शनिवार, ८ डिसेंबर, २०१२

राष्ट्रपिता




-         डॉ. सुधीर रा. देवरे

      काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीने न्यायालयात जन‍हीत याचिका दाखल केली होती की, भारत सरकारने महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी बहाल केली आहे काय? न्यायालयाच्या नोटीशीला केंद्र शासनाने उत्तर दिले, अशी कोणतीही उपाधी बहाल केलेली नाही.
      अशा अनुत्पादित फालतू प्रश्न उपस्थित करायला लोकांना इतका वेळ कसा मिळतो हा खरा प्रश्न आहे. आपल्यापुढे- म्हणजे भारतासमोर रोजचे इतके गहन प्रश्न आ वासून उभे आहेत की ते सोडवायला आपल्याला वेळ नाही. न्यायालयांना भांडणांचा निपटारा करायला वेळ पुरत नाही. आणि आपण कोणाच्या उपाधीची चौकशी करत भलत्याच गोष्टीत शक्ती खर्च करत आहोत. त्यानंतर चर्चेला ऊत येऊन कोणी म्हटलं, कायद्याने ती उपाधी महात्मा गांधींना बहाल करण्यात यावी, तर काहींनी यादीच तयार करून टाकली की, राष्ट्रपिता अजून कोणाकोणाला म्हणता येईल.
      यावर वेगळे भाष्य न करता राष्ट्रपिता नावाची माझी कविता उदृत करतो :
राष्ट्रपिता
राजेंद्र प्रसादांना जसे राज्यघटनेचे शिल्पकार म्हणता येणार नाही
पंडीत नेहरूंना जसे पोलादी पुरूष म्हणता येणार नाही
सावरकरांना जसे लोकमान्य म्हणता येणार नाही
आणि टिळकांना जसे स्वातंत्र्यवीर म्हणता येणार नाही
धर्मगुरूंना जसे सुधारक म्हणता येणार नाही
जीनांना जसे महात्मा म्हणता येणार नाही
तात्या टोपेंना जसे छत्रपती म्हणता येणार नाही
‍आणि विवेकानंदांना जसे नेताजी म्हणता येणार नाही
टागोरांशिवाय कोणत्याही व्यावसायिक भगव्या बुवाला
जसे गुरूदेव म्हणता येणार नाही
तसे महात्मा गांधींशिवाय कोणालाही
राष्ट्रपिता म्हणता येणार नाही.
कारण जनमानसात रूजलेली आद्य प्रतिमा
कायद्याने बदलता येत नाही...

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

२ टिप्पण्या: