शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

अहिराणीचा सामाजिक अनुबंध

-    डॉ. सुधीर रा. देवरे

     अगोदर माणूस, माणसानंतर समाज आणि मग भाषा. भाषा आणि बोली हा फरक आता यापुढे करायचा नाही. जी बोली आपण बोलतो ती भाषा. मग ही भाषा आक्ख्या जगाची असो नाहीतर एखाद्या गाव-पाड्यापुरती मर्यादीत असो. बोली म्हणजे भाषाच असते. लोक एकमेकांसोबत देवाणघेवाण करताना जे काही बोलतात ती भाषा. कोणत्याच भाषेत कोणताच घटक अशुध्द नसतो. भाषा गावंढळ वा ग्राम्य नसते आणि देढगुजरी सुध्दा नसते. याचा व्यत्यास करायचा झाला तर कोणतीच भाषा शंभर टक्के शुध्दही नसते, असं म्हणता येईल.
     भाषेवर बोलताना काही लोक व्यासपीठांवरून म्हणतात, ‘आमची भाषा शुध्द आहे.’ (म्हणजे त्यांना म्हणायचं असतं की आमच्या परिसरातली भाषा सोडून बाकीच्या भाषा अशुध्द आहेत.) पण भाषेत तसं शुध्द आणि अशुध्द काही नसतं. तसं पहायला गेलं तर आजची जी जागतिक भाषा इंग्रजी आहे ती सुध्दा (अशा लोकांना अभिप्रेत असल्यासारखी) शुध्द नाही. असंच कोणीतरी अहिराणी भाषक म्हणत असतात, ‘मराठी लोकांना अहिराणी भाषा कळत नाही.’ पण असं नाही. अहिराणी भाषा वाचायला वा ऐकून समजून घ्यायला थोडा वेळ द्यावा लागतो हे खरं. मराठी माणसाला अहिराणी भाषा कळते आणि बाहेर सगळ्या महाराष्ट्रातही कळते. अहिराणी भाषेची सर्वत्र दखल सुध्दा घेतली जाते. फक्‍त काम चांगलं असायला हवं.
     दोन जणांना एकमेकांशी बोललेलं कळलं की झाली भाषा तयार. मग तु्म्ही तिला कोणतंही नाव द्या. तिला नाव दिलं नाही तरी कोणत्याही भाषेचं काहीच अडत नाही. मग अशा भाषा त्या त्या लोकांच्या गटांचं, जातीपातीचं नाव लावून लोकजीवनात तग धरून राहतात. अहिर लोकांची अहिराणी भाषाही खानदेशात अशीच तयार झाली. आजूबाजूचे लोकजीवन म्हणजे लोकांचं रोजचं जगणं, हे जगणं भाषेत आलं आणि अहिराणी भाषा तयार झाली.
     मनुष्य इथून तिथून जसा एक नाही. जमीन इथून तिथून जशी एक नाही, बाहेरची हवा-वातावरण इथून तिथून जसं एक नाही. तशा भाषाही इथून तिथून एक नाहीत, याच्या पुढेही जगाची एकच एक भाषा होऊ शकत नाही. आणि यापुढे समजा कोणी कितीही तसं करायचं ठरवलं तरी ते व्यवहारी होणार नाही. तरीही आक्ख्या जगात आज आपल्या स्वत:च्या भाषा बोलायला जे जे लोक लाजतात, त्या त्या भाषा मरायला सुरूवात झाली आहे. अशा अनेक भाषा आजपर्यंत मेल्या त्यांचा आपल्याला पत्ताही लागला नाही.
     जसं लोकजीवन असतं तशी भाषा असते. लोकजीवनात ज्या ज्या जिनसा- वस्तू असतात, जी जी झाडं झुडपं असतात. जमीन, पाणी, हवा, पीकपाणी असतात त्यामधून लोकजीवनात लोकपरंपरा, लोकगीतं, लोकवाड्मय, लोकम्हणी, लोकनाच, लोकहुंकार, लोकपरिमाणं, लोकव्यवहार, लोकवास्तु, लोकवस्तु, लोकहत्यारं आदी तयार होतात आणि या सगळ्यांतून आपोआप स्थानिक भाषा तयार होत असतात.         
     संस्कृतमधून मराठी आणि मराठीतून अहिराणी अशी जी आजपर्यंत आपल्याला कोणी अहिराणी भाषेची उत्पत्ती- व्युत्पत्ती सांगत होतं ती चूक आहे. असं आतापर्यंत उलटं संशोधन होत आहे. अहिराणीची तशी उत्पत्ती नाही. बोलीभाषांमधून प्रमाणभाषा तयार होतात. प्रमाणभाषेपासून बोली नाही तयार होणार.
     कोणत्याही भाषांमध्ये इतर भाषेतले शब्द येणं साहजिक आहे. काही टक्के दुसर्‍या भाषेतले शब्द बोलींमध्ये दिसतात म्हणून ती भाषा त्या अमूक एका प्रमाणभाषेपासून तयार झाली, असं म्हणणं म्हणजे वडाचं पान पिंपळाला लावण्यासारखं आहे. लोक जेव्हा भाषा वापरायला लागतात आणि दुसरी भाषा बोलणार्‍या लोकांसोबत व्यवहार करतात तेव्हा शब्द इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे होत राहतात. काही काळानंतर ते शब्दही आपल्या भाषेत रूजून आपल्याच भाषेचे अविभाज्य घटक बनतात आणि हे साहजिक आहे.
     लोकदेवांचं तसंच. जशी माणसं, तसे देव. विधी, विधी- नाट्य आणि देव देवता यांच्यावरही त्या त्या भागाची- परिसराची दाट सावली पडलेली दिसते. जसं माणसांचं रोजचं जगणं, राग-लोभ, काम, भीती, समजुती, भक्‍ती ह्या परंपरेने त्या त्या भागात तयार होतात; तसे त्यावरील तोडगेही काढले जातात. याच पध्दतीने असे लोकदेवही माणसाला आधार देण्यासाठी तयार झाले. या सर्व घडामोडींचा आळ- आरोप देवावर केले जातात, जो अहिराणी भागातही लागू होईल.
     लोकदेव हा भावाचा भुकेला असतो. म्हणून छोटासा कपडा, थोडासा नैवेद्य यात तो खुश होत असतो. त्याला भक्‍ताकडून कोणत्याही घबाडाची अपेक्षा रहात नाही. ज्या सुताचे कपडे इथं तयार होतात त्याच कपड्यात देव खुश होतो. ज्या झाडांची पानं इथं सहज उपलब्ध होतात त्या झाडांची पत्रीच या देवांना वाहिली जाते. जी जी फळं इथं त्या त्या ऋतूत येतात, तीच फळं इथल्या देवाला आवडतात. जे पदार्थ इथं घराघरात कमी खर्चात तयार होतात, तोच नैवेद्य या देवांना लागतो आणि त्या नैवेद्यानेच त्यांचं पोट भरतं.
      लग्नातली गाणी, झोक्यावरची गाणी, गौराईची गाणी, कानबाईची गाणी, गुलाबाईची गाणी, बारातल्या शिव्या, अहिराणी रडनं, ओव्या, घरोटवरच्या ओव्या, आन्हा, उखाना, कोडा, म्हणी अशा सर्व लोकपरंपरेतून अहिराणी बाईचं बाईपण ‍बघितलं तर ध्यानात येतं, अहिराणी बाईला दागिन्यांचा सोस जसा आहे, तसा रामाचा म्हणजे पतीचा विरह. सासरच्या सासरवासाला ती जशी कंटाळलेली आहे, तशी माहेरपणला - आईला भेटायची तिला ओढ आहे. माहेरच्या माणसांना भेटायला ती उतावीळ दिसते. पहाटेपासून काम करता करता ती इतकी थकून जाते तरी दुसर्‍या दिवशी पहाटे उठून ती घट्यावर गाणी म्हणण्याइतकी ताजीतवाणीही होताना दिसते. हे वर्णन लोकगीतांना अनुसरत परंपरेतलं आहे. आजचं नाही. लोकगितांतले शब्द आणि त्यांचे अर्थ पाहिले तर नवल वाटतं. अहिराणी किती श्रीमंत आहे हे मौखिक लोकगीतांतून सहज ध्यानात येतं. 
     अहिराणी ही मागधी, सौराष्ट्री, शौरसेनी, महाराष्ट्री, पैशाची या सर्व भाषांपासून तयार झाली का संस्कृत - मराठी – या वाटेने तयार झाली? असा विचार करण्यापेक्षा ती इथंच (म्हणजे या प्रदेशात) तयार झाली असेल असं का म्हणू नये? अहिराणी भाषा इथंच रांगली, इथंच तिला बोबडे बोल फुटलेत आणि इथंच ती चार जिल्ह्यात हात पाय पसरून तिने आपला जम बसवला असं म्हणणं अधिक योग्य आहे.
     - जगातल्या कोणत्याही भाषेत त्या त्या समाजाचं आणि तो समाज ज्या भागात राहतो त्या भागाचं चित्र दिसतं. तसं अहिराणीतही अहिराणी बोलणार्‍या लोकांचं चित्र अगदी टहाळबन- स्पष्ट दिसतं.
     (‘अक्षरदान 2019 च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या दीर्घ लेखाचा काही संपादीत भाग. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
 ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

बोलीभाषा: समज आणि आक्षेप




-    डॉ. सुधीर रा. देवरे 

     अनेक लोकांचे बोलीभाषेबद्दल काही समज आहेत. काही अपसमज आहेत. समाजात फक्‍त प्रमाणभाषा असाव्यात. बोलीभाषा नकोत. भाषा जेवढ्या कमी असतील तेवढे दळणवळण सुलभ होईल असा त्यांचा भाबडा समज असतो. ‘एक देश एक भाषा’ असा नाराही एकेकाळी गाजला आहे. (आणि आताही तसा प्रयत्न होऊ पहात आहे.) आपली भाषा सोडून इतर भाषा वा बोलींबद्दल असं मत मांडणं, अशा एखाद्या तथाकथित अभ्यासकाला शोभून दिसेल, ज्या अभ्यासकाचा एखादी बोली बोलणार्‍या लोकांशी कधी कोणताही संबंध येत नाही. त्या बोलीतले अपरिहार्य लोकजीवन त्याला मा‍हीत नसतं. तरीही अशा विशिष्ट लोकजीवन व्यतीत करणार्‍या लोकांनी प्रमाणभाषाच बोलावी असा त्यांचाआग्रह असतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्‍तीला वा गटाला एका विशिष्ट बोली व्यतिरिक्‍त कोणतीही भाषा बोलता येत नाही आणि तरीही ती भाषा वाळीत टाकली जाते व त्या गटाला विशिष्ट भाषा बोलायला वा शिकायला भाग पाडलं जातं, तेव्हा ही घटना माणसाच्या अस्तित्वालाच सुरूंग लावणारी ठरते. कोणीतरी आपली जीभ कापून टाकतंय असा हादरवून टाकणारा त्यांचा हा अनुभव असतो.
विशिष्ट भौगोलिक परिसरातल्या बोली त्या क्षेत्रातील प्रमाणभाषा बोलणार्‍या लोकांना थोड्याफार कळतात. अहिराणी भाषा सुध्दा अनेक मराठी लोकांना कोणत्याही अडचणीशिवाय कळते. काही पारिभाषिक शब्दांची अडचण येऊ शकते, पण एकूण मतितार्थ कळतो. मी संपादित करीत असलेले अहिराणी माध्यमातील ‘ढोल’ आणि माझे अहिराणी लेख, पुस्तकं सुध्दा महाराष्ट्रभर आणि बाहेरही सर्व चोखंदळ मराठी वाचकांना समजतात, याचा उल्लेख मी इथं मुद्दाम करीत आहे.
प्रमाण मराठीत सोपी अहिराणी उपयोजित करावी असं माझं मत आहे आणि तो प्रयोग मी माझ्या लिखाणात करत असतो. (असा प्रयोग प्रत्येक बोलीभाषकाने करावा.) आता सोपी अहिराणी म्हणजे काय यावरही नवा आक्षेप येण्याची शक्यता असल्याने त्याचं स्पष्टीकरण आताच देऊन ठेवतो. जशी सोपी मराठी, अवघड मराठी; सोपी हिंदी, अवघड हिंदी; सोपी इंग्रजी, अवघड इंग्रजी; अशी आपण वर्गवारी करतो त्या अर्थाने सुलभ अहिराणी ही संज्ञा मी इथं वापरतो.
     दुसरं उदाहरण देतो: राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन नाटकातील भाषा मराठी आणि ग. दी. माडगूळकर यांच्या कवितेची भाषाही मराठी. एक समजायला कठीण. दुसरी समजायला सोपी.
     भाषा ह्या प्रवाहासारख्या असतात. प्रवाहात नदीचं पात्र जसं पुढे विस्तृत होत जातं, तसंच भाषेचंही असतं. भाषा एकच असली तरी आजची भाषा कालच्या भाषेपेक्षा वेगळी असते. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरांची मराठी, शिवाजी-तुकाराम यांची मराठी, ज्योतिराव फुल्यांची मराठी, चिपळूणकरांची मराठी आणि आजची मराठी यांत जसं साम्य नाही, तसं अहिराणीत आज आदिमपण दिसणार नाही. तसं कोणत्याच बोलीभाषेत आज आदिमपण दिसणार नाही.
आदिम, प्राचीन, आर्ष या संज्ञा मी अहिराणीच्या वा कोणत्याही बोलीभाषेच्या संदर्भात वापरत नाही. लेखाचा तो कधी विषय सुध्दा करत नाही. पण मध्यंतरी एका अभ्यासकाने अहिराणी ही आदिम बोली आहे का, हा प्रश्न विचारला होता. माझ्या कोणत्याही लेखात तसा उल्लेख नसताना हा प्रश्न विचारला गेला. अहिराणीच नव्हे तर बहुतेक बर्‍याच बोली या आदिम आहेत. नैसर्गिक क्रमानुसार आधी बोली निर्माण होतात आणि मग प्रमाणभाषा. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील एकमेकांना लागून असलेल्या विविध बोलींच्या सरमिसळ मानवी व्यवहारातून प्रमाणभाषा निर्माण होत असतात.
आज भाषेतील केवळ काही शब्दांचे आदिमपण सांगता येतं. संपूर्ण भाषेचं आदिमपण दाखवता येत नाही. कारण अनेक भाषांच्या आदान प्रदानातून सगळ्याच भाषा एकमेकांना पुरक होत राहतात. ज्या अभ्यासकाचा उल्लेख केला त्यांनीच, संस्कृत आदिम भाषा आहे हे सांगताना संस्कृत मधील ‘विष्णु’ हा असा एकच शब्द सांगितला की ज्याची व्युत्पत्ती सांगता येत नाही. आणि संस्कृत मधील या एका शब्दाची व्युत्पत्ती सांगता येत नाही म्हणून त्यांच्या मते संस्कृत ही समग्र भाषा आदिम ठरते. अहिराणीचे आजही असे शंभर शब्द सहज सांगता येतील की ज्यांची व्युत्पत्ती लावता येत नाही. त्या शब्दांचे नैसर्गिक स्त्रोत दाखवता येत नाहीत. तरीही अहिराणी ही आदिम भाषा आहे असा दावा करणं अप्रस्तुत समजतो.
अहिराणी भाषेत प्रचलित मराठी शब्दांचे अवशेष-रूपे दिसतात, हे खरं आहे. आज अहिराणी बोली बोलणारे लोक पहिलीपासून मराठीत शिक्षण घेतात. त्यामुळे अहिराणीमध्ये मराठी शब्द आज प्रंचड प्रमाणात रूढ झालेत. जेव्हा एखादी बोली प्रमाणभाषेच्या प्रभावाखाली येते तेव्हाच तिचं अर्वाचिनीकरण होणं सुरू होतं. शब्द, व्याकरण आणि लिपीही प्रमाणभाषेकडून उसने घेतले जातात. अहिराणीला स्वतंत्र लिपी नसल्याने जसं अहिराणी लिखाण मराठी म्हणजे देवनागरी लिपीत लिहिलं. उपलब्ध मराठी लिपीत अहिराणी लिहिल्यामुळे तिचं दृश्य रूपच मराठी दिसतं, तर मग ती आदिम कशी वाटेल? आणि ती आदिम आहे की नाही यावर चर्चा कशासाठी?
भाषेत जसं शब्दांचं आदान प्रदान होत राहतं, तसं व्याकरणाचंही होत असतं. याचं एकच उदाहरण देतो. मराठी व्याकरणानुसार वाक्याची सुरूवात ‘आणि’ या संज्ञेने होत नाही. आणि ही संज्ञा वाक्याच्या मधे येत असते. पण इंग्रजी व्याकरणानुसार वाक्याची सुरूवात (अँड) आणि ने होते. मात्र अलीकडच्या काळात मराठीतही आणि ने सुरूवात होणारी वाक्य अनेक लेखकांकडून लिहिली जातात. संशोधनात्मक प्रबंधांतही अशी वाक्य येत आहेत. हे इंग्रजी भाषकांकडून व्याकरणाचे आदान आहे. याचा अर्थ मराठी भाषेला इंग्रजी व्याकरण आहे असं जसं म्हणता येणार नाही, तसं अहिराणीला पूर्णपणे मराठी व्याकरण आहे, असं म्हणता येणार नाही.   
ज्या प्राचीन भाषा इतर भाषांच्या संपर्कात आल्या नाहीत त्यांचे आदिमपण आजही टिकून आहे. उदाहरणार्थ, अंदमान बेटावरील जारवा या आदिम माणसांची भाषा आज आदिम- प्राचीन- आर्ष म्हणता येईल. कारण जारवा ही जमात इतर लोकांच्या संपर्कात अजूनही आलेली नाही. ज्या बोली इतर भाषांच्या संपर्कात आल्या त्यांचे प्राचीनत्व त्यांच्यातील काही शब्दांवरून ठरवता येतं. भाषेवरून नाही. 
     जिथं शब्द फक्‍त हुंकाराचं काम करतात अशा प्राचीन भाषांना अगदी सुरूवातीच्या काळात व्याकरण नसतं. मात्र भाषेत वाक्ये यायला लागलीत की व्याकरण येतंच. म्हणून प्रत्येक भाषेला व्याकरण असतं. बोलीभाषांना व्याकरण नसतं, हा समज चुकीचा आहे. त्या बोलीभाषेचं व्याकरण आतापर्यंत कोणी लिहिलं नसेल, व्याकरण समजून सांगितलं नसेल, अथवा त्या भाषेतल्या व्याकरणाचं पुस्तक प्रकाशित झालं नसेल. पण त्या बोलीला व्याकरणच नाही असं म्हणता येणार नाही.
परंपरेने चालत आलेल्या नैसर्गिक लोकबोली वेगळ्या आणि पिजीन - क्रिऑल या कृत्रीम तयार झालेल्या बोली वेगळ्या. बोलींपासून व्यावहारीक प्रमाणभाषा तयार होतात. मात्र पिजीन - क्रिऑल सारख्या कृत्रीम बोली या प्रमाणभाषेपासून तयार होत असतात. उदाहरणार्थ, मुंबईची हिंदी बोली ही अनेक प्रमाणभाषांच्या संकरातून तयार झालेली क्रिऑल भाषा आहे. (काही गुप्त व्यवहारांसाठीही कृत्रीम सांकेतिक भाषा तयार केल्या जातात, त्यांनाही बोली म्हणता येत नाही.)
एक अभ्यासक म्हणाले की, ‘बोली सुधारल्या तर मराठी सुधरेल असं तुम्हाला का वाटतं?’ हा प्रश्न ऐकून चक्रावण्याची वेळ आली. असं आतापर्यंतच्या माझ्या लिखाणात कुठंच म्हटलेलं नाही. बोली मुळीच सुधारायच्या नाहीत. त्यांचं संवर्धन करायचं आहे. बोली जशा आहेत त्याच स्वरूपात त्या वाचवायच्या आहेत. इतर भाषेतील शब्दांऐवजी मूळ भाषेतील शब्द सापडत असतील तर बोलीत ही दुरूस्ती नक्कीच करायला हवी. बोली वाचवल्या तर प्रमाणभाषा टिकतील आणि सकस समृध्द होतील हे मात्र खरं आहे.
‘अहिराणी ही अहिर लोकांचीच भाषा आहे, हे कशावरून?’ हा एक आक्षेप. अभिर लोकांचा एक समूह होता जो नैऋत्य कडून आला, असं इतिहासकारांनी आधीच नमूद करून ठेवलं आहे. अभिरचा अपभ्रंश नंतर अहिर झाला. अहिर हे एका विशिष्ट जातीचे नव्हते. म्हणून आजही अहिर कुणबी, अहिर सोनार, अहिर लोहार, अहिर शिंपी अशा सर्व जातीत अहिर हे कुळ आढळतं. अहिर लोकांची भाषा ती अहिराणी. आणि तेव्हापासून म्हणजे तिच्या उगमापासूनच ती लोकभाषा आहे.
लोकदेव म्हणजे काय हे सुध्दा अनेक लोकांकडून विचारलं गेलं. पण आतापर्यंतच्या ग्रंथांतल्या विवेचनावरून ते सह्ज लक्षात येतं. लोकांनी लोकांसाठी तयार केलेला तो लोकदेव. लोकदेव हा लोकांचा साधासुधा देव असतो. लोकांचं अन्न ते त्याचं अन्न. लोकांचे कपडे ते त्याचं वस्त्र. कानबाई, म्हसोबा, आसरा, मुंजोबा, वाघदेव, नागदेव, खांबदेव, पिरोबा, खंडोबा, डोंगरदेव, कन्सरा माऊली आदी अहिराणी पट्यातील लोकदेव आहेत आणि या लोकसंस्कृतीतून लोकभाषा घडत असते.
     एका अभ्यासकाने जे काही म्हटलं आहे त्या आक्षेपाला काय उत्तर द्यावं सुचत नाही. बोलीभाषा टिकवल्या पाहिजेत, त्या मरू देता कामा नयेत, त्यांचं संगोपन करणं, त्यांचे डॉक्युमेंटेशन करणं, बोलीभाषा बोलणार्‍या लोकांना समजून घेणं आदी प्रकारच्या सर्व कामाला त्यांनी प्रतिगामी ठरवलं आहे. आणि बोलीभाषा मारून प्रमाणभाषेकडे जाणं म्हणजे त्यांना पुरोगामी वाटतं. अशी संकुचित टिका याआधी कधीच ऐकली नव्हती. पण अशा विचारांचे लोकही आहेत हे लक्षात येतं. अशा विचारांच्या लोकांनी मराठी भाषेत तरी का बोलावं आणि मराठीत का लिहावं? कारण मराठी सुध्दा महाराष्ट्रापुरती एक बोलीभाषाच आहे. या बोलीभाषेत व्यवहार करून प्रतिगामी ठरण्यापेक्षा त्यांनी जागतिक भाषेत म्हणजे फक्‍त इंग्रजीत व्यवहार करून पुरोगामी असणं इष्ट ठरेल.
     याचं उत्तर कदाचित ते देतील की मराठी ही आमची मातृभाषा आहे म्हणून आम्ही ती उपयोजित करतो. मग वेगवेगळ्या बोली बोलणार्‍यांची आणि बोलीभाषा जतन करणार्‍यांचीही तीच भूमिका आहे हे त्यांच्या लक्षात का येत नाही.
     (‘अक्षरदान 2019 च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या दीर्घ लेखाचा काही भाग. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
 ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/