शनिवार, १४ एप्रिल, २०१८

उन्माद



-   डॉ. सुधीर रा. देवरे

     देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला? बलात्कार (घरात, शेतात, ऑफिसात, रस्त्यावर चालत्या वाहनात आणि आता मंदिरातही), भ्रष्टाचार, हिंसक आंदोलने, अ‍सहिष्णुता (घासून गुळगुळीत झालेला शब्द), शिस्तीने नव्हे, झुंडींनी- कळपांनी हत्यारबंद लोक रस्त्यावर उतरतात. बलात्कारी लोकांच्या (संत- महात्मे- बाबा- बुवांच्याही) समर्थनासाठी लोक आपला जीव ओवाळून टाकतात आणि कायद्याच्या रक्षणासाठी निवडून आलेले लोक हिंसक कळपाचे नेतृत्व करतात!
     जाळपोळ, तोडफोड, हत्त्या, फसवणूक, कटकारस्थान करणारे सत्तेतले पाताळयंत्री मोरखे भुमिगत सूत्रे हलतात. जात, धर्माचा टिळा लाऊन लोक अस्मितेने घराबाहेर पडतात. (आवश्यकता नसतानाही धार्मिक चिन्हे अंगावर मिरवतात.) देशाची लोकशाही धोक्यात आली तरी आपले जात- धर्म टिकले पाहिजेत? ज्या महापुरूषांच्या उद्‍घोषाने आंदोलने केली जातात ते असा धुडगूस खपवून घेतील?   
     राजकारणातून नक्की कोणतं समाजकारण केलं जातं? राजकारण हे सामाजिक कामाचं व्रत आहे का? राजकारणाचा समाजकारणाशी संबंध तरी उरला काय? राजकारणाला प्रचंड व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी? जात- धर्म धोक्यात आल्याच्या घोषणा देणारे लोक आपलं माणूसपण कुठं गहान ठेवतात! मानव असण्यापेक्षा विशिष्ट जाती-धर्माचं असणं अस्मितादर्शक ठरू शकतं का?
     घरांपासून चालत्या वाहनांपर्यंत दिसणार्‍या रंगीबेरंगी झेंड्यांत अशोकचक्राचा तिरंगी कुठं आहे? (‍वर्षांतून दोन वेळा सरकारी कार्यालयांवर वाजत गाजत फडकवण्यासाठी राखीव ठेवण्यात आला का?) व्होटबँक वाढते म्हणून दिवसाढवळ्या भर रस्त्यांवर निर्लज्जपणे माणूस मारण्याचे थेट प्रयोग सुरू आहेत!
     देशातला मतदार म्हणून नव्हे, देशाचे नागरिक म्हणून... लोकहो जागे व्हाल? लोकशाही धोक्यात आली आहे! हा उन्माद माणूसपण संपवणारा आहे! तुमच्या आदिम रानटी टोळ्या होऊ नयेत! म्हणून सावधान!
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा