बुधवार, १५ जुलै, २०२०

पाप आणि पुण्य

-   डॉ. सुधीर रा. देवरे

    देवाला आपण माणसासारखं उभं केलं. म्हणजे देवाची मूर्ती आपण माणसाच्या रूपासारखी बनवतो. आपल्याच रूपात आपण त्याला पहात आलोत. राग, लोभ, प्रेम, काही प्रमाणात दोषही माणसासारखेच आपण त्याला बहाल केले. माणूस आनंद व्यक्‍त करतो वा रागावतो तसा देवही प्रसन्न होतो वा कोपतो. याचा अर्थ माणसाच्या रूपातच सर्व देव आहेत. सगळ्या देवांवर आपण माणसासारख्या नाना तर्‍हा आरोपीत केल्या. काही देवांना आपण आपल्या वासना सुध्दा बहाल केल्या. माणसापासून आपण देवाला खूप दूर जाऊ दिलं नाही.
    माणुसकी हे मानवी समाजाचं मूल्य आहे. संस्कृती सोबत अधिक प्रगल्भ होत गेलेलं तत्व म्हणजे माणुसकी. माणसात माणुसकी आली की देवत्व फार लांब नाही. म्हणूनच आपली नैतिक उन्नती करून घेण्यासाठी अध्यात्म असतं. जगण्याला धर्माचं अधिष्ठान असतं. धर्म म्हणजे जगण्याचं तत्व. धर्म म्हणजे पूर्वसुरींनी तयार केलेली सामाजिक आचारसंहिता. धर्म आणि अध्यात्म हे देवत्वाचं वा कर्मकांडांचं देव्हारे माजवणारं साधन नव्हे. कोणताही अध्यात्मिक माणूस अन्य धर्माचा व्देष करत नाही. परधर्माचा व्देष करताना कोणी दिसलं की समजावं,या तथाकथित माणसाचं अध्यात्म नकली आहे! सत्ता मिळवण्यासाठी तर धर्माचं अस्तित्व मुळीच नाही. पण माणूस इथंही गल्लत करत धर्माचा वापर करतो.
    देवाची आराधना करताना ठरावीक साच्यातील पाप- पुण्याच्या संकल्पनाही आपण आपल्यापुरत्या निश्चित करून टाकल्या. म्हणजे पोथी पुराणातला स्वस्त- प्रक्षिप्त मजकूर वाचून आपण पाप- पुण्याची गणना करतो ती मुळातूनच अज्ञानावर आधारीत आहे. पापक्षालन करता येतं, असा समज असल्यानेच पाप करायला माणूस धजावतो. पापक्षालन करण्याचे उपायही स्वस्त- सोपे आहेत. एखाद्याचं पापक्षालन एका नारळाने होतं तर कोणाचं, सोन्याचा मुकुट देवस्थानाला (देवाला नव्हे, गरजवंताला नव्हे) दान केल्याने होतं.  
    शारीरिक व्यंगाकडे पाहताना देवभोळे- भाबडे लोक आजही पाप- पुण्याचा पारंपरिक पगडा असलेला दृष्टीकोन ठेवतात. या जन्मी नसलं तरी पूर्वजन्मी पाप केलं असावं म्हणून भोग भोगावे लागतात, असा लोकसमज होता- आजही आहे. (काल परवापर्यंत जातीव्यवस्थेकडे पाहताना सुध्दा हाच दृष्टीकोन होता.) हातून पाप झालं असेल म्हणून अमुकच्या वाट्याला हे दु:ख आलं, असं सहज सांगितलं जातं. आजच्या निष्पाप माणसाच्या मागच्या जन्मातल्या पापाबद्दल चर्चा करून आपण आजच ‘निंदकाचं’ पाप करत असतो, हे आपल्या गावीही नसतं. स्वत:ला धार्मिक- अध्यात्मिक समजणारे काही तथाकथित आस्तिक लोक असा ‘निंदनीय’ प्रचार करतात, हे आणखी एक दुर्दैव.
    आजच्या आधुनिक जगातील शिक्षित माणसांतही लोकश्रध्देचं ओझं वाहणारे अनेक अंधश्रध्द लोक आढळतात. कोणाच्या शारीरिक दुर्बलतेकडे आपल्या मनाचे लाड पुरवून घेण्यासाठी सोयीस्कर पारंपरिक दृष्टीकोनातून पाहतात. शारीरिक दुर्बल माणसाने शारीरिक तंदुरस्त माणसाचा कायम  सहानुभुतीचा विषय व्हावा, अशी अपेक्षा केली जाते. दुर्बल व्यक्‍‍ती आपल्या अथवा सामाजिक न्याय हक्कासाठी भांडत असेल, तर काहींना त्या व्यक्‍‍तीचा आजही तो आगावूपणा वाटतो. सत्य वचन बोलणं म्हणजे फटकळ, खडूस आणि सत्य लपवून वरून गोड गोड बोलणं म्हणजे तोंडावर स्तुती करणं, याला लोक चांगुलपणा वा सज्जनपणा समजतात.
         पाप आणि पुण्य या संकल्पना केव्हाही सापेक्ष ठरतात. आधीच्या जन्माचा वचपा देव दुसर्‍या जन्मात काढत असेल तर देव आणि माणूस यात फरक काय राहिला! खरं तर माणूस सुध्दा आधीच्या जन्माचं वैर (पुढच्या जन्मातच नव्हे तर त्याच जन्मात)  विसरून जातो. आणि देव तर माणसाइतका क्रूर नाही. (पाप-पुण्य आणि योग्य कर्माची जबाबदारी आपल्या स्वत:वरच आहे,ती देवावर टाकू नका, हे देवाने या करोना काळात आपली दारं बंद करून अप्रत्यक्षपणे सुचीत केलं आहे.)  
        एकाच्या दृष्टीकोनातून जे पाप असू शकतं ते दुसर्‍याच्या मते पुण्य ठरू शकतं. म्हणून पाप- पुण्याची परिमाणं जोपर्यंत वैश्विक दृष्टीकोनातून बदलत नाहीत, तोपर्यंत पुण्य म्हणजेच देवत्व, संतत्व आणि मनुष्यत्वही आपल्यापासून कित्येक कोस दूर असेल. ‘पुण्याची गणना कोण करी’ हा ‍हरिपाठ फक्‍त घोकण्यासाठी नाही!
(‘सगुण- निर्गुण’ मटा, दि. 10-6-2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १ जुलै, २०२०

स्वच्छ एकटेच तळे : आस्वाद




- डॉ. सुधीर रा. देवरे

स्वच्‍छ एकटेच तळे
विसावले चांदण्यात.
         - शंकर रामाणी
    शंकर रामाणी यांची ही फक्‍त दोन ओळींची कविता. या दोन ओळीतील एकूण पाच शब्द म्हणजे ही कविता.

स्वच्‍छ     - शुचिर्भूत. कलंक नसलेले. डाग नसलेले. नितळ.
एकटेच     - एकांत. समाधी लागलेले. चिंतन.
तळे      - पाण्याचा साठा. पाणी म्हणजे जीवन. जीवनाचा साठा. तृप्त.
विसावले   - शांतता. शांती. तृप्तता. आयुष्याच्या सुरूवातीला खूप कष्ट
           करूनच विसावता येते. खस्ता खावूनच विसावता येते. तसे
           नसेल तर विसावण्याला आळशी म्हणतात. सुस्त म्हणतात.
चांदण्यात   - शीतलता. सौहार्दता.

        कवितेत तळे आहे. तलाव नाही. तळे नैसर्गिक, तर तलाव मानव निर्मित. तळे असल्याने आजूबाजूला हिरवीगार झाडी सुध्दा असली पाहिजेत. हिरवळ असली पाहिजे. पक्षी असले पाहिजेत. आणि आजूबाजूंच्या झाडीत पशू सुध्दा असले पाहिजेत. जे तलावावर दिवसा आपली तहान भागवायला येत असावेत.
        तळे म्हणजे तलाव नाही. पोहण्यासाठी माणसाने बांधून घेतलेला कृत्रिम तलाव नसून हे नैसर्गिक तळे आहे. हे निसर्गरम्य ठिकाण असले पाहिजे. नाहीतर ते स्वच्‍छ कसे राहील? आणि आजूबाजूला शांतता तरी कशी राहील? तळ्यात जीवन असेल. म्हणजे जलचर असतील.
        तळे शांत असते. त्यात लाटा निर्माण होत नाहीत. समुद्रात लाटा निर्माण होतात. खाडीत लाटा तयार होतात. निवांत एकट्याच विसावलेल्या मनात क्रोधाच्या- संतापाच्या लाटा निर्माण होत नाहीत.
        कवितेत चांदणे आहे, म्हणजेच रात्रीची वेळ आहे. दिवसभर कष्टाची- परमार्थाची कामे केली तर चांदण्यात रात्री शांत विसावता येते. चांदण्याची रात्र आहे म्हणजे कदाचित पौर्णिमेची रात्र असली पाहिजे. पौर्णिमेला चंद्राच्या गुरूत्वाकर्षणाने समुद्रात लाटा निर्माण होतात. मात्र पौर्णिमा असूनही या तलावात समुद्रासारख्या लाटा येत नाहीत. तळे शांत असते. तृप्त असते. तृप्ततेचे शालीनतेचे आणि शांततेचे हे प्रतीक म्हणजे ही कविता. 
        तळे एकटेच. त्या विशिष्ट सामसुम जागी आपले कर्तव्य बजावणारे. आपल्या पोटातील जलचर, आजूबाजूचे जंगल, पशू, पक्षी यांच्यावर उपकार करत असल्याचा कोणताही आव न आणता, कोणताही गाजावाजा न करता, प्रसिध्दीचा सोस न धरता इतरांसाठी उपयोगी पडत राहते. तृषार्तांची तहान तृप्त करत राहते. म्हणजेच जीवनाचे भरण पोषण करणारे तळे. प्रसिध्दीच्या झोतापासून जंगलात दूर निवांत आपल्याच शांत चित्तात समाधिस्त. रात्री शुभ्र चांदण्यात कृतार्थतेने विसावले आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती!
(आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ या आताच प्रकाशित झालेल्या समीक्षेच्या पुस्तकातून. लेख इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/