शनिवार, २३ मार्च, २०१३

भालचंद्र नेमाड्यांचे भाषण



           - डॉ. सुधीर रा. देवरे

         सत्ताविस फेब्रुवारी 2013 ला मराठी भाषा दिनाच्या दिवशी नाशिक येथे भालचंद्र नेमाडे यांना जनस्थान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणातील दोन मुद्दे इतके महत्वाचे आहेत की त्यांची दखल सर्वत्र घेतली जाईल आणि यावर चॅनल्सवरूनही खूप चर्चा होईल असे मला वाटत होते. पण आपण कलावंताला वा साहित्यिकाला कसे गांभिर्याने घेत नाही, हेच मराठी वर्तमानपत्रांसह मिडियाने दाखवून दिले. अशी सर्वत्र शांतता पाहून या मुद्द्यांवर मी येथे मुद्दाम लिहीत आहे. नेमाडे यांचे त्या भाषणातील दोन मुद्दे असे:
         एक: महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना ब्राम्हणांनी मुसलमानांविरूध्द वापरून घेतले. मराठ्यांनी ब्राम्हणांविरूध्द वापरून घेतले. शिवसेनेने दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीयांविरूध्द वापरून घेतले. मात्र शिवाजी महाराजांचे अनेक विश्वासू मुसलमान मित्र होते, तरीही बिचारे मुसलमान शिवाजी महाराजांना वापरून घेण्यात कमी पडले.
         दोन: रामाने सीतेचा अपमान केला. सीतेवर संशय घेऊन टाकून दिले. यामुळे अशा अन्यायी राजाचे मंदिर होऊ नये म्हणून आधी सगळ्या महिलांनी अयोध्येतील राम मंदिराला विरोध केला पाहिजे.
         : या भाषणातील हे दोन मुद्दे मला महत्वाचे वाटले. पण ऐकणार्‍यांना आणि मिडियालाही हे भाषण कदाचित विनोदी वाटले असावे म्हणून त्यांनी गांभिर्याने घेतले नाही की काय याची शंका येते. या दोन मुद्यांत मला चाकोरीबाहेरची वैचारिकता जाणवली. केवळ श्रोत्यांना हसवण्यासाठी काहीतरी बोलायचे म्हणून नेमाडे बोलले असे वाटून आपण प्रासंगिक विनोद म्हणून तिथेच हे सोडून दिले की काय? खरे म्हणजे अशा प्रकारचे वास्तव विचार आपल्या पचनी पडत नाहीत म्हणून आपण ते तिथल्या तिथे सोडून सोयिस्करपणे विसरून जातो.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा