शनिवार, २३ जून, २०१२

ही तर आपल्याच घराला आग ।



- डॉ. सुधीर रा. देवरे

ही फक्त एखाद्या घराला लागलेली आग नाही. एखाद्या हॉटेलला लागलेली आग नाही. एखाद्या इमारतीला लागलेली आग नाही. एखाद्या मॉलला लागलेली आग नाही.  एखाद्या कार्यालयाला लागलेली आग नाही. एखाद्या जंगलाला लागलेली आग नाही. ही आग एका राज्याचा राज्य कारभार जिथून चालवला जातो त्या राजदरबराला लागलेली आग आहे प्रजाहो.
      ह्या आगीत किती लोकांच्या फायली जळाल्या आपल्याला माहीत नाही. या आगीत किती लोकांच्या सेवा निवृत्तीच्या फायली जळाल्या आपल्याला माहीत नाही. या आगीत किती विनंती अर्ज करणार्या लोकांच्या फायली जळाल्या आपल्याला माहीत नाही. या आगीत किती लोककल्याणकारी योजनांच्या फाइली जळाल्या हे आपल्याला माहीत नाही. या आगीत किती स्वप्ने जळालीत आपल्याला माहीत नाही.
आणि या आगीत किती काळे कारनामे जळून खाक झाले हे ही आपल्याला कधीच माहीत होणार नाही. या आगीत जीवंत असूनही किती लोक बरबाद झाले हे आपल्याला मा‍हीत नाही. कारण पुन्हा नवीन कागदपत्रे गोळा करत फाइली तयार करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा अनेक सर्वसामान्य लोक सरकारकडे काही मागणेच बंद करून देतील.
      ह्या आगीत राज्याचे सिंहासन, राज्याचा राजा आणि त्याचे प्रचंड प्रधान मंडळ यांच्या केसालाही धक्का लागलेला नाही. कारण नेहमीप्रमाणेच ते आपल्या सिंहासनात विराजमान नसावेत, हे आपल्या प्रजेचे केवढे मोठे सद्‍भाग्य म्हणावे लागेल. नाव गाव नसलेले पाच प्रेतं सापडलीत हे खरे. पण एवढ्या मोठ्या प्रचंड आगीत फक्त पाच प्रेतांवर निभावले हे काय कमी आहे? लोक तर मरतीलच ना. पण फक्त पाचच लोक कामी आले यातच समाधान व्यक्त केले पाहिजे.
      सर्व बेचिराख झाल्यावर आपत्कालीन व्यवस्थापनाचा बोर्या वाजला म्हणून त्या कर्मचार्यांवर ठपका ठेवत काही निलंबीत करून आपली गादी चालवायला मोकळे होऊ या. कोणाला तरी दोषी ठरवल्याशिवाय ताठमानेने हा राज्यशकट कसा चालवता येईल? म्हणून त्याला इलाज नाही मिस्टर्स सो अँड सो.
      आता झाले गेले ते विसरून काही हजारो करोड रूपये खर्च करून अत्याधुनिक मंत्रालय बांधू या. प्रजा आपल्या खर्चाची काटकसर करत जास्तीचा कर आनंदाने भरेल. कारण अशा कामाला कर नाही द्यायचा तर मग कोणत्या कामाला? आणि ही तर आपल्या घरालाच लागलेली आग आहे. म्हणूनच आपले राजे आणि त्याच्या प्रधान मंडळापर्यंत या आगीच्या झळा आपण पोचू दिल्या नाहीत. कारण एवढ्या मोठ्या राज्याचा राज्यकारभार चालवायला त्यांचे डोके थंड असावे म्हणून एवढ्या मोठ्या आगीत त्यांच्या जनानखाण्याची एसी सुध्दा आपण बंद होऊ दिली नाही काही सेकंद.  

- डॉ सुधीर रा. देवरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा