- डॉ
सुधीर रा. देवरे
या
देशाला म्हणजे देशातील लोकांना झालंय तरी काय? आसाम प्रश्न आज कालचा नाही. तब्बल
1950 पर्यंत मागे गेल्यावर आसाम प्रश्न लक्षात येतो. आसामचा प्रश्न या देशातील
सर्वसामान्य लोकांना माहिती नाही. तरीही त्या प्रश्नाच्या चुकीच्या बाजूने मुंबईत
मोर्चा निघतो. तोडफोड – हिंसा
होते. त्याची परिणीती म्हणून पुण्यात काही पूर्वोत्तर भारताच्या विद्यार्थ्यांवर
हल्ला होतो. आणि या घटनेनंतर पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, बेंगलोर मधून
उत्तर-पूर्व भारतातील लोक आपल्या घरांकडे पलायन करू लागतात. खरे तर धार्मिक भेद
बाळगणार्या लोकांनाही हे लोक नेमके कोण आणि आपण काय करीत आहोत हे नक्की माहीत
नाही.
सोशल
नेटवर्कींग साइटस् वरून आणि एसएमएस वरून अफवा आणि अराजकता हेतुत: पसरवली जात आहे.
जातीयवादी बोलले जात आहे. एकाच प्रश्नावर दोन दोन लोकांच्या नेतृत्वाखाली काही
दिवसाच्या अंतराने दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलने होत आहेत. पुण्यात चार बाँब स्फोट
होतात आणि हे सर्व भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन सोहळ्याच्या आगेमागे
घडतंय. या सगळ्या गोष्टींकडे नीट पाहिले तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपला देश
तोडण्याचे, देशात यादवी माजवण्याचे कोणा परकिय शक्तीचे षडयंत्र आहे की काय असा
संशय यावा इतपत या घटना मोठ्या आहेत.
आणि या
सर्व प्रश्नांचे राजकारण होत आहे ही सर्वात मोठी दुर्दैवी आणि लाजीरवाणी गोष्ट
आहे. भारत हा देश धर्मनिरपेक्ष आहे. सरकार त्यांच्या पध्दतीने काय कारायचे ते
करीलच पण आपण भारताचे नागरीक म्हणून पूर्वोत्तर लोकांनाच नव्हे तर जो जो कोणी
अडचणीत असेल त्याला विश्वास दिला पाहिजे की भारत आपल्या सर्वांचा आहे. येथे
कोणालाही धोका नाही. सर्व भारतीयांनी जात-धर्म यांच्या चौकटीतून बाहेर निघून
मानवतावादी दृष्टीकोन ठेवत भारत वाचवावा ही विनंती. ईद च्या सर्वांना शुभेच्छा.
- डॉ सुधीर रा. देवरे
(माझा
ब्लॉग)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा