मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

नवे नवे शोध




- डॉ. सुधीर रा. देवरे

      मी आठवी नववीत असेल तेव्हा. एका लहानश्या विरगाव नावाच्या खेड्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत ‍शिकत होतो. शाळेत आम्ही काही मित्र त्यावेळी स्वत:ला हुशार समजत होतो. पहिला नंबर मिळवण्यासाठी आमच्यात स्पर्धाही असे. विज्ञानाच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही शाखा तसेच भूगोल, खगोल, गणित अभ्यासताना आतापर्यंत लागलेल्या विविध शोधांवर आमचं एकमेकांमध्ये बोलणं व्हायचं. अशा प्रकारची एकदा शोधांची चर्चा सुरू असताना एक मित्र सहज बोलून गेला,  आपल्या जन्माआधीच शास्त्रज्ञांनी सर्व शोध लावून ठेवलेत. एखादा शोध लावायला आपल्याला मागं काहीच शिल्लक ठेवलं नाही. असं त्या मित्राने म्हणताच आम्ही काही मित्रांनी त्याची री ओढत आमच्या हुशारीच्या समजुतीमुळे त्याच्या या सिध्दांताला दुजोरा दिला. पण दुसरा मित्र शंका घेत म्हणाला, सर्व शोध म्हणजे नक्की कोणकोणते शोध? असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे उदाहरणार्थ आठवतील तसे काही शोध आम्हा सर्व मित्रांकडून आळीपाळीने सांगितले गेले: सूर्य मालिकेत नऊ ग्रह आहेत, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृ्थ्वी स्वत:भोवती फिरते, गुरूत्वाकर्षण, वनस्पती सजीव असतात, पेन, कागद, सायकल, मोटार, रेल्वे, घड्याळ, रेडिओ, ‍औषधे, टाइपरायटर असे सर्व शोध आपल्या पुर्वजांनी लावून ठेवलेत. विमान आकाशातून जाताना लहान का होईना पण पाहता येत होतं. टीव्ही, टेलिफोन यांच्याबद्दल अभ्यासक्रमात उल्लेख येत असले तरी प्रत्यक्षात ते कसे असतात हे आमच्यासहीत कोणालाही गावात माहीत नव्हतं. आपल्याला माहीत असलेल्या शोधांव्यतिरिक्‍त अजून काही नवे शोध लावता येऊ शकतात हे त्यावेळी आमच्या बालबुध्दीला माहीत नव्हतं. जे शोध लावले गेले होते त्यापैकी कदाचित आपणच एखादा शोध लावला असता असा बालीश भ्रम आमच्या मनात होता. नवीन शोध लावायला पूर्वीच्या शास्त्रज्ञांनी आपल्यासाठी काही शिल्लक ठेवलं नाही, अशी आम्ही स्वत:ची समजूत करून घेत होतो. म्हणजे आता मानवजात परिपूर्ण झाली असा आमचा त्यावेळी बाल समज झाला होता.
      आमच्या या गोंडस गैरसमजुतीला पुष्टी देण्यासाठी आमच्या आजूबाजूच्या मोठ्याधाट्या वृध्द माणसांकडून सुध्दा असंच काहीतरी सुचक ऐकायला मिळत होतं. (आज भाषा बदलली आहे, बाकी सारांश तोच. सर्व जग ग्लोबल झालंय. सर्वत्र नवता आलेली आहे. तो आमच्या बालपणातला जुना रम्य काळ आता राहिला नाही. अशी ओरड आज ऐकू येते. अशा अर्थाचं आज जे बोललं जातं, तसं त्या काळीही वडीलधारी मंडळी वेगळ्या शब्दात आम्हाला त्या काळाविषयीची तक्रार ऐकवीत असत.)
      माझ्या लहानपणी म्हणजे साधारणत: पस्तीस- चाळीस वर्षांपूवी सुध्दा आजी आजोबांसारख्या वृध्दांकडून त्याकाळी असंच ऐकत होतो, की आता जग बदललं आहे. माणूस चंद्रावर पाऊल ठेऊन आला. काही खेड्यांमध्ये वीजेचे दिवे येऊ लागले होते. काही घरांमध्ये रेडिओ आले होते. मनगटावर घड्याळे चमकू लागली होती. पायी जाण्याऐवजी सायकली येऊ लागल्या होत्या. गावापासून दहा बारा किलोमीटरवरच्या तालुक्याच्या गावी चुली- स्टो ऐवजी गॅसवर स्वयंपाक होऊ लागला, असं कानावर येऊ लागलं होतं.
      आज मोटार, रेल्वे, घड्याळ, रेडिओ, ‍औषधे अशी सगळी नावं तीच असली तरी त्यात किती प्रकारचे सूक्ष्म शोध लागून ते टोकदार झालेत. शोध शॉर्प झाले. मोटारी विविध प्रकारच्या आल्यात. रेल्वे आपल्या गतीसह कितीतरी आधुनिक झाली. मेट्रो- बुलेट ट्रेन आल्यात. विमान- हॅलिकॉप्टर लांबून पहायला मिळायचे. आता आपल्यापैकी अनेक लोक त्यात प्रवास करू लागलेत. फ्रिज, टीव्ही, टेलिफोन जीवनाचे अविभाज्य भाग झालेत. आधीचे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही रंगीत झाले. मोठे झाले. वजनाने जड होते हलके झाले. एलसीडी, एलइडी अशी अनेक परिवर्तनं झालीत. टेलिफोन मॅन्युअल होता तो आता काँप्युटराइज्ड झाला. मोबाईल नावाची गोष्ट तर त्यावेळी ऐकूनही माहीत नव्हती. ती आता प्रत्येकाच्या हातात आणि खिशात आहे. आज मोबाईल हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य अवयव झाला आहे. ब्लॅक मोबाईल होता तो रंगीत झाला. स्क्रिनटच झाला. अँड्रॉइड झाला. टीव्हीबद्दल शालेय जीवनात म्हणजे बालपणातच ऐकत होतो. टीव्हीचा शोध कोणी लावला याचे उत्तर एका सेंकदात आम्ही देत होतो, तरी प्रत्यक्ष टीव्ही कसा असतो हे पहायला पंच्चाऐशी साल उजाडले. त्यावेळी आम्ही युवक झालो होतो. संगणकही आम्ही शालेय जीवनात ऐकला नव्हता. महाविद्यालयीन काळात संगणक हा शब्द कानावरून जाऊ लागला पण तो पहायला मिळत नव्हता. 1985 सालानंतर भारतात संगणक कुठं कुठं येऊ लागला. 1990 नंतर मोठ्या प्रमाणात आला. आणि तालुका पातळीवर पोचायला 1995 साल उजाडले. तरी हे संगणक कॅफेमध्येच वापरता येत. संगणक घराघरात यायला एकविसावे शतक उजाडावे लागले. आता संगणकांच्या सर्व पिढ्या पहायला मिळाल्या. अगदी प्राथमिक अवस्थेपासून तर आताच्या फाष्ट युगापर्यंत. यात लॅपटॉप, टॅब आदी अनेक प्रकार आहेतच.
      इंटरनेट हे सुध्दा आम्हाला शालेय जीवनात कधी माहीत नव्हतं. त्याने आज क्रांती घडवली. पुढची पायरी वायफाय आणि आता लायफाय सुध्दा. सोशल नेटवर्कचा जन्म अलिकडचा. फेसबुकचा जन्मच मुळी 4 फेब्रुवारी 2004 सालचा. व्टिटर आलं. व्हॉटस अॅप तर अजून बाळच आहे. हे थांबणार नाही. प्रगती सुरू राहील. शोध सुरू राहतील. कोणताच शोध विशिष्ट पातळीवर थांबत नाही. त्यात प्रगती होत राहते. गती वाढत राहते.
      म्हणजे काल जे नवं वाटत होतं ते आज जुनं झालं आहे. अ‍ाणि आज जे काही नवं आहे ते उद्या जुनं होणार आहे. रोज नवे शोध लागताहेत. नवं शोधायला काही उरलं नाही अशी तक्रार करायला आज जागा राहिली नाही. अशी प्रचंड प्रमाणात जगाची भौतिक प्रगती होत राहणार, होत आहे. पण समाजातला शेवटचा माणूस कुठे आहे, यावरून आपल्या समाजाची खरी प्रगती ठरत असते. असा शेवटचा माणूस समजा उद्या ग्लोबल झालाही, तरी (आजच्या जातीय- धर्मिय संकुचित घडामोडी आणि अंधश्रध्दा पाहता) तो विचारांनी पुरोगामी होईल का? शास्त्रीय दृष्टीकोनाचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करेल का? वा पुढे कधीतरी तसा तो होण्याच्या दिशेने प्रवास करेल का? हा खरा प्रश्न आहे.
            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  - डॉ. सुधीर रा. देवरे          
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

भाषेचे मूळ : चिंता आणि चिंतन





- डॉ. सुधीर रा. देवरे


      जानेवारी-फेब्रुवारी (२००३) महिन्यात भाषेविषयीच्या राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रासाठी अहिराणी भाषेचा प्रतिनिधीया नात्याने निमंत्रित म्हणून म्हैसूर येथील केंद्रीय भाषा संशोधन संस्थेत गेलो होतो. दिवसभर परिसंवादातील चर्चा आणि रात्री विविध नाटके पाहायला मिळत होती. नाटकांना जाताना भाषेची निवड हा भाग दुय्यम महत्त्वाचा होता. म्हणून जास्त करून कानडी, एक हिंदी तर एक जेनु करुबा या आदिवासी जमातींवरील आणि आदिवासींकडूनच बसवल्या गेलेल्या नाटकाचा आस्वादही केवळ सादरीकरणाच्या गुणवत्तेमुळे कायमचा लक्षात राहील, असा मनःपटलावर कोरला गेला.
      भीष्म साहनींचे मूळ हिंदी नाटक माधवीपाहण्याचा योग आला नाही, पण म्हैसूरला या नाटकाचा कानडीतील अनुवादाचा प्रयोग पाहायला मिळाला. यक्षगानया कानडी लोकपरंपरेतला प्रयोग पाहिला. जेनु करुबाया नावाच्या आदिवासींच्या लोककथेवर आधारित आणि त्यांच्याच भाषेत मुख्य म्हणजे या आदिवासींमधील तीस कलाकार घेऊन डॉ. केकरी नारायण यांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग पाहून तर मती गुंग झाली. ही भाषा आपल्याला अवगत राहिली असती तर काय बहार आली असती, असे वाटल्यावाचून राहिले नाही. अर्थात सादरीकरणावर तहान भागवून गप्प न बसता दुसर्‍या दिवशी लेखक डॉ. केकरी नारायण यांच्याकडून संहिता समजावून घेतली.
      भाषा ह़ी संस्कृतीचे वाहन असते, याचा प्रत्यय म्हैसूर मुक्कामात वेळोवेळी येत होता. भाषा आणि लोकसंस्कृती या समातंरपणे व्यामिश्रतेने सादर हत असतात. विचारविनिमय आणि चिंतनात हे ही सुचले की आपल्याला सादरीकरण कळत,  हावभाव कळतात, काह़ी शब्द ुध्दा कळतात; पण पूर्ण भाषा कळत नाह़ी. काश्म़ीपासून कन्याकुमारी पर्यंत पाय़ी प्रवास करत हळहळ प्रा ओलांडले तर आपल्याला भाषेची अडचण कुठेच निर्माण होणार नाही. कारण अमूक एक भाषा अमूक एका सीमेपर्यंत; नंतर दुसरी, असे भाषेबाबत होत नाही. भाषा हळहळ आपल्याला जाणवणार नाह़ी अशा पद्धतीने बदलत जातात. खर तर आपण वगाने प्रदेश पादाक्रात करतो म्हणून भाषा आपल्याला खटकतात. भाषा मात्र केवळ एकेक उच्चार-एकेक शब्द याप्रमाणे बदलत जातात. म्हणून तर प्राचीन काळी पाय़ी यात्रा करणार्‍यांना भाषेचा प्रश्न कध़ी डसावला नसावा.
      आज मात्र परभाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन विशाल राहिलेला नाह़ी. ो तो आपल़ी भाषा बळजबरीने दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्न करतोय. एवढच नव्हतर आपण जी भाषा बालतो त़ी भाषा शुध्द-प्रतिष्ठित तर दसरा बोल त़ी भाषा अशुध्द-गावढंळ, अश़ी भाषिक वगर्वाऱी़ विशिष्ट गट करू पाहत, हे  चित्र भयावह आहे. बोलींच्या बाबतीत तर हा प्रश्न अधिक जटील होत जातो. त्या त्या परिसरात बोलल्या जाणार्‍या बोली या कशा अशिष्ट असतात हे बिंबवण्याचा प्रयत्न काही लोक पडद्याआडून करत असतात.
       विशिष्ट बोली ज्यांची मातृभाषा आहे असे आपल्याकडील काही विद्वान वक्‍तेही अशा विशिष्ट गटाला आपल्या भाषिक कृतीतून सहकार्य करीत असतात. आपले वक्तृत्व फुलविण्यासाठी ते ओढूनताणून जड व अनाकलनीय संस्कृत शब्दांची व्याख्यानातून अधूनमधून पेरणी करतात. भाषण म्हटले की, ते असेच असणार अशी श्रोत्यांचीही समजूत झालेली दिसते. म्हणून अगदी सर्वसामान्य मनुष्य सुद्धा संस्कृत जड अशा सौष्ठवपूर्ण भाषणांची तारीफ करताना दिसतो; आणि प्रवाही बोलीभाषेत बोलणार्‍यांचे भाषण ग्रामीण पार्श्वभूमी असणार्‍या लोकांनाही अर्वाच्यवाटायला लागते. खर तर ज्यांचं भाषण अस्सल बोलीभाषेतील असतं, ते ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात त्यांची बोलीभाषा त्यांच्या तोंडातून तिच्या लकबींसह, हेलांसह येत असते. म्हणून हे खरं वक्तृत्व ठरायला हवं. परंतु आपण तथाकथित वक्त्याच्या अनुकरणाने मुद्दाम कमावलेल्या कृत्रिम भाषेलाच नावाजत असतो. संस्कृत शब्द वक्त्याने अपरिहार्यस्थानी वापरायला हरकत नाही;  पण अशा शब्दांची फोड करून सांगणेही त्यांचे कर्तव्य असते. तसे ते करत नाहीत. कारण सोपी गोष्ट अवघड करून सांगणे, संस्कृत, जड, क्लिष्ट शब्द वापरले म्हणजे भाषणातील शब्दसौंदर्य वाढते अशी चुकीची कल्पना डोक्यात बाळगल्यामुळे वक्ते अस करत असावेत. व्याख्यात्यांमध्ये हे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यांचे संस्कृत वेड वाढत चालल्याच लक्षात आल्यामुळे हा मुद्दा मांडला आहे.
      परिभाषा शब्दकोशातही जाणूनबुजून संस्कृत भाषेला शरण जाऊन बोजड शब्द तयार केलेले असतात. असे शब्द सामान्य माणसा उच्चारता येत नाहीत. उदाहरणार्थ, काह़ी व्यवसाय, कार्यालीन व उत्सवाच्या नावाचं देता येईल.
      फलोद्यान, फळवाटिका, कुक्कुटपालन, मृद संधारण, केश कर्तनालय, मत्स्यपालन, गणेशोत्सव, शारदोत्सव वगैरेंसाठी अशी बोजड नावे देण्याऐवजी अनुक्रमे फळबाग, फळबगीचा, कोंबडी पालन, जमीन संधारण, केस कापण्याचे दुकान, मासे पालन, गणपती उत्सव, शारदा उत्सव अशी सहजसोपी नावे दिल्याने कोणाचे काय बिघडणार आहे? पण सर्वसामान्यांवर दबाव आणून ते कसे दचकतील, असे भाषेविषयी धोरण अभ्यासकांनी अवलंबिल्यामुळे हे सर्व प्रश्न उपस्थित होतात.
      काही दक्षिणात्य भाषा किंबहुना तमिळ भाषा सोडून आपल्याकडील सर्व भारतीय प्रमाणभाषा व बोली या संस्कृतोद्भव भाषा आहेत; हे भाषाशास्त्रातील जुनाट प्रमेयही आज नव्याने तपासून पहायची गरज निर्माण झाली आहे. मराठी भाषेचे मूळया विश्वनाथ खैरे लिखित पुस्तकात मराठीचे मूळ फक्त संस्कृतमध्ये न शोधता तमिळ, तेलुगु, कन्नड आदी भाषातही शोधायला हवे’, असे त्यांचे प्रतिपादन आहे. ‘‘शेती व्यवसायात जे अनेक खास शब्द बोलीभाषेत प्रचलित आहेत, त्यांचा मागोवा घेऊनपाहिल्यास तमिळ प्रमाण भाषेतल्या शब्दांशी त्यांची संगती लागते.’’  हे विश्वनाथ खैरे यांचे प्रतिपादन प्रस्तुत अभ्यासकाला महत्त्वाचे वाटते. कोणत्याही भाषेचे मातृत्व संस्कृतपासून सुरू होते, असे विधान करण्यासारखी परिस्थिती नाही. असे काही उपोद्बलक पुरावे प्राप्त होत असले तरी स्पष्ट व ठोस पुरावे नाहीत.
      उलसाया अहिराणी शब्दाचा अर्थ लहान’, ‘छोटाअसा आहे, तर तमिळ भाषेत याच शब्दाचा अर्थ थोडाअसा आहे. म्हणजे उच्चाराप्रमाणेच अर्थदृष्ट्यासुद्धा हा शब्द दोन्ही भाषेत खूप जवळचा आहे. चिधी, चिट्य, बिट्य, तमान, अडकित्ता, हाट, हाड्या, हाड, आंड, आंगण, अक्खा, अच्छेर, आघाडा, येरानयेर आदी शब्द अहिराणी भाषेत विपुल प्रमाणात आढळतात. म्हणून अहिराणी ही केवळ मराठीची बोलीभाषा नसून स्वतंत्र अथवा अनेक भाषांचे योगदान घेऊन निर्माण झाली आहे - घडली आहे, असे म्हणावे लागेल.
अमुक भाषा ही अमुक भाषेची बोली आहे, पोटभाषा आहे. किंबहुना अमुक भाषेपासून अमुक भाषेचा जन्म झाला आहे, असे तुटपुंज्या आधारांवर सिद्ध करत बसण्यापेक्षा कोणत्याही भाषेचे मूळ शोधू नये, हेच उत्तम!
      (पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व महाराष्ट्र शासनाच्या नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार प्राप्त ‍अहिराणीच्या निमित्ताने: भाषा या माझ्या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/