रविवार, २ डिसेंबर, २०१२

बोलीभाषा: काही समज काही आक्षेप


                                                  -डॉ. सुधीर रा. देवरे

डिसेंबर दोनहजार अकरा मध्ये झालेल्या नाशिक येथील चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनातील परिसंवादातील माझ्या अध्यक्षिय भाषणावर नंतर जे मला खाजगीत प्रश्न विचारले गेले वा काही अभ्यासकांकडून आक्षेप घेतले गेले, त्या आक्षेपांवरील उत्तर म्हणजे हा लेख. मात्र हा संदर्भ काढून टाकला तरी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहेच. भाषण अहिराणी भाषेतच का? मराठीत का नाही हा सुध्दा त्यात एक प्रश्न होता. बोली भाषांबद्दल सर्वसामान्यांमध्ये किती पराकोटीचे अपसमज पसरलेले आहेत, हे यावरून लक्षात आले. कोणी बोलून दाखवतं तर कोणी बोलत नाही एवढेच. म्हणून कोणतीही बोली भाषक नसलेल्या वाचकांसाठी आणि सगळ्याच बोलीभाषांबद्दल कोणाचाही आकस निर्माण होऊ नये यासाठी हा लेख मी मुद्दाम लिहीत आहे.
      अनेक लोकांचे बोलीभाषेबद्दल काही समज आहेत. काही अपसमज आहेत. समाजात फक्त प्रमाणभाषा असाव्यात. बोलीभाषा नकोत. भाषा जेवढ्या कमी असतील तेवढे दळणवळण सुलभ होईल असा त्यांचा भाबडा समज असतो. एक देश एक भाषा असा नाराही एकेकाळी गाजला आहे. आपली भाषा सोडून इतर भाषा वा बोलींबद्दल असे मत मांडणे अशा एखाद्या तथाकथित अभ्यासकाला शोभून दिसेल, ज्या अभ्यासकाचा एखादी बोली बोलणार्या लोकांशी कधी कोणताही संबंध येत नाही. त्या बोलीतले अपरिहार्य लोकजीवन त्या अभ्यासकाला मा‍हीत नसते. तरीही त्यांनी प्रमाणभाषाच बोलावी असा आग्रह असतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तिला वा गटाला एका विशिष्ट बोली व्यतिरिक्त कोणतीही भाषा बोलता येत नाही आणि तरीही ती भाषा वाळीत टाकली जाते व त्या गटाला विशिष्ट भाषा बोलायला वा शिकायला भाग पाडले जाते, तेव्हा ही माणसाच्या अस्तित्वालाच सुरूंग लावणारी घटना ठरते. कोणीतरी आपली जीभ कापून टाकतंय असा हादरवून टाकणारा हा अनुभव असतो.
विशिष्ट भौगोलिक परिसरातल्या बोली त्या क्षेत्रातील प्रमाणभाषा बोलणार्या लोकांना थोड्याफार कळतात. अहिराणी भाषा सुध्दा अनेक मराठी लोकांना कोणत्याही अडचणीशिवाय कळते. काही पारिभाषिक शब्दांची अडचण येऊ शकते, प एकूण मथितार्थ कळतो. मी संपादित करीत असलेले अहिराणी माध्यमातील ढोल आणि माझे अहिराणी लेख, पुस्तके सुध्दा महाराष्ट्रभर आणि बाहेरही सर्व चोखंदळ मराठी वाचकांना समजतात. याचा उल्लेख मी इथे मुद्दाम करीत आहे.
चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनात नाशिकच्या मराठी लोकांनाही माझे अहिराणी भाषण समजावे म्हणून मी भाषणाची रचना सोप्या अहिराणीत केली होती. आता सोपी अहिराणी म्हणजे काय यावरही नवा आक्षेप येण्याची शक्यता असल्याने त्याचे स्पष्टीकरण आताच देऊन ठेवतो. जशी सोपी मराठी, अवघड मराठी; सोपी हिंदी, अवघड हिंदी; सोपी इंग्रजी, अवघड इंग्रजी; अशी आपण वर्गवारी करतो त्या अर्थाने सुलभ अहिराणी ही संज्ञा मी येथे वापरतो आहे.
