शनिवार, २ मार्च, २०१३

स्मारकांच्या देशा




 - डॉ. सुधीर रा. देवरे

         दिल्लीत बलात्कार झाला आणि नंतर प्रंचड जनक्षोभ उसळला. त्यावेळी एका टीव्ही चॅनलवर भावनिक आवाहन केले जात होते, की पिडित महिलेचे स्मारक बांधायला हवे काय? इतक्या गंभीर प्रसंगीही मला त्यावेळी हसू आले होते. (नंतर काही दिवसांनी त्या पिडित मुलीचा मित्र एका चॅनलवर त्याच्या मुलाखतीसह दाखवला आणि त्यावेळीही त्या चॅनलवर चर्चा झाली, की या तरूणाला शासनकडून शौर्य पदक देण्यात यावे काय? यावेळीही ही चर्चा हास्यास्पद वाटली. त्या युवकाने धाडस दाखवले हे सत्य असले तरी त्याचे ते कर्तव्यच होते असे चॅनलला वाटले नाही.  आणि त्यामुळेच त्याला पुढे प्रश्न विचारला गेला की तुला तिथून पळून जावेसे का नाही वाटले? हा प्रश्न ऐकून तर मी डोक्याला हात लावला. ज्याच्या विश्वासाने ती मुलगी बाहेर पडली होती आणि ती त्याची मैत्रीण होती. तिच्यासाठी प्राण पणाला लावणे हे सा‍हजिक होते. त्या युवकाऐवजी दुसरा कोणीही असता तरी त्याला तिथे लढावेच लागले असते.)
         महाराष्ट्रात सध्या असेच स्मारकांचे वादळ आलेले आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात व्हावे का अन्य ठिकाणी. ते कसे असावे. पुतळा किती उंचीचा असावा. बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक कुठे करावे. महात्मा फुले यांच्या स्मारकाचे काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची किमान जागा तरी नक्की झाली. अजून काही स्मारकांची चर्चा सुरू आहे. पण त्यांचा आवाज अजूनतरी वाढलेला नाही.
         जी स्मारके आज महाराष्ट्रात उभी आहेत, त्यांची अवस्था पाहिलीत तर ह्या स्मारकांचे एकतर कुठे मंदिरे झाली आहेत नाहीतर ती भूतबंगले म्हणून शिल्लक राहिली आहेत. स्मारके कशासाठी? का? ज्यांच्या स्मारकांची आपण मागणी करतो त्या व्यक्ती आपण नीट समजून घेतल्यात का? त्यांचे विचार समजून घेतलेत का? त्यांचे तत्वज्ञान अभ्यासले का? त्यांनी लिहून ठेवलेले ग्रंथ वाचलेत का? त्यांचे कार्य आपल्याला माहिती आहे का? आपण जे काही स्मारक उभारायचे म्हणतो ते त्यांच्या स्वत:च्या विचांरांशी सुसंगत आहे का, हे ही तपासून घ्यायला नको हवे याचे भान कोणालाच नाही. स्मारके म्हणजे प्रंचड ग्रंथालय ही संकल्पना आपल्याकडे अजून रूजायची आहे.
         महाराष्ट्रापुढे आज किती गंभीर प्रश्न उभे आहेत हे खरे तर कोणालाच सांगायची आवश्यकता नाही. त्यातला तात्कालीक प्रश्न म्हणजे पिण्याचे पाणी. भीषण दुष्काळ. तरीही असे प्रश्न प्राधान्याने बाजूला ठेऊन बाकीचे बिनमहत्वाचे प्रश्न का पुढे येतात, हा आज अभ्यासाचा विषय होऊ पहातोय. बौध्दीक प्रबोधन करण्याऐवजी लोकांच्या भावना कुरवाळणे राजकीय लोकांकडून नेहमी होतंय ते केवळ मतपेटीसाठी. अशा भावनिक मुद्द्यांना हात घातला की लोक आपले खरे प्रश्न विसरून संमोहीत होतात. आणि या पोकळ अस्मितेवर जगत राजकीय लोकांना मते देऊन त्यांना मोकाट सोडतात. लोकांच्या पोकळ अस्मिता कुरवाळल्या की ते वश होऊन आपल्याला मतदान करतात हे राजकीय नेत्यांच्या- पक्षांच्या लक्षात आलं आहे. अशा पध्दतीने निवडून येऊन नेते वास्तवात सगळ्या प्रकारचे ऐषारामी जीवन व्यतीत करत राहतात. आणि आपण काल्पनिक सुखात तुडुंब जगत राहतो. अर्धपोटी का होईना.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा