मंगळवार, ३० जून, २०१५

स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:






- डॉ. सुधीर रा. देवरे

      हे जग बदलण्याची वाट पहात बसू नका. जग बदलण्याच्या भानगडीतही पडू नका. आपण स्वत: बदला असे भाष्य आपल्याला अनेक आदर्शवत लोकांकडून ऐकायला मिळतं. आणि नेमक्या अशा लोकांकडून ऐकायला मिळतं की त्यातील काही लोकही दुसर्‍यांना नेहमी वाईटच म्हणत असतात. प्रवचनात, आख्यानात, कीर्तनात, भाषणात वा एखाद्या कार्यालयीन ट्रेनिंग सेंटरमध्ये असे हमखास शिकवले जाते. या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी सोबत एक दृष्टांत कथाही सांगितली जाते. ती कथा अशी:
      ‘‘ज्याला हे जग बदलायचे होते अशा एका माणसाने देवाची प्रार्थना करून देव प्रसन्न करून घेतला. प्रसन्न झाल्यावर देवाने त्या माणसाला विचारले, काय हवंय वत्सा तुला?  तो माणूस म्हणाला, मला जग बदलायचं आहे. त्यासाठी मला बळ दे. देव म्हणाला, तथास्तु. तुला वीस वर्ष देतोय मी. जा जग बदलून ये. वीस वर्षानंतर पुन्हा तो माणूस देवाजवळ आला. म्हणाला, जग खूप मोठे आहे म्हणून मला जग बदलता येत नाही, आता मी देश तरी बदलून पाहतो. देव म्हणाला, जा तुला पुन्हा वीस वर्ष दिली. तुझा देश बदलून ये. वीस वर्षानंतर तो परत येतो आणि देवाला सांगतो, देशही खूप मोठा आहे. देश बदलता येत नाही. देश बदलत नाही तर आता मी राज्य तरी बदलून पाहतो.
त्याला आपले राज्यही बदलता येत नाही. मग तो जिल्हा बदलायचं म्हणतो. नंतर तालुका व त्यानंतर गाव बदलू पाहतो. पण गावही बदलत नाही. स्वत:च्या घरातील माणसांची वृत्तीही त्याला बदलता येत नाही. म्हणून तो देवाला शरण येतो. देवाला सांगतो, कोणीच बदलत नाही म्हणून मी आता स्वत: बदलणार आहे. आणि तो बदलतोही.
देव हसतो. म्हणतो, समाज बदलू नका. स्वत:ला बदला. जगासारखे वागा.’’
      इथेच तर खरी गोम आहे. आपण बदलणं म्हणजे नेमके काय? कसे बदलायचे? लोकांप्रमाणे आपण वागणं म्हणजे आपण बदलणं. लाच घेणार्‍यांबरोबर जमवून घेण्यासाठी लाच घ्यायला सुरूवात करायची म्हणजे आपण बदलणं का? अशा प्रकारचे आपण बदलणं देवाला अभिप्रेत आहे का? भ्रष्टाचार्‍यांबरोबर जमवून घेणे म्हणजे भ्रष्टाचाराला साथ द्यायची? नंगटांमध्ये बदलून नंगट व्हायचं? दारू पिणारा आपल्या सांगण्यावरून दारू पिणे सोडत नसेल तर आपण त्याच्यासोबत दारू प्यायची? कोणतेही व्यसन करणारा व्यसनी आपले व्यसन सोडत नसेल तर आपण त्याच्यासारखे व्यसनी व्हायचे? जे दोष आपल्याला इतरत्र दिसतात त्यांच्यासारखे होऊन त्या दोषांना सामोरे जायचे, म्हणजे बदलणे? अथवा वाईट गोष्टींकडे डोळेझाक करायची? चांगलं शिकवायचं नाही आणि विरोधही करायचा नाही? अन्याय सहन करायचा? अन्याय पचवत जगायचे. समाज बदलायच्या भानगडीत न पडता आपण बदलायचे म्हणजे आपण त्यांच्यासारखे अवगुणी व्हायचे, असे सरळ सरळ हे दृष्टांत आपल्याला सांगतात. शिकवतात. असाही अर्थ या स्वत: बदलण्याच्या उपदेशात असू शकतो, तो नाकारता येणार नाही.
      आपला स्वभाव लोकांना आवडत नाही म्हणून तो बदलायचा. खरे बोलायची सवय असेल तर ती सवय बदलायची. तोंडावर गोडी गोडी बोलायचे. पाठ फिरताच निंदा नालस्ती करायची. सगळ्यांशी क्षुद्र राजकारण खेळायचे. लोकांना अडचणीत आणायचे. म्हणजे लोक आपल्याला चांगले म्हणतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. लोक आपल्याला घाबरतील. समोर येताच नमस्कार करतील. आपण लोकांसारखे बदलायचे म्हणजे असे बदलायचे का? का आपले सत्व कायम ठेवायचे, आपले तत्व जपायचे. आपण बदलायचे म्हणजे नक्की काय करायचे? हे सोपे प्रश्न नाहीत. खूप गहन आहेत. क्षुद्र राजकारणाला बळी पडणार्‍या लोकांनाच हे प्रश्न सखोल कळू शकतात. अनेक लोक अशा क्षुद्र राजकारणामुळे आपल्या आयुष्यातून उठले आहेत.
      सारांश, आपले आचार‍, विचार, तत्व, ज्ञान आपल्याला स्वत:ला भावत असतील. आपण स्वत: वाईट मार्गावर नाही. आपलेच वागणे योग्य आहे, अशी आपल्याला खात्री असेल तर आपला मार्ग सोडून दुसर्‍याच्या मार्गाने जाणे धोकादायक आहे. आपण आणि आपले काम भले. म्हणून आपल्यासारखे होण्यासाठी जग बदलणार नसेल तर आपण त्यांच्यासारखे कधीही होऊ नये. हेच गीतेत वेगळ्या शब्दात म्हटले आहे:
स्वधर्मे निधनं श्रेय:
परधर्मो भयावह: ।।
निदान मी स्वत: तरी गीतेतल्या या पदाचा असा अर्थ काढतो.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

रविवार, १४ जून, २०१५

वाचायला वेळ नाही




- डॉ. सुधीर रा. देवरे

      वाचन करणे हा रिकामटेकड्या माणसाचा उद्योग, असे फक्‍त पूर्वीच म्हटले जायचे असे नाही. आज सुध्दा जो रिकामटेकडा आहे आणि अजिबात काही वाचत नाही अशा माणसाचे मत सुध्दा असेच आहे. आपल्याकडून चुकून एखाद्याला सहज विचारले गेले, काय वाचन चाललंय सध्या? तर त्याचे उध्दटपणे उत्तर येते, वाचायला वेळ आहे कुणाला? या वाक्यानंतर तो त्याच्या दैनंदिन जीवनात कसा व्यस्त आहे याचे पाडे वाचू लागतो. अशा वेळी आपल्यालाच अपराधी वाटू लागतं की आपण वाचन करतो हे याच्या निदर्शनास आलं नसतं तर किती बरं झालं असतं. कारण त्याच्या दृष्टीने आपण वाचन करतो म्हणजे पूर्णपणे रिकामटेकडे असतो.
      वाचन्याशिवाय वाचणार नाहीत, वाचाल तर वाचाल, असे कितीही सुविचार आपण कोणाला ऐकवले तरी व्यवहारात आपल्याला पावलोपावली प्रॅक्टीकल उत्तर मिळत असतं, पैशांशिवाय वाचणार नाहीत. सर्व जग पैशांकडे धावतंय, हे रस्त्यावर येताच कळू लागतं. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून पैशाच्या नाण्याभोवती फिरते हे नटसम्राटातील अवतरण फार विदारक पध्दतीने आज सामोरे येते. यात बदल करायचा झाला तर नाण्याऐवजी नोटेभोवती इतकाच बदल करावा लागेल.
      पैशांसाठी कष्ट, काम, श्रम, परिश्रम, धावपळ करून थकवा आला की थोड्या विरंगुळ्यासाठी पूर्वी काही लोक वाचन करत होते. पण विरंगुळ्यासाठी वाचन वगैरे प्रकारही आज कालबाह्य झालाय. विरंगुळ्यासाठी टीव्ही, विविध चॅनल्स, सिनेमा, चालू नाटके, डान्स बार, ऑक्रेस्ट्रा, टेप, गप्पा, पत्ते, भजने, सत्संग करणे, मंडळे काढणे इत्यादी अनेक प्रकार उपलब्ध असताना वाचन हा मक्ख चेहर्‍याचा प्रकार कसा तगून राहू शकेल?
      वाचक, अभिरूचीसंपन्न वाचक आणि उच्चअभिरूचीसंपन्न वाचक अशा तीन पायर्‍या वाचकांत असतात. पहिल्या पायरीवरचा वाचक प्रगती करत तिसर्‍या पायरीवर जाऊ शकतो. पैकी उच्चअभिरूचीसंपन्न वाचक वर्ग हा बाहेर कितीही करमणूकीच्या साधनात उत्क्रांती- क्रांती वा स्फोट झाले तरी आपली वाचन साधना सोडत नाही. ती त्याची गरज बनलेली असते. मग प्रपंचासाठीची नोकरी वा व्यवसायातून त्याला वेळ मिळत नसला तरी वेळ नाही असे त्याला वाटत नाही. त्यातल्या त्यात वेळ काढून तो वाचायला वेळ देत असतो.
      अभिरूचीसंपन्न वाचक हा एकतर उच्चअभिरूचीसंपन्न वाचक होतो अथवा त्याच पायरीवर अधूनमधून वाचन करत राहतो. अथवा व्यवहारी तडजोड करून छंदाचा व्यवसायाशी जोड देऊन प्रपंचाचे साधन करू पाहतो. मग या खटपटीत वाचनाचा छंद तो अन्य छंदात बदलून घेऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या कथेचा चित्रपट तयार करणे, नाटक सादर करणे, दिग्दर्शन करणे, निर्माता होणे, पटकथाकार होणे, संवाद लिहिणे, जाहिराती तयार करणे, नाटककार होणे, एकांकीका लिहिणे, प्रकाशक होणे, कवितांचा व्यावसायिक प्रयोग करणे, रंगमंचीय कविता सादर करणे, साहित्य संमेलने भरवणे, कॅसेट काढणे, सीडी तयार करणे वगैरे.
      पहिल्या पायरीवरचा जो केवळ वाचक असतो त्याने अभिरूचीसंपन्न वाचक होऊन पुढे उच्चअभिरूचीसंपन्न वाचक होणे अशा पायर्‍या क्रमाने गाठायच्या असतात. पण त्यापैकी बहुतेक प्रपंचासाठी अन्य व्यवसाय, रोजगार, नोकरी, दुकानदारी, एजंट, कंपनी, कंत्राटदार, शिक्षक आदी नोकर्‍या- व्यवसायात अडकतात. अशा व्यवसायात राहूनही पैशांसाठी अल्पसंतुष्ट असलेला माणूस साधारण वाचकांकडून उच्च‍अभिरूचीसंपन्न वाचकांकडे प्रवास करू शकतो. पण एकदा प्रपंच हव्यासात गुरफटला की तो वाचनातून बाद होतो. प्रापंचिक तात्कालीन सुख त्याला खरे सुख वाटायला लागते. मग कुटुंबासाठी पैसे कमावल्यानंतर विरंगुळ्यासाठी तो स्वस्त करमणूकीचा आश्रय घेत राहतो. उदा. टीव्ही, सिनेमा, बुवा, सत्संग, मंडळातली सत्ता- प्रसिध्दी वगैरे.
      असा साधारण वाचक आणि अभिरूचीसंपन्न वाचक या वर्गाकडून वाचायला वेळ कुठे आहे? असे आपल्याला उत्तरे ऐकू येत राहतात. पण त्याच वेळी क्षुद्र गोष्टींसाठी रोज तो वणवण भटकत असतो. ज्या दै‍नंदिन गोष्टींना तो अपरिहार्य समजतो तितके वाचनाच्या छंदाला तो अपरिहार्य समजत नाही.
      दैनंदिन कष्टाच्या तासांनंतर करमणूकीसाठी वा जगणे सुसह्य करण्यासाठी तो ज्या धावपळीत अडकतो त्या क्षुद्र असल्या तरी त्या त्याच्या गरजा होऊन बसतात. काही शुल्लक गोष्टींसाठी तो जसा आपला वेळ काढू शकतो तसा तो वाचनालाही काढू शकतो हे त्याच्या लक्षात येत नाही. या सगळ्या गोष्टी गद्यात सांगण्यापेक्षा सूत्रबध्दरित्या पद्यात सांगितल्या तर लेखाचा अनाठायी विस्तार वाचेल म्हणून उदाहरणार्थ,
चहाची चव घेत
नुसते बसून रहायला वेळ आहे
पण वाचायला वेळ नाही
दुपारी झोपायला वेळ आहे
पण वाचायला वेळ नाही
पत्ते कुटायला वेळ आहे
पण वाचायला वेळ नाही
निंदा नालस्ती चकाट्यांना वेळ आहे
पण वाचायला वेळ नाही
सिनेमा, सिरियल्स, क्रिकेटला वेळ आहे
पण वाचायला वेळ नाही
बुवांकडे जायला वेळ आहे
मंदिरात जायला वेळ आहे
सत्संग करायला वेळ आहे
पण वाचायला वेळ नाही
दारू प्यायला वेळ आहे
पार्ट्या- बारला वेळ आहे
सहलींना वेळ आहे
लग्नाला, बारश्याला, मौतीला वेळ आहे
पण वाचायला वेळ नाही
मंडळातल्या सत्तास्पर्धेसाठी वेळ आहे
राजकारण खेळायला वेळ आहे
पण वाचायला वेळ नाही.
      वरील सूत्रबध्द ओळी वाचून या गोष्टी जर आयुष्यात अपरिहार्य म्हणून आपण करत असतो, वेळ नसतानाही वेळात वेळ काढून वरील सर्व कर्म आपण रोज निपटीत असतो, तर असाच वेळातवेळ काढून आपण थोडेसे का होईना अधून मधून वाचन नक्कीच करू शकतो. (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/