रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

जेएनयूतला अराज्यवाद (?)





 - डॉ. सुधीर रा. देवरे

      9 फेब्रुवारी 2016 ला दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या घटनेची चित्रफित मी 10 फेब्रुवारीला पाहिली! विद्यार्थ्यांच्या देशाविरूध्द जोशातल्या घोषणा ऐकून खूप अस्वस्थ झालो. दुसर्‍ंया दिवशी विद्यार्थ्यांच्या बाजूने आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या- ऐकल्यात तर अजून चक्रावलो. हा काय प्रकार आहे? काय लिहावे. लिहू का नको वाटले. पण आत खदखदत राहिलो. 10 फेब्रुवारीला दाखवली गेलेली चित्रफित खोटी होती म्हणे. म्हणून सुधारीत 11 फेब्रुवारीला प्रसारीत केलेली चित्रफित पाहिली. घोषणांचा आशय तोच होता. जेएनयूतले काही विद्यार्थी बदलले तरी घोषणा भडकाऊ होत्याच. या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ कोलकत्त्यातील जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पुन्हा तेच केले. रस्त्यावर उतरून जेएनयूतल्याच आक्षेपार्ह घोषणा दिल्या.
            भारत सरकार म्हणजेच भारत देश समजतात की काय असे लोक? भारत सरकार आणि भारत देश यांच्यात फरक करता आला पाहिजे! (सरकार पाच वर्षांत बदलत असतं. शासन स्थिर असतं. आपण सरकार आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांविरूध्द लढू शकतो. भ्रष्ट व्यवस्थेविरूध्दही लढू शकतो. लोकशाहीने आणि भारताच्या संविधानाने दिलेला तो आपला हक्क आहे. पण देशाविरूध्द लढणे माझ्या आकलनापलिकडे आहे!)  केंद्रात अन्य इतर पक्षाचे सरकार असतानाच्या काळात या विद्यापीठात अशा प्रकारचे आक्षेपार्ह कार्यक्रम याआधीही घेण्यात आले आहेत, म्हणून हे अधिक चिंताजनक ठरते. केंद्रात कोणतेही सरकार असो, दहशतवादी वा नक्षलवादी विचारसरणीचा प्रचार आपण कसा सहन करावा? समजा भारतात नव्हे तर उदाहरण म्हणून अमेरिकेच्या काही नागरिकांनी अमेरिकेत अमेरिकेविरूध्द अशा दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या घोषणा दिल्या तरी भारतीय असूनही आपल्याला ती पटणार नाहीत, इतकी ही गोष्ट आक्षेपार्ह आहे. आपल्या खिशातून जो कर जातो त्या करातून हे विद्यार्थी शिकतात. या विद्यापीठातील एका विद्यार्थ्यामागे एका वर्षाला तीन लाख रूपये शासन म्हणजे आपण खर्च करतो. त्यांनी भारताचे तुकडे करण्याची भाषा करावी, हे मी (पुरोगामी असलो तरी) समजू शकत नाही. दहशतवाद्यांचे काम किती सोपे होत आहे पहा.   
      एखाद्या देशात जन्माला येऊन वा एखाद्या देशाचे नागरिकत्व असूनही त्याच देशाच्या बरबादीसाठी स्वत:ला झोकून देत लोकांच प्रबोधन करण याला विशिष्ट बौध्दीक पातळीवर लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणण समजा घटकाभर मान्य केल तरी अशा लोकांनी त्या देशाच्या नागरिकांच्या करातून शैक्षणिक वा अन्य सवलती मिळवण हे त्यांच्या नैतिकतेत बसू शकत का? हा प्रश्न उपस्थित होतो. अशा सवलती त्यांनी प्रथम नाकारायला हव्यात.
            एका विद्यार्थ्याला अटक झाली त्याच वेळी सर्व आरोपींना अटक व्हायला हवी होती. एकाला अटक करून बाकिच्या आरोपी गुन्हेगारांना भूमिगत व्हायला पुरेसा वेळ मिळाल्यान हे प्रकरण जास्त चिघळत गेल. आरोपी गुन्हेगार विद्यार्थी नेमके कोणते ते शोधून त्या सर्वांना पोलिसांनी उशीरा का होईना एकाच वेळी ताब्यात घ्यायला हव होत. अटक केलेल्या विद्यार्थ्याचे अपील वाचल होत. त्या अपिलाची गोळाबेरीज एका वाक्यात अशी सांगता येईल: माझा भारताच्या संविधानावर आणि एकात्मतेवर विश्वास आहे! ...दुसर्‍या दिवशी त्याने सांगितलं की ते अपिल पोलिसांनी त्याच्याकडून दबावानं लिहून घेतलं. याचा अर्थ त्या विद्यार्थ्याचा भारताच्या संविधानावर विश्वास नाही असा होऊ शकतो का?
     जेएनयूतील घटनेने एक गोष्ट लक्षात आली: कोणत्याही राजकीय नेत्याला वा पक्षाला देशाच्या एकात्मतेशी काही घेणं देणं नाही. येत्या निवडणूकांसाठी आपली वोटबँक कशी वाढेल या भूमिकेची जो तो काळजी घेताना दिसतो. ज्या देशावर वा देशातल्या प्रांतांवर हे राजकीय पक्ष राज्य करणार आहेत, त्याच देशाच्या बरबादीचा प्रचार करणार्‍या मुठभर लोकांना काही राजकीय पक्ष कुरवाळतात. हे बेरजेचं राजकारण नसून संधीसाधूपणा आहे. रस्ता चुकलेल्या लोकांच्या जातीधर्माचे सर्व लोक आपल्याला मतदान करतील अशी खोटी व संकुचित विचारसरणी या मागे दिसते. अशा फुटीरतावादी लोकांच्या पाठिंब्याने निवडून आलेले सत्ताधारी देशाला कसं वाचवू शकतील? पण अशा मुठभर फुटीरतावादी लोकांमागे त्या त्या जाती धर्माचे लोक उभे नसतात हे अशा राजकारण्यांनी लवकर समजून घेतलेलं बरं.
      संसद हल्यानंतर अफजल गुरूची मुलाखत ऐकली होती. जेएनयू घटनेनंतर पुन्हा दुसर्‍यांदा ऐकली. त्या मुलाखतीतून त्याच्या गुन्ह्याची त्याने कबूली देत असं स्वत: स्पष्ट केलं आहे: पाकिस्तानातील गाझीबाबा व जैशच्या तो संपर्कात आल्याने त्याच्या आहारी गेला होता. त्याच्या आदराखातर पाकिस्तानात जाऊन दहशतवादी ट्रेनिंग घेऊन भारतात आला. गाझीबाबा सांगेल ते करण्याची त्याची तयारी होती कारण त्याला पैशांची आवश्यकता होती. पैशांसाठी त्याने संसदेवर हल्ला करण्याच्या कटाला पूर्णत्व ‍दिलं. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रतिकावर हा हल्ला होता. (संसदेत घुसून सर्व खासदारांना ठार मारणं- मग ते कोणत्याही पक्षाचे असोत- असा हा कट होता, असं अफजल गुरू म्हणाला. त्या हल्ल्यातून आपल्या जवानांचे बळी देऊन वाचलेले खासदार आज वाट चुकलेल्या विद्यार्थ्यांचे समर्थन करीत आहेत. याला काव्यगत न्याय म्हणावा का अजून काही?)
      काश्मिर भारतात कसं वि‍लीन झालं, हे अफजलला माहीत नव्हतं. काश्मिरच्या काही भागावर पाकिस्तानने कसा कब्जा मिळवला हे त्याला माहीत नव्हतं. आणि काश्मिर का आझाद करायचं हेही त्याला माहीत नव्हतं. काश्मिरबाबत कसलाही आदर्शवाद त्याच्यापुढे नव्हता की कुठलं विशिष्ट तत्वज्ञानही नव्हतं. सारांश, अफजल गुरू हा पैशांसाठी विकला गेलेला एक धंदेवाईक- वाट चुकलेला फक्‍त दहशतवादी होता. (याउलट अफजलगुरूचा मुलगा उच्च शिक्षण घेऊन देशासाठी काही करू इच्‍छितो, हे ऐकून बरं वाटलं.)
      या पार्श्वभूमीवर अशा फालतू आदर्शहीन व कोणताही बौध्दीक पाया नसलेल्या दहशतवादी अफजल गुरूच्या व मकबूल भट्टच्या समर्थनार्थ, जेएनयूतील स्कॉलर- संशोधक (?) विद्यार्थी भारताच्या नागरिकांच्या पैशाने शिकत, जर आपल्याच देशाविरूध्द कट कारस्थानं करत असतील तर ह्या विद्यार्थ्यांना कोणती विशेषणं लावावीत, मला सुचत नाही. हे विद्यार्थी खरंच अभ्यासू असतील, उदारमतवादी असतील आणि ‍वैश्विक दृष्टीकोनातून त्यांना दहशतवाद्यांची भूमिका योग्य वाटत असेल तर त्यांनी तसा अभ्यासपूर्ण प्रबंध लिहून आपल्या संशोधनातून जगासमोर सिध्द केलं पाहिजे. सवंग घोषणा देऊन त्यांचा उदारमतवाद सिध्द होत नाही.
      राज्यशास्त्रात अराज्यवाद नावाची एक संकल्पना आहे. त्यात जगातील काही विचारवंत कोणतीच सत्ता वा देशाची विशिष्ट सीमा मानायला तयार नसतात. जगाचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपले स्वातंत्र्य अबाधित का असू नये असं त्यांचं म्हणणं असतं. या विद्यार्थ्यांच्या डोक्यात अशी काही संकल्पना असण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. कारण असे विचारवंत वा बुध्दीवान लोक एका फालतू विकाऊ बिनबुडाच्या दहशतवाद्याच्या समर्थनार्थ कधीही घोषणा देणार नाहीत आणि आपल्या स्वत:च्याच काय अन्य कोणत्याही राष्ट्राच्या बरबादीसाठी घोषणा देत रस्त्यावर उतरणार नाहीत. म्हणूनच वेगवेगळ्या पध्दतीने पुरोगामी विचार करून, स्वत:ला वैश्विक नागरिक समजूनही मला अशा (वाट चुकलेल्या) विद्यार्थ्यांच्या बाजूने अवाक्षरही बोलता येणार नाही. (लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा