शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

My Blogs ग्रुपला एक वर्ष पूर्ण





- डॉ. सुधीर रा. देवरे

     आपला ब्लॉग व्हॉटस् अॅप वर पाठवत चला म्हणजे आम्हाला वाचता येईल अशी विनंती काही मित्रांनी केल्यामुळे 1 नोव्हेंबर 2014 ला व्हॉटस् अॅप वर My Blogs नावाचा ग्रुप तयार करण्यात आला. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. एप्रिल 2012 पासून मी सातत्याने ब्लॉग लिहितोय. सुरूवातीचे दोन वर्ष प्रत्येक आठवड्याला एक, नंतर पंधरा दिवसातून एक असे ब्लॉगवर लेख देतोय. कोणत्याही कारणाने अजून तरी ठरलेल्या दिवशी लेख देण्यात खंड पडला नाही. प्रत्येक महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला माझ्या ब्लॉग साईटसह फेसबुकवरही तोच लेख देत असतो.
      ग्रुपसाठी आधी 50 सभासद संख्या मर्यादित असल्याने निवडक मित्रांनाच My Blogs  व्हॉटस् अॅप ग्रुप वर घेता आले. आता ही सभासद संख्या वाढता वाढता शंभर झाली आहे. व्हॉटस् अॅप ग्रुपची मर्यादा आज तरी शंभर सभासदांचीच असल्याने आपल्याला या संखेवर थांबावे लागले. ब्लॉग टाकल्यानंतर दरम्यानच्या पंधरा दिवसाच्या काळात ब्लॉगवर टिपण्यांच्या स्वरूपात चर्चा करता येते. ही चर्चा लेखकावर न होता लेखाच्या विषयावर व्हावी अशी अपेक्षा असते आणि लेखावर प्रतिकूल प्रतिक्रियांचेही स्वागत होते. काही प्रतिक्रिया भाबड्या असल्या तरी त्या चर्चेत सामावल्या जातात. ग्रुपवर अनावश्यक मजकूर येत राहिला की सतत वाजत राहणार्‍या आणि आपल्या कामात व्यत्यय आणणार्‍या अलार्ममुळे अनेक मित्र कंटाळून ग्रुप सोडून जातात. म्हणून योग्य तीच चर्चा ग्रुपवर करावी अशी मी ग्रुपवरील मित्रांना कायम विनंती करत असतो. सर्व मित्रांच्या सहकार्याने असा आगळा वेगळा ग्रुप व्हॉटस् अॅप वर एका वर्षापासून सुरळीत सुरू आहे.  
      या ग्रुपवर तब्बल पंधरा दिवस एकाच विषयावर चर्चा होते. सकाळची पोष्ट संध्याकाळी जुनी होण्याच्या आजच्या गतिमान मोबाईल जमाण्यात एकाच विषयावर पंधरा दिवस चर्चा करणे ही गोष्ट काहींच्या दृष्टीने रटाळ आणि कंटाळवाणी असली तरी उठसुठ कोणतीही जुनी पोष्ट नवीन समजून फॉरवर्ड करत राहणे हे अनेक लोकांच्या दृष्टीने डोकेदुखी असते आणि नाइलाजाने त्यांना ग्रुप नकोनकोसा होतो. एकाच विषयावर बोलायचे बंधन असल्याने अनावश्यक पोष्ट ग्रुपवर येण्याचे थांबते. म्हणून अधून मधून ग्रुपवर शांतता असते. अशी शांतताही कामात व्यग्र असलेल्या माणसाला आवश्यक असते. दिलेल्या ब्लॉगच्या विषयावर पंधरा दिवस चर्चा झाली तर ती चर्चा प्रासंगिक न ठरता तिला संग्राह्य मूल्य प्राप्त होते. एकाच विषयावर महत्वाचा दस्ताऐवज तयार होतो. युज अँड थ्रो च्या जमाण्यात साहित्य आणि विचार सुध्दा वाचा नि डिलेट करा या गटात जाऊन बसू नयेत म्हणून हा प्रयत्न आहे. गटातील सभासद दिलेल्या विषयावर विचार करत त्यावर टिपण्या तयार करतात. या मंथनातून एकेका विषयाचे नवनीत बाहेर यावे ही अपेक्षा आहे. या ग्रुपवर साहित्यिक, कलावंत, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, संपादक, पत्रकार, जागरूक नागरिक आणि काही रसिक मित्र व विद्यार्थी आहेत. ग्रुपवर येण्यासाठी अनेक मित्र इच्छुक असून त्यांनाही टप्प्याटप्प्याने ग्रुपवर घेण्यात येईल.
      या ग्रुपवर संपूर्ण महाराष्ट्रातील मित्र तर आहेतच पण महाराष्ट्राबाहेरील काही मित्रही आहेत. ब्लॉगचे लिखाण आणि चर्चा मराठी भाषेत होत असल्याने हा ग्रुप देश पातळीवर नेता येत नाही. (मात्र जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा ठिकाणी म्हणजे देशभरात आणि परदेशातही ब्लॉगवरील लेखन वाचले जाते.) आतापर्यंत सुमारे एकशे पन्नास ब्लॉग प्रकाशित झाले असून त्यांत विषयांची विविधता जाणून बुजून नाही तर आपोआप आली आहे. नवीन लिहिलेल्या लेखांसोबत माझ्या प्रकाशित पुस्तकांतील निवडक मुद्दे आणि विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेले निवडक लेखही निमित्ताने ब्लॉग स्वरूपात देत असतो. स्थलकालाची मर्यादा आणि दैनंदिन व्यस्ततेमुळे अनेक वाचकांना वाचनाची इच्छा असूनही प्रत्येक पुस्तकापर्यंत वा नियतकालिकांपर्यंत पोचता येत नाही ही विदारक वस्तुस्थिती आहे. म्हणून माझ्या प्रकाशित पुस्तकातील प्रकरणे ब्लॉगमधून दिल्याने अनेक वाचकांची सोय झाल्याचे त्यांनी आवर्जून कळवले आहे. अनेक वाचक ब्लॉग वाचून मूळ पुस्तकापर्यंतही पोचलेत.
      My Blogs  नावाचा व्हॉटस् अॅप ग्रुप हा एक प्रयोगिक प्रयत्न आहे. व्हॉटस् अॅपचा वापर विविध बातम्या, निरोप, निमंत्रणे, फोटो, विनोद, थट्टा मस्करी, गप्पा, शुभेच्‍छा, सुविचार, छोटे चटपटीत मजकूर, कॉपी- पेष्ट फॉरवर्ड आदी कारणांसाठी सर्वत्र होत आहे. व्हॉटस् अॅप चा वापर आपण ब्लॉग सारख्या सामाजिक- वैचारिक- सांस्कृतिक गोष्टीसाठीही करून पहावा असे वाटले. आणि प्रत्येकाला स्वतंत्ररित्या ब्लॉगवरील लेख पा‍ठविण्याऐवजी एक गट तयार करून पंधरा दिवस ब्लॉगवरील एकाच विषयावर चर्चा घडवून आणली तर ती कदाचित यशश्वी होऊ शकेल, अशी आशा वाटली. असा हा प्रयत्न सफल होण्याच्या मार्गावर आहे. गटावरील लांबलचक लेख खास वेळ काढून वाचक वाचतात आणि हा प्रयोग एक वर्षभर चालला याचा विशेष आनंद होत आहे. या यशश्वीतेचे श्रेय ग्रुप मधील प्रत्येक सभासदाला द्यावे लागेल. प्रत्येक सभासदाचे हे यश आहे. ब्लॉगच्या लेखांवरील आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया (प्रतिकूल प्रतिक्रिया सुध्दा) वाचून मला खूप आनंद मिळतो. हा आनंद आपण सर्व मिळून यापुढेही घेत रहायचा का? माझ्या ब्लॉगवरील लेखांचे जवळजवळ तीन हजार वाचक आहेत पण व्हॉटस् अॅप ग्रुपच्या शंभर सभासदांच्या प्रतिक्रिया मला प्रातिनिधीक स्वरूपाच्या वाटतात. या ब्लॉग्सवरील लेखांमधून आपल्याला काही नवीन माहिती वा नवीन ज्ञान मिळते का? प्रबोधन होते का? वा तसे होत नसेल तर किमान सांस्कृतिक- सामाजिक उजळणी तरी होते का? अशा प्रश्नांचे मंथन करत आपण या पंधरा दिवसात आपली मते मांडण्याचा प्रयत्न केला तर...
 
-          डॉ. सुधीर रा. देवरे
          इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

अराजक




- डॉ. सुधीर रा. देवरे

     केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या साहित्य अकादमीसह इतर संस्थांचे पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांची- विचारवंतांची संख्या देशभरात वीस पर्यंत पोचली आहे. (महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनीही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत केले.) आणीबाणी नंतर आजची राजकीय स्थिती ही सर्वात जास्त अराजकतेकडे चालली आहे काय? कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्‍त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्‍खं जग सोडून निघून गेले! खरंच हे जग आज इतके वाईट आहे का? पण साहित्यिकांच्या या कृतीने सरकारवर अजून तरी साधा ओरखडाही उमटलेला दिसत नाही. राजकारणी लोकांमध्ये आता साहित्यिक- विचारवंतांचा आदर राहिला नाही. आजच्या राजकारणात सुसंस्कृतपणा दिसून येत नाही.
एम. एस. कलबुर्गी, गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर या तीन विचारवंतांचा खून. या हत्त्यांमागील लोक कोण हे शोधणे फार दूरचे काम असे आपण समजून चाललो तरी ज्या मारेकर्‍यांनी त्यांना रस्त्यात गाठून हत्त्या केली ते भाडोत्री मारेकरी सुध्दा हाती लागू नयेत हे आकलनापलिकडे आहे. एखादा संशयीत मारेकरी पोलिसांच्या हाती लागला तर तो कसा निष्पाप आहे हे न्यायाधिशांच्या आधी मंत्रीमहोदय सांगतात.
      कोणी काय खावे हे दुसरा कोणी कसा ठरवू शकतो? कोणी कोणते कपडे घालावेत त्यावरून मतभेद. कोणाचे घर कोणत्या वस्तीत असावे हे तो तो कळप ठरवणार? मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडाने आक्खा देश हादरला. थरकाप उडवणारी आणि झोप उडवणारीही हिंसक घटना आहे ही. आपण मध्ययुगीन आदिम काळात जगतो आहोत की काय असा भास व्हायला लागला. आपापल्या जातीधर्माच्या कळपात राहून आपण आपले आदिम हिंसक टोळ्यांमध्ये रूपांतर करू पहात आहोत? गुजरातमध्ये मुस्लीम युवकांना गरबा नृत्य परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली. देशभरात विविध संघटनांकडून असे अनेक छोटेमोठे स्थानिक फतवे निघताहेत. हा कोणत्या प्रकारचा जमातवाद आहे.
यापुढे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे हे देशाच्या दृष्टीने हानीकारक ठरणार आहे का? आपण या देशाच्या विकासासाठीच नक्की सरकार निवडून दिलंय का? हा कोणत्या प्रकारचा विकास आहे? विकासाच्या आरोळ्या मारताना देशातल्या शंभरावर असलेल्या विविध नावांच्या संघटना सुप्तावस्तेत होत्या. सत्ता मिळताच त्या आपल्या खरे रूप दाखवायला लागल्या. रस्त्यांवर नंगानाच होऊ लागला. मत विभाजन होण्यासाठी एखादा नाटकी विरोधकही तसा खमक्या हवा म्हणजे आपला अजेंडा ठोसपणे राबवता येतो. आपल्या समूहावर विषारी टीका केली की आपल्यापासून थोडे दूर गेलेले लोक अजून आपल्या जवळ येतात या सिध्दांताने अगदी ठरवून एका राक्षसालाही जन्म देण्यात आला. तो जितके विषारी बोलेल तितका आपल्याला फायदा. इथे एक कळत नाही की एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली तर त्या नेत्याच्या धर्माच्या लोकांचा अपमान कसा होऊ शकतो?
इतके सारे होत असूनही सिंहासनावर आरूढ झालेली व्यक्‍ती काही बोलायला तयार नाही. तेव्हाचे मौनीबाबा परवडले. आता सोयीनुसार बोलले जाते आणि सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. प्रचारसभांमध्ये आणि इतर देशांच्या दौर्‍यांवर जे बोलू नये ते बोलले जाते. रेडीओवर मनातले सगळे सोयीस्कर सांगितले जाते. पण देशांतर्गत हिंसेवर तोंडावर बोट... गडीगुप्प. उत आलेले लोक याचा फायदा उठवत आपला कार्यभाग उरकवताहेत.
      महात्मा गांधींना संपवता येत नाही तर आता महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि होता आले तर दुसरे महात्मा व्हायला काय हरकत आहे. मंदिरे बांधता बांधता पोटातल्या पोट आपलेही एखादे मंदिर का बांधू नये आता? दोन आक्टोबरला रस्त्यांची स्वच्‍छता करता करता मनातल्या जळमटांची स्वच्‍छता मात्र अजिबात करायची नाही! भारत पंधरा महिण्यांपूर्वी अस्तित्वात होता की नव्हता, माहीत नाही. कदाचित तो आताच घडवला गेला असेल ! चमकता येईल तिथे चमकायचे मग ते फेसबुक का असेना पण जग फिरताना आपल्याच देशाची निंदा करणे गरजेचे आहे का?
      काल एका चॅनलवर ऐकले: बिहार मध्ये मुस्लीम मते नितीश आघाडीकडे किती जातील आणि भाजपकडे किती. राजपूत आणि तेल्यांची मते कुठे जातील तेही सांगू... माझी जात ज्या कोणाला मते देईल त्यालाच मी माझे मत देईल का? एक जात एक धर्म सर्व मिळून एखाद्या पक्षाला मतदान करू शकतात का? अशा जातीयवादी सर्वे करणार्‍या चॅनल्सना कोर्टात खेचले पाहिजे. कोणतं न्यूज चॅनल नेमकं कोणाला विकलं गेलंय हे सहज कळतं आता! लोकशाहीचा तिसरा स्तंभ विकला गेला आहे का!
      सावधान! देशाच्या सवोच्च स्थानी असलेल्या नेत्यांची भाषा प्रचार सभांमध्ये पार रसातळाला गेली! आपला देश फक्‍त प्रचार सभांपुरताच आणि निवडून येण्यापुरताच उरला की काय? तसे नसते तर आज प्रचार करताना जातीय धर्मिय समिकरणे जिथक्या उथळपणे वापरली जातात तशी ती वापरली गेली नसती.
      भारतात अशी अराजकता येणार असेल तर देशाच्या नुकसानासाठी दुसर्‍या शत्रू देशाला काहीच करायची गरज नाही. आपण आपल्याच कृत्यांनी देशाची एकता पोखरून काढू. अथवा शत्रू राष्ट्राला हे निमंत्रण आहे! असे म्हणावे लागेल. आपण खरंच अराजकतेकडे जात आहोत का, याचा सजगपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
      (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
 
-          डॉ. सुधीर रा. देवरे
          इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/