      दुसरे उदाहरण देतो. राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन नाटकातील भाषा मराठी आणि ग. दी. माडगूळकर यांच्या कवितेची भाषाही मराठी. एक समजायला कठीण. दुसरी समजायला सोपी.
      भाषा ह्या प्रवाहासारख्या असतात. प्रवाहात नदीचे पात्र जसे पुढे विस्तृत होत जाते तसे भाषेचे असते. भाषा एकच असली तरी आजची भाषा कालच्या भाषेपेक्षा वेगळी असते. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरांची मराठी, शिवाजी-तुकाराम यांची मराठी, ज्योतिराव फुल्यांची मराठी, चिपळूणकरांची मराठी आणि आजची मराठी यांत जसे साम्य नाही तसे अहिराणीत आज आदिमपण दिसणार नाही. तसे कोणत्याच बोलीभाषेत आदिमपण दिसणार नाही.
आदिम, प्राचीन, आर्ष या संज्ञा मी अहिराणीच्या वा कोणत्याही बोलीभाषेच्या संदर्भात वापरत नाही. माझ्या लेखाचा तो कधी विषय सुध्दा करत नाही. पण मध्यंतरी एका अभ्यासकाने अहिराणी ही आदिम बोली आहे का हा प्रश्न मला विचारला होता. माझ्या कोणत्याही लेखात  तसा उल्लेख नसताना. अहिराणीच नव्हे तर बहुतेक बर्याच बोली या आदिम आहेत. नैसर्गिक क्रमानुसार आधी बोली निर्माण होतात आणि मग प्रमाणभाषा. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील एकमेकांना लागून असलेल्या विविध बोलींच्या सरमिसळ मानवी व्यवहारातून प्रमाणभाषा निर्माण होत असतात.
आज भाषेतील फक्त शब्दांचे आदिमपण सांगता येते. संपूर्ण भाषेचे आदिमपण दाखवता येत नाही. कारण अनेक भाषांच्या आदान प्रदानातून सगळ्याच भाषा एकमेकांना पुरक होत राहतात. मी ज्या अभ्यासकाचा उल्लेख केला त्यांनीच, संस्कृत आदिम भाषा आहे हे सांगताना  संस्कृत मधील विष्णु हा असा एकच शब्द सांगितला की ज्याची व्युत्पत्ती सांगता येत नाही. आणि संस्कृत मधील या एका शब्दाची व्युत्पत्ती सांगता येत नाही म्हणून त्यांच्या मते संस्कृत ही समग्र भाषा आदिम ठरते. अहिराणीचे आजही असे शंभर शब्द सहज सांगता येतील की ज्यांची व्युत्पत्ती लावता येत नाही. त्या शब्दांचे नैसर्गिक स्त्रोत दाखवता येत नाहीत. तरीही अहिराणी ही आदिम भाषा आहे असा दावा करणे मी अप्रस्तुत समजतो.
अहिराणी भाषेत प्रचलित मराठी शब्दांचे अवशेष-रूपे दिसतात, हे खरे आहे. आज अहिराणी बोली बोलणारे लोक पहिलीपासून मराठीत शिक्षण घेतात. त्यामुळे अहिराणी मध्ये मराठी शब्द आज प्रंचड प्रमाणात रूढ झालेत. जेव्हा एखादी बोली प्रमाण भाषेच्या प्रभावाखाली येते तेव्हाच तिचे अर्वाचिनीकरण होणे सुरू होते. शब्द, व्याकरण आणि लिपीही प्रमाणभाषेकडून उसने घेतले जातात. अहिराणीला स्वतंत्र लिपी नसल्याने जसे माझे अहिराणी लेखन मराठी म्हणजे देवनागरी लिपीत लिहिले. उपलब्ध मराठी लिपीत अहिराणी लिहिल्यामुळे तिचे दृश्य रूपच मराठी दिसते तर मग ती आदिम कशी वाटेल? आणि ती आदिम आहे की नाही यावर चर्चा कशासाठी?
भाषेत जसे शब्दांचे आदान प्रदान होत राहते तसे व्याकरणाचेही होत असते. याचे एकच उदाहरण देतो. मराठी व्याकरणानुसार वाक्याची सुरूवात आणि या संज्ञेने होत नाही. आणि ही संज्ञा वाक्याच्या मधे येत असते. पण इंग्रजी व्याकरणानुसार वाक्याची सुरूवात (अँड) आणि ने होते. मात्र अलिकडच्या काळात मराठीतही आणि ने सुरूवात होणारी वाक्य लेखकांकडून सुध्दा सहज लिहिली जातात. संशोधनात्मक प्रबंधांतही अशी वाक्य येत आहेत. हे इंग्रजी भाषकांकडून व्याकरणाचे आदान आहे. याचा अर्थ मराठी भाषेला इंग्रजी व्याकरण आहे असे जसे म्हणता येणार नाही तसे अहिराणीला पूर्णपणे मराठी व्याकरण आहे असे म्हणता येणार नाही.    
ज्या प्राचीन भाषा इतर भाषांच्या संपर्कात आल्या नाहीत त्यांचे आदिमपण आजही टिकून आहे. उदाहरणार्थ, आंदमान बेटावरील जारवा या आदिम माणसांची भाषा आज आदिम- प्राचीन-आर्ष म्हणता येईल. कारण जारवा ही जमात इतर लोकांच्या संपर्कात अजूनही आलेली नाही. ज्या बोली इतर भाषांच्या संपर्कात आल्या त्यांचे प्राचीनत्व त्यांच्यातील काही शब्दांवरून ठरवता येते. भाषेवरून नाही.  
      जिथे शब्द फक्त हुंकाराचे काम करतात अशा प्राचीन भाषांना अगदी सुरूवातीच्या काळात व्याकरण नसते.  मात्र भाषेत वाक्य यायला लागलीत की व्याकरण येतेच. म्हणून प्रत्येक भाषेला व्याकरण असते. बोलीभाषांना व्याकरण नसते हा समज चुकीचा आहे. त्या बोलीभाषेचे व्याकरण आतापर्यंत कोणी लिहिले नसेल, व्याकरण समजून सांगितले नसेल, अथवा त्या भाषेतल्या व्याकरणाचे पुस्तक प्रकाशित झाले नसेल. पण त्या बोलीला व्याकरणच नाही असे म्हणता येणार नाही.
परंपरेने चालत आलेल्या नैसर्गिक लोकबोली वेगळ्या आणि पिजीन - क्रिऑल या कृत्रीम तयार झालेल्या बोली वेगळ्या. बोलीपासून व्यावहारीक प्रमाणभाषा तयार होतात. मात्र पिजीन - क्रिऑल सारख्या कृत्रीम बोली या प्रमाणभाषेपासून तयार होत असतात. उदाहरणार्थ, मुंबईची हिंदी बोली ही अनेक प्रमाणभाषांच्या संकरातून तयार झालेली क्रिऑल भाषा आहे. (काही गुप्त व्यवहारांसाठीही कृत्रीम सांकेतिक भाषा तयार केल्या जातात, त्यांनाही बोली म्हणता येत नाही.)
एक अभ्यासक मला म्हणाले की, बोली सुधारल्या तर मराठी सुधरेल असे तुम्हाला का वाटते? हा प्रश्न ऐकून चक्रावण्याची वेळ आली. असे मी आतापर्यंतच्या माझ्या लिखाणात कुठेच म्हटलेले नाही. बोली मुळीच सुधारायच्या नाहीत. उलट बोली जशा आहेत त्याच स्वरूपात त्या वाचवायच्या आहेत. इतर भाषेतील शब्दांऐवजी मूळ भाषेतील शब्द सापडत असतील तर बोलीत ही दुरूस्ती नक्कीच करायला हवी. बोली वाचवल्या तर प्रमाणभाषा टिकतील आणि सकस समृध्द होतील हे मात्र खरे आहे, जे मी वेळोवेळी म्हटले आहे.
अहिराणी ही अहिर लोकांचीच भाषा आहे, हे कशावरून? हा एक आक्षेप. अभिर लोकांचा एक समूह होता जो नैऋत्य कडून आला, असे इतिहासकारांनी आधीच नमूद करून ठेवलेले आहे. अभिरचा अपभ्रंश नंतर अहिर झाला. अहिर हे एका विशिष्ट जातीचे नव्हते. म्हणून आजही अहिर कुणबी, अहिर सोनार, अहिर लोहार, अहिर शिंपी अशा सर्व जातीत अहिर हे कुळ आढळते. अहिर लोकांची भाषा ती अहिराणी. आणि तेव्हापासून म्हणजे तिच्या उगमापासूनच ती लोकभाषा आहे. अहिराणी ही विशिष्ट जातीची भाषा नाही.
लोकदेव म्हणजे काय हे सुध्दा अनेक लोकांकडून विचारले गेले. पण भाषणातील विवेचनावरून ते सह्ज लक्षात येते. लोकांनी लोकांसाठी तयार केलेला तो लोकदेव. लोकदेव हा लोकांचा साधासुधा देव असतो. लोकांचे अन्न ते त्याचे अन्न. लोकांचे कपडे ते त्याचे वस्त्र. म्हसोबा, आसरा, मुंजोबा, वाघदेव, नागदेव, खांबदेव, पिरोबा, खंडोबा, डोंगरदेव, कन्सरा माउली आदी अहिराणी पट्यातील लोकदेव आहेत. आणि या लोकसंस्कृतीतून लोकभाषा घडत असते.
      शेवटी, एका अभ्यासकाने जे काही म्हटले आहे त्या आक्षेपाला काय उत्तर द्यावे मला सुचत नाही. बोलीभाषा टिकवल्या पाहिजेत, त्या मरू देता कामा नये, त्यांचे संगोपण करणे, त्यांचे डाक्युमेंटेशन करणे, बोलीभाषा बोलणार्या लोकांना समजून घेणे आदी प्रकारच्या सर्व कामाला त्यांनी प्रतिगामी ठरवले आहे. आणि बोलीभाषा मारून प्रमाणभाषेकडे जाणे म्हणजे त्यांना पुरोगामी वाटते. अशी संकुचित टिका याआधी मी कधीच ऐकली नव्हती. पण अशा विचारांचे लोकही आहेत हे लक्षात येत होते. अशा विचारांच्या लोकांनी मराठी भाषेत तरी का बोलावे आणि मराठीत का लिहावे? कारण मराठी सुध्दा महाराष्ट्रापुरती एक बोली भाषाच आहे. या बोलीभाषेत व्यवहार करून प्रतिगामी ठरण्यापेक्षा त्यांनी जागतिक भाषेत म्हणजे फक्त इंग्रजीत व्यवहार करून पुरोगामी असणे इष्ट ठरेल.
      याचे उत्तर कदाचित ते देतील की मराठी ही आमची मातृभाषा आहे म्हणून आम्ही ती उपयोजित करतो. मग वेगवेगळ्या बोली बोलणार्यांची आणि बोलीभाषा जतन करणार्यांचीही तीच भूमिका आहे हे त्यांच्या लक्षात का येत नाही.

(दिनांक ३ व ४ डिसेंबर २०११ ला नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात आयोजित अ. भा. चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनातील अहिराणी बोली: सामाजिक अनुबंध या विषयाच्या परिसंवादातील माझ्या अध्यक्षिय भाषणावर नंतर ज्या प्रतिक्रिया आल्या- काही आक्षेप घेतले गेले. त्यांचे निरसन म्हणजे हा लेख आहे.)
(भाषा आणि जीवन, पुणे, दिवाळी अंक 2012 यात प्रसिध्द झालेला लेख. प्रका‍शन, 10 नोव्हेंबर 2012)
-             डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा