शनिवार, ११ मे, २०१३

कुठे गेली मानव जातीबद्दलची कळकळ




-         डॉ. सुधीर रा. देवरे


         इथे विशिष्ट जातीच्या प्रेमाने का लिहिले जाते वा एखाद्या जातीबद्दल प्रेमाने लिहिताना दुसर्‍या जातीचा व्देश का दिसतो काही लोकांच्या लिखाणातून. तसेच एखाद्या धर्मावर आपुलकीने लिहिताना दुसर्‍या धर्माबद्दलची नफरत का दिसते आपल्या विचारातून. एखाद्या ऐतिहासिक पुरूषावर लिहिताना दुसर्‍या ऐतिहासिक पुरूषाला आपण कमी का लेखतो. एखाद्‍दुसरा तसा संदर्भ आला तर आपण तो का झाकपाक करतो वा नाकारतो?
         अंधश्रध्देवर लिहिले तर तो धर्मावर प्रहार असतो का? राजाराम मोहन राय यांनी सतीची चाल बंद केली म्हणजे त्यांचा इथल्या धर्माला विरोध होता का? महात्मा फुल्यांनी बहुजनांना आणि‍ स्त्रियांना शि‍क्षणाची दारे उघडली म्हणून तो धर्मावर आघात झाला का? आगरकर सुधारक होते म्हणून ते काही धर्माविरूध्द होते का? बालविवाह बंद झाले म्हणून धर्म बुडाला नाही. विधवा विवाह सुरू झाले म्हणून धर्माला कोणी वाईट ठरवले नाही. आज कोणी परंपरेतील भोंदूगिरीवर प्रहार करत असेल तर तो धर्माविरूध्द आहे असे का म्हटले जाते. धर्मातील अनिष्ट गोष्टी दूर करणे हे आपले कर्तव्य आहे. ह्या अनिष्ट गोष्टी खर्‍या धर्माचे अंग नसतात. कोणीतरी आपल्या स्वार्थासाठी त्या नंतर घुसडलेल्या गोष्टी असतात. म्हणून सगळ्या हिनकस गोष्टी नाकारणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते.
         आपल्या विचारात अखिल मानव जातीबद्दलची कळकळ का नाही दिसत. आपण फक्त विशिष्ट जातीची, विशिष्ट धर्माची, विशिष्ट गटाची, विशिष्ट पक्षाची बाजू घेत का लढत राहतो आयुष्यभर. विशिष्ट व्यक्तिला विभूती ठरवून व्यक्तिपूजेचे स्तोम का माजवत राहतो आपण. या व्यक्ती म्हणजे तथाक‍थित आजचे संत असोत, आजचे राजकीय पुढारी असोत की होऊन गेलेले ऐतिहासिक पुरूष असोत. या सगळ्यांतून आपण बाहेर पडलो नाहीत तर आपले भवितव्य कठीण आहे.


-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा