रविवार, १० जून, २०१२

अस्वस्थ करणार्‍या काही बातम्या


                        - डॉ सुधीर रा. देवरे

 

      एवढ्यात काही बातम्या वाचण्यात आल्या. आपणही वाचल्या असतील. त्यापैकी काही बातम्यांची उजळणी:

बातमी पहिली: दिल्लीतील योजना आयोगाच्या इमारतीतील स्वच्छता गृहाच्या नुतनीकरणासाठी पस्तीस लाख रूपये खर्च झाले.

योजना आयोग म्हणजे काय? देशातील विकासकामांसाठी हा आयोग तरतुदी सुचवतो. या आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलंय की जो मनुष्य दिवसाला 26 रूपये कमवतो त्याला गरीब म्हणता येणार नाही. म्हणूनच जो मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर कष्टाने स्वत:चा दहा लाखाचा फ्लॅट घेऊ शकणार नाही वा घर घेऊ शकणार नाही त्या देशातील योजना आयोग पस्तीस लाखात स्वच्छतागृहाची दुरूस्ती करतो.

 बातमी दुसरी: श्री क्षेत्र शनीशिंगणापूर येथील स्वयंभू शनिमुर्तीला एका शनिभक्ताने देवाच्या मुखवट्यासह साडेचार किलो सोन्याचा मुकूट अर्पण केला. या शनिभक्ताने नावाबाबत गुप्तता ठेवली आहे. ( बातमी, लोकसत्ता, 3 जून 2012, पहिले पान. मुकुटासह बातमी.)

      अशा भक्तांची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे की त्यांच्याकडे एवढी संपत्ती कोणत्या देवाच्या कृपाप्रसादाने येते. बँकांचे राष्ट्रीयकरण झाले तसे मंदिरांचे करावे काय?

        बातमी तिसरी: सोनोग्राफी लिंग गर्भजल चिकित्सा केंद्रांनी सर्वत्र मांडलेला उच्छाद.

      या बातमीचा आवाका  आणि त्याचे क्षेत्रफळ पहाता ही बातमी तात्कालिक नाही. किमान 25 वर्षांपासून अशी तपासणी सर्वत्र होत आहे आणि गर्भपातही. यातील फरक एवढाच की 15 वर्षांपूर्वीपर्यंत अशा तपासणीसाठी नजीकच्या शहरात जावे लागायचे. आणि आता ही सोय आपल्या गावातही आहे. स्त्री मुक्त भारत व्हायला आता फार काळ वाट पहावी लागणार नाही.

       बातमी चौथी : वेगळ्या जातीत वा धर्मात लग्न करायची शिक्षा- मृत्यूदंड. आणि तोही आईबापांकडूनच. नुसते प्रेमाचे संबंध असले तरीही ही शिक्षा अमलात येते.

जास्त प्रमाणात मुलीच मारल्या जातात. काही ठिकाणी दोघांनाही मृत्यू पत्करावा लागतो. जातीसाठी माती खावी म्हणजे मुक्ती मिळेलच.

बातमी पाचवी: एक स्त्री डाकीण असल्याच्या संशयाने एका जोडप्याला वाळीत टाकायचा  एका जात पंचायतीचा निर्णय.

भारतात त्या त्या जातीच्या जातपंचायती गावपातळीवर परंपरागत पध्दतीने अस्तित्वात आहेत. भारतात कायदा अस्तित्वात असूनही असे बेकायदेशीर शिक्षा देण्याचे प्रकार सर्वत्र होत असतात. अजूनही भारतातील सर्वच आदिवासी क्षेत्रात या जात पंचायती न्यायदानाचे कार्य करत त्या जबर शिक्षा देत असतात. पर्ववैमनस्यातून एखाद्याचा काटा काढायचा झाला तर जातपंचायतीचा आधार घेतला जातो. डाकीण काढणे ही तर ढळढळीत अंधश्रध्दा.                          

  बातमी सहावी: भारतात विविध समारंभातून दिल्या जाणाय्रा जेवणावळीत अठ्ठावण्ण हजार करोड रूपयाचे अन्न वाया जाते.

आणि आपण परवडत नाही तरी कर्ज काढून जेवणावळी देत राहू. अनेक लोकांना भुके ठेऊन जेवणावळींचा उत्सव भरवत राहू या.

 

      ...आणि फक्त एवढ्याच बातम्या नाहीत. अशा बातम्या यापूर्वी होत्या. आता आहेत. यानंतरही बातम्या येतच राहणार आहेत. आपण काय करणार? हीच ना ती हताश प्रतिक्रिया? नाही. आपण खूप काही करू शकतो.

 

- डॉ सुधीर रा. देवरे

         sudhirdeore29@rediffmail.com

२ टिप्पण्या:

  1. अस्वथ करणार्या या बातम्या !!! एकत्र वाचताना स्वातंत्र्य व लोक्शाही ,समानता ,सहिश्णूता अशा अनेक बाबतीत प्रश्नच उभे राहातात !!!

    उत्तर द्याहटवा