शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

विश्व मराठी साहित्य संमेलन


                                         - डॉ सुधीर रा. देवरे


         या वर्षाचे विश्व मराठी साहित्य संमेलन कॅनडातील टोरांटो येथे होणार होते. साहित्य महामंडळाने ते रद्द केले आहे. रद्द करण्याचे कारण आयोजकांकडून त्यांना विमानाची तिकिटे वेळेत पोचली नाहीत हे आहे. बेचाळिस तिकिटे महामंडळाला हवी होती. पैकी एकही तिकिट महामंडळाला कमी चालणार नाही. या बेचाळिस लोकांमध्ये नेमके कोणते साहित्यिक आहेत? पैकी अठरा महामंडळाचे पदाधिकारी, जे आतापर्यंतच्या तिन्ही विश्वसाहित्य संमेलनाला जाऊन आले आहेत. आणि बाकिचे जे कोणी लोक आहेत ते ही महाराष्ट्रातील थोर साहित्यिक आहेत असे महामंडळाला वाटते. आणि हे सर्व लोक या आधीच्या संमेलनांनाही जाऊन आलेले होते. महाराष्ट्रातील चाळीस- बेचाळीस लोक का होईना पण आलटून पालटून संमेलनाला जातील असे नाही. प्रत्येक वर्षी हेच लोक संमेलन गाजवतील. महाराष्ट्रातील बेचाळिस लोक, जे साहित्यिक नाहीत अशांसाठी महाराष्ट्र सरकार तीन वर्षांपासून 25 लाख ते 50 लाख रूपये अनुदान देत आहे.
         महामंडळातील पदाधिकारी, बाकिचे हौशी कुठेही आपली वर्णी लाऊन घेणारे साहित्यिक तेही फक्त बेचाळिस आणि परदेशातील भक्कम आर्थिक परिस्थिती असणारे मराठी लोक यांच्यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन या नावाने हा प्रचंड पैसा खर्च होत आहे. यातून ना मराठी भाषेचे भले होत ना मराठी साहित्याचे. चांगले पुस्तके वाचकांपर्यंत पोचत नाहीत आणि कोणती पुस्तके वाचकांनी वाचावीत हे लेखक आपल्या पुस्तकांशिवाय वाचकाला सांगत नाहीत.
         विश्वसाहित्य संमेलन असो की अ भा म साहित्य संमेलन. जिल्हा साहित्य संमेलन असो की गाव पातळीवरचे साहित्य संमेलन. साहित्यिकांपेक्षा इतर हौशी लोकांनाच त्याचा फायदा होत असतो अ‍ाणि गाव पातळीवरचा कार्यकर्ताही विश्वसाहित्य संमेलनासारखाच गाजण्याचा प्रयत्न करत असतो. अशा सर्व साहित्य मंडळांमध्ये साहित्यिक नावाला आणि हौशी उलाढाल करणारे लोकच मंडळ हायजॅक करताना दिसतात. संमेलनात पैसे देणार्याला आणि धावपळ करणार्या लोकांनाच साहित्यिक ठरवण्याचा प्रयत्न होतो. संमेलनातच नव्हे तर कोणत्याही व्यासपीठांवर टाळ्या खाऊ भाषण करणार्यांना वाचक साहित्यिक म्हणत असतात आणि हा गैरसमज असे हौशी साहित्यिक वाचकांमध्ये जोपासत राहतात. सारांश, जत्रा, उत्सव साजरा करण्यापलिकडे आपण जाऊ शकत नाही आणि अशा उद्योगातून जी तात्पुरती कृतक प्रसिध्दी मिळते तीच साहित्यिक म्हणून प्रसिध्दी आहे असा समज करून आपण वैश्विक साहित्यिक होऊ पाहतो.

- डॉ सुधीर रा. देवरे
            (माझा ब्लॉग)

२ टिप्पण्या: