मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

एका विटीत दोन कोल्या..

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

एकमेकाला चिकटलेलं जुळं..

इवसं वा दिव्यांग

जन्मताच कोणी मुक्‍ती देतं

गळ्याला नख लावून

रस्त्यात जीवंत हेळना

वा उसनं संगोपन करून

कोणी तिकीट लावतं जत्रेत

फक्‍त चरितार्थ नव्हे

खोर्‍याने पैसे ओढण्यासाठी...

चार हात... चार पाय.. दोन तोंडं..

पाठीलापाठ चिकटली म्हणून

मादी देह एक..

आणि दोन भिन्न 

गर्भाशयांसाठी

दोन भिन्न योन्या

संबधोत्सुक... संभोगोत्सुक...

पुन्हा इवसंच जन्माला घालण्यासाठी की काय...

- एक नर घिरट्या घालतोय!...

एका विटीत

दोन कोल्या...

(आणि जत्रेत व्यावसायिक तिसरी..)

मारता येतील म्हणून...

                             - सुधीर रा. देवरे 

                    पंचवीस वर्षांपूवी एक चांगला अभिजात हिंदी चित्रपट पहाण्यात आला होता. चित्रपटाचं नाव देबशिशु (1985) असल्याचं आठवतं. काही वर्षांपूवी दूरदर्शनवर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री उशीरा विविध भाषेतील अभिजात चित्रपट दाखवले जात. त्यापैकी हा एक होता. उत्पलेंदु चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ओम पुरी, स्मिता पाटील आदींनी काम केलं आहे. चित्रपटाचं कथानक असं:

                    आर्थिकदृष्ट्या एका गरीब जोडप्याच्या घरी एक विचित्र बालक जन्माला येतं (तीन तोंडे, सहा हात असे काहीतरी). बालकाचा बाप घाबरुन एका मांत्रिकाकडे जातो. ते मूल घरात ठेवणं पाप आहे असं मांत्रिक सांगतो आणि त्या मांत्रिकाचा चेला ते मूल आपल्याकडे घेऊन यायला सांगतो. बालक रस्त्यावर टाकून देण्यापेक्षा कोणी मागतं म्हणून त्याला देतो.

                    काही वर्षांनी त्या बालकाला जीवंत शिशुदेव म्हणून तिकीट लावून त्याचं गावोगाव प्रदर्शन भरवत पैसे कमवण्याचं साधन केलं जातं, एकदा तो पिडीत कुटुंब प्रमुख शहरात जातो तेव्हा जागृत जीवंत देव बालकाच्या जाहिरातीची हवा त्याला मोहीत करते. तो तिकीट काढून देव पहायला भव्य अशा तंबूत शिरतो. हा देव पहायला रांगा लावून प्रंचड गर्दी होत असते. देव पहाण्यासाठी तिकीट काढून तंबूत जावं लागतं. देवापुढे असलेला पैशांचा गंज खूप लांबूनच त्याला दिसू लागतो. देव नजरेच्या टप्प्यात येताच हा देव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या घरात जन्मलेलं विचित्र बालक असल्याचं त्याच्या लक्षात येतं. आपण कष्टाची कामं करून कसंतरी जगत आहोत आणि आपल्या अशा मुलाचा फायदा उठवून- उपयोग करून हा कोण कुठला माणूस वैभवात लोळतो, याचा साक्षात्कार त्याला त्या रांगेत होतो. मुलाच्या बदल्यात तीस रुपये देणारा इसमही तो तिथं ओळखतो. त्याच्याजवळ आपला मुलगा नाहीतर काही पैसे मागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला चोर ठरवलं जातं. चेल्यांतर्फे त्याच्यावर हल्ला करून त्याला पिटाळलं जातं. आणि त्यानंतर या नवरा बायकोत होणारा मानसिक संघर्ष आपल्याला अंतर्मुख करून सोडतो. मानसिक संघर्षाशिवाय आणि स्वप्नात बदला घेण्याशिवाय हे जोडपं मुलाचा देव म्हणून धंदा करणार्‍याचं काहीही करु शकत नाही..

                    पण हा चित्रपट पाहून लगेच ही कविता लिहिली नाही. एक वेगळा अनुभव म्हणून हा चित्रपट मनाच्या कप्प्यात खूप दिवसांपासून पडून होता...

                    अशातच दूरदर्शनवरील सुरभी या मालिकेत एकमेकांच्या पाठीला चिकटलेल्या दोन जुळ्या तरुण बहिणी दाखवण्यात आल्या. मुलींचा उपयोग त्या मुलींचा बाप यात्रेत तिकीट लावून लोकांना दाखवत पैसा कमवण्यासाठी करत असल्याचं सांगितलं गेलं. या दोन्ही मुलींशी लग्नाला इच्‍छुक असणार्‍या एका तरुणाचीही मुलाखत दाखवली. मुलींचा बाप लग्न लावायला नकार देतो. कारण त्या मुली त्याच्या उत्पन्नाचं साधन होत्या. हा मुलगा त्या जुळ्या एकमेकाला चिकटलेल्या मुलींशी लग्न करून या मुलींचा बाप जसा पैसा कमवतो, तसाच तो स्वत:ही त्यांच्या प्रदर्शनाने पैसा कमावणार असल्याचं बोलून दाखवतो... हे ऐकून देबशिशु चित्रपटाची आठवण पुन्हा ताजी झाली... मनाच्या अशा अवस्थेतच एका विटीत दोन कोल्या ही कविता लिहिली गेली.

