शुक्रवार, २५ जानेवारी, २०१३

इथे भारतीय कोणी नाही




   
-         डॉ. सुधीर रा. देवरे

      कोणाला कशाचा पुळका येईल सांगता येत नाही. कोणी सीतेचे अपहरण करणार्‍या रावणाच्या प्रेमात पडतं तर कोणी आईचा शिरच्छेद करणार्‍या परशुरामाचे पोवाडे गातो. कोणी संमेलनाचे साहित्यिक व्यासपीठ बळकाऊ पाहतात तर कोणी आपल्या खिशातल्या कायद्याने चिपळूण बंदी घालतं. दरवर्षी काही साहित्यिकही राजकीय संमेलनात आपली प्रसिध्दी अजमावू पाहतात. स्त्री म्हणजे चूल आणि मूल हे वेगळ्या शब्दात सांगताना कोणी सामाजिक करार या भारदस्त वैचारिक संज्ञेचा आधार घेऊ पाहतं आणि बलात्कार पिडितांना इंडियात ढकलून आपण भारतात राहू पाहतात. कोणा प्रांतीय नेत्याच्या म्हणण्यानुसार सर्वच बलात्कारी ‍बिहारी असतील तर मग महाराष्ट्रातील मराठी कानाकोपर्‍यात एवढे बलात्कार कसे होतात. कुठे तुम्ही आणि आम्हीचा जमातवाद, कुठे नक्षलवाद्यांची क्रूरता तर कोणी तथाकथित संत मयत पिडितालाच उपदेश करतो की बलात्कार्‍याला भाऊ मानून त्याचे पाय धरायला हवे होते.  
      आज सगळेच नशेत बोलल्यासारखे बोलतात. इथे- या प्रजासत्ताक राष्ट्रात काहींना अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहेत. ते काहीही बोलले तरी त्यांच्यावर कोणी खटला भरत नाही. आणि सामान्य माणसाने अशांविरूध्द नुसता ब्र काढला तरी त्याला तुरूंगात जावं लागतं. काय झालं माझ्या भारताला... माझ्या आकलनापलिकडे आहे हे सगळं. म्हणून काही उद्‍गारांशिवायची अजून एक कविता:

फक्त अफगानीस्थानातच नाही
फक्त पाकिस्तानातच नाही
आता इथेही तालिबान्यांचा
सुळसुळाट झाला आहे...
ह्या धर्माचा दहशतवाद
त्या धर्माचा दहशतवाद
ह्या जातीचा दहशतवाद
त्या जातीचा दहशतवाद
ह्या झेंड्याचा दहशतवाद
त्या झेंड्याचा दहशतवाद...
आणि देशभर धुमाकुळ  घालणार्‍या
तथाकथित संतांची वाणी
लढाईची बढाई
फार पुढची बाब आहे राव...
नुसता ब्र काढाल
तरी तुमच्या अस्तित्वालाच
सुरूंग लागेल...

- अभिव्यक्ती,
इथे भारतीय कोणी नाही
जो तो ज्या त्या झेंड्यासाठी आहे
सावधान...

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, १९ जानेवारी, २०१३

सत्ताहीन पाकिस्तान



-         डॉ. सुधीर रा. देवरे

      पाकिस्तान हा सत्ताहीन देश आहे. त्या देशाचे पंतप्रधान राजा परवेज अशरफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन तेथील सुप्रीम कोर्टाने त्यांना अटक करायचे फर्मान काढल्यामुळे ते भूमिगत झालेत म्हणून वा त्या देशातील राष्ट्रपती असिफ अली झरतारींना दुबईला पळून जावे लागले म्हणून आज तो देश सत्ताहीन झाला, असे मला म्हणायचे नाही. पाकिस्तान हा देश त्याच्या निर्मितीपासून म्हणजेच 1947 पासून सत्ताहीन देश आहे. पाकिस्तानात सुरूवातीपासूनच पाच सत्ताकेंद्रे आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, आयएसआय, लष्कर आणि दहशतवादी हे ते पाच सत्ताकेंद्रे आहेत. यापैकी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचा एक ग्रुप तर आयएसआय, लष्कर आणि दहशतवादी हा दुसरा ग्रुप.
      पाकिस्तानच्या लोकशाही मुखवट्यासाठी तेथे सार्वजनिक निवडणुका होऊन पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच्या नावाने नकली सरकार अस्तित्वात येते. हे सरकार दुसर्‍या ग्रुप कडून कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचवले जाते. या सरकारला तसा काहीही अर्थ नसतो. म्हणूनच पाकिस्तान लोकनियुक्त सरकार अमेरिकेकडून करोडो रूपयांची मदत घेऊनही ओसामा बिन लादेनला तेथील लष्कर लपवून ठेवते आणि सरकारला हे माहीत असूनही ते खपवून घेते.
      हा तिढा अमेरिकेला माहीत असूनही अमेरिका डोळेझाक यासाठी करते की लोकनियुक्त सरकारच्या नावाने अमेरिकेला आशिया खंडात हा हक्काचा तळ उलब्ध होतो. दहशतवाद्यांवर उघड आणि राजरोस द्रोन हल्ले करता येतात. ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तान सरकारला अंधारात ठेऊन सहज ठार मारता येते. म्हणून अमेरिका पाकिस्तानशी राजनैतिक संबंध ठेवते. अमेरिकेसारखे आपल्याला म्हणजे भारताला तसे करता येणार नाही. पाकिस्तानातील पाकव्याप्त काश्मिरातील दहशवादी आपल्याला विमानाने टिपता येणार नाहीत. दाऊदला नाहीतर अन्य दहशतवाद्याला तिथून उचलून आणता येणार नाही. मग अमेरिकेचे अनुकरण करत भारत पाकिस्तानाशी राजनैतिक संबंध ठेऊन काय साध्य करतो.
      उलट या राजनैतिक संबधांमुळेच आपण आहोत त्यापेक्षा अधिक संकटे ओढवून घेत असतो. अटल बिहारी वाजपेयी बस घेऊन लाहोरला जाताच तिथल्या लष्कराने कारगिल बळकावले. आताही आपण पाकिस्तानशी मैत्रीचा राग आळवताच तिथल्या लष्कराने कपटाने आपले जवान मारून त्यांची विटंबना केली. ज्या ज्या वेळी पाकिस्तानच्या नकली सरकारशी आपण जवळीक केली त्या त्या वेळी तिथल्या लष्कराने आपल्याशी घातपात केले आहेत. त्यापेक्षा या नकली सरकारशी दूर राहिलेले चांगले. युध्द नको आणि मैत्रीही नको. पाकिस्तानला सुरक्षित अंतर राखून दूर ठेवावे आणि ज्या ज्या वेळी त्याने आगळाई केली त्या त्या वेळी त्या आघाडीवर चोख प्रत्युत्तर देणे हितावह ठरेल.
      केवळ भारत द्वेशातून या देशाची निर्मिती झाल्यामुळे ‍तेथील ‍दुसरा ग्रुप आपल्याला जवळ येऊ देणार नाही. काही काळ हा देश मुस्लीम देशांचे नेतृत्व करण्याच्या गप्पा करत होता. मुस्लीम बाँब ची हाकाटी देत होता. पण त्यांचे धोरणे आणि वागणे मुस्लीम धर्माच्या विरूध्द आहेत. म्हणून आंतरराष्ट्रीय मुस्लीम देशांनीही पाकिस्तानाला वाळीत टाकायला हवे.
      आता राहिला प्रश्न पाकिस्तानी जनतेचा. आतापर्यंत पाकिस्तानी जनतेने सार्वजनिक रित्या भारताच्या बाजूने विचार मांडलेले नाहीत. इम्राणखान सारखे आजचे नेतेही भारतात येऊन भारताचा पाहुणचार घेऊन जातात पण भारत हा आपला मित्र देश आहे हे पाकिस्तानात जाऊन सांगण्याची त्याची हिम्मत होत नाही. पाकिस्तानचे कलाकार, गायक, खेळाडू आणि विचारवंत भारताच्या बाजूने उभे राहत नाहीत हे दुर्दैव. आणि म्हणूनच  त्यांना‍ विरोध करावा लागतो. भारतासारखी वैचारिकता, पत्रकारिता, तटस्थता तिथल्या जनतेत नाही हे सत्य आहे.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, १२ जानेवारी, २०१३

पाकिस्तान: एक कपटी शेजारी



 
-         डॉ. सुधीर रा. देवरे

    एकोणावीसशे सत्तेचाळीस पासून पाकिस्ताने भारताशी तीन युध्दे केले. तीनही युध्दे भारताने जिंकून पाकिस्तानची इंचभरही जमीन बळकावली नाही. कारगिल झाले. कारगिल संपतानाही पाकिस्ताने भारताच्या सैनिकांच्या मृतांची विटंबना केली. भारताने सोडून दिले. 1998 साली पाकिस्तानने भारताच्या सैनिकांचे शीरे कापली होती. भारताने पाकिस्तानला कडक इशारा दिला. 2000 साली तसेच झाले. भारताने कडक इशारा दिला. आता 2013 च्या सुरूवातीला पाकिस्ताने आमच्या दोन जवानांची हत्या करून शीर कापून नेले. भारताने फक्त कडक इशाराच दिला.
      यापूर्वी पाकिस्तानने अनेकदा काश्मीरमध्ये उघड उघड हस्तक्षेप केला. पंजाब तोडण्याचा प्रयत्न केला. भारतातील अनेक शहरांत बाँब स्फोट घडवून आणले. विमान अपहरण केले. संसदेवर हल्ला केला. जम्मू काश्मीर विधानभवनावर हल्ला केला. मुंबईवर हल्ला केला. भारत कडक इशारा देतोच आहे कायम. भारत पाकिस्तानशी विविध करार करतो आहे. तिथल्या नेत्यांना भारतात बोलवले जाते. ते दिल्लीत एक बोलतात आणि इस्लामाबादला पोचताच भलतेच बोलतात. आपण विसरून जातो. आपले पत्रकारही पाकिस्तानच्या नेत्यांच्या प्रेमात पडतात.
      मुंबईचे पुरावे दिले ते पाकिस्तानला पुरावे वाटत नाहीत. दाऊदचे पुरावे दिले तरी दाऊद तिथे नाही. पाकिस्तानच्या मते कोणताच दहशतवादी पाकिस्तानात नाही. सैनिकांचे शीर कापणे आणि भारतीय हद्दीत शिरणे हे आपले आत्ताचे आरोपही पाकिस्तानने नेहमीप्रमाणे तात्काळ फेटाळले आहेत. पाकिस्तान लोकनियुक्त सरकार केव्हा अप्रत्यक्षपणे आयएसआय कडे बोट दाखवते तर केव्हा सैन्याकडे. आणि पाकिस्तानातील दहशतवादी हे नॉन स्टेट ॅअँक्टर्स आहेत असे उघडपणे पाकिस्तान सांगतं. सरकारचे त्या देशात काही धकत नसेल तर अशा सरकारशी वाटाघाटी करण्याचा काय उपयोग?
      आपण पाकिस्तानला माफ करत मैत्री करत राहू या. त्यांच्याशी क्रिकेट खेळत राहू या. पाकिस्तानी कलाकारांना पाहुणे म्हणून बोलवत त्यांना सन्मान देत राहू या. पाकिस्तानच्या गायकांना जगापुढे आणू या. त्यांच्याशी आर्थिक करार करत राहू या. त्यांनी निर्यात केलेल्या बोगस चलनामुळे आर्थिक हानी सोसत राहू या. मात्र पाकिस्तान हा पाकिस्तानच आहे. तो मित्रच काय आपला दिलदार शत्रूही होऊ शकत नाही. तो फक्त एक कपटी शेजारी असल्यामुळे भारताचे मैत्रीस्तान होऊ शकत नाही, हे कधी कळेल आम्हाला.
      कितीही कडक इशारा द्या. पाकिस्तानला फरक पडत नाही. कारण पाकिस्तानला माहिती आहे, कडक इशारा देण्याशिवाय- भारतात निषेधमोर्चे निघण्याशिवाय- भारतातील टीव्ही चॅनल्सवर चर्चा होण्याशिवाय, भारत आपले काहीच वाईट करू शकत नाही.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, ५ जानेवारी, २०१३

बलात्कारी पुरूषाची आई स्त्रीच असते...


                                          -         डॉ. सुधीर रा. देवरे

      प्रत्येक पुरूषाची आई ही एक स्त्री असते. प्रत्येक पुरूषाचा जन्म एका स्त्री पासून होत असतो. कोणत्याही लिंगपिसाट बलात्कारी पुरूषाची आईही एक स्त्रीच असते. म्हणून प्रत्येक आईने आपल्या पंधरा वर्षाच्या वयापुढील मुलाला- मुलांना घराघरात सुचकतेने सांगितले पाहिजे:
      : बाळा, मी जशी तुझी आई आहे. आपल्या घरात जशी तुझी बहिण आहे. तशाच तुला बाहेर भेटतात त्या इतर स्त्रियाही मनाने- भावनेने- शरीराने माझ्यासारख्याच आहेत. त्यापैकी तुला काही आवडतील. तुला काहींचे आकर्षण वाटेल. आणि तसे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे- नैसर्गिक आहे. वाईट नाही. काहींशी तू मैत्री करशील. पुढे कुठली तरी स्त्री तुझी पत्नी होईल. स्त्रियांशी मैत्री जरूर कर. त्यांच्याशी चर्चा कर. वाद घाल. लैंगिकतेवरही बोल. पण तुझे विचार तिच्यावर लादू नकोस. कोणावरही कसलीही बळजबरी करू नकोस. (बलात्कार हा शब्द टाळावा. तुम्हाला काय म्हणायचंय हे त्याला कळेल.) एखाद्या स्त्रीने तुझ्या मैत्रीला नकार दिला तर तू दुखावला जावून मनात सूडाची भावना ठेऊ नकोस. कारण तुझा दृष्टीकोण कितीही निकोप असला तरी तिच्या मनातील वादळ वेगळे असू शकते. तू  असे कधी करणार नाहीस याची मला खात्री आहे. तुझ्या इतर मित्रांनाही अशा धाडसांपासून सावध रहायला सांग. जिथे तुला असा वास येईल तिथे तू मदतीला धाऊन जा. रस्त्यावर अशी असहाय्य स्त्री मदत मागत असेल वा एखाद्या अपघातात कोणाला इस्पितळात पोचवायचे असेल तर हातातले काम सोडून त्यांना मदत कर.     
      -असे किती महिलांनी आजपर्यंत आपल्या मुलांना विश्वासात घेऊन सांगितले आहे. नसेल सांगितले तर आता आपल्या घरापासून सुरूवात करायला हवी. (इतक्या नेमक्या शब्दात पुरूष पालक, कोणत्याही वर्गातले शिक्षक- शिक्षिकाही आपल्या पाल्यांना- विद्यार्थ्यांना असे सुचकपणे सांगू शकतात.) कारण हा ही एक वैश्वीक संस्कार आहे. तो केला पाहिजे.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/