शनिवार, २७ जुलै, २०१३

दुपारचे जेवण: शेवटचे



 
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         मंगळवार दिनांक 16 जुलै 2013. बिहार. छपरा नावाचा जिल्हा. त्यातील धर्मसती नावाचे एक छोटेसे गाव. तिथली प्राथमिक शाळा. शाळेतले दुपारचे जेवण. आणि जेवणानंतर पटापट मरणारे फक्त दहा वर्षांआतील मुले. रात्रीपर्यंत मरणार्‍या मुलांचा आकडा बावीसपर्यंत गेलेला. आता ही संख्या तेवीस झाली आहे. अजून काही मुले इस्पीतळात प्राणांशी झुंज देत आहेत.
         असे विषारी जेवण फक्त बिहारमध्येच दिले जाते असा कोणाचा गैरसमज असेल तर तो तात्काळ दूर करण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यातील शाळेला भेट द्या. सुदैवाने अशी भीषण घटना महाराष्ट्रात अजून घडली नाही इतकेच. विषबाधा कुठेनाकुठे रोज होतात. पण इतक्या मोठ्या प्रमाणात मुलांना अजून जीव गमवावा लागला नाही यातच आपल्याला समाधान मानावे लागेल.
         दोन हजार चार साली सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की, प्राथमिक शाळांमध्ये मुलांना दुपारचे जेवण द्या. त्याप्रमाणे शाळांमध्ये दुपारचे जेवण सुरू झाले. सगळ्याच योजना चांगल्या असतात. वाईट आहेत त्यांची अमंलबजावणी करणारे हात. सगळीकडे खाण्याची सवय लागलेल्या व्यवस्थेला खाण्याचे अजून एक कुरण मिळाले. प्रत्यक्षात जी यंत्रणा सडलेली आहे त्या यंत्रणेत दुपारच्या जेवणातील पदार्थही सडलेलेच येऊ लागलेत. दुपारच्या जेवणात फक्त खिचडी आणि दोन दिवस उस्सळ भात अथवा पोळी असे निकस दर्जाचे जेवण असूनही त्यावर डल्ला मारण्याचे काम होऊ लागले. शंभर मुलांसाठी फक्त एक किलो बटाट्याची भाजी होऊ लागली. काही ठिकाणच्या तांदूळ आणि डाळीला प्राणीही तोंड लावत नाहीत इतक्या निकृष्ट दर्जाचे अन्न शाळांना पुरवले जाते.
         आधीच शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामांनी वैतागलेल्या शिक्षकांवर खिचडी शिजवण्याचा भार पडला. काही प्रामाणिक शिक्षक हे ही काम व्यवस्थित करू लागलेत पण गावातील ग्रामसभेने हस्तक्षेप करून भ्रष्टाचार सुरू केला. गावातील अशा सभासदांच्या मुलींच्या लग्नात या तांदळाचा भात आणि तुरदाळीचे वरण शिजू लागले.
         इथपर्यंतही ठिक होते. पण जेव्हा तेल, मसाला, बटाटा, कांदा शेंगदाणे वगैरे खरे‍दी करताना- म्हणजे पैसे खिशात घालताना आपण निष्पाप मुलांच्या जिवाशी खेळतोय याचेही भान कोणाला राहिले नाही. ही यंत्रणाच किती संवेदनाशून्य आहे याचा प्रत्यय वेळोवेळी येऊ लागला. ज्या कुटुंबाचे मुले आज शाळेतल्या जेवणाने मारले गेले ते मनात म्हणत असतील, शाळेतल्या त्या जेवणापेक्षा घरी एका वेळी जेऊन- कदाचित अर्धमेली होऊन का होईना अजून काही दिवस तरी ही मुले सहज जगली असती.
         12 रूपये, 5 रूपये आणि 1 रूपयात पोटभर जेवण मिळण्याचा शोध आपल्या काही राजकीय नेत्यांनी आज लावलाच आहे. त्यांना अनुसरून शाळेतल्या या दुपारच्या जेवणाची एकूण गुणवत्ता पाहता एका जेवणाचे सरासरी मूल्य तीन ते चार रूपये असेल. या चार रूपयांच्या जेवणासाठी इतक्या मुलांना आपला जीव गमवावा लागावा यातच आपण आज किती प्रगती केली याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. शाळेत दिले जाणारे दुपारचे जेवण हे आयुष्याच्या संध्याकाळचे शेवटचे जेवण ठरू नये अशी अपेक्षा इथल्या गरीब जनतेने करायचीच नाही का?

