शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

सृजनाचा व्यायाम

 

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

                    सिनियर लेखकाशी ज्युनियरचं प्रत्यक्ष वा फोनवर बोलणं होत राहतं. प्रत्येक वेळी जशी मागची उजळणी होते तसे बोलण्यात नवे मुद्देही येत राहतात.

                    परवा सिनियर बोलता बोलता ज्युनियरला म्हणाले,  "व्यायाम करतोस ना रोज?’’

           ‘‘होय करतोय ना. जोरात चालण्याचा व्यायाम करतो. सूर्य नमस्कार नाही करत आता. झेपत नाही. शिर्षासन करायचो पण आता वय आणि वजन वाढल्यामुळं तेही नाही करत.’’ असं म्हणून ज्युनियरनं सिनियरला बोलायला स्पेस दिली.

                    स्पेस मिळताच सिनियर बोलू लागले, ‘‘बरोबर,  आता या वयात नाही करू शिर्षासन. मानेला त्रास होतो. एक कल्पना डोक्यात येऊन गेली परवा : जे अवयव हलवता येत नाहीत त्यांचा व्यायाम कसा करायचा. उदाहरणार्थ, काही अवयव सांगतो तुला. मुत्रपिंडाचा व्यायाम करता येईल का? कसा करायचा? माणसाला कान हलवता येत नाहीत. छोटे असतात ना म्हणून. बाकी प्राणी त्यांचे कान फडफडवतात. म्हणजे व्यायामच करतात ना कानांचा. माणसाला कानांचा व्यायाम कसा करतात हे शोधून काढावं लागेल. कपाळाचा व्यायाम कोणालाच करता येत नाही. प्राण्यांनाही नाही. नाकाचा व्यायाम कसा करायचा. हृदय- काळीज, यकृत यांचा व्यायाम कसा करायचा? ज्या अर्थी आपण डोळ्यांचा व्यायाम करतो त्याअर्थी कपाळ, हृदय, यकृत, कान, नाक यांचा व्यायाम का करू नये? एका लेखकानं यकृत, हृदय नावाची नाटकं लिहिलीत हे माहिती आहे ना तुला?’

 ‘हो. श्याम मनोहर. पण शरीरातल्या यकृत, हृदयावर ती नाही लिहिलेली. ती प्रतिकं आहेत.’ ज्युनियर म्हणाला.

‘बरोबर.’ सिनियर लेखक पुढं म्हणाले, ‘आतड्यांचा व्यायाम आपोआप होत असावा. जिभेचा व्यायाम आपोआप होतोय. दातांचा व्यायाम आपोआप होतो. नाकाचा आणि कानांचा आपोआप होतो की नाही मला माहीत नाही.’

‘कठीण आहे सगळं. खूप सुचतंय सर तुम्हाला.’

‘हो, आणि हे कुठं द्यायचा प्रयत्न करू नकोस तू. फेसबुक, व्हॉटसअॅप बिटसअॅपवर देऊ नकोस. माझ्या नावासहीत द्यायचं झालं तरी देऊ नकोस. अशीच एकाशी फोनवर चर्चा केली आणि त्यानं फेसबुकवर पोस्ट करून दिली. माझ्या नावानिशी. दिली तर दिली पोस्ट, माझी काही वाक्य त्याच्या नावावर खपवून टाकली त्यानं.’ सिनियर श्वास घेण्यासाठी थांबले. म्हणून ज्युनियर म्हणाला,

                    ‘तुम्ही जे काही बोलतात ना वाचकांशी ते तुमच्या कादंबरीत येत असतं पुढं मागं, हे मला माहीत आहे. म्हणून मी ते इतरत्र कुठं देत नाही आणि खाजगीतही सांगत नाही मित्रांना.’

                    ‘हो मला माहीत आहे ते. विश्वास आहे तुझ्यावर. तू नाही देणार हे कुठं. हं तर आपण काय बोलत होतो. व्यायामाविषयी. व्यायाम हा सर्वव्यापी आहे. शरीराच्या आतल्या आणि बाहेरच्या अवयवांच्या व्यायामाविषयी आपण बोलत होतो ना?’

‘हो सर.’

                    सिनियर तंद्री लावत म्हणाले, ‘मेंदू आणि प्रतिभा हे काय आहे? मेंदू नावाचा आपल्या डोक्यात एक अवयव आहेच. पण प्रतिभा कुठं आहे? प्रतिभा हा अवयव नाही. मग लेखकात ती येते कुठून? मेंदूचा व्यायाम शक्य आहे. अनेक नवनवीन शोध हे मेंदुच्या व्यायामामुळंच शक्य झालेत असं म्हणता येईल. आणि कलांचा उद्‍गम हा प्रतिभेमुळं झाला. पण प्रतिभा कुठं आहे?’

                    सिनियर बोलायचे थांबले म्हणून ज्युनियर म्हणाला, ‘खूप गहन होत चाललंय सर.’

                    सिनियर सावकाश चिंतनात हरवून बोलू लागले, ‘हो. गहन आहेच रे हे सगळं. खूप खोल जावं लागतं. प्रतिभा हृदयात असते असं म्हणतात. आपणही गृहीत धरू तसं. गायक गाण्याचा रियाझ करतो. म्हणजे गाण्याचा व्यायामच ना. चित्रकार चित्र काढण्याची सवय ठेवतो. म्हणजे चित्र काढण्याचा व्यायाम. लेखक लिहित राहतो. म्हणजे लिहिण्याचा व्यायाम. आपण लेखक आहोत म्हणून लेखकावर फोकस करू. लेखक इतके श्रम करून लिहितो, त्या लिखाणाचं नेमकं काय होतं? कुठंतरी छापून येतं. नंतर त्याचं पुस्तक होतं. पण ते पुस्तक सर्वदूर पोचावं यासाठी आपण, प्रकाशक वा साहित्य रसिक काही खास प्रयत्न करतो का? लेखक जे लिहितो ते मर्यादित रसिकापर्यंतच पोचतं. आपल्या भाषेच्या लोकांपर्यंत पुस्तक सर्वदूर जाऊन धडकत नाही. एखाद्या घरी पोचतं पण त्या घरातले सगळे लोक तरी ते पुस्तक वाचतात का? एखाद्या ग्रंथालयात पोचतं आणि तिथंच पडून राहतं ना नुसतं? सर्क्युलेट होत नाही. तुझं मी वाचायचं आणि माझं तू.  हे साटंलोटंच झालं ना कॉलेजात एकमेकांना भाषणाला बोलवल्यासारखं.’

‘खरंय’. ज्युनियर म्हणाला.

न थांबता सिनियर पुढं बोलत राहिले, ‘माझ्याकडं एक नवीन तरूण लेखक आला होता. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. बायकोही होती सोबत. त्यानं मध्येच मला विचारलं, अमूक अमूकचं अमूक पुस्तक वाचलं का? मी त्याला म्हणालो, ते मीच का वाचलं पाहिजे? तू हे पुस्तक वाचण्याचं जसं मला विचारलं तसं तू तुझ्या सासूला विचारलं का?’   

                    सिनियरला रिलिफ मिळावा म्हणून ज्युनियर मध्येच म्हणाला, ‘साहित्य वाचन चळवळ जोरात राबवायला हवी. मागं मी सांस्कृतिक दुष्काळाची डायरी लिहिली होती पहा. यावर भर द्यायला हवा.’

                    धागा पकडत सिनियर पुढं म्हणाले, ‘तसंच असं नाही, ते ही बरोबर आहेच. परंतु जे लिहिलं जातं.. लिहून झालं आहे.. छापून झालं आहे.. वितरीत झालं आहे.. त्याची लागण का होत नाही दूर दूर पर्यंत? ते वादळासारखं पसरलं पाहिजे वेगानं, इतकं की एकानं वाचलं की त्यानं दहा जणांना सांगून त्या दहा जणांनी झपाटून वाचलं पाहिजे. आणि त्यापुढं प्रत्येकाचे पुन्हा दहा दहा. दहाच का? दहाचे शंभर, शंभराचे हजार अशा रीतीनं... पुस्तकाची लागण झाली पाहिजे एखाद्या साथीच्या आजारासारखी. वाईट गोष्टी कशा स्प्रेड होतात सोशल नेटवर्कवरून, तसं पुस्तकांचं झालं पाहिजे...’

                    सिनियर श्वासासाठी थांबताच ज्युनियर म्हणाला,

                    ‘‘तसं होतंही. पण ते लोकप्रिय साहित्याबद्दल होतं. अभिजात साहित्याबद्दल असं होत नाही. बाबा कदम जितके वाचले जातील तितके श्याम मनोहर वाचले जात नाहीत. गुलशन नंदा जितके वाचले जातात तितके भालचंद्र नेमाडे वाचले जात नाहीत. दुसरा मुद्दा आजचे अनेक चांगले लेखक वाचकांना माहीत नाहीत. अजूनही अनेक वाचक ययाती, मृत्यूंजय, स्वामी या पुस्तकांनाच मानदंड मानतात. काही लोक तर न वाचताच ही पुस्तकं वाचल्याची नावं सांगत राहतात.’’

                    सिनियर नाहीतली मान हलवत म्हणाले, ‘तुझा हा मुद्दा मला तितकासा पटला नाही. कारण की, ज्ञानेश्वरी कशी वाचली जाते अजूनही घराघरात? तुकारामांची गाथा वाचली जाते ना अजून घराघरात? यावरही बोललं पाहिजे.’

                    ज्युनियरचं उत्तर तयार होतं, ‘हो सांगतो ना. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा घराघरात आजही वाचली जाते. पण त्याच्यातले काव्य वा तत्वज्ञान भिडतं म्हणून ती वाचली जात नाहीत. म्हणजे तत्वज्ञान वा काव्यानंदासाठी ती वाचली जात नाहीत. धार्मिक ग्रंथ म्हणून केवळ श्रध्देनं ती वाचली जातात हे खरं कारण. जर या ग्रंथांत अध्यात्म नसतं वा त्यांचे कर्ते संत नसते तर हे साहित्यही दुर्लक्षित झालं असतं इतर अभिजात साहित्याप्रमाणं.’

                    सिनियर कबूल करत म्हणाले, ‘तुझ्या म्हणण्यात तथ्य आहेच. नाही असं नाही. पण मला दुसरी शंका येते.’

‘कोणती?’

‘‘अजून तशी लिखित कलाकृतीच निर्माण झाली नसेल कदाचित? आपल्या प्रतिभेची निर्मितीच कमी पडते की काय. लेखकाला लिहायच्या मर्यादा पडत असाव्यात? सृजनाचाही व्यायाम असायला हवा, तो कमी पडतो की काय, अशी शंका आहेच.’’ प्रश्न उपस्थित करून सिनियर थांबले. 

                    विचारांची लिंक लावत ज्युनियर म्हणाला, ‘‘सृजनाचा व्यायाम असतोच. पण हेसुध्दा पूर्ण सत्य नाही. विलास सारंग, जी. ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे... ह्यांची निर्मिती कमी पडते असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. त्यांना मर्यादा आहेत असंही नाही. इतकं अभिजात लेखन येऊनही अनेक वाचकांना ते ऐकूनही माहीत नसेल तर आपण उपस्थित केलेला मुद्दा बरोबर नाही असं मला वाटतं... तेव्हा...’’ ज्युनियरनं आपलं म्हणणं अर्ध्यावर सोडून दिलं. यावर सिनियर काही बोलत नाहीत म्हणून ज्युनियर संथपणे मनातल्यामनात म्हणाला,

                    लोकांना वाचन ही जीवनावश्यक गरज वाटत नाही असं म्हणता येईल कदाचित!...

                    (हंस, दिवाळी अंक, नोव्हेंबर 2023 मध्ये प्रकाशित कथा. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

मोकळा प्लॉट

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

          काही वर्षांपूर्वी गावाला लागून असलेल्या नव्या वस्तीत माझ्या छोट्याशा घरात रहायला आलो तेव्हा आजूबाजूला खूप कमी घरं होती. घराजवळच्या जागेत लोक विविध प्रकारचा कचरा हक्कानं फेकायची. लक्षात येताच तो कचरा गोळा करून जाळायचो.

          आजूबाजूला घरं बांधली जाऊ लागली. पण माझ्या घराला लागून एका बाजूचा प्लॉट अजूनही मोकळा आहे. घरं वाढली तसा घराजवळच्या प्लॉटात कचराही वाढू लागला. तो मी इमानेइतबारे आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी जाळू लागलो. तेव्हा नगरपालिकेकडून कचरागाडी फॅसिलीटी नव्हती. म्हणून कचरा जाळणं म्हणजे वायुप्रदुषण करणं, हे माहीत असूनही तेव्हा दुसरा सोपा उपाय नव्हता.

          त्यावेळी जुन्या गावातही लोक कुठंही कचरा फेकायचे. कचरा पेट्यांच्या परिसरातली नेमकी पेटीच मोकळी ठेऊन, लोक आजूबाजूला कचर्‍याचं साम्राज्य पेरायचे. तो कचरा कधी कोणी उचलायचाच नसतो असं लोकांनाही वाटत असावं. बरेच लोक आपापल्या घरासमोरच्या उघड्या गटारीतही कचरा टाकायचे. कधीतरी गटार उपसलीच तर त्या गल्लीनं जाणं ही कठोर शिक्षा वाटायची. या गल्लीत लोक कसे राहत असावेत? भयानक उग्र वास दोन दिवस येत रहायचा.

          नव्या घराजवळच्या जागेत बरीच झाडी लावली. पावसाळ्यात काही झाडं शेजारच्या प्लॉटमध्ये आपोआप उगली आणि आपोआप वाढत राहिली. घराच्या हद्दीत मुद्दाम लावलेली तर रिकाम्या प्लॉटमध्ये आपोआप झाडी उगून घराबाजूच्या एक चथुर्तांश प्लॉटमध्ये नैसर्गिक उगलेल्या झाडांचं कुंपण तयार झालं. यात बाभुळ, गंगुती, बिलायत, बोरी, शिकेखाई अशा काटेरी झाडांमुळं डुकरांपासून आणि गायी, बकर्‍यांपासून मी लावलेल्या झाडांना संरक्षण मिळत होतं.

          दरम्यान आजूबाजूला नवी घरं उभी रहात हा भाग चांगलाच डेव्हलप होत होता. माझी झाडंही मोठी होत होती. शेजारचा प्लॉट अजूनही मोकळाच होता. घराच्या बाजूला झाडांनी अशी दाटी केली की त्याबाजूनं दुरून घर दिसण्याऐवजी फक्त झाडी दिसत.

          दरम्यान नगरपालिकेकडून गावात घंटागाडी सुरू झाली. म्हणून आपल्यासारखेच इतर लोकही आता घरात निर्माण झालेला कचरा घंटागाडीत टाकत असावीत असं वाटत होतं.  

          शेजारच्या प्लॉटमध्ये लावलेल्या आणि काही आपोआप उगलेल्या अशा घनदाट झाडांमध्ये थोडा निवांत वेळ काढून रमायचो. उन्हाळ्यात फॅनची गरज भासत नव्हती. या झाडांमुळं घरात थंड हवा खेळायची. काही झाडं फुलं द्यायची. काही फळं द्यायची. पण संगोपन केलेल्या झाडांसहीत इतर सर्वच झाडं भरभरून ताजा प्राणवायु फुकट द्यायची, हे सर्वात महत्वाचं होतं. घराजवळचं वातावरण कायम टवटवीत आल्हाददायक असायचं.

          अनेक पक्षी– ज्यांची नावंही माहीत नाहीत ती घराजवळ झाडांत रमू लागली. घरटी बनवू लागली. अंडी घालू लागली. त्यांची पिलं जन्माला येऊ लागली. त्या पिलांना त्यांचे आईवडील दाणे कसे भरवतात, वगैरे निरिक्षण जवळून करता ये‍त होतं. परका मोठा पक्षी आजूबाजूला आला की त्यांचा चिवचिवाट सुरू व्हायचा. त्याला दूर पळवून लावण्यासाठी चोची मारून दूर हाकलत. (काही पक्ष्यांनी मलाही शत्रू समजून चोची मारल्या आहेत.) पक्षी पिलाला उडायला कसं शिकवतात, हे जवळून पाहू लागलो. त्यांच्यासाठी दाण्यांची- पाण्याची- फळांची सोय करू लागलो.

          मधमाशा दिसू लागल्या. झाडांवर मधाचे पोळे दिसू लागले. मागच्या दारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर मधमाशा पाणी प्यायला येऊ लागल्या. मानवी वावर असतानाही धीट होऊ लागल्या. चुकून त्यांना धक्का लागला तर चावा घेऊ लागल्या. मधमाशा, गांधील माशा, विविध प्रकारची फुलपाखरं असे अनेक प्रकारचे किटक जवळून पहात होतो. अंजीर, पेरु, सिताफळ, रामफळ, पपई, केळी ही फळं पाखरं खायची. फळं तोडायला गेलं तर त्यांची फळं तोडतो असं त्यांना वाटायचं आणि चिवचिवाट करत फळं तोडायला विरोध करायची. मुंगूस, मुंगसाची पिलं, जमिनीतली मुंगसांची बिळं, खारूताई, मांजरी आदी प्राणी ह्या छोट्याशा जंगलात दिसत. या लावलेल्या कम नैसर्गिक जंगलाचा उल्लेख घरात आम्ही बाग असा करायचो. उदा. बागेत कसला आवाज आला बघ’, अमूक एक वस्तू बागेत ठेवली असेल बघ.

          निसर्गासहीत सर्व जीव मला आवडतात. पण डुक्कर, माशा (आणि काही प्रमाणात कुत्रा) हे जीव अजिबात आवडत नाहीत. (मच्छर- डासही आवडत नाहीत. डास रोगाला निमंत्रण देत असले तरी त्यांची किळस तरी येत नाही, डुक्कर, माशा, कुत्रा यांची अतोनात ‍किळस येते. हे प्राणी भयंकर रोग- साथ पसरवतात.) घराभोवती असे सुंदर जंगल‍ निर्माण केल्यानं डुकरांना इथं प्रवेश नव्हता. घराजवळ एखादंही डबकं साचणार नाही, याची काळजी घ्यायचो. त्यांना सहजासहजी बागेत येता येणार नाही अशी वडांगीची डागडुजी आतून अधूनमधून व्हायची.  

          आणि एके दिवशी नगरपालिकेनं निर्णय घेतला की शहरातील बर्‍याच रिकाम्या प्लॉटांमध्ये उगलेल्या अनाहूत बोरी बाभळी काढायच्या. तसं काम सुरू झालं. इतरत्र सुरू झालेलं हे काम पाहून आपल्या घराजवळच्या या प्लॉटचं काय करायचं? काय करावं? निर्णय घेता येत नव्हता. खरं तर प्लॉट स्वच्छ झाला तर ते हवंच होतं. झाडांविषयी, पशु-पक्षी-किटक- निसर्गाविषयीच्या प्रेमामुळं, आहे तसंच ठेवलं तरी चालणार होतं. मला ठोस भुमिका घेता आली नाही. घेतलीच नाही. एक दिवस जेसीबी आलं आणि माझ्या हद्दीतील पाळीव झाडं वगळून, त्यांच्या हिशोबानं भाकड झाडं काढून प्लॉट त्यांच्या पध्दतीनं स्वच्छ केला. झाडांना आडोसा असलेला वडांगीसारखा नैसर्गिक भाग निघून गेला. पक्ष्यांची घरटी उध्वस्त झाली. अंडी फुटली. काही पिलं मेली, पक्षी उडून गेले. मधाचा पोळा कचर्‍यात गेला. मधमाशांनी कालवा केला, पण त्यांच्या विरोधाचा उपयोग झाला नाही. कचर्‍याचा ढीग प्लॉटात मध्यभागी गोळा करून जेसीबी दुसरीकडं निघून गेलं.

          लावलेली- फुलं, फळं देणारी झाडी आपल्या कामाची आणि बोरी, बाभूळ, नीम, पिंपळासारखी झाडं बिगर कामाची, अशा तथाकथित आपल्या  उपयुक्ततावादी दृष्टीकोनामुळं दिवसेंदिवस जंगल कमी होतंय. पण सर्वच हिरव्या पानांच्या वनस्पती आपल्यासाठी प्राणवायू निर्माण करीत असतात हे कोणाच्या खिजगणतीतही नसतं. अनेक जीवांसाठी निवासी जंगल जेसीबीनं काही मिनिटात

उखडून फेकून दिलं. प्लॉट मोकळा झाला हे चांगलं झालं की वाईट मला ठरवता येत नव्हतं. उघडी बोडकी जागा मला अस्वस्थ करत होती. मशीनचा आवाज मंद होत दूर जाताच एक कावराबावरा झालेला भारव्दाज पक्षी, आधी झाडं होती, तिथं जमिनीवर उतरला. इकडं तिकडं पहात झाडांचा कानोसा घेऊ लागला. अजून काही पक्षी याच पध्दतीनं आपली घरं शोधत आली. धारातिर्थी पडलेल्या हिरव्यागार झाडांच्या कत्तलीतून चाहूल नसलेला कानोसा घेत, मागमूसही शिल्लक नसलेली घरं इथं होती, कुठं गेली?’ अशा नजरेनं बोलत होती. कावर्‍याबावर्‍या झालेल्या मुक्या जीवांचं रडणं आपल्यापर्यंत पोचत नाही, त्यांचा आक्रोश दिसत नाही. मानवी शब्दांत त्यांचं सांत्वनही करता येत नाही. त्यांची पोरकी अवस्था पाहून नकळत दुसरीकडं बघू लागलो. मनातल्यामनात प्रतिक्रियाशून्य झालो.

          दुसर्‍या दिवसापासून मात्र आणखी वेगळेच धक्के बसू लागले. रोज कचरागाडी येऊनही आजूबाजूचे बरेच लोक या रिकाम्या प्लॉटात येता जाता दिवसभर कचरा फेकत होते. एका बाजूला राहणारा विक्षिप्त शिक्षक, रोज माझ्या अभ्यासाच्या खिडकीजवळ अगदी पाच सात फुटावर रात्रीचं शिळं- नासलेलं- वास करणारं अन्न टाकून जातो. प्लॉटशेजारी दुसर्‍या बाजूला राहणारा माणूस त्याच्या पाळलेल्या कुत्र्यानं ओट्यावर केलेली घाण, राजरोस रिकाम्या प्लॉटात रोज फेकतो. कोणी प्लॅस्टीकच्या पिशव्या फेकतं. एक बाई तर या प्लॉटपासून तीन चार घरं पलीकडे राहत असूनही आणि तिच्या मागच्या दारीसुध्दा मोकळा प्लॉट असूनही ती तिच्या घरातला ओला कचरा फेकायला या प्लॉटजवळ येते. म्हणजे स्वत:च्या घराजवळ कचरा फेकल्यानं आरोग्याला ते हाणीकारक आहे हे त्या महिलेला ज्ञात आहे, म्हणून ती तो कचरा फेकायला इथं येते. जणू असा कचरा घंटागाडीत टाकायला मनाई आहे, असं लोकांना वाटतं की काय! या कचर्‍यात तोंड घालण्यासाठी डुकरांचे- कुत्र्यांचे कळप आता नेहमी इथं वावरत असतात.

          एक चथुर्तांश प्लॉटमध्ये जेव्हा मी निसर्गाचा आनंद घेत होतो तेव्हा तीन चथुर्तांश प्लॉटमध्ये हे कचरा फेकण्याचं- कुत्र्याची घाण फेकण्याचं काम नित्यनेमानं आधीपासूनच सुरू असलं पाहिजे. मात्र दाट आणि अपारदर्शक जंगलामुळं दृष्टीआड सृष्टी या न्यायानं मला ते दिसत नव्हतं. त्याचं गांभीर्य नव्हतं. आज हे सगळं पाहत सहन करावं लागतं. कुत्र्यावाल्याला सांगितलं, ही घाण इथं टाकू नका, कचरागाडीत टाकत जा. कचरा फेकणार्‍यांना सांगितलं, कचरा घंटागाडीत टाकत जा. लोकांनी ऐकून घेतलं.

          विक्षिप्त शिक्षकाला असं सांगताच तो म्हणाला, ‘मी कचरा टाकताना तुम्ही दुसरीकडं पहायचं ना? इकडं कशाला पाहतात?’ असा हा तज्ज्ञ शिक्षक! सामाजिकतेचा गंध नसलेल्या लोकांना मोकळे प्लॉट म्हणजे कचरा डेपो वाटतात.

रोज सकाळी खिडकी उघडताच बाहेर नवनवीन कचरा दिसत राहतो, प्लॅस्टीक दिसत राहतं. (प्लॅस्टीकचा वास येत नाही ही आपल्यासाठी जमेची बाजू. पण प्लॅस्टीक डोळ्यांना दुरूनच खडळत राहतं, फ्रेश वाटत नाही. हे सहज फेकलेलं प्लॅस्टीक आता 30 वर्ष मातीत मिसळणार नसतं. शहरातील प्रचंड वाढणारी डुक्करसंख्या, कुत्री आणि गर्दीत फिरणारी भाकड जनावरं हा आणखी भयानक आणि मोठा चिंतनाचा विषय आहे. कुत्र्यांचा कळप जीवंत डुकरांच्या पिलांना फाडून खातात. दुनिया नामशेष होईपर्यंत हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत, असं आता पाठपुराव्यांनी थकून वाटू लागलं.)

          घराला तार कंपाऊंड केलं अथवा भिंतीचं कंपाऊंड केलं तरी कचरा फेकला जाणार. कंपाऊंड केल्यावर कदाचित तो कचरा धीट होत कंपाऊंडला लागून अजून जास्त घराजवळ सरकू शकेल. म्हणजे या समस्येवर कंपाऊंड करणं हाही रामबाण उपाय होऊ शकत नाही.  

          पुढच्या वर्षाच्या पावसाळ्यात नैसर्गिक जंगल पुन्हा उगण्याची वाट पाहण्याशिवाय हाती काहीही शिल्लक नाही. नैसर्गिक झाडांतून जंतू कदाचित फिल्टर होत राहतील, अथवा अन्नसाखळीच्या नियमानुसार काही जीव त्यांना परस्पर संपवतील अशा आशेत... तसं झालं नाही तरी वाढलेल्या भाकड वनस्पतींतून आपल्या पापी डोळ्यांना पलीकडचा कचरा दिसणार नाही आणि लोकांना शिस्त लावण्यात आपसातले संबंधही खराब होणार नाहीत.

                    (अप्रकाशित. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता :http.://sudhirdeore29.blogspot.com/