच जर 400 कोटी रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यासाठी आणि संशयित काळाबाजार करणार्‍यांवर छापे टाकून पकडायला वापरली असती तर कमी कष्टात बरंच काही साधता आलं असतं. मात्र नोटाबंदीचा हा निर्णय आता मागे घेणं यापेक्षा भयानक ठरू शकतं. म्हणून आता जे काही झालं ते यशश्वी व्हावं असंच प्रत्येक नागरिकाला मनापासून वाटतं.

      9 नोव्हेंबर पासून काही दिवस भाजीपाला सडला, तो घ्यायला लोकांकडे सुटे पैसे नव्हते. अनेक ट्रका रस्त्यांवर पडून होत्या. भाजीवाला 500 रूपये घेऊन सुटे कुठून देणार, प्रवाश्यांना खिशात पैसे असून जेवता आले नाही. सुटे पैसे नाहीत म्हणून बस मध्ये प्रवास करता आला नाही. रेल्वेतही तीच अवस्था. हॉस्पीटल्समध्ये पैशांशिवाय इलाज झाला नाही. काही लोक, काही लहान बालकं दगावली. कोणी बँकेच्या रांगेत हार्ट अॅटकने वारले. बँक कर्मचारी अॅटकने वारले. कोणाच्या लग्नाची फसगत. स्मशानभूमीत फसगत. बँक कर्मचार्‍यांवरील अतोनात ताण. आतापर्यंत या सर्जिकल स्ट्राईक्स मध्ये 75 सर्वसामान्य लोक वारले. मात्र काळा पैसा जवळ आहे म्हणून कोणी हार्टअॅटक येऊन वारला वा आत्महत्या करून वारला अशी एकही बातमी अजून ऐकायला- वाचायला मिळाली नाही! ज्या नागरिकांचे अजून कोणत्याच बँकेत खाते नाही अशा मजूर, भटक्या, आदिवासी व ग्रामीण लोकांचे सर्वात जास्त हाल झाले. या निर्णयाचे चांगले आणि वाईट असे दूरगामी परिणाम होणार आहेत.

            नवीन नोटांच्या आकाराचे साचे एटीएम मशीनमध्ये नसल्याने एटीएम व्यवहार ठप्प होते अजूनही आहेत. नोटा बंद करायचा निर्णय घेणारे जे कोणी दोन तीन लोक असतील त्यांना एटीएम मशीनची रचना (हार्डवेअर) नवीन नोटांसाठी मॅन्युअल पध्दतीने दुरूस्त करावी लागतील याची कल्पना नसावी. देशभरातील दोन लाख वीस हजार एटीएम मशीन्स मॅन्युअल पध्दतीने अपडेट (रिकॅलिब्रेशन) करणे सोपी गोष्ट नाही. नवीन नोटा जुन्या नोटांच्या आकाराच्या छापल्या असत्या तरी एटीएम सेवेचा इतका बोजवारा उडाला नसता. बँकेतून द्यायलाही चलन अपूर्ण पडत आहे. नवीन चलनाची जी व्यवस्था व्हायला हवी होती ती झाली नाही. 500 रूपयाच्या नोटा छापायला 11 नोव्हेंबरला सुरूवात झाली.

      काळा पैसा, सोने, भूखंड, स्मगलर या सर्वांचा विचार केला तरी अजून काहीतरी या व्यवस्थेत खोट आहे. फक्‍त एक उदाहरण सांगतो. आपल्याला असे अनेक उदाहरणे आठवतील: एखाद्या व्यापार्‍याचे शहरात चार पाच दुकाने असतात. रहायला मोठी बिल्डिंग असते. तरीही त्याच्याजवळ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असते. मात्र पोष्टात काम करणारा लिपिक नॉन क्रिमिलियर मध्ये बसत नाही. कारण त्याला मिळणार्‍या प्रत्येक पैशाचा हिशोब त्याच्या पेस्लीपमध्ये असतो. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याला पूर्ण फी भरावी लागते. या देशात फक्‍त नोकरवर्गानेच आयकर भरावा आणि नोकरवर्गाच्या मुलांनीच प्रचंड फुगवलेली शैक्षणिक पूर्ण फी भरावी असा अलिखित नियम झाला आहे. हे कधी आणि कोण बदलेल? प्रत्येक नागरिकाचे खरे उत्पन्न कागदावर कधी येईल? जास्तीतजास्त नागरिक आपला प्रामाणिक प्राप्तीकर कधी भरतील? (सध्या फक्‍त 4 टक्के नागरिक प्रा‍प्तीकर भरतात.) ‍नोकरी करत नसलेले पण करप्राप्त उत्पन्न असलेले बरेच लोक आयकर का भरत नाहीत?

 ‘‘कोणाचे काम करून देताना कधीच लाच घेत नाही, नियमांतर्गत (वा नियमबाह्य) कामे करून देण्यासाठी लाच देत नाही, आपला योग्य तो प्राप्ती कर (इनकम टॅक्स) देशासाठी भरतो, निवडणूकीत जो नागरिक आपले मत विकत नाही आणि जो उमेदवार मते खरेदी करत नाही, तो खरा देशभक्‍त.’’ अशी देशभक्‍ताची व्याख्या केली तर किती देशभक्‍त आपल्या देशात सापडतील?

      म्हणून सर्वात महत्वाची बाब म्हणजे मानवी नैतिकता. ती नसेल तर कोणी कोणतेही कायदे करो, कोणतेही चलन बंद करो वा नवीन आणो, लोकपाल आणो. अनैतिक व्यवहारांसाठी सगळीकडे पळवाटा आहेत. (हजाराच्या नोटांत लाच दिली- घेतली जात होती ती आता दोन हजाराच्या नोटेत सुटसुटीतपणे देता- घेता येईल. पैसेही कमी जागेत साठवता येतील.) आपण नैतिकता पाळणार नसू तर सचोटी येऊच शकणार नाही कधी. म्हणून हा फक्‍त सरकारी यंत्रणेचा प्रश्न नाही. आपण सर्व मिळून चांगले काही करू शकलो तरच हे होऊ शकेल. अन्यथा नाही. आज इतके सारे होऊनही बेईमानी लोक आपल्या घरात ऐषारामात गात असतील:

आम्हास नाही तोटा शोधण्यास पळवाटा                                     कितीही करा खोटा आम्ही करू तो मोठा

            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/