शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२

मराठी माणूस महाराष्ट्रापुरता




- डॉ सुधीर रा. देवरे

         दिल्लीला गेल्यावर मी मराठी माणूस आहे हे सांगायला मला कमीपणा वाटेल का? पाटण्याला गेल्यावर मी ताट मानेने सांगू शकेन का, मी मराठी माणूस आहे म्हणून? भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, कानपुर, लखनऊ, चंदीगड, अलीगढ आदी ठिकाणी मराठी माणूस म्हणून माझे कसे स्वागत होईल? देशात- इतर राज्यात जर माझे कुठेच चांगले स्वागत होणार नसेल तर मी माझ्या महाराष्ट्रात चुकीचा वागतो असे म्हणावे लागेल का?
         दोनहजार दहा साली दिल्लीतील प्रगती मैदानातीन जा‍गतिक पुस्तक मेळाव्यात मराठी पुस्तकांच्या स्टॉलसमोर एका व्यक्तीने शिव्या देण्याचा प्रयत्न केला असे पद्मगंधा प्रकाशनाचे अरूण जाखडे यांनी सांगितले होते. प्राध्यापक श्रीनिवास सिरास या मराठी माणसाचा काही दिवसांपूर्वी अलिगढ विद्यापीठ परिसरात गुढ मृत्यू झाला होता. (संदर्भ: लोकसत्ता). काही मराठी तरूण दिल्लीहून रेल्वेने येत असताना अशाच रोषाला सामोरे गेले. असे का होते?
         या पुरोगामी महाराष्ट्राची सर्वांना समावून घ्यायची आणि देशाचे नेतृत्व करायची थोर आणि उज्वल परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर-तुकाराम पासून आताच होऊन गेलेल्या गाडगे महाराजांपर्यंत महाराष्ट्राला थोर संत परंपरा आहे. छत्रपती शिवाजी, शाहू महाराज, टिळक, आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, साने गरूजी, सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, मधु दंडवते, एस. एम. जोशी आदींची दृष्टी विशाल आणि कोणत्याही जातीपलिकडे होती-आहे. स्वातंत्र्यासाठीच्या चळ‍वळीतही महाराष्ट्राचे योगदान अग्रणी होते.
         अशा पार्श्वभूमीवर आपण संकुचित विचार करणे विघातक ठरणारे आहे. महाराष्ट्राबाहेर काही कोटी मराठी लोक आहेत. या सवार्नांच आपण बृहन महाराष्ट्र म्हणतो. देशाबाहेरही मराठी लोक राहतात. त्यांना नीट राहू द्यायचे असेल तर आपण महाराष्ट्रात नीट वागले पाहिजे.

-         डॉ सुधीर रा. देवरे
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

असीम त्रिवेदी आणि ह. मो. मराठे



- डॉ सुधीर रा. देवरे

         साहित्याशी आणि कला जगताशी संबंध असणार्या दोन जणांना एकाच आठवडयात अटक झाली. असीम त्रिवेदी हे व्यंगचित्रकारापेक्षा चळवळे आणि प्रचारक कार्यकर्ते अधिक आहेत. म्हणून त्यांच्या व्यंगचित्रात वस्तुनिष्टपणापेक्षा एक दृष्टीकोन डोकावतो जो सामुहीक पातळीवर मान्य होण्याऐवजी आपल्या गटालाच जास्त भावतो. अशाच उत्साहाच्या भरात हे चित्र रेखाटले गेले असावे जे वादग्रस्त ठरले. या विशिष्ट व्यंगचित्राचे कोणालाही समर्थन करता येणार नाही हे खरे असले तरी हा 124 अ सारख्या देशद्रोही कलमात बसणारा गुन्हा नाही. पहिली गोष्ट म्हणजे अशी याचिका कोणी दाखलच करायला नको होती आणि कोणी केली तरी व्यंगचित्रकाराला योग्य ती समज देऊन सोडायला हवे होते. पण शासन असो की समाज आपण इतके अतिसंवेदनाशिल कसे झालोत की आपल्याला कोणतीही कृती आता देशविघातक वाटायला लागली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य का स्वैराचार अशी चर्चा होऊन या कृतीकडे दुर्लक्ष करायला हवे होते.
         दरम्यान ह. मो. मराठे यांनाही अटक होऊन सुटका झाली. मराठे यांना त्यांच्या कोणत्याही कलाकृतीत म्हणजे पुस्तकात असे असे लिहिल्यामुळे अटक झाली असे नाही. तर त्यांनी एखाद्या धंदेवाईक आणि जातीयवादी राजकारण्यासारखे पत्रक वाटून आपल्यावर ही आपत्ती ओढवून घेतली. म्हणून त्यांच्या अटकेचा अर्थ हा साहित्यिकाच्या अभिव्यक्तीवरील हल्ला असे म्हणता येणार नाही. तरीही मराठेंवर गु्न्हा दाखल व्हायला नको होता. त्यांना अटक व्हायला नको होती. त्यांचे जे विचार होते ते व्यक्तीगत होते. म्हणून तेवढ्यापुरती त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करून हा विषय संपवायला हवा होता.
         त्रिवेदी आणि ह. मो. मराठे या दोघांची अटक निषेधार्ह आहे. यापुढे जरा कुठे काही खट्ट झाले नोंदवा गुन्हा आणि करा अटक असा पायंडा पडू नये. त्रिवेदींना ही अटक हिरो करून गेली. त्यांना भारतभर प्रसिध्दी मिळाली. त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आली. त्याच वेळी मराठेंच्या बाजूने कोणीही उभे राहिले नाही. कारण त्यांनी जे केले होते ते समर्थनिय नव्हते. त्यांना ही अटक मानहानी आणि लहान करून गेली. याचा धडा प्रत्येकानेच घ्यायला हवा.

- डॉ सुधीर रा. देवरे
            (माझा ब्लॉग)

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

साहित्याची जात का साहित्यिकाची जात



- डॉ सुधीर रा. देवरे

         साहित्यिक, विचारवंत, कलावंत यांना जात धर्म नसतो. ते मानवतावादी असतात. पशु, किटका‍दी प्राण्यांवरही साहित्यिक प्रेम करतो. साहित्य आणि साहित्यिक हे वैश्वीक असतात. अनेक साहित्यिकांना देशाच्या सीमा पाळणे सुध्दा कमीपणाचे वाटते. अशा परतत्वस्पर्श क्षेत्रात कालबाह्य जातीयवादी डबके तयार करणे हे कृत्य किती किळसवाणे ठरावे.  जेव्हा एखादा साहित्यिकच जातीयवादी बोलतो, जातीचे समर्थन करतो तेव्हा सर्वसामान्य लोकांनी काय करावे? राजकारणी लोकांनी  जातीपातीचे तट उभे करून देशाचे या आधीच वाटोळे केले आहे. आणि आता आपणही? साहित्यिक हा जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, वर्गभेद, देशभेद, वाईट प्रथा यांच्याविरूध्द दंड थोपटणारा असतो. राजकारण्यांनाही चार खडे बोल सुनावू शकतो.
         खरे तर अशा जातीयवादी तथाकथित लेखकांनी आपण साहित्यिक आहोत का? आपल्या साहित्याची जात काय आहे? म्हणजे आपले साहित्य काय दर्जाचे आहे याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. पण तसे न करता म्हणजे तसे करून आपण आपल्याच नजरेतून उतरण्यापेक्षा, आपण ‍श्रेष्ठ साहित्यिक नसलो तरी श्रेष्ठ जातीचे आहोत असा समज करून घेण्यासाठी कोणत्याही कष्टांची गरज नसते. आपल्या वंशश्रेष्ठत्वाचा आश्रय घेणे केव्हाही सोपे असे अशा प्रकारचे जातीय भांडवल करणार्या ‍साहित्यिकाला वाटत असावे.
         ह. मो. मराठे यांची पुस्तके किती प्रगल्भ वा सकस, दर्जेदार आहेत हे या आधीच सर्व ‍साहित्यिक, रसिक, वाचक यांना ज्ञात आहे. आपल्याला अध्यक्षिय मते मिळावीत यासाठी आज ते त्यांच्या साधारण गुणवत्तेच्याही कितीतरी खाली उतरले म्हणून त्यांच्या पोरकटपणाबद्दल वाईट वाटले. विशेष म्हणजे ते आपल्या पत्रकातील वा पत्रातील मजकुरावर ठाम असून त्याचे ते समर्थन करतात की, मी ब्राम्हण असल्यामुळे मला मतदान करा असे मी कुठेही सरळपणे म्हटलेले नाही. व्यंजना, लक्षणा, वक्रोक्ती माहीत असलेला साहित्यिक सांगतो की मी तसे सरळपणे बोललो का? असे बालीश समर्थन फक्त एखादा पाचवीतला मठ्ठ मुलगा करू शकेल. साहित्यिक असलेला माणूस नव्हे.
         अ. भा. साहित्य संमेलनाचे त्याच्या पेक्षा मोठे विकृत अपत्य म्हणजे विश्वसाहित्य संमेलन आणि ओंगळ अनुकरणीय अपत्य म्हणजे गावपातळ्यांवर होणारी असंख्य साहित्य संमेलने. ही दोन्ही संमलने घेणारे महामंडळ एकच आहे. घटना एकच आहे. पण एका संमेलनासाठी निवडणूक होते तर दुसर्यासाठी अध्यक्ष ठरवला जातो. आणि मतदार कोण हा पुन्हा एक संशोधनाचा विषय. कवयित्री इंदिरा संत निवडणूकीत हरल्या आणि साहित्यिक नसलेली व्यक्ती ज्यावेळी निवडून आली तेव्हाच ही संमेलने रद्द झाली पाहिजेत असे मला वाटले होते. पण आता तर कहर झाला. कोणताही साहित्यिक दृष्टीकोन नसलेले आणि एक दोन पुस्तके प्रकाशित झालेल्याला आपण साहित्यिक झालो असे वाटते तर दुसरीकडे फक्त संखेने शंभर पुस्तके प्रकाशित झालेल्या माणसालाही आपण ‍साहित्यिक झालो असे वाटते. आणि म्हणून ह. मो. मराठ्यांसारखे साहित्यिक उत्पन्न होतात. अस्सल साहित्यिकांचा या सर्व घटनांशी काहीही संबध नसतो.
         प्रत्येक साहित्य संमेलन कशाच्या तरी वादात सापडते. पण या वर्षाच्या साहित्य संमेलनाची चर्चा एका नियोजित अध्यक्षाच्या पत्रामुळे इतक्या खालच्या पातळीवर आली की आता आपण साहित्यिक आहोत हे सांगायला लाज वाटावी. सगळ्याच प्रकारची साहित्य संमेलने होणे यापुढे त्वरीत थांबावे असे मनापासून वाटते.

  - डॉ सुधीर रा. देवरे

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

विश्व मराठी साहित्य संमेलन


                                         - डॉ सुधीर रा. देवरे


         या वर्षाचे विश्व मराठी साहित्य संमेलन कॅनडातील टोरांटो येथे होणार होते. साहित्य महामंडळाने ते रद्द केले आहे. रद्द करण्याचे कारण आयोजकांकडून त्यांना विमानाची तिकिटे वेळेत पोचली नाहीत हे आहे. बेचाळिस तिकिटे महामंडळाला हवी होती. पैकी एकही तिकिट महामंडळाला कमी चालणार नाही. या बेचाळिस लोकांमध्ये नेमके कोणते साहित्यिक आहेत? पैकी अठरा महामंडळाचे पदाधिकारी, जे आतापर्यंतच्या तिन्ही विश्वसाहित्य संमेलनाला जाऊन आले आहेत. आणि बाकिचे जे कोणी लोक आहेत ते ही महाराष्ट्रातील थोर साहित्यिक आहेत असे महामंडळाला वाटते. आणि हे सर्व लोक या आधीच्या संमेलनांनाही जाऊन आलेले होते. महाराष्ट्रातील चाळीस- बेचाळीस लोक का होईना पण आलटून पालटून संमेलनाला जातील असे नाही. प्रत्येक वर्षी हेच लोक संमेलन गाजवतील. महाराष्ट्रातील बेचाळिस लोक, जे साहित्यिक नाहीत अशांसाठी महाराष्ट्र सरकार तीन वर्षांपासून 25 लाख ते 50 लाख रूपये अनुदान देत आहे.
         महामंडळातील पदाधिकारी, बाकिचे हौशी कुठेही आपली वर्णी लाऊन घेणारे साहित्यिक तेही फक्त बेचाळिस आणि परदेशातील भक्कम आर्थिक परिस्थिती असणारे मराठी लोक यांच्यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन या नावाने हा प्रचंड पैसा खर्च होत आहे. यातून ना मराठी भाषेचे भले होत ना मराठी साहित्याचे. चांगले पुस्तके वाचकांपर्यंत पोचत नाहीत आणि कोणती पुस्तके वाचकांनी वाचावीत हे लेखक आपल्या पुस्तकांशिवाय वाचकाला सांगत नाहीत.
         विश्वसाहित्य संमेलन असो की अ भा म साहित्य संमेलन. जिल्हा साहित्य संमेलन असो की गाव पातळीवरचे साहित्य संमेलन. साहित्यिकांपेक्षा इतर हौशी लोकांनाच त्याचा फायदा होत असतो अ‍ाणि गाव पातळीवरचा कार्यकर्ताही विश्वसाहित्य संमेलनासारखाच गाजण्याचा प्रयत्न करत असतो. अशा सर्व साहित्य मंडळांमध्ये साहित्यिक नावाला आणि हौशी उलाढाल करणारे लोकच मंडळ हायजॅक करताना दिसतात. संमेलनात पैसे देणार्याला आणि धावपळ करणार्या लोकांनाच साहित्यिक ठरवण्याचा प्रयत्न होतो. संमेलनातच नव्हे तर कोणत्याही व्यासपीठांवर टाळ्या खाऊ भाषण करणार्यांना वाचक साहित्यिक म्हणत असतात आणि हा गैरसमज असे हौशी साहित्यिक वाचकांमध्ये जोपासत राहतात. सारांश, जत्रा, उत्सव साजरा करण्यापलिकडे आपण जाऊ शकत नाही आणि अशा उद्योगातून जी तात्पुरती कृतक प्रसिध्दी मिळते तीच साहित्यिक म्हणून प्रसिध्दी आहे असा समज करून आपण वैश्विक साहित्यिक होऊ पाहतो.

- डॉ सुधीर रा. देवरे
            (माझा ब्लॉग)