शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

सृजनाचा व्यायाम

 

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

                    सिनियर लेखकाशी ज्युनियरचं प्रत्यक्ष वा फोनवर बोलणं होत राहतं. प्रत्येक वेळी जशी मागची उजळणी होते तसे बोलण्यात नवे मुद्देही येत राहतात.

                    परवा सिनियर बोलता बोलता ज्युनियरला म्हणाले,  "व्यायाम करतोस ना रोज?’’

           ‘‘होय करतोय ना. जोरात चालण्याचा व्यायाम करतो. सूर्य नमस्कार नाही करत आता. झेपत नाही. शिर्षासन करायचो पण आता वय आणि वजन वाढल्यामुळं तेही नाही करत.’’ असं म्हणून ज्युनियरनं सिनियरला बोलायला स्पेस दिली.

                    स्पेस मिळताच सिनियर बोलू लागले, ‘‘बरोबर,  आता या वयात नाही करू शिर्षासन. मानेला त्रास होतो. एक कल्पना डोक्यात येऊन गेली परवा : जे अवयव हलवता येत नाहीत त्यांचा व्यायाम कसा करायचा. उदाहरणार्थ, काही अवयव सांगतो तुला. मुत्रपिंडाचा व्यायाम करता येईल का? कसा करायचा? माणसाला कान हलवता येत नाहीत. छोटे असतात ना म्हणून. बाकी प्राणी त्यांचे कान फडफडवतात. म्हणजे व्यायामच करतात ना कानांचा. माणसाला कानांचा व्यायाम कसा करतात हे शोधून काढावं लागेल. कपाळाचा व्यायाम कोणालाच करता येत नाही. प्राण्यांनाही नाही. नाकाचा व्यायाम कसा करायचा. हृदय- काळीज, यकृत यांचा व्यायाम कसा करायचा? ज्या अर्थी आपण डोळ्यांचा व्यायाम करतो त्याअर्थी कपाळ, हृदय, यकृत, कान, नाक यांचा व्यायाम का करू नये? एका लेखकानं यकृत, हृदय नावाची नाटकं लिहिलीत हे माहिती आहे ना तुला?’

 ‘हो. श्याम मनोहर. पण शरीरातल्या यकृत, हृदयावर ती नाही लिहिलेली. ती प्रतिकं आहेत.’ ज्युनियर म्हणाला.

‘बरोबर.’ सिनियर लेखक पुढं म्हणाले, ‘आतड्यांचा व्यायाम आपोआप होत असावा. जिभेचा व्यायाम आपोआप होतोय. दातांचा व्यायाम आपोआप होतो. नाकाचा आणि कानांचा आपोआप होतो की नाही मला माहीत नाही.’

‘कठीण आहे सगळं. खूप सुचतंय सर तुम्हाला.’

‘हो, आणि हे कुठं द्यायचा प्रयत्न करू नकोस तू. फेसबुक, व्हॉटसअॅप बिटसअॅपवर देऊ नकोस. माझ्या नावासहीत द्यायचं झालं तरी देऊ नकोस. अशीच एकाशी फोनवर चर्चा केली आणि त्यानं फेसबुकवर पोस्ट करून दिली. माझ्या नावानिशी. दिली तर दिली पोस्ट, माझी काही वाक्य त्याच्या नावावर खपवून टाकली त्यानं.’ सिनियर श्वास घेण्यासाठी थांबले. म्हणून ज्युनियर म्हणाला,

                    ‘तुम्ही जे काही बोलतात ना वाचकांशी ते तुमच्या कादंबरीत येत असतं पुढं मागं, हे मला माहीत आहे. म्हणून मी ते इतरत्र कुठं देत नाही आणि खाजगीतही सांगत नाही मित्रांना.’

                    ‘हो मला माहीत आहे ते. विश्वास आहे तुझ्यावर. तू नाही देणार हे कुठं. हं तर आपण काय बोलत होतो. व्यायामाविषयी. व्यायाम हा सर्वव्यापी आहे. शरीराच्या आतल्या आणि बाहेरच्या अवयवांच्या व्यायामाविषयी आपण बोलत होतो ना?’

‘हो सर.’

                    सिनियर तंद्री लावत म्हणाले, ‘मेंदू आणि प्रतिभा हे काय आहे? मेंदू नावाचा आपल्या डोक्यात एक अवयव आहेच. पण प्रतिभा कुठं आहे? प्रतिभा हा अवयव नाही. मग लेखकात ती येते कुठून? मेंदूचा व्यायाम शक्य आहे. अनेक नवनवीन शोध हे मेंदुच्या व्यायामामुळंच शक्य झालेत असं म्हणता येईल. आणि कलांचा उद्‍गम हा प्रतिभेमुळं झाला. पण प्रतिभा कुठं आहे?’

                    सिनियर बोलायचे थांबले म्हणून ज्युनियर म्हणाला, ‘खूप गहन होत चाललंय सर.’

                    सिनियर सावकाश चिंतनात हरवून बोलू लागले, ‘हो. गहन आहेच रे हे सगळं. खूप खोल जावं लागतं. प्रतिभा हृदयात असते असं म्हणतात. आपणही गृहीत धरू तसं. गायक गाण्याचा रियाझ करतो. म्हणजे गाण्याचा व्यायामच ना. चित्रकार चित्र काढण्याची सवय ठेवतो. म्हणजे चित्र काढण्याचा व्यायाम. लेखक लिहित राहतो. म्हणजे लिहिण्याचा व्यायाम. आपण लेखक आहोत म्हणून लेखकावर फोकस करू. लेखक इतके श्रम करून लिहितो, त्या लिखाणाचं नेमकं काय होतं? कुठंतरी छापून येतं. नंतर त्याचं पुस्तक होतं. पण ते पुस्तक सर्वदूर पोचावं यासाठी आपण, प्रकाशक वा साहित्य रसिक काही खास प्रयत्न करतो का? लेखक जे लिहितो ते मर्यादित रसिकापर्यंतच पोचतं. आपल्या भाषेच्या लोकांपर्यंत पुस्तक सर्वदूर जाऊन धडकत नाही. एखाद्या घरी पोचतं पण त्या घरातले सगळे लोक तरी ते पुस्तक वाचतात का? एखाद्या ग्रंथालयात पोचतं आणि तिथंच पडून राहतं ना नुसतं? सर्क्युलेट होत नाही. तुझं मी वाचायचं आणि माझं तू.  हे साटंलोटंच झालं ना कॉलेजात एकमेकांना भाषणाला बोलवल्यासारखं.’

‘खरंय’. ज्युनियर म्हणाला.

न थांबता सिनियर पुढं बोलत राहिले, ‘माझ्याकडं एक नवीन तरूण लेखक आला होता. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. बायकोही होती सोबत. त्यानं मध्येच मला विचारलं, अमूक अमूकचं अमूक पुस्तक वाचलं का? मी त्याला म्हणालो, ते मीच का वाचलं पाहिजे? तू हे पुस्तक वाचण्याचं जसं मला विचारलं तसं तू तुझ्या सासूला विचारलं का?’   

                    सिनियरला रिलिफ मिळावा म्हणून ज्युनियर मध्येच म्हणाला, ‘साहित्य वाचन चळवळ जोरात राबवायला हवी. मागं मी सांस्कृतिक दुष्काळाची डायरी लिहिली होती पहा. यावर भर द्यायला हवा.’

                    धागा पकडत सिनियर पुढं म्हणाले, ‘तसंच असं नाही, ते ही बरोबर आहेच. परंतु जे लिहिलं जातं.. लिहून झालं आहे.. छापून झालं आहे.. वितरीत झालं आहे.. त्याची लागण का होत नाही दूर दूर पर्यंत? ते वादळासारखं पसरलं पाहिजे वेगानं, इतकं की एकानं वाचलं की त्यानं दहा जणांना सांगून त्या दहा जणांनी झपाटून वाचलं पाहिजे. आणि त्यापुढं प्रत्येकाचे पुन्हा दहा दहा. दहाच का? दहाचे शंभर, शंभराचे हजार अशा रीतीनं... पुस्तकाची लागण झाली पाहिजे एखाद्या साथीच्या आजारासारखी. वाईट गोष्टी कशा स्प्रेड होतात सोशल नेटवर्कवरून, तसं पुस्तकांचं झालं पाहिजे...’

                    सिनियर श्वासासाठी थांबताच ज्युनियर म्हणाला,

                    ‘‘तसं होतंही. पण ते लोकप्रिय साहित्याबद्दल होतं. अभिजात साहित्याबद्दल असं होत नाही. बाबा कदम जितके वाचले जातील तितके श्याम मनोहर वाचले जात नाहीत. गुलशन नंदा जितके वाचले जातात तितके भालचंद्र नेमाडे वाचले जात नाहीत. दुसरा मुद्दा आजचे अनेक चांगले लेखक वाचकांना माहीत नाहीत. अजूनही अनेक वाचक ययाती, मृत्यूंजय, स्वामी या पुस्तकांनाच मानदंड मानतात. काही लोक तर न वाचताच ही पुस्तकं वाचल्याची नावं सांगत राहतात.’’

                    सिनियर नाहीतली मान हलवत म्हणाले, ‘तुझा हा मुद्दा मला तितकासा पटला नाही. कारण की, ज्ञानेश्वरी कशी वाचली जाते अजूनही घराघरात? तुकारामांची गाथा वाचली जाते ना अजून घराघरात? यावरही बोललं पाहिजे.’

                    ज्युनियरचं उत्तर तयार होतं, ‘हो सांगतो ना. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा घराघरात आजही वाचली जाते. पण त्याच्यातले काव्य वा तत्वज्ञान भिडतं म्हणून ती वाचली जात नाहीत. म्हणजे तत्वज्ञान वा काव्यानंदासाठी ती वाचली जात नाहीत. धार्मिक ग्रंथ म्हणून केवळ श्रध्देनं ती वाचली जातात हे खरं कारण. जर या ग्रंथांत अध्यात्म नसतं वा त्यांचे कर्ते संत नसते तर हे साहित्यही दुर्लक्षित झालं असतं इतर अभिजात साहित्याप्रमाणं.’

                    सिनियर कबूल करत म्हणाले, ‘तुझ्या म्हणण्यात तथ्य आहेच. नाही असं नाही. पण मला दुसरी शंका येते.’

‘कोणती?’

‘‘अजून तशी लिखित कलाकृतीच निर्माण झाली नसेल कदाचित? आपल्या प्रतिभेची निर्मितीच कमी पडते की काय. लेखकाला लिहायच्या मर्यादा पडत असाव्यात? सृजनाचाही व्यायाम असायला हवा, तो कमी पडतो की काय, अशी शंका आहेच.’’ प्रश्न उपस्थित करून सिनियर थांबले. 

                    विचारांची लिंक लावत ज्युनियर म्हणाला, ‘‘सृजनाचा व्यायाम असतोच. पण हेसुध्दा पूर्ण सत्य नाही. विलास सारंग, जी. ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे... ह्यांची निर्मिती कमी पडते असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. त्यांना मर्यादा आहेत असंही नाही. इतकं अभिजात लेखन येऊनही अनेक वाचकांना ते ऐकूनही माहीत नसेल तर आपण उपस्थित केलेला मुद्दा बरोबर नाही असं मला वाटतं... तेव्हा...’’ ज्युनियरनं आपलं म्हणणं अर्ध्यावर सोडून दिलं. यावर सिनियर काही बोलत नाहीत म्हणून ज्युनियर संथपणे मनातल्यामनात म्हणाला,

                    लोकांना वाचन ही जीवनावश्यक गरज वाटत नाही असं म्हणता येईल कदाचित!...

                    (हंस, दिवाळी अंक, नोव्हेंबर 2023 मध्ये प्रकाशित कथा. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/