शनिवार, ६ एप्रिल, २०१३

मंदिरांची मांदियाळी



                                      - डॉ. सुधीर रा. देवरे

         आज सगळीकडे नवनवीन मंदिरे उगवताहेत. माणूस जसजसा आधुनिक होतोय तसतसे त्याच्या भोवताली मंदिरेही वाढू लागलीत. साधी आणि छोटी मंदिरे तर वाढत आहेतच पण पंचतारांकीत मंदिरेह प्रंचड प्रमाणात वाढताहेत. प्रतिमंदिरे- प्रतितिर्थक्षेत्रेही वाढताहेत. म्हणजे प्रतिशिर्डी- प्रतिबालाजी वगैरे. या प्रतिमंदिरातही मूळ मंदिरांइतकीच भक्तांची गर्दी होतेय हे ही विशेष.
         मंदिरांमागे फक्त भक्ती ही एकच एक गोष्ट आहे असे समजायचे कारण नाही. पुणे- मुंबंईसारख्या शहरात जागेचा कब्जा करण्यासाठी मोक्याच्या रस्त्यावर वा कोपर्‍यांवर मंदिरे उभारण्याचा पर्याय असतो. मंदिरांच्या आडोश्याने जागेवर आपले बस्तान बसवता येते. आणि मोठ्या मंदिरांची निर्मिती म्हणजेच एक नवीन उद्योग सुरू करणे.       
         अगदी तालुका पातळीवरील शहरात नवीन उपनगरे तयार होत आहेत. या नवीन शहर आराखड्यात नियमानुसार मोकळी जागा- ओपन प्लेस सोडावी लागते. या ओपन प्लेसचा उद्देश सर्वत्र सिंमेंटचे जंगल न दिसता या जागेत थोडी हिरवळ असावी. आजूबाजूच्या लोकांना जरा मोकळी हवा मिळावी. मुलांना तिथे खेळता यावे. संध्याकाळी लोकांना त्या जागेत येऊन मोकळा श्वास घेता यावा अशा उद्देशाने त्या मोकळ्या जागा सोडण्याची योजना असते. मात्र या बहुतांश मोकळ्या जांगांमध्ये जागा मालक वेगवेळ्या देवांची मंदिरे वा स्मारके उभारून ती जागा वेगळ्या प्रकारे आपल्या कबजात ठेवतात. (तसेही करता आले नाही तर कुठले तरी सांस्कृतिक-सामाजिक मंडळ स्थापन करून ती संस्था नोंदणी केली की त्या संस्थेच्या कार्यालयाला ती जागा देता येते.)
         मंदिरातून ठेवलेल्या दानपेट्या दिवसभरात अगदी सहज भरून येतात. येता जाता लाच देण्याची सवय असलेल्या लोकांना देवाच्या दानपेटीत माणसाला लागणार्‍या लाचेच्या मानाने कमी पैसे टाकूनही पुण्य पदरात पाडता येते. (म्हणजे परमेश्वरा, तुम्ही सुध्दा?)
         आज या मंदिरांच्या मांदियाळीतून वाट काढत जर कोणाला काही चांगले काम करायचे असेल तर तो पुन्हा एखाद्या धार्मिक कार्यातच खर्च करतो अशी ही सगळी गोची आहे. एखादे धार्मिक ट्रष्ट सामाजिक काम करते वा दुष्काळग्रस्तांना मदत करते असे दाखवत असले तरी तुम्ही दानपेटीत टाकलेल्या एका रूपयातून एक पैसाही अशा सामाजिक कामात खर्च होत नाहीत, इतके हे प्रमाण अल्प आहे. खरे सामाजिक कार्य आणि धार्मिकतेच्या नावाने चाललेले कर्मकांड या वेगळ्या बाबी आहेत हेच आज कोणाला कळेनासे झाले आहे.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

२ टिप्पण्या:

  1. आपल्या विद्याव्यासंगाबद्दल वाचले ... आनंद झाला साहेब. पण तुकारामाच्या विठ्ठलाला सुद्धा आपण लाचखोर ठरवीत आहात याचे दुखः तुकारामाला जरूर झाले असेल. इतर धर्मांवर सुद्धा लिहा. मी आपला नियमित वाचक बनेन.

    उत्तर द्याहटवा
  2. Miraghe Sir. mi tukaramacha ani vithalacha bhaktt aahe. varkari sampradayacha abhyasak aahe. aapan vegala arth ghetla. tase mala mhanayche nahi. aapan bolu. thanks so much.

    उत्तर द्याहटवा