गुरुवार, ३१ मे, २०१८

लग्नविधी आणि इतर विधी (भाग: दोन)




-    डॉ. सुधीर रा. देवरे

          विधी संज्ञेचे लग्न विधी आणि इतर विधी असे भाग करावे लागतील. ग्रामीण विधींमध्ये अनेक अंधश्रध्दा आढळत असल्या तरी ग्रामीण विधींतूनच भाषेला अनेक नवीन शब्द, वाक्‍प्रचार, म्हणी मिळलेल्या आहेत. लोकपरंपरा आणि विधी जसजश्या नष्ट होऊ लागतात तशा भाषेतील अनेक संज्ञा, वाक्प्रचार, म्हणी यांचाही अस्त होऊ लागतो.
          ग्रामीण भागातील लग्न विधी परपरेत खालील गोष्टींचा समावेश होतो. यात कसमादे (नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) पट्ट्यातील लग्न विधींचा प्रामुख्याने समावेश केला आहे : मुलगी पहायला जाणे, मुलाला आवतन द्यायला जाणे, सुपारी फोडणे, नारळ देणे, साखरपुडा, चिरामुंदी, बस्ता बांधणे, दिवट्या बुधल्या करणे, मुळ लावणे, पानसुपारी, फुलकं काढणे, बेल मांडव सांगणे, मांडव आणणे, मांडव टाकणे, आरबोर बांधणे, मांडव बेळीचे आवतन देणे, चुल्हाले आवतन देणे, भावबंदकी सांगणे, दिवटी पाजळणे, जुगूम जेवायला बसवणे,  तळी भरणे, देव घ्यायला जाणे, तेलन पाडणे, सायखेडं आणणे, फुलोरा टांगणे, देव घडवणे, देव घ्यायला जाणे, देवांचे लग्न लावणे, देव नाचवणे, हळद कांडणे, हळद लावणे, कुंवारपण फेडणे, शेवंती काढणे, रूखवत आणणे, वरमाया काढणे, पाय धुणे, वाण लावणे, वाण जिंकणे, ताट लोटी लावणे, मान देणे, साड्या नेसवणे, ओट्या भरणे, टोप्या घालणे, नवरदेव ओवाळणे, गळाभेट घेणे, मिरवणूक काढणे, कलवरी जाणे, नवरा नवरी खांद्यावर घेऊन नाचवणे, अंघोळ घालणे, नवरी वाटे लावणे, काकण पोयते बांधणे, काकण सोडणे, तोंड धुवायला जाणे, परने जाणे, खोबरे थुंकणे, गुळण्या टाकणे, वाजा वाजवत सार्वजनिक अंघोळ घालणे, नाव घेणे, मांडवफळ बसणे, सत्यनारायण घालणे, शिदोरी आणणे, शिदोरी पहायला जाणे, उलटावन पालटावन करणे, मांडवाखाली नेणे, मांडव टिपायला जाणे, चुल्ह्याला पाय लावायला जाणे, घराच्या पायर्‍या चढणे आदी परंपराचा आज लोप होताना दिसत असला तरी दुसर्‍या बाजूला अनेक अनावश्यक आणि खर्चिक परंपरा रूढ होताना दिसतात. ज्या परंपरा अनाठायी आणि पूर्णपणे व्यावसायिक झालेल्या आहेत.
          लग्न सोहळ्यांव्यतिरिक्‍तच्या अनेक लोकपरंपरा सुध्दा भाबड्या श्रध्दा आणि अंधश्रध्देतून निर्माण झालेल्या आहेत. या लोकपरंपरातूनही अनेक संज्ञा, वाक्प्रचार आणि म्हणी भाषेला मिळत असल्या तरी त्या भाषेला संपन्न करण्यासाठीच यापुढे उराव्यात. अंधश्रध्देला खतपाणी घालून त्यांचे उत्थापन होऊ नये. लोकसंग्रह आणि नाते संबध जपण्यासाठीच्या लोकपरंपरा विधी मात्र टिकून रहाव्यात असेच प्रत्येकाला वाटेल. अशी योग्य ती वर्गवारी करता येईल अशा काही‍ विधींचा उल्लेख इथे करता येईल.
          यात व्रत घेणे, चक्र भरणे, तोंड पाहण्याचा कार्यक्रम, सुखगाडी (सुखदेवता), मुलामुलींची नावे ठेवण्याची पध्दत, पाऊस येत नाही म्हणून वरूण देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, जावळं काढणे, घरभरणी करणे, दिठ काढणे (दृष्ट काढणे), मर्तीक संस्कार विधी (पाणी देणे, नदीत गवर्‍या जाणे, नदीत फुलं पाठवणे, अग्नी डाग देणे, तिरडी उचलणे, खांदा देणे, राख सावडणे, अस्थि विसर्जन करणे, मयताला जाणे, वाटे लावायला जाणे, दारावर जाणे, दहावं करणे, पिंड घालणे, अकरा सवाष्णी बसवणे, दिवस घालणे, तेरावे करणे, दु:ख टाकायला आणणे वगैरे.) अंगावर गोंदून घेणे, एखाद्या वैद्याने पारंपरिक पध्दतीने रोग्याची पटोळी पाहणे, मंत्रांनी पान उतरवणे (सापाचा दंश उतरवणे), विंचू उतरवणे, इतर मंत्र- तंत्र आदी काही उग्र विधीही पहायला मिळतात. यातु विद्येचा समावेश असलेले काही अघोरी विधी आहेत.
          काही विधी वाद्याच्या चालीवर केले जातात तर काही विधी नाट्यात्मक पध्दतीने सादर केले जातात. सर्व विधीत तारतम्य दाखवून योग्य त्या पध्दतीने मध्यम मार्गाने लोकपरंपरा विधी जपता येऊ शकतात. पण अजून तरी एकतर हे टोक वा दुसरे टोक अशा पध्दतीने विधींवर भूमिका घेतली जाते. ते चुकीचे आहे. भाबड्या विधी जरूर असाव्यात पण त्यांचा बडेजाव नको.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

सोमवार, १४ मे, २०१८

ग्रामीणांचे लग्नसोहळे




- डॉ. सुधीर रा. देवरे

     आधी ‍तीन दिवसांचा लग्न समारंभ व्हायचा. तो आज दोन दिवसांवर आला. लग्नाची तारीख धरली की आधी सर्व भाऊबंद बस्त्याचा दिवस नक्की करायचे. भाऊबंदांना गोळा करून तालुक्याच्या गावी मोठ्या कापडाच्या दुकानात बस्त्याला जायचं. बस्ता म्हणजे नवरा नवरीसाठी घेतले जाणारे नवे कपडे. या बस्त्यात पहिल्यांदा फडकी नावाचं कापड खरेदी करायची परंपरा होती. ती आता नामशेष झाली आहे. बाकी बस्त्यात वराला दोन पोषाखांचे कापड, नवरीला पाच साड्या, परकर, झंपरचे कापड, वरमायांसाठी लुगडे, सुख्यासाठी कापड, टॉवेल, उपरणे – टोप्या आदी कापडे बस्त्यात असायचे.
     पूर्वी गावात तीन दिवसांचे लग्न असायचे. पहिला दिवस मांडवचा. दुसरा टाळीचा- म्हणजे लग्नाचा तर तिसरा दिवस हा मांडवफळ आणि सत्यनारायणचा असायचा. लग्न आठ दिवस पुढे असायचे तेव्हापासून लगीनघराच्या ओट्यावर लोकगीतं गायले जायचे. लग्नातही मोठ्या प्रमाणात लोकगीतांचा समावेश होता. लग्न विधींच्या निमित्ताने अनेक लोकगीतांचा जन्म झाला होता. ही लोकगीतेही आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. लोकगीतांची जागा आता आधुनिक गाण्यांसह वाद्यांनी घेतली.   
     लग्नाच्या तिसर्‍या दिवसांच्या लोकपरंपरा खूप मजेशीर होत्या. नवरा नवरी तोंड धुवायला गावाच्या बाहेर नदीत वा पाटावर वाजत गाजत बैलगाड्यातून जात असत. मांडोफळ, नवरानवरीची सार्वजनिक अंघोळ, काकण सोडणं, घरोघर चहापाणी आदी प्रथांचा वराकडील लग्नाचा हा तिसरा दिवस असायचा. आता तो फक्‍त सत्यनारायणापुरता उरला. बाकी परंपरा कालबाहय झाल्या आहेत.
     तीन दिवसाचे लग्न आता दोन दिवसावर आले. पहिला दिवस मांडवचा आणि दुसरा विवाहाचा. ग्रामीण भागात विवाह सोहळे अगदी कालपरवापर्यंत आपापल्या अंगणातच होत असत. नंतर काही विवाह शाळेच्या पटांगणात होऊ लागलीत. विवाहाच्या जेवणात वरण, भात, घुगरी आणि शिरा नंतर शिराला पर्याय म्हणून बुंदी असे मोजकेच पदार्थ असत.
     आता मंगल कार्यालयांच्या काळात विवाह ग्लोबल व्हायला लागलीत. जेवणावळीतल्या पात्रात अन्न मावणार नाही इतके पदार्थ ठेऊन अन्न मोठ्या प्रमाणात वाया घालवलं जातं. हा समारंभ खरं तर लवकर एका दिवसावर यायला हवा. पण तो एका दिवसावर न येता दिवसेंदिवस प्रतिष्ठित होताना दिसतो. पहिल्या दिवसाच्या मांडवच्या कार्यक्रमात देवांचे लग्न लावणे आणि हळद लावणे हे मुख्य कार्यक्रम असून सायखेडं, वरमायांचे पाय धुणे, तेलन पाडणे आदी अन्य विधी आहेत. वधूचे घर असेल तर वधूला वा वराचे घर असेल तर वराला हळद लावण्याचा कार्यक्रम आता थाटामाटात आणि वाद्यांच्या गजरात होत असतो. पूर्वी हळद लावणे हा विधी केवळ घरगुती कार्यक्रम असायचा. आता हा कार्यक्रम दिवसेंदिवस कमर्शियल होत महत्वाचा समजला जाऊ लागला.
     मांडवच्या एका बेळीजवळ माठणी ठेऊन तिथे आरबोर ठेवणे हा विधी आहे. मांडवला कच्च्या धाग्याच्या दोराने गुंडाळणे हा एक विधी आहे. हळद फोडणे, तेलन पाडणे आदी वि‍धीही आज केले जातात. देवांचे लग्न लावणे हा मांडवच्या दिवसाचा मुख्य वि‍धी. वरमायांचे पाय धुणे ही लोकपरंपराही कमी होण्याऐवजी वाढताना दिसते. थोडक्यात, लग्न घरातून आता लोकगीतं ऐकू येत नाहीत. लग्नातले लोकगीतं म्हणणे दिवसेंदिवस कमी होत चालले. मानपानाची प्रथाही कमी होताना दिसत असली तरी लग्न समारंभांना येणारे व्यावसायिक रूप आणि दिखाऊपणा कमी होताना दिसत नाही. कार्यक्रमांना आपल्याला गर्दी हवी असते. मग तो लग्नसमारंभ का असेना. अशी मानसिकता कार्यरत असेपर्यंत लग्नसमारंभ खर्चिकच होत राहतील.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

मंगळवार, १ मे, २०१८

ग्रामीण करमणूक-मनोरंजन



- डॉ. सुधीर रा. देवरे

          उत्तर महाराष्ट्र ग्रामीण वासियांची करमणूकीची साधनंही इतर  गावांप्रमाणे पारंपरिक होती. अनेक लोकपरंपरा सादर करत आणि त्यांचा आस्वाद घेत गाववासी आपली करमणूक करून घेत असत. दिवसभर अंग दुखेपर्यंत कष्ट केल्यानंतर वेळ उरला की ग्रामीण लोक आपल्या मनोरंजनाकडेही वळत.
          भोवाडा, डोंबार्‍याचा खेळ, गारूडीचा खेळ, तमाशा, सर्कस, गावातल्या लोकांनीच बसवलेले नाटक, गणपतीच्या काळात गावात मागवलेले एखादे कलापथक वा ऑक्रेस्ट्रा, भारूड, कीर्तन, प्रवचन, भजन, लळित, खंडोबाचं आढीजागरण, होळी, आखाजीचा बार, झोके, पतंग, गौराई, कानबाई, रानबाई, भालदेव, जादूगार, टिंगरीवाला, रायरंग, बाजार, जत्रा, अनेक मैदानी खेळ, विहिरीत वा बंधार्‍यात पोहणे आदीत मन घालून ग्रामीण लोक मनसोक्‍त जीवन जगत. लोकजीवनातून पारंपरिक पध्दतीने गावकरी देव भजत असत. देव भजण्यातून विधी केल्या जात. आणि या सर्व प्रक्रियेतून अनायासे गावकरी आपले मनोरंजनही करून घेत असत.
          आखाजीच्या बारात ऐकू येणार्‍या अश्लील गाळ्या कोणत्याही गावकर्‍याला त्या काळात अश्लील वाटत नव्हत्या. (शहरात या शिव्यांना अश्लील समजलं जायचं.) आता अलीकडच्या काळात त्या गाळ्या (शिव्या) ग्रामीण लोकांनाही अश्लील वाटू लागल्या. आखाजीच्या दिवशी दिवस कलला की गावातले लोक हटकून वेळ काढून बार खेळण्याच्या जागेवर जाऊन बसत. हातात दगडी घेऊन गोफणीने वा हातानेच दुसर्‍या गावातल्या तरूणांवर धाऊन जात दगडी मारत. एक तर दुसर्‍या गावातल्या माणसाचं तो डोकं फोडत असे वा आपलं डोकं फोडून घरी परतत असे. काही लोक बारची फक्‍त दुरून गंमत पहात असत. आज मात्र या गावकर्‍याला ते प्रतिष्ठितपणाचं वाटत नाही. (बारात डोकी फोडणं हे त्याकाळीही चुकीचंच होतं.) शेतीची वा नेहमीची कामे करत गाववासी दोन मसाल्यांवर चालणार्‍या रेडिओवरची गाणीही ऐकत असे.  
          कबड्डी,‍ चिलापाटी, आट्यापाट्या, पावसाळ्यात ओल्या जमिनीत जोरात सळई खुपसणे, भोवरा, भोवर्‍यातली पाच कोची, दगड का माती, लपाछपी, डीबडीब, हत्तीची सोंड, गो गो राणी, खोपाखोपी, कुस्त्या, कोयी कोयी, गोट्या गोट्या, आळे चिपी, आंधळी कोशींबीर, आळीसुळी अशा प्रकारच्या अनेक मैदानी खेळात ग्रामीण तरूण आपली करमणूक करून घेत असत. 
          वर सांगितलेल्या करमणूक- मनोरंजनाऐवजी आज खेड्या पाड्यातले लोक टीव्हीवर सिरियल पाहतात, मुव्हीज् पाहतात, क्रिकेट मॅच पाहतात, आयपीएल पाहतात. आज प्रत्येकाच्या हातात आलेला मोबाईलसुध्दा एक करमणुकीचे मुख्य साधन झाला आहे. ज्यांच्या घरी कधी टेबलावर ठेवण्याचा लँडलाईन फोन आला नाही, अशा घरातही आज प्रत्येकाजवळ मोबाईल फोन आहेत.
          मोबाइलवर गेम खेळणे, व्हीडीओ पाहणे, ‍व्हीडीओ चॅट करणे, व्हॉटस अप मेसेज फॉरवर्ड करत राहणे, गाणे ऐकणे, सेल्फी घेणे, फोटो काढणे आदी प्रकारचा टाइमपास मोबाईलवर केला जातो.
     होळीच्या अश्लील आरोळ्या मारायला आज गावातला माणूस सरमायला लागला. भोवाडा तर आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तमाशा आज चोरून लपून पाहण्याच्या पंगतीत जाऊन बसला. अशा प्रकारच्या लोकपरंपरा आजच्या पिढीला भावत नाहीत. झोक्यावर बसणं आज कोणाला आवडत नाही. झोक्यावर बसून झोक्यावरची गाणी म्हणणं तर फार लांबची गोष्ट झाली. रेडिओवरच्या बातम्या वा जुनी गाणी ऐकणंही आज कालबाह्य झालं आहे.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/