शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

नदी आणि गाव



 
-    डॉ. सुधीर रा. देवरे

     गाव तिथं नदी होतीच. आजही ज्या गावाला नदी नाही असे फार क्वचित गावं असतील. गाव तिथं नदी नव्हती, तर जिथं नदी होती तिथं गावं वसली. नदीच्या काठांवर लोकवस्ती झाली. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. जिथं जिथं पाणी होतं त्या पाणवठ्यांच्या काठांवर गावं वसली. म्हणून कोणतं गाव कोणत्या नदीच्या काठावर हे अजूनही मुद्दाम विचारलं जातं. अथवा कोणत्या गावाजवळून कोणती नदी वाहते याचीही उत्सुकता असते. जरी अनेक नद्या वाहता वाहता आज आटून गेल्या आहेत.
     नदी लहान असो की मोठी. आज वाहत असो की नसो. आजची गावंही नदीच्या‍ किनारीच सापडतात. जीवन देणारी नदी ही माणसाची देवता आहे. नदीला माता समजलं जातं. परंपरेने नद्या पुजल्या जातात. नदीत अनेक देवता आजही पहायला मिळतात. नदी ही स्त्रिलींगी असल्याने नदीतल्या बहुतांश देवता या महिला देवता आहेत. आसरा ह्या देवता नदीतच अस्तित्वास असतात. प्रत्येक गावाच्या आसरा ह्या नदीतच वास्तव्य करतात. त्यांचं नावही आसरा. गावाला आसरा देणार्‍या नदीतल्या देवता त्या आसरा. आसरांना बोली भाषेत आया म्हणतात. नदी आपली आई. आईचे अनेक वचन आया. नद्या ह्या सर्व प्राणीमात्रांच्या आया आहेत.
     नदीतल्या आसरांसमोर आजही ग्रामीण भागात लहान बाळाला घुगरवलं जातं. घुगरावणं म्हणजे नदीतल्या आसरांसमोर मानवी बाळाने नतमस्तक होणं. त्याच्या पुढील आयुष्यासाठी या आसरा देवतांचा (आयांचा) आशीर्वाद घेणं म्हणजे घुगरावणं. जन्म झाल्यावर बाळाला जसं नदीचं दर्शन घडवलं जातं, तसं माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे सर्व‍ क्रियाकर्मही नदीतच वा नदीच्या काठांवर केले जातात. माणसाच्या अंत्ययात्रेचं वित्सर्जन नदीत होतं. माणसाची राख नदीच्या पाण्यात सोडली जाते. अस्थी नदीत बुडवल्या जातात. म्हणून उतारवयातल्या माणसाला मुद्दाम हिणवण्यासाठी तुझ्या नदीत गोवर्‍या गेल्या तरी अक्कल आली नाही असं म्हटलं जातं. लोकप्रथा आपण समजतो इतक्या अडाणी नसतात. लोकप्रथांत आदिम लोकसमज आणि लोक सजगता दडलेली असते. हे लोकसमज जगण्याला बळ देतात. आत्मशक्‍ती वाढवतात. पूर्वी माणसाची आत्मशक्ती वाढवण्याचं काम अशा लोकप्रथा करत होत्या.
     लहानपणी साथ देणारी नदी आपल्याला आयुष्यभर प्रवाहीत करीत असते. ग्रामीण नदी जी आज वाहत नसली तरी केवळ तीस- पस्तीस वर्षापूर्वीच्या छोट्या छोट्या नद्याही सुजलाम सुफलाम होत्या. आतापर्यंत सगळ्याच माणसांचं बालपण या नद्यांच्या कडेवर पोसलं जात होतं. (या पुढच्या पिढ्यांना कदाचित पूर्वी इथून नदी वाहत होती असं सांगावं लागेल.) नदीच्या दोन्ही थड्यांवर दाट आंबराई असायची. आंबराई दाट नसली तरी नदीच्या काठांवर अनेक झाडी असायची. नदी दोन्ही पात्रे भरून वहायचीच असं नाही. नदी छोटी असली तरी एका धारेने वाहताना दिसायची.
     काही लोक उन्हाळ्यात नदीत डांगरवाड्या तयार करत. डांगरवाडीत डांगरे, टरबुज, पानकाकड्या पिकायच्या. इतक्या कमी पाण्यातही काही मासेमारी करणारे लोक बारके बारके मासे पकडायचे. खडकांच्या खाचेतून खेकडे पकडायचे. लहान मुलं टोंगळ्याइतक्या वाहणार्‍या नदीच्या धारेत अंघोळ करायचे. थंडगार पाण्यात अंघोळ होताच तापल्या वाळूत अंग शेकायचं- वाळवायचं. आंब्याला लगडलेल्या कैर्‍या दगड मारून पाडायच्या. त्या तिथल्यातिथं खायच्या. वाळूत झरा तयार करून गढूळ पाणी उपसून झाल्यावर नितळ थंडगार पाणी हाताच्या ओंजळीने घटाघटा प्यायचं.
     नदीत बकरके बकर्‍यांना पाणी प्यायला आणायचे. गुराखी गायींना पाण्यावर आणायचे. शेतकरी आपल्या बैलांसह पाळीव प्राण्यांना पाणी पिण्यासाठी नदीवर आणायचे. गावात काही लोक बदकं पाळायचे. ते बदकं पाण्यात पोहण्यासाठी नदीत आणले जात. काही लोक केतकी नावाची वनस्पती नदीच्या धारेत भिजवत ठेवत. नंतर त्याचे लांब धागे काढून त्याचा दोर (आवते)‍ विनत. ही सगळी गंमत पाहण्यासाठी गावातली लहान मुलंही नदीत येत.
     घरोघरच्या गृहीणी धुणं धुण्यासाठी म्हणजे कपडे धुण्यासाठी नदीवर येत. नदीत कपडे धुवून होताच ते तापलेल्या वाळूवर वाळत घालत. वाळलेल्या कपड्यांच्या नदीतच घड्या करून कढईत ठेऊन ती कपड्यांची कढई डोक्यावर धरून घरी आणली जायची. डोक्यावर कपड्यांची पाटी घेत नदीकडे धुणं धुण्यासाठी जाणार्‍या महिला आणि नदीकडून कपडे धुवून गावात येणार्‍या महिला हे रोज दिसणारं ग्रामीण दृश्य रमणीय असायचं. मठमुंगाचे वडे असले तर दाळा धुवायला गावातल्या महिला भल्या पहाटे नदीवर जात. मट्यारं धुवायचं असलं तर नदीवर जात. अशी ही पारंपरिक नदी गावातलं सगळं भलं भुरं आपल्या पोटात घेत काठावर वस्ती करून गाव वसलेल्या लोकांना स्वच्‍छ ठेवीत असे. गावातल्या लोकांची तहान आयुष्यभर भागवत असे. आता अशा जीवंत नदीचे दृश्य गावात दिसून येत नाही.
     नद्यांच्या आजच्या वाळवंट होण्याला आपणच कारणीभूत आहोत. नदी उगमाजवळचे डोंगर, झाडं तोडून आपण उघडे नागडे केले. नदीकाठचे झाडं तोडून आपण नदीला उघडं पाडलं. (त्याचा पावसावरही परिणाम झाला.) अतोनात पाणी उपसून वा अडवून नदीचं प्रवाहीपण बंद केलं. अतोनात वाळू उपसून नदीचं खड्डं केलं. नको तिथं अतिक्रमण करून छोट्या नद्या नामशेष केल्या. गावातल्या गटारी नदीत सोडल्या. रासायनिक कारखाण्यांचे प्रदुषित पाणी नदीत सोडलं. इतकं सारं होऊनही नद्या जिवंत राहतील कशा?
     (वाघूर 2018 च्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखाचा अतिसंक्षिप्त भाग.
या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

गावातला आड




-    डॉ. सुधीर रा. देवरे

     पूर्वी गावात आड असत. घरोघरी नसले तरी प्रत्येक पंधरा वीस घरांमागे एक आड असायचाच. घराच्या मागच्या दारी आड खोदला जायचा. जमिनीत चाळीस पन्नास हात खोल जाताच आडाला पाणी लागायचं. आडाची रूंदी चार बाय चार हात अथवा तीन बाय तीन हात असायची. या रूंदीला कडं म्हटलं जायचं. आडनं कितीनं कडं घिदं?’ उत्तर यायचं चार हात’. हेरनं (विहिरीचं) कितीनं कडं घीदं?’ उत्तर यायचं बारानं कडं’. (म्हणजे बारा बाय बारा हात).
     आड धसू नये म्हणून तो बांधून घेतला जायचा. दगड आणि चुना यात तो खालून वरपर्यंत गोल आकाराने बांधावा लागायचा. आडाच्या वर लाकडी रहाट बसवलं जायचं. त्यासाठी सुताराकडून आडाच्या काठावर दोन तिरपे खांब उभे केले जायचे. खांबांच्या वरच्या टोकाला छिद्रे पाडून त्या छिद्र्यांतून आडवा लोखंडी आस टाकत त्या आसात रहाट ओवलं जायचं. आडात एखादा प्राणी वा लहान मूल पडू नये म्हणून आडाच्या तोंडावर चौकट टाकून लावण्या- उघडण्याच्या फळ्या बसवल्या जायच्या.
     रहाटाला आवते म्हणजे दोर बांधून दोराच्या दुसर्‍या टोकाला बादली बांधली जायची. ती बादली रहाटावरून आडात सोडली जायची. बादली पाण्यात बुडली की रहाटावरच्या आवत्याने ती ओढायची. दोन हातांनी रहाट ओढायला रहाटाला चार  मुठ्या असत. त्या मुठ्या धरून रहाट ओढत रहायचं. म्हणजे आपण ओढत असलेलं रहाट आसाभोवती गोल फिरायचं. आवते रहाटाला गुंडाळलं जात पाण्याने भरलेली बादली वर यायची. बादली वर येताच एका हाताने रहाट स्थिर पकडून दुसर्‍या हाताने बादलीच्या कडीला धरून बादली आपल्याकडे खेचायची. ती बादली हंड्यात ओतायची. अशा पध्दतीने तीन चार बादल्यांनी हंडा भरला की तो उचलून घरात आणून पिण्याच्या पाण्याचा रांजण- माठ भरायचा.
     रहाटाने दोन जणींनाही पाणी खेचता येतं. शक्यतो पाणी भरण्याचं काम महिलांकडेच असायचं. दोन जणी पाण्याची बादली रहाटाने ओढू लागल्या की ओढणं जरा हलकं जातं आणि न थकता पाणी भरता येतं. आडाचं पाणी पिण्यासाठी गावात वापरलं जायचं. धुणं धुण्यासाठी गावातल्या महिला नदीवर जायच्या. खोल पण आकाराने हे छोटे छोटे आड खाजगी एखाद्याच्या मालकीचे असायचे. तरीही आजूबाजूचे दहा पंधरा घरं या आडावर हक्काने पाणी भरायला यायची. आडाचा मालक सुध्दा आपण पाणी भरणार्‍यांवर उपकार करतो असा आव कधी आणायचा नाही. उलट आडातून पाण्याचा जेवढा जास्त उपसा होईल, तितकी पाण्याला चांगली चव येते असा त्यांचा समज होता. पाणी भरणार्‍या शेजारील बायाही आडाच्या मालकिनीच्या (आपल्याला पाणी भरू देते म्हणून) चावलेल्या दाबलेल्या नसायच्या.
     काही आड उन्हाळ्यात आटायचे. तेव्हा आड कोरावा लागायचा. गावात एक दोन जण आड कोरणारे, आड खोदणारे असायचेच. ते आडात उतरून आडात साचलेला गाळ काढायचे. एक दोन हात खाली खोदायचे. आणि तो गाळ – चिखल पाण्याच्या बादलीतूनच दुसरा माणूस वर ओढायचा. आड खोदणारा आडाचे आजूबाजूचे झिळ- पाझर मोकळे करायचा. त्यात अडकलेली घाण- गाळ काढून स्वच्‍छ करायचा. त्यानंतर पुन्हा आडात पाणी उतरायचं आणि आडातून बादली भरून पाणी येऊ लागायचं.
     आवते तुटून काही वेळा बादली पाण्यात पडायची. अशी बादली आडातून काढण्यासाठी विशिष्ट गळ असायचा. त्या गळाला आवते बांधून गळ पाण्यातून आडाच्या बुडापर्यंत सोडला जायचा. गळ वरून आवत्याने खंगाळला जायचा. गळात बादली अडकली असेल तर ती गळातून निसटू नये म्हणून आवते हळूहळू वर खेचावं लागायचं. पाण्यातून गळ बाहेर येताच त्याला बादली अडकली आहे की नाही ते आडात डोकावून पहावं लागायचं. गळाच्या वजनावरूनही ते लक्षात यायचं. नाही आली तर हा प्रयत्न पुन्हा पुन्हा करावा लागायचा. बादली पाण्यात पालथी पडलेली असली तर ती गळात अडकायची नाही. अशा वेळी आड खोदणारा माणूस आडात उतरून बादली काढून आणायचा.
     पडलेली बादली आडातून काढण्याचा गळ प्रत्येक घरी नसायचा. गावात दोन चार जणांकडे असे. मग त्या घरी गळ मागायला गेलं की आपला गळ, नेणार्‍याने आठवणीने परत आणून द्यावा म्हणून गळ मालक गळाच्या बदल्यात तोपर्यंत एखादं भांडं ठेऊन जायला सांगायचा. बाया गळाच्या बदल्यात पितळाचा तांब्या अथवा बोघणं ठेऊन येत. गळ परत करायचा आणि आपला तांब्या वा बोघणं परत आणायचं, अशी गावात पध्दत होती.
     गावात काही सार्वजनिक आडही असत. या आडांचे कडे मोठे असायचे म्हणून मळ्यातली विहीर आणि हे आड सारखेच दिसायचे. बारा बाय बारा अथवा सोळा बाय सोळा हाताचे कडे या आडांना असायचे. हे आड ग्रामपंचायतीने बांधलेले असल्याने लोक या आडांना सरकारी आड म्हणायचे.
     आता गावात आड दिसत नाहीत. होते ते आड बुजले गेले. म्हणजे आपापले आड लोकांनी स्वत:हून मातीने बुजून टाकले. आज इतके कष्ट करून पाणी प्यायला कोणाला सवड नाही. आता गावागावात वॉटर सप्लाय आलं, जरी ते वेळेवर वॉटर सप्लाय करत नाही. कुठं कुठं आता हात पंपही पहायला मिळतात. ते उपसून पाणी वर येईलच याचीही शाश्वती राहिली नाही.
            (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/