गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

करोनाचा इशारा

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

                आजपर्यंत जगात अनेक साथी येऊन गेल्या असल्या तरी आज संपूर्ण जग करोना साथीपुढे हतबल झालं आहे. जगाने असा दीर्घकालीन लॉकडाऊन याआधी अनुभवला नव्हता. करोनाने माणसाच्या अस्तित्वालाच सुरुंग लावला. अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा दिला. मात्र अजूनही अनेक लोक करोनाला गांभीर्याने घेत नाहीत. ज्यांच्या कुटुंबात, नातेवाईकांत, मित्रमंडळीत करोनाने जीव घेऊन वा जबर आर्थिक कींमत मोजून जोरदार धक्का दिला तेवढेच लोक जागरुक असल्याचं दिसून येतं. करोना हा आजारच नाही, करोना म्हणजे साधा सर्दी खोकला, करोना म्हणजे व्यापार’, वगैरे चर्चा अजूनही ऐकू येत आहे हे दुर्दैव.

                करोनाने माणसाला इशारा दिलाय, की त्याच्या आगमनाने माणसांच्या श्रध्दास्थानांचे - मंदिरांचे दरवाजेही बंद करावे लागले. यावर काही हुशार लोकांनी युक्तीवादही शोधून काढले, देव आता मंदिरात नाही तर दवाखान्यात रुग्णांची सेवा करतोय. या युक्तीवादाला अनुसरुन पुढं असं म्हणता येईल, की देवाला रंजलेल्या गांजलेल्या रुग्णांची सेवा करणंच अधिक आवडतं! असं असेल तर गावोगावी आता नवीन मंदिरं बांधण्याऐवजी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स बांधून त्यात चांगले निष्णांत डॉक्टर्स आणून लोकांच्या आरोग्याची मोफत काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक देवालयाने तर हे केलंच पाहिजे. मंदिरांत दानपेट्या ठेवण्याऐवजी अशा इस्पितळांत दानपेट्या ठेवायला हव्यात. (मंदिरं म्हणजे सगळ्याच धर्मांची प्रार्थनागृहे अभिप्रेत.)  

               ज्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकांकडून अव्वाच्या सव्वा कर वसूल करतात, त्यांनी लोकाभिमुख होऊन अशी इस्पितळे निर्माण केली पाहिजेत. (काही नगरपालिका सामान्य नागरिकांकडून मनमानी घरपट्टी दुप्पट तिपटीने वसूल करतात. लोडबेअरिंग घरावर आरसीसी रूम दाखवण्याचा चमत्कार करून अतिरिक्त घरपट्टी लावतात. नागरिकांची क्षमायाचना करून ही गंभीर चूक दुरुस्त करण्याऐवजी नागरिकांनाच उलट  ब्लॅकमेलींग केलं जातं. कोणतंही शैक्षणिक कार्य करीत नसताना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर विशेष शिक्षण करही (दुहेरी) वसूल करतात. वृक्ष लागवड वा वृक्षसंवर्धन न करताही वृक्ष कर वसूल करतात.) अशा स्वराज्य संस्थांनी आता जास्तीचा आरोग्य कर लावून नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवायला हव्यात. पण लोकांच्या देवभोळेपणाचा फायदा घेत स्वस्त प्रसिध्दीसाठी केवळ नवनवीन खर्चिक समारंभाचा घाट घातला जातो. गल्ली, बोळ, गाव, शहरं आदींची नावं बदलून, जिर्णोध्दार करत नागरिकांच्या भावनिक श्रध्देशी खेळत मूळ प्रश्न तसेच टांगणीला ठेवली जातात.

                नैतिकतेची चाड असती आणि भारतीय सरकारी व्यवस्था ही अव्यवस्था नसती तर गावोगावी सुरु झालेली सरकारी हॉस्पिटल्स आज खरोखरची आरोग्य मंदिरं झाली असती. पण दुर्दैवाने ही हॉस्पिटल्स फक्त शोभेच्या टोलेजंग इमारती ठरतात. करोनाच्या या तडाख्याने अजूनही आपण खडबडून जागे झालो आणि इच्‍छाशक्ती दाखवली तर सरकारी पैशांची प्रचंड उलाढाल होत असलेली ही हॉस्पिटल्स सामान्य लोकांसाठी संजीवनी ठरु शकतील. यात काही चांगली आशेची किरणंही आज दिसून येतात. ठाणे कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची अतिशय चांगल्या पध्दतीने काळजी घेतली जात असल्याचं समजतं. सटाणा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्व कर्मचारी या करोना काळात नागरिकांसाठी सहसंवेदनशील व सहकार्य करणारे आहेत. सरकारी असूनही असे अपवाद आढळले तर त्यांचं मनापासून कौतुक करावं लागेल.

                प्रचंड फी भरुन आणि पात्रता नाही म्हणून देणग्या देऊन डॉक्टर झालेले लोक सामाजिक जाणीव ठेवून वैद्यकीय सेवा देऊ शकत नाहीत. ते केवळ व्यवसाय (धंदा) करीत असतात. म्हणून शैक्षणिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचारासह सार्वजनिक प्रत्येक क्षेत्रातला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. तो बंद झाला की व्यवस्था ही अव्यवस्था होणार नाही. सगळेच डॉक्टर भ्रष्ट नसतात, पण चांगले डॉक्टर कमी असतात. (असं प्रत्येक क्षेत्रात असतं.)

                एका वर्षापासून रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार सर्वांनीच जवळून अनुभवला. मूळ औषध काळाबाजाराला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, म्हणून डुप्लीकेट औषधाचा धंदा करुन काहींनी प्रचंड पैसा कमवला. (या औषधाचा करोना रुग्णांवर विशेष चांगला प्रभाव पडत नाही हे डब्ल्यूएचओने तीन चार महिण्यांपूर्वीच जाहीर करुनही असे प्रकार आज मोठ्या प्रमाणात होत आहेत.) सहा हजाराची औषधे कोणी सव्वीस हजाराला विकली, तर महात्मा फुले आरोग्य सेवा अंतर्गत उपचार करुनही कोणी अव्वाच्या सव्वा बीलं आकारली. अशा प्रकारालाच माणसाला माणसाने खाणं  वा प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात. असा उद्योग करणार्‍यांना माणूस का म्हणावं? आज जे लोक मरताहेत त्या रांगेत स्वत: आपणही उभे असून अशा मरणात आपलाही उद्या नंबर लागू शकतो, अशी परिस्थिती असूनही लोक अनैतिक मार्गाने पैसे कमवताहेत.

               आज राजकारणाची किळस यावी अशा पध्दतीने सर्वदूर राजकारण खेळलं जात आहे. नागरिकांच्या आरोग्यापेक्षा एकमेकांना खाली खेचण्याचा खेळ खेळला जातो. (फक्त मार्जिन मिळणारी सार्वजनिक विकासकामं निष्कृष्टतेनं केली जातात. बाकी निधी परत गेला तरी हरकत नसते.) रोज निवडणुकीचा प्रचार करीत असल्यासारखं भाष्य करणारे राजकारणी लोक पाहिले, की हे लोक कसे निवडून येतात हा प्रश्न सतावतो. आपल्या पात्रतेनुसारच आपल्याला लोकप्रतिनिधी आणि सरकार मिळत असतं. म्हणून पाच वर्षांनी मतदान करतांना आपणच जागरुक असलं पाहीजे. पाचशे- हजार रुपये घेऊन वा मटणाच्या पार्ट्या घेऊन आपण मतदान करणार असाल तर नोकरशहा आणि सरकार हातात हात घालून ही व्यवस्था अजून अशीच बिघडवत राहतील. (अर्थात नोकरशहात आणि लोकप्रतिनिधीतही अपवाद आहेतच.)                

          सारांश, हा करोनाचा इशारा प्रत्येकाने मनावर घ्यायला हवा! (बाकी मास्क, शारीरिक अंतर, हात धुणे आदी गोष्टींचं पालन करावं, हे सांगणं आता नवीन राहीलं नाही.)

               (अप्रकाशित लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

        © डॉ. सुधीर रा. देवरे

        ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)


 

- डॉ. सुधीर रा. देवरे

                        भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तसतसा त्या संदर्भातील भाषेचाही र्‍हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते. येथे मराठी व अहिराणी भाषांतील काही शब्दांचे उदाहरण घेऊन मुद्दा स्पष्ट केला आहे.

                 उदाहरणार्थ आड : गावागावातील आड जसे नामशेष होत आहेततसे आड संदर्भातील शब्द- संज्ञा- वाक्‍प्रचार भाषेतून लुप्त होत आहेत. रहाटआसमुठ्याबादली काढाना गळगळ टाकणेगाळ काढणेआड खोदणेआड कोरणेपुरूषभर पाणी असणेखाटेचं सुम बुडण्याइतके पाणी असणे(खाट’ ही वस्तूही नामशेष होत असल्याने सुम हा शब्दही हरवून गेला)शिकाळी आदी शब्दांना मराठी भाषा लवकरच मुकणार आहे. 

                   बैलगाडी: बैलगाडी लुप्त होत आहे. ती काही वर्षांनी कायमस्वरूपी नामशेष होईल. त्या पाठोपाठ मराठी भाषेतील कितीतरी शब्द मान टाकणार आहेत. साटलंसाटलीपांजरीसावळाजोतंजुवाडंदुशर (बैलाच्या मानेवर जुवाड ठेवण्याची जागा)आसआर्‍यादांडकेनांदनी (बैलांच्या पायाला चाक लागू नये म्हणून गाड्याला बांधलेली आडवी काठी)शिंगाड पाटली (गाडीवानाला बसण्यासाठी केलेली जागा)आखरी पेटी (आसावर बसवलेले चौकोनी लाकूड)तुंब (चाकाचा मध्यभाग) धाव बसवणे वंगननळागेजआरी नाथमाथोट्याश्याम्या काकडा शेल गाडं चकारीछकडंआंड ठेचणंबैल जुंपणंबैल दाव्याला बांधणंबैलांना पानी दाखवणं (बैल पाण्यावर नेणं)(बैलगाडीला वा औताला जोडलेले बैल हाकलण्यासाठी हटहयच्यच्य) आदी शब्द- हुंकार भाषेतून लुप्त होणार आहेत. ‘गाड्याबरोबर नळ्याची यात्रा’ ही म्हणही अर्थलुप्त होईल. 

                 बाजरी- गहू काढण्याची पद्धत: बाजरीगहू आणि इतर धान्ये काढण्याची पारंपरिक पद्धत बंद होऊन धान्ये मशीनने काढण्याची सुरूवात झाल्याने भाषेतील अनेक शब्दवाक्प्रचार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. खळं तयार करणंखळं सारवणं वडांग करणंशिडं पडणंशिडं बुजणंवडांग शाकारणंउढी रचणंउढी फोडणंपेंढी बांधणंपेंढी फोडणंबाजरी खुडणंपाथ धरणंमुचकं बांधणंकणसं कांडणंच्याहूर फावडंपाट्या देणंडालकंसाबडंउपणणंरासव्हका घेणंउप्त घेणंचिड्या उडवणं मोगरीवार्‍याची वाट पाहणं आदी.

                 जुनी घरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून घरांच्या संदर्भातील अनेक संज्ञा कालबाह्य झाल्या आहेत. घर शेणाने सारवणंसडा टाकणंपोतारणंभुई घेणंभुई पिटणंपिटणीचिरीसरीकड्याकिलचनआडेकडेसाने खांबकमान पांजडानं सपरंछप्परझ्यापसैडनकवाडी, शिडं, कवाडकुसनालकुमई खारी धाब्यावर खारी टाकणंधाबं निंदणंपंडाळघर गळणंधाब्यावर नळा बुजायला जाणंकौलारु घरपांजडानं घरपत्रासनं घरधबानं घरपाटाईनं घरइटासनं घरमाडीनं घर रद्दाना भितडाशिडीबोळपडवीपायथोर्‍याकोस आदी शब्द घराची रचना बदलल्याने आणि सिमेंटचा वापर होऊ लागल्याने संपुष्टात आले आहेत.

                 घरातील पाटा गेला म्हणून पाटा या शब्दासहवरवंटावाटणेठेचणे चयडणे हे शब्द गेले. कैरीचा ठेचा गेला. मिरचीचा ठेचा कालबाहय झाला. घरातील खलबत्ता गेला म्हणून खलबत्त्यासह मुसळीकांडणंकुटणंदणका देणं हे शब्द गेले.

                 घरातील घरोट गेला म्हणून घरोट शब्दासह घट्याजातंभरडकी भरडणं दळणंघरोट बसवणंघरोट उपटणंखुटादांडामाकडी हे शब्द लुप्त झाले.  हरण पळे दुध गळे’ हा उखाणा यापुढे कोणाला कळणार नाही आणि मुख्य म्हणजे जाते नामशेष झाल्याने जात्यावरील असंख्य ओव्याम्हणीउखाणेआन्हे नामशेष झालेत. घरातील उखळ गेला म्हणून उखळ या शब्दासह मुसळकांडणं हे शब्द गेले. लाकडाचा नांगरपांभरवखर, केरनऔत धरणे आजच नामशेष झाले आहेत. लोखंडाचे फणतोले कुदळपहारफाळपास ह्या वस्तू आणि पर्यायाने भाषेतील शब्दही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विळाखुरपनंकुर्‍हाडटिकम आणि पावडी या वस्तू अजून तरी पाहण्यास मिळतात. मळ्यातील मोट इतिहासजमा झाली म्हणून मोटेवरील प्रासादिक गेय गाणी कायमची लुप्त झाली.

                 या सर्व वस्तू बनवणारे विविध कारागिर रस्त्यावर आले ते वेगळेच. घरातील भाकरींची डालकी गेली म्हणून अड्याकड्याला टांगून ठेवण्याची शिकाळी गेली. (लाकडी चौकट चार दोर्‍या बांधून छताला टांगून तिथं भाकरी ठेवत.) तोडक्या मोडक्या घरातल्या भाकरींच्या डालकीतून कुत्र्या- मांजरांनी भाकरी पळवू नयेत म्हणून शिकाळीची सोय असायची. धाब्याच्या ग्रामीण घरातील सानं गेलं. (चूल पेटवल्यावर घरातला धूर बाहेर निघून जाण्यासाठी घर बांधतानाच केलेली व्यवस्था.) घरात वा  घराबाहेर बांधलेला झोका गेला म्हणून झोक्यावरची असंख्य गाणी विस्मरणात गेली. घरात वापरण्याचा समार आहे पण तो बाजारातून आयता येतो. समार करण्याची पद्धत विस्मरणात चालली. मिरचीचा साधा लाल समार घरात केला जात नाहीआयता आणतात. लाल समाराला तिखट म्हणतात. पूर्वीचे तिखट नव्या जमान्यात मिरचीची पावडर झाली आहेती बाजारातून आयती आणली जाते. हिरव्या मिरच्या पावशीने कापल्या जात नाहीतचाकूने कट केल्या जातात. म्हणून घरातून पावशी गुप्त झाली. ग्रामीण महिलांनी नऊवारी लुगडं नेसणं सोडताच कंबळकाच, बटवा, कंबरनी पिसोडी आदी शब्द गेले. भाकरी करण्यास लाकडातून कोरलेली काठोख कोणी वापरत नाही. म्हणून काठोख या वस्तूसह भाषेतील महत्त्वपूर्ण- सौष्ठवयुक्‍त शब्द लुप्त झाला.

                 ग्रामीण भागात शेती अजूनही बर्‍याच प्रमाणात पारंपरिक पद्धतीने केली जात असल्याने शेतीची मेर म्हणजे काय हे सर्वसाधारण माणसाला समजते. भोद सारंग बांधनिंदनंखुरपनंगव्हानबंधनीवाफाबेलेबारा देणं सोला,  साकरू,  चिचना हांगोडाकैरीस्ना घडचिचोक्याकोयीसरकी, तन, बोचकं, गागा बसनं, डाभुर्लआबगाजथापतगेदूल्हाव करनंपघळनंफसकारा करणं बाशी याळ पुल्हाळ रामपहारतिसरा पहारचिपडं पडनंआखठं करनंकठान घेणंहरभरा घेवाले जाणंबाजरीवरल्या चिड्या उडावाले जाणंआरन्या आदी शब्द वा वाक्प्रचार अजून तरी तग धरून आहेत.

                 ग्रामीण भागातील रोज वापरले जाणारे काही शब्दधन मात्र लोकांच्या अंगवळणी पडलेले दिसते. उदाहरणार्थवैचा जायेललसूनचोट्टाचोखांडभरउल्हानं देनं शिळागारकडीजखडीनावरमाडमोचडंडांजनंदिवाबत्ती करणंचिपडं पडणं खुशाल, शिमर्‍या तानणंहयाती रहाणं आदी शब्दसंपदा तर वयाने चाळीस- पन्नासच्या घरात असलेली पिढी थोडीफार समजू शकते.

                 तसे शब्दधन शाबूत असल्यानेच ग्रामीणप्रधान व शेतीप्रधान रांगडी मराठी भाषा अजूनही जिवंत भासते. पुढे मागे न्यूनगंडाने या शब्दांची लाज वाटायला लागली की मराठी भाषेचा पाया धसत सांगाडा ढळू लागेल. लोकसंस्कृतीतील घटक नाहीसे होताच भाषा लयाला जाऊ लागतेअथवा उसन्या शब्दांचे नवे वळण घेत कात टाकते. भाषेतील जुने शब्द पूर्णपणे लुप्त झाल्यानेभाषेचे प्रचंड नुकसान होत असते. भाषेतील जुने शब्दधन जतन करत नव्या शब्दांचेही (इतर भाषेतीलसुद्धा) स्वागत करते ती भाषा समृद्ध होते.

                    (मराठी संशोधन पत्रिका’, जानेवारी-फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा संदर्भ देत हाच लेख शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१ रोजी थिंक महाराष्ट्र वर प्रकाशित झाला. लेखाचा वा लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

        © डॉ. सुधीर रा. देवरे

        ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/