- डॉ. सुधीर रा. देवरे
महाराष्ट्रात साधारणपणे 65 बोलीभाषा बोलल्या जातात. अधिकतम म्हणजे चार
जिल्ह्यांच्या मोठ्या भौगौलिक क्षेत्रात
अहिराणी बोलली जाते. मालवणी भाषेला राष्ट्रीय पातळीवर
प्रमाण भाषा म्हणून मान्यता आहे. इतर
बोलीभाषांना मात्र अशी मान्यता नाही. जवळपास एक कोटी नागरिक अहिराणी बोलतात. बोलीभाषा दिवसेंदिवस नामशेष होत चालल्या आहेत. त्यातले
प्रवाहीपण साचल्यासारखे झाले आहे. दर पंधरा दिवसाला
जागतिक पातळीवर एक बोलीभाषा मरते.
बोलीभाषेत लेखन करणा-यांची कमतरता आहे. सर्व वाचक ते वाचत नाहीत
हे यामागचे कारण आहे. अहिराणी बोलीभाषा बोलत असूनही
अनेक प्रथितयश अहिराणी लेखक प्रमाण भाषेतच लेखन
करतात. हेच चित्र इतर बोलीभाषांमध्ये पहायला मिळते. सर्व प्रदेशांमध्ये विखुरलेला मराठी वाचक डोळ्यांसमोर ठेवून प्रमाण भाषेत लेखन करावे
लागते. बोलीभाषेला ठरावीक असा वाचक वा प्रेक्षक
उरलेला नाही.
‘ढोल’सारखं अहिराणी भाषेतलं
नियतकालिक पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये गाजलं, पण धुळे-
जळगावसारख्या अहिराणी भागातही दुर्लक्षिलं जातं. हा
विरोधाभास सगळ्याच बोलीभाषांच्या बाबतीत दिसतो. शासकीय नियमानुसार दहा लाख
लोकांपेक्षा अधिक लोक बोलीभाषा बोलतात तेव्हा त्या भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा देण्यात येतो. असा दर्जा मिळाला म्हणजे बोलीभाषेत
साहित्यनिर्मिती व्हायला परिस्थिती पूरक ठरते.
मात्र, जनगणनेत लोक आपली बोलीभाषा ही मातृभाषा म्हणून सांगत
नाहीत अशीही एकीकडे स्थिती आहे. आपली
शैक्षणिक भाषा मातृभाषा म्हणून सांगतात. बोलीभाषेतून साहित्यनिर्मितीबरोबरच
व्यवहारदेखील होणे अपेक्षित आहे. अलिकडे प्रमाणभाषेतून
बोलीभाषा उपयोजित होताना दिसत असली तरी बोलीभाषेतून समग्र कलाकृतीचे लिखाण होताना
दिसत नाही. बोलीभाषांवर संशोधन, संकलन केले
जाते, पण त्या भाषेतून विनोद सोडल्यास ललित, गंभीर
लेखन, कथा, कादंबरी होताना
दिसत नाही.
सर्वच
बोलीभाषांना लिपीचा प्रश्न असतो कारण बोलीभाषा अजूनही मौखिक स्वरूपातच अस्तित्वात
आहेत. त्यामुळे जवळच्या प्रमाणभाषेचा- महाराष्ट्रात देवनागरी
लिपीचा आधार बोलीभाषा लिहिताना घेतला जातो, ज्यात अनेक अडचणी येतात हे देखील बोलीभाषेत साहित्यलेखन न होण्याचे कारण
आहे. वाचकवर्ग मर्यादित लाभत असल्याने अशी
पुस्तके छापायला प्रकाशकही पुढे येत नाहीत म्हणून लेखक प्रमाण भाषेचाच आधार घेताना
दिसतात हे अत्यंत साहजिक असले तरी बोलीभाषेतून
लेखन होणे बोलीभाषा टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे
आहे. आणि जी भाषा आपली मातृभाषा आहे तिच्यात लिहिणे नैसर्गिक ठरेल.
प्रमाण
भाषेत बोलीभाषेतील शब्द वारंवार वापरण्याचे प्रमाण काही
लेखकांच्या लेखनात दिसत असते ही त्यातल्या त्यात एक चांगली आणि जमेची बाजू. त्यामुळे त्या बोलीभाषेबरोबरच प्रमाण भाषादेखील समृद्ध
होते. असे काही चांगले प्रयत्न वगळता
बोलीभाषांमध्ये लेखन होत नाही. बोलीभाषेच्या वापरामुळे त्या त्या ठिकाणची लोकसंस्कृती साहित्यात
खोलवर रुजण्यास मदत होते. त्यामुळे
बोलीभाषा साहित्यात वापरली जाणे आवश्यक आहे.
(दै. दिव्य मराठी, अक्षरा
पुरवणीत दिनांक 18 जुलै 2012 रोजी माझी मुलाखत प्रसिध्द झाली आहे. मुलाखत
प्रियंका डहाळे यांनी घेतली आहे.)
डॉ. सुधीर रा. देवरे मुलाखत : प्रियंका डहाळे
डॉ. सुधीर रा. देवरे मुलाखत : प्रियंका डहाळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा