शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

संजय दत्त आणि कायदा


                                   - डॉ. सुधीर रा. देवरे


         संजय दत्तने काय गुन्हा केलाय हे सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून त्याला जी तीन-साडेतीन वर्षाची प्रतिकात्मक शिक्षा झाली आहे ती त्याने निमुटपणे भोगायला काही हरकत नाही असे आपल्याला वाटते. पण इतक्या मोठ्या गुन्ह्यासाठी इतकीशी शिक्षाही त्याला खूप मोठी शिक्षा वाटू लागली. ही शिक्षा कशी टाळता येईल  याचा प्रयत्न त्याने शासकीय पातळीवर सुरू केला होता. जनमाणसाच्या भावनांच्या रेट्यापुढे शासनाला काही करता आले नाही, नाहीतर त्याची शिक्षा माफ करण्याची शासनाची तयारीही सुरू झाली होती. शिक्षा माफ होत नाही असे लक्षात येताच संजय दत्तने भावनिक ब्लॅक मेलींग सुरू केले. पत्रकार परिषदेत रडण्यापासून तर आपण जसे काही शहीद व्हायला निघालोत अशा पध्दतीने तो वागू लागला.
         तुरूंगवास आता टाळता येत नाही म्हणून त्याने तुरूंगात जाण्याची मुदत वाढवण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात तो त्यात यशश्वीही झाला. शेवटी त्याला तुरूंगात जावे लागले. पण तुरूंगात जाताच त्याने नवीन मार्ग शोधून काढला. कायदेशीर सुट्या घेण्याचा नवीन मार्ग. त्यासाठी त्याला तुरूंग अधिकार्‍यांनी आणि प्रशासनाने साथही दिली. मे 2013 ला संजय दत्त तुरूंगात गेला आणि ऑक्टोबर महिण्यात आधी चौदा दिवसाची रजा घेऊन बाहेर आला. नंतर हीच रजा पुन्हा चौदा दिवस वाढवून मिळाली. आणि आता पुन्हा डिसेंबर मध्ये त्याला एका महिण्याची रजा मंजूर करण्यात आली.
         कोणत्याही शासकीय कर्मचार्‍याला एका वर्षातून फक्त 30 दिवस मेडीकल रजा घेता येते. जो कर्मचारी मे मध्ये नोकरीला रूजू झाला असेल त्याला डिसेंबरपर्यंत जास्तीतजास्त 15 दिवसाची मेडीकल रजा घेता येते. मात्र एका गुन्हेगाराला सहा महिण्यात 58 दिवस रजा मिळावी याचा अर्थ शासकीय कर्मचारी हा एखाद्या तुरूगांतल्या गुन्हेगारापेक्षा कनिष्ठ दर्जाचा नागरीक ठरतो. सहा महिण्यातून दोन महिने  तर वर्षाला एकूण चार महिने रजा आणि ती ही एका गुन्हेगाराला. हा कायद्याचाच अपमान नव्हे तर जे सामान्य लोक आपले आख्खे आयुष्य तुरूंगात खितपत पडलेत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. शिक्षा भोगताना काही कारणास्तव गुन्हेगाराला अशा अवास्तव सुट्ट्या दिल्या तर एकूण शिक्षेनंतर घेतलेल्या रजांइतके दिवस त्याने तुरूंगात राहिले पाहिजे, असाही नवीन कायदा व्हायला हवा का?
         संजय दत्तला पश्चाताप झाला आणि तो तुरूंगात असलेल्या सगळ्या कैद्यांचा विचार करतोय असेही दिसत नाही. अनेक लोक असे आहेत की ते केवळ अपघाताने गुन्हेगार झाले आणि त्यांचे उर्वरीत आयुष्य तुरूंगात खितपत पडून बरबाद झाले. अशा सगळ्यांविषयी संजय दत्तला कळवळा निर्माण झाला आणि तो त्याविषयी बोलतोय, असे दिसले असते तर त्याच्या प्रामाणिकपणाविषयी काही पुरावा मिळाला असता. पण संजय दत्त इतका स्वार्थी आहे की तो आपल्या व्यतिरिक्त काही बोलायला तयार नाही. इतर कैदी तर सोडाच पण त्याच्याच कृत्याच्या समभागीदारी जे कैदी आहेत त्यांनाही अशी सवलत द्यावी यावरही तो बोलत नाही. त्याचे फक्त एवढेच म्हणणे आहे की त्याचे तीन वर्षे वाया जातील आणि या तीन वर्षांच्या काळातील चित्रपट त्याला मिळणार नाहीत म्हणून त्याचे आर्थिक नुकसात होईल.
         या संजय दत्तच्या सुट्टीवर आपण फक्त बोलू शकतो वा लिहू शकतो. बाकी आपल्या हातात काय आहे?

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा