शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

फेसबुक आणि चाटींग साइटच्या बदनामींपासून सावधान



 
- डॉ सुधीर रा. देवरे

फेसबुक वर अनेक फेक आय डी आहेत. तुमच्याच नावाचे अनेक खरे खोटे लोक आहेत. अनेक प्रकारचे अश्लील, गलीच्छ प्रकार फेसबुकवर पहायला मिळतील. अफवांपासून तर कोणाची निंदा नालस्ती फेसबुकमधून करणे अगदी सहज सोपे आहे. फक्त फेसबुकच नव्हे तर प्रत्येक वेब साइटची फ्रेंडशिप च्याटींग पेज व च्याटींग रूम मध्ये हे प्रकार सर्रास सुरू आहेत. या बाकीच्या साइटस् वर हे प्रकाच जास्त घृणास्पद आढळून येतात आणि यात 80 टक्के आय डी बनावट नावाने असतात. अशा बदनामी कारक मजकुरामुळे आतापर्यंत काही आत्महत्यासुध्दा घडलेल्या आहेत.
      फेसबुकवर मनमोहन सिंग, सोनिया गांधींपासून अण्णा हजारेंपर्यंतचे अनेक अश्लील फोटो-चित्रे पहायला मिळतात. बदनामी कारक मजकूर वाचायला मिळतो. असे करणारे लोक काल्पनिक नावाने आय डी सुरू करतात. अशा आय डी सुरू करणे अजिबात अवघड नाही. व्यक्तीगत किरकोळ भांडणाचा सूड म्हणून अशा घटनांना अलिकडे उधान आलेले दिसते.
आपल्या नावाने आपल्याच फोटोनिशी आपल्याला माहीत नसताना आपण फेसबुकवर असू शकतो. म्हणजे आपल्या नावाने व आपलाच फोटो वापरून आपल्याला कोणीही फेसबुकवर वा अन्य चाटींग साइटस् वर बदनाम करू शकतो. म्हणून आपल्या कोणी जवळच्या व्यक्तीविषयी आपल्याला त्याच्या असली फोटोसहीत काही मजकूर अशा साइटस् वर दिसला तर त्या व्यक्तीविषयी गैरसमज न करता ही कोणाची तरी बदमाशी असू शकते हे लक्षात घ्यावे व त्या व्यक्तीला सावध करावे.

- डॉ सुधीर रा. देवरे
            (माझा ब्लॉग)

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

या देशाला झालंय तरी काय?



- डॉ सुधीर रा. देवरे

या देशाला म्हणजे देशातील लोकांना झालंय तरी काय? आसाम प्रश्न आज कालचा नाही. तब्बल 1950 पर्यंत मागे गेल्यावर आसाम प्रश्न लक्षात येतो. आसामचा प्रश्न या देशातील सर्वसामान्य लोकांना माहिती नाही. तरीही त्या प्रश्नाच्या चुकीच्या बाजूने मुंबईत मोर्चा निघतो. तोडफोड हिंसा होते. त्याची परिणीती म्हणून पुण्यात काही पूर्वोत्तर भारताच्या विद्यार्थ्यांवर हल्ला होतो. आणि या घटनेनंतर पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, बेंगलोर मधून उत्तर-पूर्व भारतातील लोक आपल्या घरांकडे पलायन करू लागतात. खरे तर धार्मिक भेद बाळगणार्या लोकांनाही हे लोक नेमके कोण आणि आपण काय करीत आहोत हे नक्की मा‍हीत नाही.
सोशल नेटवर्कींग साइटस् वरून आणि एसएमएस वरून अफवा आणि अराजकता हेतुत: पसरवली जात आहे. जातीयवादी बोलले जात आहे. एकाच प्रश्नावर दोन दोन लोकांच्या नेतृत्वाखाली काही दिवसाच्या अंतराने दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलने होत आहेत. पुण्यात चार बाँब स्फोट होतात आणि हे सर्व भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन सोहळ्याच्या आगेमागे घडतंय. या सगळ्या गोष्टींकडे नीट पाहिले तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपला देश तोडण्याचे, देशात यादवी माजवण्याचे कोणा परकिय शक्तीचे षडयंत्र आहे की काय असा संशय यावा इतपत या घटना मोठ्या आहेत.
आणि या सर्व प्रश्नांचे राजकारण होत आहे ही सर्वात मोठी दुर्दैवी आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. भारत हा देश धर्मनिरपेक्ष आहे. सरकार त्यांच्या पध्दतीने काय कारायचे ते करीलच पण आपण भारताचे नागरीक म्हणून पूर्वोत्तर लोकांनाच नव्हे तर जो जो कोणी अडचणीत असेल त्याला विश्वास दिला पाहिजे की भारत आपल्या सर्वांचा आहे. येथे कोणालाही धोका नाही. सर्व भारतीयांनी जात-धर्म यांच्या चौकटीतून बाहेर निघून मानवतावादी दृष्टीकोन ठेवत भारत वाचवावा ही विनंती. ईद च्या सर्वांना शुभेच्छा.

- डॉ सुधीर रा. देवरे
            (माझा ब्लॉग)

रविवार, १२ ऑगस्ट, २०१२

इतके स्वातंत्र्य कुठेही नाही ।



- डॉ सुधीर रा. देवरे

      फेसबुक वर सर्फिंग करत असताना वेगवेगळ्या दिवशी सचित्र अशी दोन वाक्य माझ्या वाचनात आली.
एक: 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्या नंतर अजूनही स्वातंत्र्याची सकाळ झालीच नाही.
दोन: गांधी हा कसला महात्मा ? कोणाचा तरी हवाला देऊन हे अवतरण.
त्या वेळी तात्काळ मला जे शब्द सुचले अशा शब्दांत- आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे- अशी मी तिथे नापसंतीची कॉमेंट लिहिली.
      स्वातंत्र्याची सकाळ अजून झाली नसती तर हा जो कोणी लिहिणारा आहे त्याला भारतात राहून अशी मल्लीनाथी करताच आली नसती आणि केली असती तर तो तुरूंगात गेला असता. ज्याअर्थी असे लिहूनही भारतात तो सलामत असू शकतो त्या अर्थी स्वातं‍त्र्याची सकाळ झालीच आहे. ज्याने डोळ्यांवर पट्टी बांधली असेल त्याला ती सकाळ दिसणार नाही. आपल्या बालपणापासून शिक्षण, विचार, विविध सवलती, जडणघडण, वृत्तपत्रांतून शासनाविरूध्द लेखन वा वाचन, विविध चॅनल्सवरून टीका टिपण्या ऐकतच हा नागरिक अशी मल्लीनाथी करू शकला ते स्वातंत्र्यामुळेच. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणाला निवडून द्यायचे, कोणाला राज्यकारभार करू द्यायचा हे आपण म्हणजे सर्वसामान्य माणूस ठरवतो.
      महात्मा गांधींना शिव्या देणे भारतात फॅशन झालीय की काय कळायला मार्ग नाही. कोणीही उठावे आणि टपली मारून जावे. महात्मा गांधींचे कोणी जातीय वारसदार नसल्याने त्यांच्या बदनामी वरून भारतात दंगली होत नाहीत. जो सर्वांचा तो कोणाचाच नसतो. गांधी नसते तर ही लोकशाही नसती. गांधी नसते तर कदाचित भारताला 1947 च्या आधीही स्वातंत्र्य मिळाले असते. पण हा देश आज आहे तसा नसता. कदाचित या देशाचे पाच पंचवीस तुकडे पडले असते. गांधींनी भारताला योग्य वेळी- जनमानस वयात आल्यावरच स्वातंत्र्य मिळवून दिले आणि पाकिस्तान निर्माण होणे ही सुध्दा काळाची गरज होती. अखंड भारताचे आतापर्यंत अंतर्गत यादवीत असंख्य तुकडे पहायला मिळाले असते. अथवा आज आहे तसा तो प्रजासत्ताक नसता- निधर्मी देश राहिला नसता. थोडक्यात, महात्मा गांधी समजून घेण्यासाठी आपली दृष्टीही तेवढी विशाल असायला हवी.  


- डॉ सुधीर रा. देवरे

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

मैत्रीत सत्यम, शिवम आणि सुंदरम




- डॉ सुधीर रा. देवरे

मैत्रीचा दिवस. मैत्री अतूट असते. कायमची असते. अमर असते. तशी मैत्री तात्पुरती सुध्दा असते. जसे आपण अतूट अमर मैत्री पासून काही ‍शिकत असतो, तसे तात्पुरत्या मैत्रीतूनही आपण काही आदर्श घेऊ शकतो. अगदी प्रवाशी मैत्रीतून वा नेटवरील दोन तीन तासांच्या चॅटींग मैत्रीतूनही आपण संपन्न होत राहतो.  
      मैत्रीला लिंग नसते. मैत्रीला वय नसते. मैत्रीला जात नसते आणि धर्मही नसतो. मैत्री हाच एक स्वतंत्र धर्म असतो. मैत्रीतून आपण दुसर्यांचा आदर करायला शिकतो. प्रेम करायला शिकतो. मैत्रीतून जीवनात हिंसा आपोआप कमी होत जाते. मैत्रीतून आपला अभिमान गर्व मी पणा गळून पडतो आणि मैत्री त्याग करायला शिकवते.
      आज जी जगात शांतता नांदते आहे ती मैत्रीमुळे. मैत्री आतून आपल्याला शुध्द करीत असते. मैत्रीत आपण दुसर्यांच्या मतांचा आदर करायला शिकतो आणि एखाद्याची मते पटत नसतील तरी मैत्रीमुळे आपण दुसर्याला समजून घ्यायला शिकतो. मैत्रीत सुंदरता आहे. मैत्रीत सत्यम, शिवम आणि सुंदरम वसत असते. मैत्री दिनापुरतीच मैत्री नसली तरी जुन्या मित्रांच्या उजळणीसाठी मैत्रीदिन हवाच. मैत्री दिनाच्या निमित्ताने असा बेरजेचा विचार करत संपूर्ण जगाकडे मित्राच्या नात्याने पाहू या.

- डॉ सुधीर रा. देवरे