     - डॉ. सुधीर रा. देवरे       
 इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, २० जुलै, २०१३


सर्वोच्च न्यायालय : एक लोकपाल

-         डॉ. सुधीर रा. देवरे


         देशातील कोणत्याही न्यायालयाने दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा ठोठावताच लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होईल असा ऐतिहासिक निर्णय 10 जुलै 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला. अशा शिक्षेतून सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत निर्दोष मुक्तता करत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्दच राहील. आजपर्यंत अनेक  न्यायालयांनी अशी शिक्षा दिलेली असली तरी कायद्यातील कलम 8 (4) नुसार अपील करून नेत्यांना सवलत मिळत होती. सदस्यत्व अबाधित राहून त्यांना संसदेत- विधीमंडळात कामकाजात भाग घेता येत होते. राज्यसभेवर निवडून जाता येत होते. राज्याच्या विधानसभेत निवडून जाता येत होते. एवढेच नव्हे तर तुरूंगातून निवडणूक लढवूनही अनेक गुंड निवडून येत होते.
         आजपर्यंत बर्‍याच गुन्हेगारांनी अशा पध्दतीने लोकप्रतिनिधीपद भूषवले आहे. आजही अनेक जण भूषवत आहेत. आजच्या संसदेतील 162 खासदारांवर गुन्हेगारी खटले सुरू आहेत तर संपूर्ण भारतातील राज्यांच्या विधानसभांमध्येही 1112 आमदारांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी पन्नास टक्के सभासद आज संसदेत वा विधानसभेत न राहता तुरूंगात रहायला हवे होते. हे सगळे वास्तव पहाता आपल्या लोकशाहीची आणि राज्यटनेची विटंबना थांबवण्यासाठी आतापर्यंत खरे तर संसदेनेच पुढाकार घेऊन अशी साफसफाई करायला हवी होती. पण ते काम शेवटी सर्वोच्च न्यायालयाला करावे लागले.
         अशी साफसफाई संसदेने न करण्याचे कारण असे की, गुन्हेगार लोक आपल्या पक्षांना निवडणूकीसाठी भरपूर पैसे पुरवतात. निवडणूकीत साम दाम दंड भेद वापरून स्वत: निवडून येतात आणि काहींना निवडून आणतात. दहशत व पैशांच्या जोरावर सत्ता मिळवता येते आणि सत्ता मिळताच त्याच्या कैक पटीने पैसा कमवता येतो, असे हे दुष्ट चक्र सुरू आहे. देशप्रेमापेक्षा सत्ता आणि पैसा यांच्या आहारी जाऊन सगळेच पक्ष भ्रष्ट झाले आहेत. म्हणून असे भ्रष्ट लोक सगळ्याच पक्षांत वावरताना दिसतात. देश स्वतंत्र झाला तेव्हा फक्त चारित्र्यसंपन्न लोक निवडून येत. मधल्या काळात गुन्हेगारांच्या पैशांवर काही लोक निवडून येत व त्यांना आपल्या काळात संरक्षण देत. मात्र आता खुद्द गुन्हगारच लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवतात आणि निवडून येतात.
         माहितीचा अधिकार राजकीय पक्षांना लागू व्हायला नको, लोकपालाने लोकप्रतिधींची चौकशी करायला नको, लोकप्रतिधींच्या गुन्हेगारीवर बोलायला नको, लोकप्रतिनिधींची वेतनवाढ आदी बाबतीत सगळ्याच पक्षांचे संसदेत एकमत होते आणि फालतू प्रश्नांवर संसदेपासून विविध चॅनल्सपर्यंत  एकमेकांवर चिखलफेक करत नागरीकांची दिशाभूल करत राहतात.
         सर्वोच्च न्यायालयाने ही जी भूमिका बजावली ती लोकपालाची भूमिका आहे आणि ती यापूर्वीच बजावायला हवी होती. उशीरा का होईना पण आता ही साफसफाई होणार असे आपल्याला वाटत असले तरी पुन्हा लोकप्रतिनिधीच आपल्याला धोका देऊ शकतात हे नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे.
         संसदेत चर्चा करून कायद्यातील कलम 8 (4) हे पूर्वीप्रमाणे संसदेने लागू केले तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाला काही करता येणार नाही. कारण न्यायालयापेक्षा संसदेला जास्त अधिकार आहेत. म्हणून संसदेत असा प्रयत्न झाला तर त्याला विरोध करण्याचे काम आपल्याला म्हणजे भारताच्या नागरिकांना करावे लागणार आहे.


     - डॉ. सुधीर रा. देवरे       
 इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, १३ जुलै, २०१३

करूणेची सावली...




-         डॉ. सुधीर रा. देवरे


         गौतम बुध्द यांचे नाव घेताच समोर साक्षात करूणा, प्रज्ञा, अहिंसा ‍यांचा प्रत्यय येतो. बुध्द गया. जिथे बोधी वृक्षाखाली गौतम बुध्दांना बोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झाले ते हे शांततेचे प्रतिकात्मक ठिकाण. अशा विभूतीला कोणी शत्रू असू शकतो हे आपल्या आकलनापलिकडचे आहे.
         आधी अफगानिस्तानातील बामियाना येथे असलेले गौतम बुध्दांचे भव्य शिल्प सुरूंग लावून फोडणारे तालिबानी आपण आठ वर्षांपूर्वी चॅनल्सवरून पाहिले. आणि आता भारतातील या शांततेच्या मंदिरात बाँबचे दहा स्फोट होतानाही आपण हताशतेने पाहिलेत. याचा अर्थ असा नाही की हे तालिबान्यांचे कृत्य आहे. पण यामागे जे कोणी असतील ती तालीबानी प्रवृत्तीच.
         भारतातील हा पहिला स्फोट नाही आणि तो शेवटचाही असणार नाही. पण दहशतवाद्यांनी हे जे ठिकाण निवडले त्यावरून त्यांची मानसिकता कशी किडलेली आहे याचा कयास आपण बांधू शकतो. इतर धर्मांचाच काय ज्याने स्वत:चा धर्मही नीट अभ्यासला नाही तोच असा धर्मव्देष्टा असू शकतो. ज्याने आपल्या धर्माचा डोळस अभ्यास केला तो कधीही धर्मांध होऊन दहशतवादी होणार नाही. कारण प्रत्येक धर्म शेवटी हे विश्वची माझे घर असेच म्हणतो.
         आता या घटनेवर भारताचे आजचे राजकारण. या स्फोटांनंतर राजकारणी जे काही बोलले ते ऐकून आपले नेते किती खालच्या पातळीवरचे राजकारण करतात ते पुन्हा एकदा सिध्द झाले. कोणत्याही दहशतवादी हल्यानंतर सगळ्या राजकारणी लोकांनी नुसते मौन पाळले, बाकी काहीही केले नाही तरी भारतातील लोक त्यांना धन्यवाद देतील आणि त्यांनी प्रत्यक्षात काहीही न करताही ऐशी टक्के काम केले असे आपल्याला वाटेल.
         जुन्या खेड्यांमध्ये पूर्वी माळी गल्ली, कुणबी गल्ली, शिंपी गल्ली, सुतार चौक, लोहार चौक, धोबी आळी अशा नावांच्या गल्ल्या- चौक असायचे आणि त्यांचे एकेक मोरखे असायचे. या जातीय गल्ल्या म्हणजेच आजचे हे राजकीय पक्ष वाटायला लागलेत. अशा जातीयवादी मोरख्यांनाही लाजवेल असे आजच्या राजकीय पक्षांचे मोरखे बोलतात. ते कोणत्या जातीधर्माचे वा गटातटाचे नेतृत्व करतात हे लपून रहात नाही. सगळ्या राजकीय पक्षांना धर्मांधता आणि जात्यंधतेचा आजार झाला आहे. आपण सर्वांचे आहोत असे त्यांच्या कोणत्याही कृतीतून दिसून येत नाही हे आपल्या देशाचे आणि राज्यघटनेचे दुर्दैव.
         या जातीय पक्षांचा आणि नेत्यांचा हा आजार फक्त भारतीय नागरीकच बरा करू शकतो. जेव्हा या पक्षांना आणि राजकीय नेत्यांच्या लक्षात येईल की, भारतीय नागरीक हा जाती- धर्माच्या नावाने मतदान करत नाही. तो काम आणि चारि‍त्र्य (भ्रष्टाचारी नसलेला) पाहून मतदान करतो. तेव्हाच त्यांचा हा आजार बरा होऊ शकतो. पण नागरिकच जातीयवादी होत असेल तर मग भवितव्य कठीण आहे.
         या सगळ्या अराजकातही हा देश चाललाय तो ‍दिवसेंदिवस अतिशय अल्पसंख्यांक होत चाललेल्या जातीभेद- धर्मभेद न मानणार्‍या करूणेच्या सावलीमुळे. ही सावली विस्तारण्याची जबाबदारी आता सामान्य नागरिकांवर येऊन पडली आहे.

     - डॉ. सुधीर रा. देवरे       
 इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, ६ जुलै, २०१३

बदनामीचा दहशतवाद



-         डॉ. सुधीर रा. देवरे


         नाशिकला एका पित्याने आपल्या गर्भवती मुलीचा गळा आवळून खून केला. एका वर्षापूर्वी त्या मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केला होता. दोन दिवसांनी ती बाळाला जन्म देणार होती. पण एका वर्षापासूनचा राग डोक्यात ठेऊन त्या पित्याने मुलीचा जीव घेतला. मात्र भारतातील अशी पहिलीच घटना नाही. अशा असंख्य घटना आपण रोज वाचत- पहात असतो.
         या पित्याने आपल्या मुलीची हत्या का केली? अशा घटनेत इतर पालकांनीही हत्त्या का केल्या? याची उत्तरे त्यांनी स्वत:च दिलेली आहेत. समाजात होणार्‍या बदनामीने आपण अशा हत्त्या केल्याचे हे गुन्हेगार सांगतात. परंपरेने उच्च समजल्या जाणार्‍या जातीतच अशा हत्त्या होतात असे नाही. अगदी सगळ्या प्रकारच्या ओबीसीतल्या जातीतही अशी अमानुष शिक्षा दिली जाते.
         असे का घडते? आपल्याच छायेत वाढवलेल्या प्रेमाच्या व्यक्तीला आपल्याच हाताने मारण्याइतके हे लोक कठोर का होतात? बदनामीची भीती वाटताच असंख्य तरूणी आणि काही तरूण आत्महत्त्याही करतात. याचे कारण आपल्या आजूबाजूच्या सामाजिक जडणघडणीत सापडेल.
         मनुष्य समाजप्रिय प्राणी असल्यामुळे त्याने बनवलेल्या आचारसंहीतेत जो तो आपल्याला बसवण्याचा प्रयत्न करत राहतो. पण समाजातील आजूबाजूची तथाकथित नैतिक कुजबूज आणि आपल्याकडे कोणी बोट दाखवून काहीतरी बोलतेय ही बदनामीची दहशत माणसाला सामान्य राहू देत नाही. त्यातल्यात्यात भर म्हणून अनेक जातीत कार्यरत असणार्‍या जातपंचायती. या जातपंचायती तर सरळसरळ भारतीय राज्यघटना आणि कायद्याचे उल्लंघन करत परस्पर शिक्षा करतात. अशा वेळी त्या विशिष्ट घरातील व्यक्तींचे मानसिक संतुलन बिघडते. संवेदनाशील माणसाला तर ही बदनामी अजिबात सहन होत नाही. म्हणून आंतरजातीय विवाहांच्या विरूध्द समाजाने खाजगीत सुध्दा वाईट बोलणे टाळायला हवे.
         सोशल नेटवर्कचेच उदाहरण घ्यायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने हसत खेळत एखादे विधान आपल्या मित्राला उद्देशून केले. विधान करणार्‍याशीच वाद घालून ते मिटवण्याऐवजी मित्राच्या अपरोक्ष त्या विधानांमध्ये अधिकची भर घालून ते कोणाला तरी सांगितले जाते वा त्याची जाहीर वाच्यता केली जाते. ते विधान पुन्हा जेव्हा बोलणार्‍या व्यक्तीपर्यंत आडवळणाने पोचते तेव्हा इथेही बदनामीच्या दहशतीचे साम्राज्य सुरू होते. अनोळखी नेटवर जर असे होत असेल तर प्रत्यक्ष जीवनात बदनामीची दहशत काय असेल?
         आपल्या मोडक्या तोडक्या जातीचा फाजील अभिमान, लोक काय म्हणतील याची दहशत आणि आपल्या इज्जतीचा पंचनामा होतोय हा समज यामागे असतो. खरे तर एखादी तरूणी वा तरूण नैसिर्गिक नियमाने घसरले तर ते संस्कारांविरूध्द असले तरी निसर्गाविरूध्द नसते, म्हणून असे झाले अशा समजूतीने घडलेल्या घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहून पुढे असे घडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. पण निसर्गनियमालाच गुन्हा ठरवून माणूस मारणे वा आत्महत्त्या करणे या अनैसर्गिक आणि कायद्याविरूध्द गोष्टी असूनही त्यांचा आसरा शोधला जातो.
         आपल्या निंदेमुळे कोणी जीवानिशी जाऊ शकतो याचा विचार करून आपल्या कृत्याने वा आपल्या वाचेने कोणावर अशी वेळ येऊ नये याची दक्षता आपण सगळ्यांनीच घ्यायला हवी.
     - डॉ. सुधीर रा. देवरे       
 इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/