शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

बंद पाळणे: एक कळणे



 - डॉ. सुधीर रा. देवरे

         काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. शिक्षणासाठी मी माझ्या मित्रासोबत एका शहरात खोली घेऊन राहत होतो. त्यावेळी एका राजकीय पुढार्याची हत्या झाली. शहरात अचानक बंद पाळण्यात आला. सगळीकडे शुकशुकाट. संध्याकाळी आमची मेस उघडली नाही. सर्व हॉटेली बंद. सर्व वाहने बंद. कुठून काहीही मिळत नव्हते. कुठून कुठेही जाता येत नव्हते. ही घटना अचानक घडल्यामुळे खाण्यासाठी आधी काही आणून ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही त्या रात्री उपाशी राहिलोत.
         अशीच एकदा दंगल झाली आणि कर्फ्यू लागला. यावेळीही आम्हाला खोलीतून बाहेर पडता आले नाही. आम्ही दिवसभर उपाशी राहिलोत. परवा 18 नोव्हेंबर 2012 या तारखेच्या रविवारी संध्याकाळी पुण्याहून मला एका विद्यार्थ्याचा फोन आला की, संपूर्ण पुणे बंद आहे. आज आम्हाला संपूर्ण दिवस उपवास करावा लागला आणि रात्रीही तसेच राहावे लागेल. दुसर्या दिवशी म्हणजे 19 तारखेला या विद्यार्थ्यांची महत्वाची परीक्षा होती. पुण्याला ही परिस्थिती तर मुंबईला अशा बाहेर जेवणार्या लोकांचे किती हाल झाले असतील? एखाद्या व्यक्तीची हत्या होणे जितके वाईट वा नैसर्गिक मृत्यूचा शोक पाळणे जितके रास्त, तेवढेच एखाद्या सामान्य माणसाला वा विद्यार्थ्याला वेळेवर जेवण मिळणेही गरजेचे आहे. बंदमुळे आर्थिक नुकसान किती होते हा नंतरचा भाग.
         टीव्ही समोर बसून जेवण करत, नाष्टा करत वा चहा पित बंद एनजॉय करत शोकयात्रा बघणे वेगळे आणि बंदमुळे उपाशी पोटी घरादारापासून लांब अडकून पडणे वेगळे. ज्यांनी कोणी असे अनुभव आपल्या आयुष्यात घेतले असतील त्यांच्या बंद विषयीच्या प्रतिक्रिया ऐकून पहाव्यात.
         अशा पार्श्वभूमीवर सोमवारी 19 नोव्हेंबर 2012 ला एक घटना कळली: रविवारच्या बंद विरूध्द एका मुलीने फेसबुकवर कॉमेंट केली म्हणून तिला व त्या कॉमेंटला लाइक करणार्या तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली. पालघर येथील साहीन फारूक धाडा असे या मुलीचे नाव असून लाइक करणारी रितू श्रीनिवासन नावाची तिची मै‍त्रिण आहे. (आता एखादी कॉंमेंट लाइक करतानाही शंभरदा विचार करावा लागेल.)
         बंदला विरोध करणे हा गुन्हा नाही. बंदचा आदेश देणे हा मात्र गुन्हा आहे. बंद पाळू नये असे कोणी आवाहन करणे हा कधीही गुन्हा होऊ शकत नाही. आज कोणाच्या भावना नेमक्या कशाने दुखावतील ते काही सांगता येत नाही.

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

एक कलंदर माणूस



                                                -         डॉ. सुधीर रा. देवरे

         कोणी वाघाची उपमा दिली, कोणी सिंहाची तर कोणी सम्राटाची. पण ते एक कलंदर व्यक्तीमत्व म्हणूनच मला जास्त भावत होते. बाळासाहेब ठाकरे हे खरे तर एक कलावंत. व्यंगचित्रकार म्हणून ते महाराष्ट्राला आधी परिचित झाले. व्यंगचित्रकार, पत्रकार, एक संघटना संस्थापक आणि राजकीय व्यक्ती यातून ते व्यंगचित्रकार म्हणजेच एक कलावंत म्हणून जास्त प्रमाणात आविष्कृत होत असत.
         याच कारणामुळे असेल कदाचित अभिनेते, खेळाडू, गायक, लेखक यातील बरेच लोक त्यांना पुजनिय स्थानी मानत असत. लता मंगेशकर ते सचिन तेंडुलकर पर्यंतच्या व्यक्ती त्यांच्यासाठी गहिवरतात आणि पु. ल. देशपांडे वसंत बापट यांच्यासाठीही ते आदरस्थानी होते.
         बाळासाहेबांच्या राजकीय प्रतिक्रिया अथवा त्यांची भाषणे हे एखाद्या कसलेल्या राजकीय व्यक्तीचे वाटण्यापेक्षा एक व्यंगचित्रकार आपल्या ब्रशच्या फटकार्यातून नेमक्या व्यंगावर बोट ठेवतो, तसे असत. ते व्देषातून बोलतात असे वाटण्यापेक्षा आपल्या तळमळीतून भावना व्यक्त करतात हे लक्षात येई. मार्मिक टिपणी करणे यापुरते त्यांचे बोलणे मर्यादित असे. कोणावर आसूड ओढणे हा त्यांचा उद्देश नसायचा.
         शिवसेना मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभर वाढली आणि नंतर देशाच्या काही भागातही. याला कारण बाळासाहेबांची शैली जशी महत्वाची होती तशी संघटनेच्या नावात छत्रपती शिवरायांची प्रतिमा चपखल वापरणे ही कल्पकताही सहायभूत ठरली.

         बाळासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली.

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१२

तिकडे कोण आहे ?



                                  - डॉ. सुधीर रा. देवरे
 

         सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक विलास सारंग हे मूळचे मराठी असल्याने त्यांनी मराठीतही बरेच लिखाण केले आहे. आपल्या सोलेदाद या कथासंग्रहात त्यांनी टेलिफोनवर एक कथा लिहि‍लीय. या कथेचा गोषवारा असा: या कथेचा नायक एका खोलीत बंदिस्त आहे. त्या खोलीत एक रिसिव्हर ऑफ टेलिफोन असून त्या रिसिव्हरवर तो कायम वावरतो, इतका तो नायक लहान आहे. (लहान असणे हे येथे प्रतिकात्मक आहे. यंत्राच्या आहारी गेलेला माणूस, म्हणून तो लहान व यंत्र मोठे.) माऊथपिस मधून हॅलो केल्यावर तिकडून कोणी बोलतं का ते ऐकण्यासाठी तो एअरपिसकडे पळत येतो आणि उत्तर ऐकतो. पुन्हा बोलण्यासाठी माऊथपिसकडे येतो. त्याच्याशी तिकडून कोणीतरी केव्हातरी बोलतं. काही वेळा कोणी बोलत नाही. असे करून थकला की तो रिसिव्हरवर झोपून जातो. बस एव्हढचं त्याचं आयुष्यभर काम. आणि एक दिवस तो या टेलिफोनवरच मरून पडतो.
         ही कथा ज्यावेळी म्हणजे ज्या काळी विलास सारंग यांनी लिहिली तेव्हा भारतात मोबाइल फोन नव्हते. टेलिफोनही क्वचित होते, घरोघरी नव्हते. फेसबुकचा शोध तर फार अलिकडचा म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वीचा, पण तेव्हा सर्रास इंटरनेटही वापरले जात नव्हते. म्हणून चॅटींगचा प्रश्नच नव्हता. ज्यांच्याकडे टेलिफोन होता तेही त्यावळी गप्पा मारण्यासाठी टेलिफोचा वापर करत नसावीत. अशा काळी आजच्या चॅटिंग विश्वावर प्रकाश पडावा इतकी महत्वपूर्ण गोष्ट त्यांनी लिहिलीय.
         आज संपूर्ण जग आंतरजालाने जोडले गेलंय. घरबसल्या आपण अमेरिकेतल्या माणसाशी समोर बसल्यासारखे बोलू शकतो. माणसाला आपल्या माणसाशी सहेतूक बोलण्याची जशी ओढ असते तशी अनोळखी माणसाशी अहेतूक मैत्री करायलाही आवडते. आजच्या आपल्या आजूबाजूच्या या प्रचंड गर्दीतही माणूस एकटा पडत चालला. त्याला प्रत्यक्ष नसले तरी आभासी नाते जोडावेसे वाटते. या जाळ्यात तो दिवसेंदिवस अडकत चाललाय. आज असे अनेक लोक दिसतील की दिवसातील बारा बारा तास नेटवर सापडतात. ते कशासाठी, हे त्यांनाही माहीत नाही. इतके तास केवळ चॅटींग मध्ये जे लोक घालवत असतील त्यांना हे व्यसन जडले असे म्हणायला जागा आहे. पण जे लोक बिझी आहेत ते ही काम करून थकव्याचा निचरा करण्यासाठी ‍िदवसातून एक तास का होईना चॅटिंग- सर्फींग करत राहतात. याचे कारण तिकडे - पलिकडे त्या आभासी जगात कोण आहे? हे जाणून घेण्याची ओढ माणसाला उपजत असते. या अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारण्यात त्याला आनंद मिळू शकतो. यातून कोणतीही उत्पादकता नाही, काहीच हाती लागण्याची शक्यता नाही, प्रत्यक्ष जीवनात यातला कोणी भेटत नाही, हे त्याला माहीत असूनही यातून केवळ आभासी का होईना माणसे माणसांना अजमावण्याचा प्रयत्न करत राहतात. ही बाब ठराविक मर्यादेपर्यंत नैसर्गिक मानली तरी तिचे रूपांतर व्यसनात होणारच नाही याची खात्री कोणाला देता येत नाही. या यंत्राच्या आहारी गेलेला माणूस लहान तर यंत्र मोठे होत जाते. आणि हे साधन म्हणजे यंत्र त्याच्यावर हुकूमत गाजवू लागते.
         विशिष्ट हेतू मनात ठेऊन चॅटींग करणारे, वड्याचे तेल वांग्यावर काढण्यासाठी ब्लॅक मेल करणारे आणि समोरच्याशी आपली वेव्हलेंग्थ तार न जुळण्यामुळे गैरसमजातून मनस्ताप देणारे अनुभवही आपल्याला येऊ शकतात. अशा वेळी हे सोशल नेटवर्कींग, अनसोशल नेटवर्कींग वाटू लागते.
-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

माझी एअर होस्टेज फ्रेंड- एक गोष्ट



-         डॉ. सुधीर रा. देवरे

         काही दिवसांपूर्वी मला एका स्त्री आयडीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती मी स्वीकारली. प्राथमिक चॅटींग झाल्यानंतर मी विचारले की, आपण काय करता आणि कुठे असता. उत्तर मिळाले, इंग्लडला असते आणि एअर होस्टेज आहे. कुठल्या एअरलाइन कंपनीत असे विचारले तर उत्तर मिळाले की, हा प्रश्न पर्सनल आहे मी सांगणार नाही. आयडीत फक्त नाव होते, आडनाव नव्हते. म्हणून मी आडनाव विचारले. उत्तर मिळाले की, हा प्रश्न सुध्दा पर्सनल आहे. इंग्लड मध्ये आपल्यासोबत कोण राहतं विचारल्यावर उत्तर आलं की, मी अनमॅरिड आहे म्हणून एकटीच राहते. आपले भारतातले गाव कोणते असं विचारल्यावर चेन्नई उत्तर मिळालं. चेन्नईत राहून मराठी? असं म्हटल्यावर मी मूळची पुण्याची हे स्पष्टीकरण आलं.
         दोन दिवसानंतर मला विचारण्यात आलं की तुम्ही दिवसभर ऑनलाइन का येत नाहीत. मी म्हणालो, मी ‍िबझी असतो म्हणून फक्त संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत ऑनलाइन असतो, पण रोज असतोच असे नाही. मला त्यांनी सुचवलं, मग आपण एसेमेस ने बोलायचं का, पण फक्त एसेमेस नेच बोला. मी‍ ‍िबझी असल्यामुळे फोन मुळीच करायचा नाही, असं मला बजावण्यात आलं. मी हो म्हणालो. मला त्यांनी त्यांचा मोबाइल नंबर दिला. मी तो नोट करून घेतला. माझ्याकडे नंबर मागितला. मी दिला.
         ऑफ लाइन झाल्यानंतर माझ्या मोबाइलवर मला एक मेसेज आला. मी मॅसेजने लगेच उत्तर पाठविले. आंतरराष्ट्रीय एसेमेस म्हणून माझ्या बॅलन्स मधून 5 रूपये वजा व्हायला हवे होते. मात्र फक्त 60 पैसे वजा झाले. मला पहिली शंका आली. नंतर मला त्यांचे खूप एसेमेस यायला लागले. ते वाचून कोणतीही महिला असे एसेमेस पुरूषाला पाठवू शकेल का अशी मला शंका यायला लागली, असे ते एसेमेस होते.
         एके दिवशी मी माझ्या दुसर्या मोबाइलवरून या नंबरला कॉल करायचे ठरवले. जो नंबर मी त्यांना दिलेला नव्हता. हा माझा नंबर पोष्टपेड असून त्याला एसटीडी आणि आयएसडीची सुविधा नाही. म्हणून या नंबरवरून आंतरराष्ट्रीयच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही कॉल लागू शकत नाहीत. पण ह्या नंबरला मी कॉल करताच चक्क रिंग गेली. मी कॉल कट केला. म्हणजे ही व्यक्ती इंग्लड मध्ये नसून महाराष्ट्रात होती. थोड्या वेळाने याच नंबरवरून मला कॉल आला. मी अँटेंड करताच पुरूषाचा आवाज आला, कोणाचा नंबर आहे हा. मी म्हणालो, आपल्याला कोण हवय? म्हणाला, मला मिस कॉल होता. म्हटलं, राँग नंबर लागला होता.
         दोन दिवसानंतर ऑनलाइनवर ती व्यक्ती माझ्याशी बोलू लागली. तेव्हा मी म्हटलं, तुम्ही पुरूष असून स्त्री च्या नावाने का वावरता? पाच मिनिटपर्यंत मला उत्तर आले नाही. नंतर अतिशय उध्दटपणाचे मॅसेज येऊ लागले. मी म्हटलं, तुमच्या मोबाइलवर मी फोन केला तर माझ्याशी एक पुरूष बोलला. पुन्हा पाच मिनिटांनी उत्तर आले, तो माझा नवरा होता. मी म्हणालो की, तुम्ही अनमॅरिड आहात असे मला सांगितले होते. उत्तर आले, मी तेव्हा खोटे सांगितले. कुठे आहेत आता तुमचे मिस्टर? उत्तर, माझ्याजवळ बसलेत. मी म्हणालो, तुम्ही इंग्लड मध्ये आहात तर तुमचा कॉल लोकल पध्दतीने कसा लागला? उत्तर मिळाले, माझे मिस्टर इंडियात आले आहेत आणि माझा मोबाइल त्यांच्या जवळ आहे. मी म्हटलं, इंडियात असताना ते इंग्लड मध्ये तुमच्याजवळ कसे बसलेत? काही मिनिटांनंतर अर्वाच्य उत्तर आले, तुम्ही तुमचे थोबाड बंद करता का? मी तुम्हाला पाहून घेईन...
         आणि मी ही घटना कोणाजवळ बोलतो की काय या भीतीने घाईगडबडीत ती व्यक्ती कोणताही आगापिछा नसलेले कुठेतरी आरोपाचे शस्त्र परजू शकते- आरोप पोस्ट करू शकते.

         कोणाला कोणाचं आकर्षण वाटावे हे जसे आपल्या हातात नाही तसे त्या व्यक्तीच्याही हातात नाही. गे असणे अथवा तृतीय पंथी असणे, आपण नैसर्गिक समजत असलो तरी त्यात पुन्हा मनोरूग्ण असणे ही वेगळी बाब आहे. हा एक आजार आहे. अशा व्यक्तीने मानसोपचार तज्ञाकडे जाऊन सल्ला घेणे योग्य. असे सांगण्यासाठीच मी फोन झाल्यानंतरही चॅटींग सुरू ठेवली होती, परंतु त्या व्यक्तीने मला ती संधीच मिळू दिली नाही. (कदाचित ही व्यक्ती मूळात स्त्री सुध्दा असू शकते पण वारंवार खोटे बोलल्यामुळे व मोबाईलवर पुरूषी आवाज आल्यामुळे मी शंका घेतली.) आरोप करण्यासाठी कोणत्याही पुराव्यांची गरज नसते म्हणून उठसूठ कोणावर आरोप करणे योग्य नव्हे. आपल्याला शंभर चांगले मित्र भेटतात, त्यात कधीतरी असाही एखादा मित्र भेटतो. त्याला आपला इलाज नाही. त्याला आपण समजून घेतले पाहिजे.
         (या मजकुरातून मला कोणाचीही बदनामी करायची नाही म्हणून मी या मजकुराला एक गोष्ट म्हणतोय. पण कोणाला ही गोष्ट आपल्यावर आहे असे वाटले तर तो केवळ योगायोग नसावा. सॉरी. समजावा.)

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/