शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

असीम त्रिवेदी आणि ह. मो. मराठे



- डॉ सुधीर रा. देवरे

         साहित्याशी आणि कला जगताशी संबंध असणार्या दोन जणांना एकाच आठवडयात अटक झाली. असीम त्रिवेदी हे व्यंगचित्रकारापेक्षा चळवळे आणि प्रचारक कार्यकर्ते अधिक आहेत. म्हणून त्यांच्या व्यंगचित्रात वस्तुनिष्टपणापेक्षा एक दृष्टीकोन डोकावतो जो सामुहीक पातळीवर मान्य होण्याऐवजी आपल्या गटालाच जास्त भावतो. अशाच उत्साहाच्या भरात हे चित्र रेखाटले गेले असावे जे वादग्रस्त ठरले. या विशिष्ट व्यंगचित्राचे कोणालाही समर्थन करता येणार नाही हे खरे असले तरी हा 124 अ सारख्या देशद्रोही कलमात बसणारा गुन्हा नाही. पहिली गोष्ट म्हणजे अशी याचिका कोणी दाखलच करायला नको होती आणि कोणी केली तरी व्यंगचित्रकाराला योग्य ती समज देऊन सोडायला हवे होते. पण शासन असो की समाज आपण इतके अतिसंवेदनाशिल कसे झालोत की आपल्याला कोणतीही कृती आता देशविघातक वाटायला लागली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य का स्वैराचार अशी चर्चा होऊन या कृतीकडे दुर्लक्ष करायला हवे होते.
         दरम्यान ह. मो. मराठे यांनाही अटक होऊन सुटका झाली. मराठे यांना त्यांच्या कोणत्याही कलाकृतीत म्हणजे पुस्तकात असे असे लिहिल्यामुळे अटक झाली असे नाही. तर त्यांनी एखाद्या धंदेवाईक आणि जातीयवादी राजकारण्यासारखे पत्रक वाटून आपल्यावर ही आपत्ती ओढवून घेतली. म्हणून त्यांच्या अटकेचा अर्थ हा साहित्यिकाच्या अभिव्यक्तीवरील हल्ला असे म्हणता येणार नाही. तरीही मराठेंवर गु्न्हा दाखल व्हायला नको होता. त्यांना अटक व्हायला नको होती. त्यांचे जे विचार होते ते व्यक्तीगत होते. म्हणून तेवढ्यापुरती त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करून हा विषय संपवायला हवा होता.
         त्रिवेदी आणि ह. मो. मराठे या दोघांची अटक निषेधार्ह आहे. यापुढे जरा कुठे काही खट्ट झाले नोंदवा गुन्हा आणि करा अटक असा पायंडा पडू नये. त्रिवेदींना ही अटक हिरो करून गेली. त्यांना भारतभर प्रसिध्दी मिळाली. त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आली. त्याच वेळी मराठेंच्या बाजूने कोणीही उभे राहिले नाही. कारण त्यांनी जे केले होते ते समर्थनिय नव्हते. त्यांना ही अटक मानहानी आणि लहान करून गेली. याचा धडा प्रत्येकानेच घ्यायला हवा.

- डॉ सुधीर रा. देवरे
            (माझा ब्लॉग)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा