- डॉ. सुधीर राजाराम देवरे
१. अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम
त्याचा मुलगा मित्राच्या शेततळ्यात पोहायला गेला होता. बुडून वारला. समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. विश्वासच बसेना. काय करावं सुचेना. कसं रडावं? शब्द फुटेना. हंबरडा आतल्याआत थिजलेला. त्याला शोक व्यक्त करता येईना. हातपाय गाळून बसला. लगेच समाजानं टोचत त्याला कार्यक्रम उद्युक्त केलं.
मोबाईलमधून त्यानं नातेवाईकांचे नंबर काढत फटाफट फोन केले. नातेवाईकांसोबत उभं राहून अंत्ययात्रेची तयारी केली. लाकूड, मीठ, घासतेल, तूप, मुरमुरे सर्व विकत घेऊन स्मशानात पोचवायची व्यवस्था केली. कापड आणलं. कुवारा मुलगा वारला म्हणून रुईशी लग्न लावायला ब्राह्मण आणला. पीएम करुन आणताच मुलाची अंघोळ घालून- लग्न लावून अंत्ययात्रा काढली. गल्लीनं मिरवत अमरधामात अग्नी द्यायचा कार्यक्रम साजरा झाला.
दुसर्या दिवशी सकाळी राख सावडण्याचा कार्यक्रम. दारावर येणार्या लोकांसमक्ष रडून शोक प्रदर्शनाचा कार्यक्रम. दहाव्याला डोक्याचे केस काढण्याचा कार्यक्रम. गंधमुक्तचा कार्यक्रम. नातेवाईकांना पंगत देण्याचा कार्यक्रम. अकराव्या दिवशी अकरा सवाष्णी जेऊ घालण्याचा कार्यक्रम. बाराव्याला दिवस म्हणतात. दिवसाला पुन्हा नातेवाईक- मित्रांना जेऊ घालण्याचा कार्यक्रम.
महिण्याचा पित्तर म्हणजे जेवणच. बारा महिने होईपर्यंत दर महिन्याला पित्तरांचं जेवण. शेवटी मुलाचा वर्षाचा पित्तर. वर्षश्राध्द. म्हणजेच पुन्हा जेवणाचा कार्यक्रम करुन बाप विसावणार.
बाप रे! दम लागून आला. मुलाच्या मृत्यूनंतरचे पारंपरिक कार्यक्रम करत बाप पार थकून गेला.
- कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळं- ताणामुळं- कार्यक्रमांसाठी पैशांच्या कडकीमुळं- लोकसहभागामुळं- जेवणावळींच्या पक्तींमुळं मेलेल्या मुलाचा बाप, मुलगा वियोगाचं दु:ख सहज विसरुन जाईल, असं समाजाला प्रामाणिकपणे वाटत राहिलं.
*
२. कार्यक्रम
‘हॅलो’
‘हां बोला’
‘माझी आई वारली’
‘अच्छा, कार्यक्रम केव्हा आहे?’
*
३. मंदिरात
तो तेरा वर्षाच्या चिमुरडीला म्हणाला,
'मंदिरात येतेस का?'
छकुली रागाने फुत्कारली,
'काका, काय हो हे! शोबतं का तुम्हाला!'
(दिनांक : 13-04-2018, संदर्भ : कथुआ, जम्मू काश्मीर)
*
४. पायांशिवाय
पायांशिवाय पायर्या चढायच्या...
*
५. पाया
एका माणसाला गावात घर बांधायचं होतं. आपल्या जागेची (प्लॉटची) त्याने साफसफाई करुन काटेकोर मोजून घेतली. घर मजबूत उभं रहावं म्हणून जमिनीत खोल पाया खोदला. पाया भरुन ओटा (प्लींथ) तयार केला.
भिंती बांधायला सुरुवात केली. लेंटल टाकली. वर पुन्हा भिंती बांधल्या. स्लॅप टाकला. वर पॅरॅफिट बांधलं. बाथरुम- टॉयलेट वगैरेही. घराच्या आतून गिलावा (प्लॅस्टर) करून घेतला. फरशी बसवून घेतली. हे सगळं आर्थिक ताण सोसता येईल तसं दीड वर्ष चाललं.
फरशी बसवून होण्याच्या दिवशी संध्याकाळी या माणसाचा शहरातला भाऊ गावात आला. घराजवळ येऊन माणसाला म्हणाला, ‘इतके दिवस लागतात? उद्यापासून मी बघतो. तू येऊ नको इकडे.’
दुसर्या दिवशी शहरातल्या भावाने दारे- खिडक्या आयते आणून घराला बसवले. घराला बाहेरुन गिलावा करुन घेतला. घराच्या चौकटीवर देवाची टाईल बसवली. दोन दिवस पाणी मारलं. पेंटर आणून आतून बाहेरुन रंग देऊन घर चकचकीत करुन घेतलं.
आणि गल्लीत उभं राहून तो ज्याला त्याला ओरडून सांगू लागला, ‘माझा भाऊ या घराचं काम दीड वर्ष करत बसला. मी पंधरा दिवसात करुन दाखवलं!’
तात्पर्य, ज्याच्या त्याच्यावर (म्हणजे कथा वाचकावर) सोपवलेलं बरं...
*
६. देढगुजरी भाषा
दूर देशीच्या दोन गारूडींच्या नादी इथले तीन माठे लागले. गारूडी पुंगी वाजवायचे, डमरू वाजवायचे, टोपली दाखवायचे. आणि ते दोन ह्या तिघांसाठी गळ लावत आपसात म्हणायचे, ‘‘ह्या नावांढगा एंडरकोचा यमुरदा फारदा एक्करदा!’’ ऐकून न समजूनही तिघे आलटून पालटून मेंढूळ सरपटून संमोहित व्हायचे. आणि शेपटीकडून पळावं की तोंडाकडून, ते न कळून बर्याचदा जागच्याजागी वळवळत तात्काळ उत्तरायचे, ‘‘एस सर, जी जी!’’ गारूडी ह्या माठ्यांची पाठ थोपटायचे. सगळंच काम सांगता सोपवता ‘सू करानी छे’ हे पण सांगायचे. हाताच्या ओंजळी पुढं करत हे तिघे तात्काळ उत्तरायचे, ‘‘एस सर, जी जी!’’ गारूड्यांच्या शाबासकीसाठी हे माठे रोज उतावळे व्हायचे. भरलेल्या टोपल्यांसह पाठ थोपटून घेण्यासाठी पुढं तिघांचे तीनशे झाले...
...दोन तीन वर्षांतच टोपल्या जाऊन टपल्या खात तिघांसहीत तीनशे तण्याठालटमें भरती करावे लागले! त्यांची देढगुजरी भाषा आता कोणालाच कळत नाही!
*
७. अस्मिता
ती घरातून बाहेर पडताना नवर्याला म्हणाली, ‘मत मालूला देऊ ना?’
तो म्हणाला, ‘साधूला दे.’
ती म्हणाली, ‘साधू, ना ओळखीचा ना पाळखीचा ना सामाजिक कामाचा. गुन्हेगारही आहे तो. मालूला देते.’
तो म्हणाला, ‘मालू, जातीची ना पातीची ना धर्माची. साधूलाच दे.’
ती घुटमळत मनधरणी करत म्हणाली, ‘पण माझी मैत्रीण आहे. लोकांवर जीव ओवाळून कामं करणारी आहे. शिकली सवरलेली ज्ञानी आहे. मग कोणाला देऊ नक्की?’
तो ठामपणे म्हणाला, ‘साधूलाच दे. कामं करणार नसला तरी जाती- धर्माचा माणूस पाहिजे! ती शिकलेली बाई काय कामाची? माणसानं कसं अस्मितेनं जगलं पाहिजे!’
*
८. मुलगा आणि मुलगी खूप फरक पडतो
नाशिक पासून सव्वाशे किलोमीटरवर एक खेडं. त्या खेड्यातल्या मुलीला बारावी सायन्सची सीईटी द्यायची होती. मुलीला भाऊ नाही. बाप अंध. आईला शहरातलं काहीच कळत नाही अशी अडाणी. सीईटी परीक्षेसाठी नियोजन असं होतं :
: नुकताच लग्न झालेला एक तरूण नातेवाईक नाशकात राहतो. त्याच्याकडे आई आणि मुलगी आदल्या दिवशी मुक्कामाला जाणार होती परीक्षेसाठी. त्याच दिवशी गेली असती तर परीक्षा सापडणार नव्हती.
पण सीईटीच्या दोन दिवस आधी त्या तरूण नातेवाईकाची बायको अचानक माहेरी गेली. आता मुलीच्या आईला आणि मुलीला पेच पडला, त्या तरूणाच्या घरी आपण मुक्कामाला जायचं कसं? तो एकटा. त्याच्या बायकोला काय वाटेल? तरूणाच्या आईबापांना समजेलच, त्यांना काय वाटेल? बाप म्हणाला, ‘मी येतो सोबत, आपण हॉटेलवर राहू.’ मुलगी नाही म्हणाली. ‘मी परीक्षा देऊ का तुमची काळजी करत राहू. बाहेर कसं थांबाल?’ आई आणि मुलीला पाठवून हॉटेलला रहायला सांगणंही त्याला जोखीम वाटली.
तरूणाच्या मनात पाप नाही. आपल्या मनात काही नाही. पण हा मनाचा खेळ चालला लोकलाजेस्तव. नातेवाईक काय म्हणतील? कोण कोण काय काय म्हणेल? अमूक काय म्हणेल? बाप मनात म्हणाला, मुलगी ऐवजी मुलगा असता तर आदल्या दिवशी एकटा जाऊन राहिला असता त्याच्या रूमवर. कोणी काहीही बोललं नसतं. कोणी शंका घेतली नसती!
आजपर्यंत आपण मुलगा आणि मुलगी भेद मानला नाही. पण प्रत्यक्षात किती मोठा फरक पडतो, हे आज कळलं!
(‘हंस’ दिवाळी अंक, २०२५ मध्ये प्रकाशित ८ अलक. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/