मंगळवार, ३१ मे, २०१६

पळता येणार नाही राजकारणापासून दूर



- डॉ. सुधीर रा. देवरे

मला खुणवायचं नाही कोणत्याही दोन माणसांत
सुरू होणार्‍या राजकारणाबद्दल
मला बोलायचं नाही एखाद्या कार्यालयात
डूक धरणार्‍या सूडकारणाबद्दल
आणि मला टोचायचं नाही एखाद्या गावात
काटा काढणार्‍या राजकारणाबद्दलही.

आत्मप्रौढीने सांगतात लोक, 
राजकारणाबद्दल बोलत नाहीत आपण
आवडत नाहीत राजकारणी आणि
राजकारणात जाणारही नाही चुकून कधी...
अशा तमाम तटस्थ प्रवृत्तीबद्दल बोलायचंय इथं.

कोणाकोणाला आवडतं म्हणे 
राजकारणाविषयी व्देषाचं बोलणं आणि ऐकणंही
तरी अशा तथाकथित कुपमंडूक राजकारणापासून 
राहता येईल का आपल्याला
कायम दोन हात तरी दूर?

तसं असायलाच हवं दूर व्यक्‍तीगत चिखलफेकीपासून
आणि डबक्यात उड्या घेणार्‍या राजकारणापासूनही
पण आता नाही बोलता येत राजकारण गेलं चुलीत
देशाच्या राजनितीपासून दूर झालोत तर
वाढणार आहे शक्यता देशाबद्दल बेफिकीर होण्याची 
काय करतोय माझा देश आणि कायहे त्याची दशा दिशा
याबद्दलही असू शकतो आपण कायम अनभिज्ञ 
माहीतच नाही व्यापक मुळातून समाजव्यवस्था
तर आपण करू शकणार नाही सकारात्मक मतदान.
नेत्याची राजकीय प्रणाली- वृत्ती- प्रवृती 
मुळातून माहीत नसणार आपल्याला
मतदान न करणं यालाही म्हणूनच
काही लोक मानतात आज प्रतिष्ठेचं काम.
महागात पडेल आपल्याला दिवसेंदिवस असं
राजकारणाकडे पाठ फिरवून डोळेझाक करणं.
          
आपण कितीही स्वीकारला आपल्यापुरता अराज्यवाद
तरी या राजकीय बेड्या तोडणं शक्य आहे काय?
आपण गावातील पंचाला निवडून देणार नसू
नगरसेवकाला निवडून देणार नसू
परिषद- पंचायत सभासद निवडून देणार नसू
आमदार-खासदार निवडून देणार नसू
तर अराज्यवाद पाळतो म्हणून पावलापावलांवरच्या
करांपासून मिळेल का मुक्‍ती आपल्याला कधी?
कोणाकडून करून घेणार आपण
आपल्या गावदेशाची भौतिक प्रगती
सरकारची गुंतवळ नाकारून आपल्याला
कसं राहता येईल शासनात कायद्यात नियमात?
        
राजकारण करणं आपलं काम नाही
भल्या माणसाचा तो प्रांत नाही
असं म्हणत आपण राजकारणापासून लांब राहायचं
आणि जातांधळ्या धर्मांधळ्या कामांधळ्या
पैशांधळ्या कायद्यांधळ्या देशांधळ्या व्यसनांधळ्या
ऑफिसांधळ्या लुटारू आतंकींचे उतलेले प्रताप पहात 
त्यानांच मुकाट्याने मतदान करत परतायचं 
नामदारांकडून चांगली कामं होण्याची 
अपेक्षा करत रहायची पाच वर्ष मुकाट्यानं मनातल्यामनात
असा हा सगळा तिढा कोणाशी वैर नको म्हणून.
        
अब्राहम लिंकन, चर्चिल, मंडेला, गोर्बाचेव्हसह...
आंतरराष्ट्रीयच नव्हे नुसत्या देशात होऊन गेलेल्या
नेत्यांच्या नावावरूनही फिरवली नजर
तर नाही दिसत असं समीकरण कुठं
फक्‍त राजकारणी आणि राजकारण
विविध पैलूदार लोक भेटतात इतिहासात-
गांधी, टिळक, बोस, रानडे, नेहरू, 
राजेंद्र प्रसाद, योगी अरविंद, आंबेडकर, 
शास्त्री, पीव्ही नरसिंहराव, व्हीपी सिंग,
अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण,
शरद पवार, ग प्र प्रधान, एस एम जोशी, डांगे आदींनी
राजकारण नाही केलं फक्‍त सत्तेचं तथाकथित 
पेक्षा ती अजून आहेत कोणीतरी महान 
कोणी कवी, कोणी साहित्यिक, गणिती,
तत्वज्ञ, विचारवंत, समाजिक कार्यकर्ता,
संशोधक, समाजसुधारक अशा विविध क्षेत्रातून
घडत जातात राजकीय व्यक्‍तिमत्वं
आणि इतिहासही घडवत राहतात
विविध स्तरातून राजनितीत येणारे इसम
दुर्गा भागवत अलिप्त राहिल्या असत्या
अशा राजकारणापासून तर लादलेल्या आणीबाणीला
करता आला नसता त्यांना बंडखोर बेडर विरोध.
        
- तात्पर्य,
आपल्याला पहायचे असतील बेरजेच्या राजनितीत
विचारवंत, साहित्यिक, तत्वज्ञ, सुधारक, शास्त्रज्ञ, संशोधक
तर आपण सक्रीय राजकारणातून राहिलोत दूर तरी
एकूण शतरंजच्या खिलाडी कुरघोड्या घडामोडींपासून
पळता येणार नाही आपल्याला खूप लांब
किमान आपल्याला करावं लागेल जागल्या होऊन
वजाच्या राजकारणावर वाजवी टीका करायचं चोख काम. 

      (या वेळी पहिल्यांदा मुद्दाम कवितेच्या फॉर्ममध्ये ब्लॉग लिहायचा प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी झाला ते माहीत नाही. ब्लॉग कविता म्हणून न वाचता लेख म्हणूनच वाचावा. या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, १४ मे, २०१६

जलसाक्षरता : पाण्याच्या देशात!



-         डॉ. सुधीर रा. देवरे

      मला एका संपादक मित्राने विचारलं, लोकसंस्कृतीतील ओव्यांमध्ये वा लोकगीतांमध्ये पाणी वाचवण्यासंदर्भात काही मौखिक परंपरा असतील तर त्या उपयोजित करत लेख लिहाल का? 
मी म्हणालो, नाही.
मी पटकन दिलेल्या नाही उत्तराने त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, का?
      कारण आपल्या लोकसंस्कृतीच्या परंपरेत इथं पाणीच पाणी आहे. भारत हा पर्वतांचा आणि नद्यांचा देश आहे. पूर्वीपार नदीच्या काठांवरच गावं वसलेली होती. इथं भरपूर जंगलं होती. म्हणून पाऊसही भरपूर कोसळायचा. पावसाच्या झड्या लागायच्या. पाण्याचे महत्व कळण्याचे दिवस नव्हतेच पूर्वी. उलट पाण्यासारखा पैसा खर्च करणे हा वाक्‍प्रचार आपल्याकडे सुरू झाला. म्हणजे पाण्याला किमंत शून्य. पूर्वी पाणी फुकट आणि जिकडे तिकडे मुबलक उपलब्‍ध असल्याने पाण्याची महात्मता वा काटकसर मौखिक वाड्‍.मयात दिसून येत नाही. मात्र लोकसंख्येच्या प्रचंड स्फोटाने आणि जंगल तोड- वृक्ष तोड झाल्याने पाण्याची निकड आता उत्पन्न होत आहे.
      संपादक महाशयांचे शंका निरसन झाले. पण पाणी हा आज सगळीकडे चिंतनाचा विषय झाला याचं कारण काय? पश्चिम आशिया खंडातल्या देशांत वाळवंट आहे. पाण्याची कमतरता पूर्वीपार आहे. म्हणून तिथले लोक आठवड्यातून एक दिवस अंघोळ करतात. त्या मानाने भारतासारख्या देशात पाण्याची उपलब्‍धता परंपरेने विपुल असल्याने आपण रोज अंघोळ करतो. (आणि आपल्या वाहनांनाही- गाड्यांनाही रोज अंघोळ घालतो. रोज घराच्या फरश्या धुतो. अर्धा ग्लास पाणी पिऊन अर्धा ग्लास फेकतो. गल्लीतून- गटारातून पाणी वाहू देतो, पण आपण नळाच्या तोट्या बंद करत नाही. बोअरवेल स्वत:च्या पैशांनी केली असली तरी त्यातून येणारे पाणी हे नैसर्गिक आणि सामाजिक आहे याचे भान आपण ठेवत नाही.) पाणी वाचवण्याचे दाखले भारतात मिळत नाहीत. भरपूर पाऊस आणि दु्‍थड्या भरून वाहणार्‍या नद्या आपण टिकवून ठेवल्या नाहीत. तात्पुरत्या स्वार्थाने त्या प्रदुषित केल्या आणि जंगलेही गरजेपेक्षा झपाटयाने नष्ट केलीत. ब्रिटीश राजवटीत दूरदृष्टीने काही नद्यांवर धरणं बांधली गेलीत. त्याचे फायदे आपल्या लक्षात आल्याने आपणही स्वतंत्र भारतात धरणं बांधू लागलो. धरणांचे फायदे आता आता आपल्याला दिसू लागली आहेत.
      पाणी, पाऊस, भूजल पातळी म्हणजे जमिनीतली पाणी पातळी यांचा खूप जवळचा संबध झाडांशी आहे, डोंगरांशी- पर्वतांशी आहे आणि त्यांच्यावर उभ्या असलेल्या जंगलावरही पाण्याचा संबंध आहे. म्हणून जलसाक्षरता राबवतानाच्या प्रचारात झाडांना विसरून चालणार नाही. फुकट मिळणारा अमर्याद प्राणवायू झाडांपासून मिळतो आणि आपल्याला प्रदुषणापासून वाचवते ते ही झाडच. म्हणून फळ न देणारी झाडं असलीत तरी ती आपण जपली पाहिजेत! आपल्याला झाडं लावता येत नसतील तर किमान तोडू तरी नये वा तोडायला कोणी उद्युक्‍त होईल अशी कृती टाळायला हवी. झाडांपासून म्हणजे लाकडांपासून बनवलेल्या वस्तू वापरण्याचं थांबवायला हवं. आपल्या प्रत्येक वाढ दिवशी आपण एकेक झाडं लावून ते वाढवायला हवं- जगवायला हवं.
      आतापर्यंत आपण पाण्यासारखा पैसा खर्च करतो, असं फुशारकीने म्हणत होतो. यापुढे मात्र आपल्याला पैशांसारखे पाणी खर्च करता येणार नाही. पैसे छापता येतात, म्हणून कमवता येतात! पाणी छापता येत नाही. म्हणून कमवताही येणार नाही! हे लक्षात घेऊन यापुढे आपण पाणी अडवलं पाहिजे. साचवलं पाहिजे. जिरवलं पाहिजे. पाण्याची काटकसर करणार्‍या कोणालाच कंजुष म्हणता येणार नाही.
      या पारंपरिक पाण्याच्या देशात पाणी वाचवायचं कसं? जलसाक्षरता आपल्या समाजात रूजता रूजत नाही. पाणी आपण स्वत: वाचवावंच पण कसं वाचवावं याबाबत दुसर्‍यालाही सुचना कराव्यात. मार्गदर्शक करावं. जशी आपण गावपातळीवर वर्गण्या काढून आतापर्यंत सार्वजनिक मंदिरे बांधत आलो, तशी पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना गावागावात श्रमदान करून सामुहीक पध्दतीने राबवायला हवी. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रातल्या काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ आहे. अशा वातावरणात ओठांवर गाणं आलंच तर ते असं येतं:
      पानी रे पानी तेरा रंग कैसा ।
सुखे मे मिला हुआ घडा जैसा ।।

      (महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावर शुक्रवार,  दिनांक २९ एप्रिल, २०१६ ला प्रकाशित झालेला माझा लेख. या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/