रविवार, ११ नोव्हेंबर, २०१२

तिकडे कोण आहे ?



                                  - डॉ. सुधीर रा. देवरे
 

         सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक विलास सारंग हे मूळचे मराठी असल्याने त्यांनी मराठीतही बरेच लिखाण केले आहे. आपल्या सोलेदाद या कथासंग्रहात त्यांनी टेलिफोनवर एक कथा लिहि‍लीय. या कथेचा गोषवारा असा: या कथेचा नायक एका खोलीत बंदिस्त आहे. त्या खोलीत एक रिसिव्हर ऑफ टेलिफोन असून त्या रिसिव्हरवर तो कायम वावरतो, इतका तो नायक लहान आहे. (लहान असणे हे येथे प्रतिकात्मक आहे. यंत्राच्या आहारी गेलेला माणूस, म्हणून तो लहान व यंत्र मोठे.) माऊथपिस मधून हॅलो केल्यावर तिकडून कोणी बोलतं का ते ऐकण्यासाठी तो एअरपिसकडे पळत येतो आणि उत्तर ऐकतो. पुन्हा बोलण्यासाठी माऊथपिसकडे येतो. त्याच्याशी तिकडून कोणीतरी केव्हातरी बोलतं. काही वेळा कोणी बोलत नाही. असे करून थकला की तो रिसिव्हरवर झोपून जातो. बस एव्हढचं त्याचं आयुष्यभर काम. आणि एक दिवस तो या टेलिफोनवरच मरून पडतो.
         ही कथा ज्यावेळी म्हणजे ज्या काळी विलास सारंग यांनी लिहिली तेव्हा भारतात मोबाइल फोन नव्हते. टेलिफोनही क्वचित होते, घरोघरी नव्हते. फेसबुकचा शोध तर फार अलिकडचा म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वीचा, पण तेव्हा सर्रास इंटरनेटही वापरले जात नव्हते. म्हणून चॅटींगचा प्रश्नच नव्हता. ज्यांच्याकडे टेलिफोन होता तेही त्यावळी गप्पा मारण्यासाठी टेलिफोचा वापर करत नसावीत. अशा काळी आजच्या चॅटिंग विश्वावर प्रकाश पडावा इतकी महत्वपूर्ण गोष्ट त्यांनी लिहिलीय.
         आज संपूर्ण जग आंतरजालाने जोडले गेलंय. घरबसल्या आपण अमेरिकेतल्या माणसाशी समोर बसल्यासारखे बोलू शकतो. माणसाला आपल्या माणसाशी सहेतूक बोलण्याची जशी ओढ असते तशी अनोळखी माणसाशी अहेतूक मैत्री करायलाही आवडते. आजच्या आपल्या आजूबाजूच्या या प्रचंड गर्दीतही माणूस एकटा पडत चालला. त्याला प्रत्यक्ष नसले तरी आभासी नाते जोडावेसे वाटते. या जाळ्यात तो दिवसेंदिवस अडकत चाललाय. आज असे अनेक लोक दिसतील की दिवसातील बारा बारा तास नेटवर सापडतात. ते कशासाठी, हे त्यांनाही माहीत नाही. इतके तास केवळ चॅटींग मध्ये जे लोक घालवत असतील त्यांना हे व्यसन जडले असे म्हणायला जागा आहे. पण जे लोक बिझी आहेत ते ही काम करून थकव्याचा निचरा करण्यासाठी ‍िदवसातून एक तास का होईना चॅटिंग- सर्फींग करत राहतात. याचे कारण तिकडे - पलिकडे त्या आभासी जगात कोण आहे? हे जाणून घेण्याची ओढ माणसाला उपजत असते. या अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारण्यात त्याला आनंद मिळू शकतो. यातून कोणतीही उत्पादकता नाही, काहीच हाती लागण्याची शक्यता नाही, प्रत्यक्ष जीवनात यातला कोणी भेटत नाही, हे त्याला माहीत असूनही यातून केवळ आभासी का होईना माणसे माणसांना अजमावण्याचा प्रयत्न करत राहतात. ही बाब ठराविक मर्यादेपर्यंत नैसर्गिक मानली तरी तिचे रूपांतर व्यसनात होणारच नाही याची खात्री कोणाला देता येत नाही. या यंत्राच्या आहारी गेलेला माणूस लहान तर यंत्र मोठे होत जाते. आणि हे साधन म्हणजे यंत्र त्याच्यावर हुकूमत गाजवू लागते.
         विशिष्ट हेतू मनात ठेऊन चॅटींग करणारे, वड्याचे तेल वांग्यावर काढण्यासाठी ब्लॅक मेल करणारे आणि समोरच्याशी आपली वेव्हलेंग्थ तार न जुळण्यामुळे गैरसमजातून मनस्ताप देणारे अनुभवही आपल्याला येऊ शकतात. अशा वेळी हे सोशल नेटवर्कींग, अनसोशल नेटवर्कींग वाटू लागते.
-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा