शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

गोड बोलण्याचा अर्थ




      - डॉ. सुधीर रा. देवरे
 
 
         लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि यू आर अनंतमुर्ती. एक थोर गायिका, एक चांगला खेळाडू आणि एक थोर साहित्यिक- कलावंत. या तीन व्यक्ती आपण प्रातिनिधीक म्हणून घेऊ. या तिघांनी फक्त आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक रहावे, दुसर्‍या क्षेत्रात लुडबूड करू नये असे कोणी म्हणणार नाही. लता मंगेशकर यांनी फक्त गाणेच गायला हवीत का? बाकी क्षेत्रात त्यांनी ब्र ही काढू नये, असेही कोणी म्हणणार नाही. म्हणून भारताचे पंतप्रधान कोणी व्हावे असा विचार स्वत:शी करायला त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहेच. पण-
         कलावंत- साहित्यिक यांच्याकडून सर्वसामान्य लोक विचार घेत राहतात. इतर क्षेत्रांतील घटनांबद्दल अशा कलावंत व्यक्तींची मते काय आहेत हे सामान्य लोक आपल्या मतांशी पडताळून पाहतात. विशेषत: राजकीय क्षेत्रात घडणार्‍या घटनांबाबत असे थोर लोक काय प्रतिक्रिया देतात याबाबत देशातील सर्व स्तरातील लोक कानोसा घेत राहतात. अशा पार्श्वभूमीवर कलावंतांनी सार्वजनिक ठिकाणी काय बोलावे आणि काय बोलू नये हे त्यांनी स्वत: ठरवायचे असते.
         लता मंगेशकरांना एखाद्या राजकीय पक्षाने राज्यसभेत पाठवणे हा त्यांचा मान आहे आणि तो यथायोग्यही होता. सचिन तेंडुलकर यांनाही राज्यसभेत पाठवले गेले हा त्यांचा मान आहे आणि तो यथायोग्यही आहे. पण ज्या राजकीय पक्षाने त्यांना राज्यसभेत पाठवले वा ज्यांनी त्यांना भारतरत्नाने सन्मानित केले त्या पक्षाचा सचिन तेंडुलकर कडून निवडणूक प्रचार केला जावा अशी जर कोणी अपेक्षा व्यक्त केली  तर त्या पक्षातील प्रामाणिक सदस्यालाही ते आवडणार नाही. तीच बाब लता मंगेशकर यांना ज्यांनी राज्यसभेत पाठवले त्या पक्षाचा त्यांनी प्रचार करावा ही सामान्य माणसाला वेदना देणारी घटना ठरेल.  
         राजकीय लोक गोड गोड बोलतात. तोंडासमोर गोड बोलून पाठीमागे कारस्थाने करणे (अपवाद गृहीत धरून) हे आजच्या राजकीय लोकांचे राजकारण समजले जाते. पण कलावंताने अशी तोंडपूजा का करावी? म्हणजे जिथे कटू बोलणे गरजेचे आहे तिथे गोड का बोलले जाते? अशा गोड बोलण्याचा अर्थ काय समजायचा? राजकारणी लोकांसारखे कलावंतही सत्य लपवून वर वर गोड बोलू लागले तर सामान्य लोकांनी खरी परिस्थिती कोणाकडून समजून घ्यायची? लोकांना प्रबोधन करण्याचे, देश घडविण्याचे आणि माणुसकी शिकवण्याचे काम ज्या कलावंताकडे आहे तोच जर गोड बोलून राजकारण करू लागला तर या देशाचे काय होईल?
         म्हणून एक थोर साहित्यिक यू आर अनंतमुर्ती यांनी काही दिवसांपूर्वी एक कठोर भूमिका घेतली. सत्य हे कटू असते म्हणून ते कटू बोलले. कटू बोललेले कोणालाही झोंबते. आपला व्यक्तीगत कोणताही स्वार्थ नसताना त्यांनी भारतीय मतदारांना जागृत करण्याचे काम केले. लता मंगेशकर यांना तोंडावर गोड बोलून भारताचे पंतप्रधान कोणी व्हावे असे जाहीर करण्याचा जसा हक्क आहे तसा अंनतमूर्ती यांना कटू बोलून कुपमंडूक राजकारण्यांसमोर स्वच्‍छ आरसा दाखवण्याचा हक्क आहेच. नुसता हक्कच नाही तर देशाच्या ऐक्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचे प्रबोधन करणे अनंतमूर्ती यांचे कर्तव्य होते, ते त्यांनी पार पाडले. मात्र त्यांचेच फक्त ते काम नाही. हे आव्हान सर्व कलावंतांना आहे. पण कलावंतच विकले गेले तर भारताच्या नशिबी वाईट दिवस खूप लांब नाहीत.


  - डॉ. सुधीर रा. देवरे          
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

सगळीकडे तहलका


                                -         डॉ. सुधीर रा. देवरे


         गावगुंडापासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत आणि धर्मगुरूंपासून ते पत्रकारांपर्यंत सगळ्यांचेच पाय मातीचे. सगळेच कशात ना कशात फसलेले. रोज नवीन नवीन तहलका देशात खळबळ माजवून देतात. नवनवीन स्कँडल गाजरगवतासारखे उगवतात. हे कधी थांबेल कोणाला माहीत नाही. दिल्लीतला बलात्कार शेवटचा ठरेल असे तात्कालिक जनभावनेतून वाटले होते. पण बलात्कारातील क्रौर्याची ती सुरूवात होती की काय असे आज वाटू लागले आहे. रोज भयानक घटना घडताहेत. कोणीही आणि कुठेही सुरक्षित नाही.
         सार्वजनिक जीवनात आतापर्यंत कोणताही डाग नसलेल्या एका नवीन राजकीय पक्षाच्या लोकांनी देणगी म्हणून रोख पैसे घेण्याची सीडी असो. एका सामान्य मुलीवर पाळत ठेवणारी एका राज्याची सरकारी यंत्रणा असो. टेलिफोन टॅपिंगच्या घटना असोत. गरीबांसाठी असलेले धान्य राजरोस बाजारात विकणारे लोक असोत. कोणाला फसवण्यासाठी ब्लॅक मेलींग करण्याची सीडी असो. कॉलेजमधील रॅगींग असो. एटीएम मध्ये महिलेवरील हल्ला असो. अँसिड हल्ला असो. मार्जिनसाठी केला जाणारा कागदोपत्रीचा विकास असो. कोणाला आयुष्यातून उठवण्यासाठी केलेला खोटा आरोप असो. आपल्या आजूबाजूला सगळ्याच वैताग आणणार्‍या घटना घडत आहेत. आणि आता एका महिला नवोदित पत्रकाराचा तिच्या बॉसने- तहलकाचे संपादक तरूण तेजपाल यांनी केलेला विनयभंग.
         असा सगळीकडे तहलका असल्यावर विश्वास नेमका कोणावर ठेवावा हे ही आता समजेनासे झालंय. आरोप असणार्‍यांवर का फसवल्या गेलेल्या व्यक्तींवर. जीवनात वैचित्र्य असू शकते आणि कोणत्याही पदावर असणार्‍या माणसाला निसर्ग चुकलेला नाही. पण अनुनय करून निखळ आनंद मिळवणे वेगळे आणि कोणाच्या इच्छेविरूध्द वा सत्तेच्या-पैशाच्या जोरावर कोणाच्या मजबूरीचा गैरफायदा घेऊन अमिष दाखवून हवे ते मिळवणे वेगळे.
         रोज रोज घडणार्‍या अशा घटनांबाबत आपण एकांगी विचार तर करत नाही ना, हे ही समजायला मार्ग नाही. कोणतीही व्यक्ती शंभर टक्के बरोबर कधीच असू शकत नाही. आणि कोणतीही व्यक्ती शंभर टक्के चूक असू शकत नाही. कोणाला किती ‍समजून घ्यायचे आणि कोणाला किती मोकळीक द्यायची वा कोणाला किती खेचायचे हे कोणी ठरवायचे? दिवसेंदिवस माणूस आपल्यातच घुसमटून आपल्या चाकोरीबध्द आयुष्यातून मोकळे होण्यासाठी त्याचा एकदम तोल जाऊन स्फोट होतोय की काय?
         शेवटी प्रश्न उरतो, सत्य काय आहे? कोणाच्याही बाबतीत आणि कोणत्याही घटनेत सत्य काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे असते. अगदी सामान्य माणूसही आपल्या पातळीवर सत्य जाणून घेण्यासाठी सत्याचे संशोधन करीत असतो.  आपल्या लोकशाहीमुळे- लोकशाहीतील चौथ्या स्तंभामुळे म्हणजेच मिडीयामुळे आपण निखळ सत्यापर्यंत पोचत नसलो तरी घटनेतले अर्धसत्य आपण समजू शकतो. अशा या अर्धसत्य का होईना पण प्रसार माध्यमांच्या वार्तांच्या प्रक्षेपणातून काही प्रमाणात तरी पुढे होणार्‍या अशाच काही वाईट कृती टळत असाव्यात असे म्हणायलाही वाव आहेच. सत्य मेव जयते!

  
   - डॉ. सुधीर रा. देवरे         
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

लैंगिक विषयाचा शास्त्रीय लेख




- डॉ. सुधीर रा. देवरे


         ग्रंथप्रेमी लोकांची दिवाळी म्हणजे दिवाळीअंक वाचून ताजेतवाणे होणे. या वर्षाच्या (2013) दिवाळी अंकांत मनोविकास प्रकाशनाचा इत्यादी हा दिवाळी अंक वाचण्यात आला. हा संपूर्ण अंक दर्जेदार विचार- समीक्षा- साहित्याने भरगच्च आहेच. पण यातील एका लेखाने माझे लक्ष वेधून घेतले. मंगला सामंत यांनी लिहिलेला लैंगिक धर्म -व्यक्त आणि अव्यक्त या शीर्षकाचा लेख. हा लेख प्रत्येकाने म्हणजे आई- वडील- मुलगा- मुलगी या संगळ्यांनी वाचायलाच हवा. 14 वर्षांवरील प्रत्येक मुलामुलींनी जरूर वाचावा असा हा अभ्यासपूर्ण शास्त्रीय लेख आहे.
         कुठे बलात्कार झाला, विनयभंग झाला वा छेडछाड झाली की आपण सगळेच हादरतो. आपली पहिली प्रतिक्रिया असते आरोपींचा उध्दार करण्याची  जी स्वा‍भाविक प्रतिक्षिप्त क्रिया असते. संस्कारांना नावे ठेवणे, संस्कृतीच्या गप्पा मारणे, पोलिसांना दोषी ठरवणे, नवीन कायदे करण्याच्या मागण्या करणे, अशा आरोळ्या मारण्याचे काम सगळ्या पातळ्यांवर सुरू होते. पण ही मानसिकता नेमकी कुठून येते याचा खोलात जावून कोणीच विचार करताना दिसत नाही.
         मंगला सामंत यांनी आपल्या लेखात डार्विनच्या नॅचरल सिलेक्शन सिध्दांताची स्थूल ओळख देऊन वनस्पती- प्राणी यांच्या लैंगिक जीवनाचा दाखला देत वि. का. राजवाडे यांच्या भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकाचा संदर्भ घेत वेदकालीन स्त्री-पुरूषांचे लैंगिक संबंध उदृत केले आहेत. आदिवासी समाज, लैंगिक भाषा, भारतीय इतिहास, पूर्वकालिन भारतातील स्त्री-पुरूष संबंधांचा मोकळेपणा, विवाहसंस्था, विवाहाचे फायदे आणि तोटे, लग्नाचे वाढलेले वय, मानवी शरीरातील हार्मोन्स, सायन्स ऐवजी आजच्या युगात कामभावना दडपण्यासाठी देवधर्म- बाबा-बुवा यांच्या मागे धावून उत्तरे शोधण्याचा केविलवाना प्रयत्न, आदींचा संक्षिप्त आढावा घेऊन आपली स्वत:ची मतेही ठामपणे या लेखात मांडलेली आहेत. आपली लैंगिकता समजून घेण्यासाठी धार्मिकतेऐवजी सायन्सच्या मार्गाने जावे आणि लैंगिकतेला विकृत, अस्पर्शीत वा अश्लील विषय मानू नये असा या लेखाचा सारांश सांगता येईल.
         असा विषय सामाजिकतेच्या अंगाने मोकळेपणाने कोणी मांडला तर आधी आपण दचकतो. अशा व्यक्तीकडे संशयाने पहात दूर जातो. मात्र धार्मिकतेच्या नावाखाली बुवाबाजीतून अशाच हरकतींना अनेक स्त्रिया बळी पडतात आणि त्यानंतर त्यांना ब्लॅक मेल करून आयुष्यभर सतावले जाते.
         खरे म्हणजे आपल्याला हे सगळे कळते पण वळत नाही. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हा खरा प्रश्न आहे. कारण या प्रश्नाला जो कोणी हात घालेल तोच आज विकृत ठरवला जातो. केंद्र शासनाने मागे एकदा शाळांमधून लैंगिक शिक्षण देण्याविषयीचे विधेयक आणण्याचा एक क्षीण प्रयत्न करून पाहिला. पण कोणतीही गोष्ट करायची ती मतांसाठी वा सत्तेसाठीच असा राजकीय पायंडा पडल्यामुळे असा धाडसी निर्णय घेणे राजकारण्यांना परवडणारे नव्हते. या कायद्यामागे फक्त पुरोगामीच नव्हे तर शास्त्रीय दृष्टीकोन होता. पण यावर घेतलेल्या आक्षेपांना शासनाला उत्तरे देता आली नाही‍त. उत्तरे न देता येण्याचे कारण शासनाकडे उत्तरे नव्हती असे मात्र नाही, तर अवघड जागेच्या दुखण्यावरचा इलाज सगळ्यांच्या पचनी पडेल याची शाश्वती नसल्यामुळे तसे उत्तरे न देता ते विधेयकच मागे घेणे सोपे होते. असो.
         आज समाजात लैंगिक निकोप वातावरण तयार करायचे असेल तर वि. का. राजवाडे यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. अथवा किमान वर उदृत केलेला लेख तरी इच्छुकांनी जरूर वाचावा.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

असा प्रचार संविधान विरूध्द आहे




- डॉ. सुधीर रा. देवरे


         काही महिन्यांपूर्वी गुजरात विधानसभेचा प्रचार सुरू होता. चॅनल्सवरही कोण सत्तेत येईल यावर चर्चा झडत होत्या. एका चॅनलवर अशाच एका चर्चेत एक जेष्ठ पत्रकार गुजरातच्या मतदारांचे विश्लेषण करत होते. त्या विश्लेषणाचा मतितार्थ पुढील प्रमाणे होता: गुजरातमध्ये काँग्रेसला मतदान होते. पण त्यात टक्केवारी वाढण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवा. गुजरातेतला ‍दलित वर्ग काँग्रेसला मतदान करतो, मुस्लीमवर्ग काँग्रेसला मतदान करतो. पण अमूक अमूक क्षेत्रातला क्षत्रिय वर्ग जो मोठ्या प्रमाणात आहे तो काँग्रेसने जर आपल्याकडे वळवला तर काँग्रेसची टक्केवारी वाढू शकते...
         असे हे भाष्य आणि विश्लेषण. ते ही एका पत्रकाराचे. हे सगळे ऐकून सदर गृहस्थ पत्रकार आहेत की कोणी जातीयवादी नेता असा मला प्रश्न पडला. ही चर्चा मला ऐकवली गेली नाही. मी चॅनल बदलले. असे जातीयवादी आणि धर्मवादी विश्लेषण आज सर्रास सुरू आहे. खरे तर या पत्रकाराने असे सांगायला हवे होते, की काँग्रेस आपले म्हणणे तिथल्या नागरिकांना पटवून देण्यास असमर्थ ठरते. त्यांनी आपल्या जाहीरनाम्याचा प्रचार व्यवस्थितपणे करून मतदार वाढवावेत. असे म्हटले असते तर ते आपल्या संविधानाला धरून होते. पत्रकारच जर जातीय आणि धर्मिय विश्लेषण करू लागले तर भारताच्या लोकशाहीत हा अधर्म आहे.
         ज्याचा समाजकारण आणि राजकारण यांच्याशी काहीही संबध नाही असा एखादा हिंदू धर्मगुरू एखाद्या व्यासपीठावरून नागरिकांना हुकूम देतो, की अमूकला मतदान करा आणि चॅनल्स अशा धर्मगुरूचा जनाधार न तपासता त्याला पुन्हा पुन्हा प्रसिध्दी देत राहतात. या उद्‍गारावर चर्चाही घडवून आणतात. एखादा मुस्लीम धर्मगुरू एखाद्या व्यासपीठावरून नागरिकांना हुकूम देतो की अमूकला मतदान करा आणि चॅनल्स अशा धर्मगुरूच्या वक्तव्यालाही पुन्हा पुन्हा दाखवत राहतात. या उद्‍गारावरही  चर्चा घडवून आणतात. खरे तर अशा धर्मांध लोकांकडे चॅनल्स अ‍ाणि वृत्तपत्रांनी दुर्लक्ष करायला हवे. त्यांना आणि त्यांच्या उद्‍गारांना प्रसिध्दी देऊ नये. अपघातातील मृत व्यक्ती जशा चॅनल्सवर दाखवल्या जात नाहीत, अश्लील हरकती जशा पुसट केल्या जातात, सापडलेले दहशतवादी, गुन्हेगार जसे आपले तोंड लपवून कॅमेर्‍यासमोर येतात तसेच अशा व्यक्तींवर कॅमेरा यायला नको. त्यांची प्रक्षोभक विधाने वा सविंधानाला धक्का लागेल अशा भाष्याला प्रसिध्दी मिळायला नको. अमूक धर्मियांनी अमूकांना मतदान करावे असा फतवा काढणे हे आपल्या संविधान विरूध्द आहे.
         अशा भडक प्रक्षोभक आणि जाती- धर्माचा गैरफायदा घेणार्‍या लोकांना आपण अप्रत्यक्ष रित्या मदत करत आहोत हे मिडीयाच्या लक्षात यायला हवे. पण आपला टीआरपी वाढवण्यासाठी अशा आक्रस्ताळी विधानांना प्रसिध्दी देण्यासाठी चॅनल्समध्ये चढाओढ पहायला मिळते हे आपले दुर्दैव.


- डॉ. सुधीर रा. देवरे            
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

आजच्या विचारांची दिवाळी



-         डॉ. सुधीर रा. देवरे

         प्रथमत: सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
         दिवाळीला पारंपारीक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहेच आणि ती सगळ्यांना माहीत आहे. याच परंपरेने दिवाळी साजरी करणे हा वाक्‍प्रचारही भारतातील प्रत्येक भाषेला दिला आहे. एखादी आनंदाची घटना घडली की आपण दिवाळी साजरी करतो. एखादे यश मिळाले की दिवाळी साजरी करण्यासारखे आपण आनंदी होतो. दिवाळी सणाच्या अशा आनंदी पार्श्वभूमीमुळे ऐन दिवाळीत कोणी कोणाला शब्दानेही दुखवत नाही.
         महाराष्ट्रात दिवाळीच्या निमित्ताने साहित्य दिवाळीही साजरी केली जाते. विविध विषयांवरील दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. दिवाळी अंक प्रकाशित होण्याची संख्या आज महाराष्ट्रात चारशेच्या पुढे गेली आहे. दिवाळीच्या आनंदात वितुष्ट येऊ नये म्हणून दिवाळी अंकामध्ये पूर्वी शोकांतिका असलेले साहित्य छापण्याचे सपांदक टाळत असत. अजूनही काही संपादक असा सांस्कृतिक संकेत पाळतात.
         प्रत्यक्ष वास्तव जीवनात सुध्दा ऐन दिवाळीत शत्रूचेही कोणी वाईट चिंतीत नाही. एखादी सार्वजनिक चांगली गोष्ट निर्माण करतानाही कोणी एखादा दुखावला जाणार असेल तर त्याची दिवाळी दु:खात जावू नये म्हणून अशी गोष्ट दिवाळी उलटून गेल्यावर केली जाते. सारांश, सणासुदीला- दिवाळीला कोणाचे वाईट करणे तर दूर पण वाईट विचार करणे, वाईट चिंतणे सुध्दा पाप, अशी आपली समृध्द पारंपारिक रूढी आहे.
         पण प्रत्येक समाजगटाअंतर्गत अजून काही छोटे दहशवादी गट असतात. इतरांच्या दु:खात त्यांना सुख मिळण्याची विकृती जडलेली असते. मग ते ऐन सणासुदीत- गर्दीच्या ठिकाणी दहशत पसरवण्याचे काम करत असतात. आणि लोकांच्या डोळ्यातले अश्रू पाहून आनंदातिरेकाने हसत हसत ते आपली दिवाळी साजरी करतात.
         हातात बंदूक घेऊनच दहशतवाद पसरवला जातो असे मात्र नाही. बाँबस्फोट करूनच दहशतवाद पेरला जातो असेही नाही. तर शिस्तबध्द योजना आखून एखाद्याविरूध्द कट कारस्थान करून त्याला योजनाबध्द पध्दतीने जीवनातून उठवणे हा ही दहशतवादच आहे. आणि अशा योजनाबध्द पध्दतीने काही शक्ती आपला दहशतवाद समाजात राबवीत असतात. सार्वजनिक जीवनात वड्याचे तेल वांग्यावर काढून कोणाला अडचणीत आणण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. ऐन दिवाळीत एखाद्याला दु:ख देऊन गम्मत पाहणे, अशा प्रवृत्तीही समाजात असतात. वाईट प्रवृत्तींवर चांगल्यांनी विजय मिळवला की दिवाळी साजरी केली जाते हा पारंपारिक अर्थ झाला. पण आज सर्रासपणे याचा व्यत्यास साधूनही दिवाळी साजरी करणार्‍यांची संख्या वाढते आहे. अशांना तसे वाईट उत्तर देण्यापेक्षा त्यांना तसा आनंद मिळू देणेही काही काळासाठी आवश्यक असते.
         म्हणून आताच्या दिवाळीला आजच्या विचारांची दिवाळी अशी टिपणी जोडून आपल्याला दु:खात लोटणार्‍या लोकांनाही आपण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहिजेत. त्या गटात बसणार्‍या अशा सगळ्यांसहीत आपणा सगळ्यांना दिवाळीच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा. आपली दिवाळी सकस, दर्जेदार, वैचारिक दिवाळी अंक वाचण्यात आनंदी जावो.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/