रविवार, १२ ऑगस्ट, २०१२

इतके स्वातंत्र्य कुठेही नाही ।



- डॉ सुधीर रा. देवरे

      फेसबुक वर सर्फिंग करत असताना वेगवेगळ्या दिवशी सचित्र अशी दोन वाक्य माझ्या वाचनात आली.
एक: 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्या नंतर अजूनही स्वातंत्र्याची सकाळ झालीच नाही.
दोन: गांधी हा कसला महात्मा ? कोणाचा तरी हवाला देऊन हे अवतरण.
त्या वेळी तात्काळ मला जे शब्द सुचले अशा शब्दांत- आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे- अशी मी तिथे नापसंतीची कॉमेंट लिहिली.
      स्वातंत्र्याची सकाळ अजून झाली नसती तर हा जो कोणी लिहिणारा आहे त्याला भारतात राहून अशी मल्लीनाथी करताच आली नसती आणि केली असती तर तो तुरूंगात गेला असता. ज्याअर्थी असे लिहूनही भारतात तो सलामत असू शकतो त्या अर्थी स्वातं‍त्र्याची सकाळ झालीच आहे. ज्याने डोळ्यांवर पट्टी बांधली असेल त्याला ती सकाळ दिसणार नाही. आपल्या बालपणापासून शिक्षण, विचार, विविध सवलती, जडणघडण, वृत्तपत्रांतून शासनाविरूध्द लेखन वा वाचन, विविध चॅनल्सवरून टीका टिपण्या ऐकतच हा नागरिक अशी मल्लीनाथी करू शकला ते स्वातंत्र्यामुळेच. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणाला निवडून द्यायचे, कोणाला राज्यकारभार करू द्यायचा हे आपण म्हणजे सर्वसामान्य माणूस ठरवतो.
      महात्मा गांधींना शिव्या देणे भारतात फॅशन झालीय की काय कळायला मार्ग नाही. कोणीही उठावे आणि टपली मारून जावे. महात्मा गांधींचे कोणी जातीय वारसदार नसल्याने त्यांच्या बदनामी वरून भारतात दंगली होत नाहीत. जो सर्वांचा तो कोणाचाच नसतो. गांधी नसते तर ही लोकशाही नसती. गांधी नसते तर कदाचित भारताला 1947 च्या आधीही स्वातंत्र्य मिळाले असते. पण हा देश आज आहे तसा नसता. कदाचित या देशाचे पाच पंचवीस तुकडे पडले असते. गांधींनी भारताला योग्य वेळी- जनमानस वयात आल्यावरच स्वातंत्र्य मिळवून दिले आणि पाकिस्तान निर्माण होणे ही सुध्दा काळाची गरज होती. अखंड भारताचे आतापर्यंत अंतर्गत यादवीत असंख्य तुकडे पहायला मिळाले असते. अथवा आज आहे तसा तो प्रजासत्ताक नसता- निधर्मी देश राहिला नसता. थोडक्यात, महात्मा गांधी समजून घेण्यासाठी आपली दृष्टीही तेवढी विशाल असायला हवी.  


- डॉ सुधीर रा. देवरे

२ टिप्पण्या: