बुधवार, १५ एप्रिल, २०२०

वैश्विक संस्कार


- डॉ. सुधीर रा. देवरे

        संस्कार म्हणजे काय? संस्कार हे सापेक्ष असतात का? संस्कार हे सुसंस्कारच असतात का? खरं तर संस्कार या शब्दातच सु म्हणजे चांगली असलेली संज्ञा गृहीत धरलेली आहे. तरीही संस्कारात सुसंस्कार आणि कुसंस्कार अशी वर्गवारी हेतूत: केली जाते. संस्कार हे कृत्रिम असतात का नैसर्गिक? निसर्गाला अनुसरून असणारे संस्कार कोणते आणि निसर्गाच्या विरूध्द असणारे संस्कार कोणते? निसर्गाच्या विरूध्द जाणार्‍या संस्कारांना संस्कार म्हणता येईल का? संस्कारांनी माणसाचा देवमाणूस होतो का? होत असेल तर संस्कारांनीच माणसाचा राक्षस होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर होतातच असे येते. संस्कारानेच दहशतवादी वा मानवी बाँब होणारे लोक या जगात आहेत. लोकांना सरेआम मारण्याचेही संस्कार केले जातात, हे सत्य आहे.
        रोज मंदिरात जाणं, रामरक्षा म्हणणं, त्रिसंध्या करणं, प्रार्थना म्हणणं, पोथ्या वाचणं, आरत्या म्हणणं, उपवास करणं, सत्संग करणं, भजन करणं, नमस्कार करणं, वडिलधार्‍यांचा मान राखणं, जानवं घालणं आदी गोष्टींना आपण पारंपरिक अर्थाने संस्कार म्हणत असतो. इतर धर्मातील याच पध्दतीची विशिष्ट कर्मकांडं करणं यालाही त्या त्या धर्मात संस्कार म्हटलं जातं. अशा धार्मिक कर्मकांडांनाच फक्‍त संस्कार म्हटलं पाहिजे की संस्कारात यापेक्षा विशाल दृष्टीकोन असू शकतो? असे संस्कार विशिष्ट गटांसाठी चौकटीच्या मर्यादेत अडकतात की सार्वत्रिक ठरतात?
        पारंपरिक संस्कारांपेक्षा अजून पुढचा विचार केला तर, आजच्या अर्थाने रोज प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? प्रमाणापेक्षा जास्त वीज वापरणं वा वीज चोरी करणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? घराच्या आजूबाजूला झाडं न लावणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? झाडं तोडणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? येता जाता रस्त्यावर थुंकणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? भर रस्त्यावर वाहणं उभी करणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? सार्वजनिक जागी अस्वच्छता करणं वा कचरा टाकणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? रस्त्याने कारणाशिवाय हॉर्न वाजवणं वा हॉर्न वाजवून कोणाला घरातून बोलावणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? ध्वनी-वायु-जल प्रदुषण करणं, सभ्य भाषेत न बोलणं, कोणाचे पैसे बुडवणं, न्यायालयात धर्मग्रंथाची शपथ घेऊन खरं बोलण्याच्या अविर्भावात खोटं बोलणं आदी संस्कार कोणत्या गटात बसतील?
    आपल्या मागण्यांसाठी आंदोलनं करताना सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणं वा जाळपोळ करणं, लाच घेणं-देणं, हुंडा घेणं, प्रमाणापेक्षा जास्त नफा घेणं, साठेबाजी करणं, आपल्या कळपाविरूध्द असलेल्याला कोंडीत पकडणं, कोणाला त्याच्या व्यंगावरून बोलून दुखावणं आदींसह आपल्या देशात कशावरही उठसूट नवनवीन कायदे करावं लागणं, हे नागरिकांच्या चांगल्या संस्काराचं लक्षण आहे का? बलात्कार का व्हावेत? कितीही कठोर कायदे केले तरी बलात्कार दिवसेंदिवस वाढताहेत. जीवंत जाळण्याचे प्रकार घडताहेत. अॅसिड फेक होते. क्षुल्लक कारणावरून माणूस माणसाला ठार करतो. हे संस्कार कुठून येतात? वयात येताना मुलांना शिकवायला हवं ते आपण शिकवत नाही का? जे मोकळं बोलायला हवं ते आपण मुलांशी बोलत नाहीत का?
        आजच्या जागतिक करोना काळात स्वच्‍छता राखणं, अंतर राखून हात जोडणं, अडचणीतल्या माणसांना मदत करणं, भाजीपाला- किराणासाठी गर्दी न करणं,  गरजा कमी करणं, दोन कुटुंबातल्या मोजक्याच माणसात लग्न समारंभ, वीस-पंचवीस माणसांच्या उपस्थितीत अंत्यविधी उरकणं आदी गोष्टी नवसंस्कार ठरतात.               
        सारांश, जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात जे वागणं सुसंस्कृत वाटेल त्यालाच वैश्विक संस्कार म्हणता येतील. संस्कार हा आपल्या घरापेक्षा, जातीपेक्षा, धर्मापेक्षा, देशापेक्षा आणि मानवजातीपेक्षाही खूप मोठा असतो. वैश्विक संस्कारात समग्र जीवसृष्टी संस्कारही अंतर्भूत.)नुसता मानवतावादच नव्हे तर मानवापलीकडे असणार्‍या सर्वच वैश्विक चराचर सृष्टीचा (भूतदयेचा) या संस्कारात समावेश असला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांचं पसायदान अशा वैश्विक धर्माचा आग्रह धरतं. अशा वैश्विक संस्कारांची आख्खं जग सगुणतेने वाट पहात आहे.
(‘सगुण- निर्गुण मटा, दि. 15 – 4 – 2020 च्या अंकात प्रकाशित झालेला लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १ एप्रिल, २०२०

कोरोना आणि माणूस



- डॉ. सुधीर रा. देवरे

    डिसेंबर 2019 मध्ये कोरोना चीनच्या वुहान शहरात पसरला. चीन मधून तो इतरत्र पसरणार नाही असा अनेकांचा समज होता. आज संपूर्ण जगात कोरोनाच्या दहशतीने युध्दजन्य परिस्थिती आहे. हा विषाणू म्हणजे मानवाने तयार केलेला जैविक बाँब असून तो माणसावरच बुमॅरंग सारखा उलटला असं बोललं जात होतं.
    चीन मधून कोरोनाचं उच्चाटन होताच चीनने हाच आरोप इतर देशांवर केला. कोरोना हा जैविक बाँब की नैसर्गिक विषाणू हा प्रश्न आज अनुत्तरीत असला तरी, हे जैविक संकरीत हत्यार असल्याची साशंकता काही शास्त्रज्ञांना वाटत आली.
    मार्च 2020 च्या सुरूवातीला कोरोना भारतात दिसू लागला. आधी तुरळक. नंतर रूग्ण संख्या वाढू लागली. दरम्यान डब्ल्यूएचओ कडून कोरोना वैश्विक महामारी असल्याचं जाहीर झालं. इटली, इराण, स्पेन, अमेरिका सारखे अनेक देश  सुरूवातीला गाफील राहिल्याने त्यांना जबर किंमत चुकवावी लागत आहे. हा विषाणू जगात अजून किती धुमाकुळ घालणार, माहीत नाही. याचं उच्चाटन होईपर्यंत जगात कितीतरी लोकांनी आपला प्राण गमावला असेल.
     कोरोनासारखे विषाणू जातीभेद, धर्मभेद, पंथभेद पाळत नाहीत. आस्तिक- नास्तिक ओळखत नाहीत. ही मक्‍तेदारी माणसाची! मित्र राष्ट्र कोणते, शत्रू राष्ट्र कोणते त्याला माहीत नाही. सगळ्या माणसांना कोरोना समान न्याय देताना दिसतो. इतकंच काय ज्याच्या भरोश्यावर लोकश्रध्देतील जगन्नाथाचा रथ चाललाय त्या देवालाही कोरोनाने माणसांसमोर कोंडून ठेवलं!
     जन्माला घालणार्‍या देशालाही त्याने दयामाया दाखवली नाही. डोळ्यांना न दिसणारा हा शत्रू माणसाच्या जीवावर उठला. पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा! हे पदोपदी जगूनही माणसावरच कोरोना सोडून माणूस माणसाच्या जीवाशी खेळतो. अशा निर्मितीशिवायही माणूस माणसाशी कोरोनासारखाच वागतो. माणसाची घमेंड, अहंकार, महत्वाकांक्षेचा हा कोरोना.
    विषाणूंच्या संकराने माणूस कोरोनाचा भस्मासूर निर्माण करतो. पण तो आपल्याच डोक्यावर हात ठेवेल, हे माणसाला कळू नये? जन्मदात्याला ओळखण्याइतकी बुध्दी विषाणूला नाही. असे विध्वंसक शोध म्हणजे पृथ्वीवरील आख्ख्या मानवजातीला सुरूंग! हे कोरोना कडून माणसाने शिकावं. आख्ख्या मानवजातीने त्याला गुरू मानत धडधडीत धडा शिकावा. कोरोनाला संजीवनी देणार्‍या महाशक्‍ती आज हतबल आहेत. घातक हत्यार बनवताना, वेळ पडल्यास मृत्यू तांडव थांबवायचं कसं, यावर समांतर संशोधन होत नाही. आज धोक्यातल्या मानवजातीला वाचवायचं औषध वा लस तयार नाही! केवढं हे क्रौर्य!  
    पृथ्वी शेकडो वेळा बेचिराख होईल इतके अणुबाँब, रासायनिक शस्त्र जगभर लपवलेले आहेत. ते चुकीच्या हातात पडले तर आक्‍ख जग नष्ट होईल. पण जागतिक सत्ताधीश होण्याच्या नादात माणूस बुध्दीभ्रष्ट झाला. विवेक हरवून बसला.
     माणसाच्या शेजारी शत्रू असतातच. आपण ज्याला देश वगैरे संबोधतो. शत्रूचं घर नष्ट करण्यासाठी त्याच्या घराला आग लावायची. शेजारचं घर जळताच आपलं घरही जळणं साहजिक, हे बुध्दीवान मानवाला माहीत असतं. तरीही शत्रूचा काटा काढण्यासाठी शेजार्‍याचं घर जाळतो. शत्रूचा नायनाट झाल्यानंतर आपलं घर जळेल! आ‍धी नाही. शत्रूचं घर जळताना जो आनंद मिळेल, तो महत्वाचा. असा माणूस. शिकून सवरून, कळून वळून बुध्दीभ्रष्ट. सत्ता आणि महासत्तेसाठी नरसंहार करणारा!
     कोरोनाचा जन्म हा असाच महत्वाकांक्षी आविष्कार. 1999 साली प्रकाशित झालेल्या डंख व्यालेलं अवकाश या माझ्या कवितासंग्रहातली युध्द नावाची कविता आठवली:

विनंतीची वेळ टळून गेली
आता बळाची परवानगी
शांततेच्या रात्री
चंद्र खुडून शत्रूचं घर पेटवायचं
मग शेजारी आपसूक बाहेर येतील...
उगवत्या सूर्याच्या साक्षीने
मागील दाराने
आपण आत घुसायचं
नंतर आपलं घर पेटलं तरी  
युद्ध आपण जिंकलंच म्हणायचं!

(‘सगुण- निर्गुण मटा, दि. 1 – 4 – 2020 च्या अंकात प्रकाशित झालेला लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
  ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/