                    तरीही ही कविता म्हणजे चित्रपटाचा सारांश नाही आणि सुरभीत पाहिलेल्या दृश्याचे सरळ वर्णन नाही... अथवा या विवेचनाच्या आधारानेच ही कविता वाचली पाहिजे असंही नाही. वरील दोन्ही गोष्टी फक्‍त कवितेच्या निर्मितीला कारणीभूत ठरल्या म्हणून त्यांचा निर्देश. ही कविता जर कविता असेल तर तिच्यातून अजून काही अर्थ (अनेकार्थ) दृगोचर झाले पाहिजेत... आणि ते अर्थ उलगडून दाखवणं हे कवीचं काम नाही... समीक्षकाचं आहे... कवी सांगेल ती फक्‍त कवितेची निर्मिती प्रक्रिया...

                    या कवितेत अहिराणीतले दोन महत्वाचे शब्द आहेत... एक- इवसं व दोन- कोल्या... हे दोन्ही अहिराणी शब्द कवितेत प्रभावी प्रतिकांचं काम करतात...

                    ‍विचित्र बालक जन्माला आलं की त्या बालकाला ग्रामीण भागात इवसं म्हणतात. ज्या घरात ते जन्माला येतं त्या घरात ही घटना अशुभ समजली जाते... असं विचित्र बालक जन्मल्यानंतर सहसा वाचत- जगत नाही असा समज आहे. (का जाणूनबुजून जगू दिलं जात नाही?) आणि वाचलंच तर (कोणाला समजू न देता) त्या घरातील लोक त्या बाळाच्या गळ्याला नख लावून मारून टाकतात वा सुनसान रस्त्यावर नेऊन ठेवतात. ग्रामीण भागात अशा घटना नेहमीच घडत राहतात.

                    दुसरा शब्द कोल्या... कोली या शब्दाचं कोल्या हे अनेकवचन. विटीदांडू खेळतांना जमिनीवर जो छोटासा लांबट खड्डा खोदला जातो त्याला कोली म्हणतात.

                    या कवितेच्या समीक्षेसाठी आणि अनेकार्थतेसाठी या दोन संज्ञांचा आधार घेणं- विचार करणं आवश्यक ठरावं, असं प्रस्तुत कवीला वाटतं. थांबतो.

              (मार्च 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या आस्वाद: भावलेल्या कवितांचा या पुस्तकात समाविष्ट असलेला लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

    © डॉ. सुधीर रा. देवरे

     ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

व्यंगचित्रांच्या निमित्ताने...



- डॉ. सुधीर रा. देवरे

 

        (संदर्भ: 2012 साली केंद्रीय विद्यालयांच्या राज्यशास्त्र- नागरीकशास्त्र विषयांतील अभ्यासाला पुरक असलेल्या स्वातंत्र्याच्या पहाट काळातील काही भारतीय राजकीय ऐतिहासिक व्यक्‍तींच्या व्यंगचित्रांमुळे भावना दुखावण्याचा प्रसंग उद्‍भवला होता. म्हणून तत्कालीन शासनाकडून अनेक चांगली व्यंगचित्रे त्या अभ्यासक्रमातून हटवण्यात आली होती. त्यावेळी लिहिलेला हा लेख. पण ब्लॉगवर अजूनही प्रकाशित केला नव्हता.)

    आजचे राजकीय नेते नको इतके संवेदनाशील झालेले आहेत. त्यांना कोणतेही सामाजिक प्रश्न ‍नीट सोडवता आले नाहीत, दुष्काळ निवारण करता येत नाही तरी कितीही जटील भावनिक प्रश्न ते चुटकीसरशी सोडवताना दिसतात. (अपवाद गृहीत). ज्या शैक्षणिधड्याबद्दल कोणी आक्षेप घेतला तो धडा अभ्यासक्रमातून धाडकन काढून मोकळं होणं, ज्या पुस्तकाबद्दल कोणी आक्षेप घेतला त्यावर पटकन बंदी आणणं. ज्या चित्रावर कोणी बोट ठेवलं ते चटकन मागे घेणं. इतक्या झटपट असे भावनिक निर्णय घेताना त्या त्या वर्षाच्या बजेटात तरतुदीनुसार जास्तीचा कोणताही खर्च येत नाही, नियोजनावर परिणाम होत नाही. खासदार- मंत्री निधीतून आर्थिक कपात होत नाही. झालाच तर तो फक्‍त फायदाच फायदा, तोही छप्पर फाडके. एकगठ्ठा मतांचा.

अशा काळात कोणी काही चांगल्या मागण्यांकरता शांततामय आंदोलन करत असेल तर ते दुर्लक्षित होतं. कोणी पिण्याला पाणी मागत असेल तर इतक्या ज्वलंत भावनिक प्रश्नांवर देशात चर्चा चालली असताना पिण्यासाठी पाणी मागणं हे अतिशय क्षुद्रपणाचं लक्षण ठरेल. कोणी चांगले रस्ते मागत असेल तर तो ही अतिक्षुल्लक प्रश्न ठरतो. शेतीमालाला भाव मागणेही तसे शासनाच्या दृष्टीने दुर्लक्ष करण्यासारखी बाब. महागाई- नफेखोरी, भ्रष्टाचार, भाववाढ, न्याय या सगळ्या गोष्टी भावना दुखावण्यापुढे किरकोळ ठरत असतात. (दुसरीकडे नोकरशाहीची मनमानी. अगदी दिल्लीपासून तर स्थानिक स्वराज्य संस्था. नगरपरिषदेकडून काही नागरीकांना दुप्पट घरपट्टी लावली जाते तर काहींना अर्धी लावली जाते. न्याय मागितला तर जातीपातीच्या- कायद्याच्या- अधिकाराच्या आश्रयाने ब्लॅक मेलींग केली जाते. स्थानिक लोकप्रतिनिधीचेंही भ्रष्ट नोकरशहा धकू देत नाहीत.) अशा वेळी आतापर्यंत सरकारने काहीही चांगलं काम केलेलं नसलं तरी असं इतिहास बदलण्याचं श्रेय फुकटात मिळतं आणि निवडणुकीत त्या जातीपातीच्या मतांचीही हमखास शाश्वती मिळते.

    कोणाच्याही अचानक भावना दुखून त्या भडकताच दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये, वाहने, वास्तु, वस्तु, दुकाने जसं शासनच सहज उपलब्ध करून देत असतं की काय, असा प्रश्न पडावा; इतक्या सहजपणे हिंसा होत राहते. जनसामान्यांचे प्रश्न बाजूला पडून अशा घटनांच्या प्रतिक्रियांसाठी राजकीय नेते चॅनेल्सवर झळकू लागतात.

    कादंबरी कशी लिहावी हे राजकीय लोक सांगतील, कविता कशी लिहावी, लेख कसा लिहावा, कथा कशी लिहावी, नाटक कसं लिहावं हे राजकीय लोक सांगतील आणि कलावंतानी त्याच आशयाचं लिहायला हवं. चित्र कशी काढावीत हेही तेच सांगतील. सिनेमा कसा निर्माण करावा, कसा दाखवावा हे आधी राजकीय लोकांना तो दाखवून मंजूरी घ्यावी, नंतरच सेन्सार बोर्डाकडे जावं.

    लोककल्याणकारी राजकारण कसं करावं, पुस्तकं कशी वाचावीत, व्यंगचित्रे कशी पहावीत आणि वाचावीतही, कला कशी आत्मसात करावी, कला म्हणजे नेमकं काय ह्याची ज्या राजकारणी लोकांनी कलावंतांकडे शिकवणी लावली पाहिजे, तेच लोक कलावंताने काय करावं हे शिकवतात, हे आपल्या देशाचं आणि या प्रजासत्ताक देशाच्या राज्यघटनेचंही दुर्दैव!!!  

महात्मा गांधीना दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून बाहेर फेकलं असं उद्या एखाद्या पुस्तकात चित्र छापल्याने कोणाच्या भावना दुखावल्यात तर काय करावं? हळू हळू इतिहास बदलून टाकावा दुसरं काय. (खरं तर महात्मा गांधीचा कितीही अपमान केला तरी या देशात कोणाच्याच भावना दुखावत नाहीत, ही आजची वस्तुस्थिती.)

        ताजा कलम: अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य घेणार्‍यांनी कोणाच्या भावना न दुखावता कलेतून सुधारकाची भूमिका घ्यावी. आणि ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांनी हातात शस्त्र घेऊन अतिरेकी होऊ नये. या जगात न्याय मागण्याच्या कायदेशीर जागा उपलब्ध आहेत, हे लक्षात असलं पाहिजे. माणूस आज जसजसा सुशिक्षित होत आहे तसा अधिकाधीक धर्मांध होत चालला का? तसं होत असेल तर आपली समग्र (जागतिक) शिक्षण व्यवस्था की अव्यवस्था तपासून पहावी लागेल. (ताजा कलमचा संदर्भ: फ्रान्स)

       (आज प्रकाशित करताना फ्रान्सच्या संदर्भासाठी ताजा कलम जोडला आहे. पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशना’कडून ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. त्या निमित्ताने पुस्तकात समाविष्ट झालेल्या पण ब्लॉगवर अजून न आलेल्या तीन लेखांपैकी हा दुसरा. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

    © डॉ. सुधीर रा. देवरे

     ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/