शनिवार, १७ मे, २०१४

तिथे पाहिजे जातीचे



 
- डॉ. सुधीर रा. देवरे


         भारतीय लोकशाही पध्दतीने मोदी सरकार निवडून आल्यामुळे प्रथमत: नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन!...
         दोन महिण्यांपासून चालत आलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणुकीचा निकाल आता आपल्या डोळ्यासमोर आहे. सर्व जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि ह्या निवडणुकीने खर्चाचाही मोडलेला उच्चांक पाहिला की जगात कोण म्हणेल भारत हा विकसनशील देश आहे! एखाद्या विकसीत आणि श्रीमंत राष्ट्राप्रमाणे ह्या निवडणुकीवर अधिकृत सरकारी पैसा वापरला गेला. पक्षीय आणि व्यक्‍तीगत पातळीवर अनाधिकृतपणे किती खर्च झाला हे (निवडणूक आयोगाला नव्हे) तर त्या त्या पक्षांना आणि उमेदवारांनाच माहीत.
         आपण कितीही भारतीय संविधाच्या गप्पा मारल्यात, ‍धर्मनिरपेक्षता म्हणत राहिलोत, जातीभेद पाळत नाहीत असे व्यासपीठांवरून आरोळ्या मारत असलो तरी आपण पक्के जातीयवादी लोक आहोत हे मान्य करायलाच हवे. (धर्म हा तर आपला मते मागण्याचा मुख्य घटक आहेच!). तिथे म्हणजे आपल्या राजकारणात पाहिजे जातीचे हे ह्या निवड‍णुकीने ढळढळीतपणे सिध्द करून दाखवले. जिथे जाती- धर्माचा उपयोग होणार नाही अशा व्यासपीठांवरून विकासाच्या गप्पा मारायच्या आणि जातीय समीकरणाचा मॉब दिसताच आपल्या जातीचे भांडवल करायचे हे आपल्या देशाच्या पंतप्रधान होऊ इच्छिणार्‍या उमेदवाराने सुध्दा उदाहरण घालून दिले. मग साध्या आमदार, खासदार, मंत्री आणि छोट्या छोट्या डबक्यातल्या प्रादेशिक पक्षीय अध्यक्षांनी तशा उड्या मारल्या तर त्या बिचार्‍यांना नावे का ठेवावीत?
         या आधीच्या निवडणुकांमध्ये, राजकारणात जातीचा फायदा घेण्यातही आला असेल, वोट बँका तयार केल्या गेल्या असतीलही. पण त्या छुप्या तरी असायच्या. या जातीय समीकरणांना किमान व्यासपीठांवरच्या गर्जनेत तरी स्थान नसायचे. पण ही एकमेव निवडणूक म्हणावी लागेल की जिच्यात जातीचा दाखला व्यासपीठांवरून चर्चिला गेला आणि मिरवला गेला. कळीचा मुद्दा आला की व्यक्‍ती कितीही मोठी असो, आपली जात कशी बाहेर काढते हे या उदाहरणांवरून लक्षात येते.
         विकास आहे, शिक्षण आहे, बुध्दी आहे, विचार आहे, अभ्यास आहे पण
राजकारणी माणसाला जात नसेल तर कसे चालेल हो? म्हणून मूळ मुद्दा इथे जात हा
घटक आहे हे पुन्हा एकदा सिध्द होत आहे. म्हणूनच तिथे पाहिजे जातीचे असे
म्हणावे लागते. परिवर्तन झाले ते सत्तेत, पण या जातीय लोकांकडून सर्वसामान्यांच्या
आयुष्यात खूप मोठे परिवर्तन होईल याची अपेक्षा म्हणूनच आपल्याला करता येणार
नाही. जे सत्तेचे दलाल आहेत ते त्याचा पुरेपुर फायदा उठवतात. सत्ता बदलली म्हणजे
सत्तेचे फक्त दलाल बदलतात, एवढेच सत्य यातून पुढे येताना दिसते.
   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा