सोमवार, १ डिसेंबर, २०२५

अहिराणी, एकूण बोली आणि मराठी- भाग दोन

 


- डॉ. सुधीर रा. देवरे

 

. मराठीचं भवितव्य : आपली जबाबदारी 

                      जगातील प्रत्येक कोपरा आपापल्या भाषेनं संपन्न आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात त्या त्या स्थानिक भाषेतून लोकसंवाद होत असतात. तरीही काही भाषा आज नामशेष झालेल्या आहेत तर काही भाषांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होत आहे, हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. आज महाराष्ट्रात सर्वदूर अस्तित्वात असलेली मराठी भाषा ही पूर्वीपासून विविध ग्रामीण आवाजांची बोलीभाषा आहे. परंतु लिहित्यांनी बोलीभाषांच्या विशिष्ट संज्ञा निवडीतून व वाचकांनी वाचनातून आजची महाराष्ट्राची प्रमाणभाषा घडवली. हे प्रत्येक मुख्य भाषेत होत राहतं.

                      भारतात सर्वदूर १५०० बोलीभाषा बोलल्या जात असूनही राज्यघटनेनं मान्यता दिलेल्या केवळ २२ भाषा अधिकृत आहेत. त्या अधिकृतांतील मराठी एक. मराठी ही भाषा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तिच्या घटकबोलींसह- विविध हेल उच्चारांसह मोठ्या प्रमाणात विशेषत: ग्रामीणांकडून बोलली जाते. मराठीत व्यवहार केले जातात, संवाद होत राहतात, मराठी लिहिली जाते, छापली जाते, शिकवली जाते. महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक, गुजराथ, मध्य प्रदेश, गोवा, आध्र प्रदेश, पं. बंगाल आदी राज्यातील कोलकात्ता, इंदोर, म्हैसूर, बेळगाव, बडोदा, सुरत, बँगलोर, हैद्राबाद, पणजी, धारवाड आदी शहरात व तंजावर, डांग भागातही मराठी लोक आहेत आणि ते आपसात मराठी बोलतात. (स्थानिकांशी स्थानिक भाषा बोलतात.) तरीही आज महाराष्ट्रातील शहरी भागात मराठीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट आणि उपेक्षा होताना दिसते. 

                      मराठी भाषेचा उदय साधारणतः इसवी सन पूर्व पहिले- दुसरे शतक ते इसवी सनाच्या पहिल्या- दुसऱ्या शतकात झालेला असावा, असं अनेक उपोद्बलक पुराव्यांनी दिसून येतं. माहाराष्ट्री, पैशाची, पाली, अर्धमागधी, प्राकृत, शौरसेनी, संस्कृत, कन्नड, राजस्थानी, बंगाली ह्या भाषांमधील काही शब्दही मराठीत आढळून येतात. म्हणूनच मराठीला एखाद्या विशिष्ट भाषेची पोटभाषा म्हणणं पूर्णत: चुकीचं ठरतं.

                      भाषेच्या संदर्भात काही चांगले अपवाद वगळता आतापर्यंत मराठी भाषेवर सरधोपट असं लिखाण होत राहिलं. (भाषेवर. भाषेत नव्हे.) हेही एक भाषा दुर्लक्षाचं कारण आहे. मराठी भाषेतून संवाद साधण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल, बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशा हेतूनं मराठीतील ठोस बोलीक बलस्थानांचा अधिक अभ्यास व्हायला हवा. भाषा हलकी फुलकी आणि सहज कशी बोलता येईल, हे पाहिलं पाहिजे. भाषेच्या नैसर्गिक वाढीला मारक ठरतील अशी महाराष्ट्राच्या प्रांतीय सरकारकडून धोरणं राबवली जाऊ नयेत. (उदा. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती कशाला? महाराष्ट्रात सीबीएससी बोर्ड कशाला?)

                      जाणूनबुजून बोजड मराठी भाषा उपयोजित करणं, मराठीतल्या बोलींसदर्भात असलेली काही अभ्यासकांची आकसबुध्दी, तथाकथित भाषा शुध्दीकरणाचा प्रयत्न, बोलीतल्या काही उच्चारांचा केलेला उपहास (उदा. न,,,,,, व्ह.), संस्कृतप्रचुर जड- अवघड शब्दांचा भरणा, संस्कृतप्रचुर बोलणं म्हणजे शुध्द भाषा बोलणं.. असा समज होणं, शुध्दलेखनाची अतिरिक्त चिकित्सा, टाकाऊ व कालबाह्य विशिष्ट पारिभाषिक संज्ञांचा अट्टहास, ढोबळ पुराव्यांच्या आधारावर केली गेलेली निश्चित विधानं (उदा. संस्कृत ही मराठीची जननी आहे. वगैरे), भाषेची तथाकथित उत्पत्ती- व्युत्पत्ती, हितसंबंध, सामाजिक प्रतिष्ठेत शुध्द(?) भाषा बोलण्याच्या आततायी कल्पना, दुसऱ्या भाषेच्या संदर्भातील अज्ञान, इंग्रजी शब्दांचा तथाकथित अनुवाद (उदा. रेल्वेला आगगाडी म्हणायचं सोडून भलताच अगडबंब अनुवाद करणं. अशा अनुवादात साधे सरळ मराठी शब्द सोडून संस्कृत घुसडणं.) पूर्वग्रह, दुराग्रही वृत्ती, भाषेतून वर्गवर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, लक्षात न येणारी जोडतोड करणं, ह्या आणि अशा अनेक प्रकारांमुळंच मराठी भाषेचं जतन- संवर्धन खुंटलेलं दिसून येतं.

                     महाराष्ट्र प्रांतातल्या मराठी माणसावरून भाषेला मराठी नाव प्राप्त झालं. महाराष्ट्रात राहणारे मराठे (जात नव्हे), म्हणून मराठे जी बोलतात ती मराठी. त्यामुळं मराठी भाषेचा संबंध कोणत्याही विशिष्ट जाती- जमातीशी लावला तर मानव्य रहिवासी दृष्टीतून ते योग्य नाही. कोणत्याही भाषेमुळं जात अथवा जातीमुळं भाषा ओळखली जाऊ नये. (पण विशिष्ट जमातीची भाषा जमातीवरून उल्लेखली जात असेल, तर त्याला इलाज नाही. आदिवासींच्या बहुतांश भाषा जमा‍तीवरून उल्लेखित होतात. सोयीच्या परंपरेनुसार ते स्वीकारलं तरी अशा उल्लेखात हिनकस हेल नसावा.)

                    लोकांच्या वर्तनातून लोकसंस्कृती संक्रमित व प्रवाहित होते. स्थानिक परिवेशातील लोकसंस्कृतीतून भाषिक संज्ञा अस्तित्वात येत असतात. म्हणूनच कोणत्याही भाषेचा अभ्यास हा त्या भाषेतील लोकवाङ्मयाच्या अभ्यासाशिवाय अपूर्ण ठरतो. लोकवाङ्मयाच्या माध्यमातूनच स्थानिक लोकांच्या श्रद्धा, चालीरीती, रीतीरिवाज, पूजा-अर्चा, लोकपरंपरा, लोकसंस्कृती, आशा-आकांक्षा, शेती, व्यवहार, नातेसंबंध, सण-उत्सव इत्यादींवर प्रकाश पडत असतो. 

                     ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ विचारायचं नसतं’, असं आपण म्हणतो, तसं भाषेचं मूळसुद्धा विचारू नये. (कोणती भाषा कोणत्या भाषेचं अपत्य आहे वगैरे. असं वर्गीकरण हे भाषाशास्त्राच्या विरूध्द आहे.) भाषा ही केवळ भाषा असते आणि ती स्थानिक परिवेशाच्या लोकसंस्कृतीतून उगम पावलेली असते, मग ती कोणतीही भाषा असो. आपण जिचा जागतिक म्हणून उल्लेख करतो ती मूळ इंग्रजीही तिच्या स्थानिक परिवेशातूनच जन्मलेली आहे.

                      अशा सूत्रानुसार मराठीचं नव्यानं डॉक्युमेंटेशनयापुढं होत राहिलं पाहिजे. निरक्षर माणसं आज अहोरात्र मराठी भाषेतून व्यवहार करताना दिसतात. परंतु बहुतांश साक्षर माणसं फक्त घरातच, नातेवाईकांतच मराठी बोलतात की काय? मूळ मराठी भाषक असूनही बरेच लोक बाजारात, हॉटेलीत, प्रवासात, ऑफिसात, अनाहूत फोनवर, समोरचा मराठी पण अनोळखी दिसतो म्हणून, अगदी सहजतेनं मोठ्या प्रमाणात हिंदी वा इंग्रजीत संवाद- व्यवहार करताना दिसतात, हे चित्र मराठीच्या प्रभावी भवितव्यासाठी भयावह आहे. 

                      महाराष्ट्रात सरकारी कार्यालयांतून हिंदीत पत्रव्यवहारासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्यासाठी खास हिंदी विभागांची नियुक्ती झाली असल्यानं बहुतांश शासकीय- अशासकीय पत्रव्यवहार आज हिंदीतून होऊ लागला आहे. कार्यालयांतून अनेक लोक हिंदीत किंवा क्वचित इंग्रजीत बोलण्याचा- लिहिण्याचा अट्टहास करतात. म्हणून मराठीला सर्वात जास्त धोका हिंदीचा आहे. मराठीतून संवाद साधण्यात लोकांना संकोच वाटत असेल तर मातृभाषेसाठी लढा देण्याची त्यांच्याकडून अपेक्षा करणं दूरची गोष्ट आहे. हा संकोच दूर करण्यासाठीच मराठी माणसानं जागं होणं गरजेचं आहे. एकीकडं मराठी भाषेसह मराठीतील घटक बोलींचा न्यूनगंड दिसून येतो, तर दुसऱ्या बाजूला परप्रांतीय वा परदेशी भाषांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राजकारणातले मराठी लोकच पुढं सरसावत आहेत. (हिंदी प्रांतात गेलात तर जरूर हिंदी बोलावं, पण आपापल्या प्रांतात आपली भाषा बोलायला हवी.)  

                     भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या संदर्भात भाष्य आलं आहे. त्या नुसार कोणत्याही भारतीय व्यक्तीला आपली मातृभाषा बोलण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. तरीही महाराष्ट्रातल्याच शाळा- महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेतून शिकवण्यासाठी शिक्षकांमध्ये मनातून उत्साह नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठी शिक्षक मराठी विद्यार्थ्यांशी हिंदीत संवाद साधतात. मुलांना आपल्या मातृभाषेपासून दूर ठेवणं म्हणजे त्यांची जीभ कापण्यासारखं आहे. स्वभाषेपासून वंचित करणं हे लोक-अधिकारांचं उल्लंघन ठरतं.

                      स्थानिक लोकसंस्कृतीच्या माध्यमातून भाषा प्रौढ होत असते. भाषिक विभागणीनुसार प्रांतीय उद्देश सफल होणार असेल तर महाराष्ट्रात मराठीचं भवितव्य कायम उज्वल असायला हवं होतं. पण तसं होताना दिसत नाही. त्यासाठी जागृत मराठी माणसानं यापुढं झोपेतही मराठी भाषिक असलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठीची सक्ती करायला हवी. लोकप्रतिनिधी म्हणून मराठी लोकच निवडून द्यायला हवीत. राजकीय पक्षांनी मराठी लोकांनाच उमेदवारी द्यायला हवी. समोरचा माणूस हिंदी बोलला तरी आपण मुद्दाम मराठीतच बोलायला हवं. अशा गोष्टी कटाक्षानं पाळल्या जातील तरच मराठीला भवितव्य आहे, अन्यथा मराठी हळूहळू क्षीण होत राहणार...

                    (काव्याग्रह’, भाषा दिवाळी विशेषांक २०२५ मधील अहिराणी, एकूण बोली आणि मराठी या प्रकाशित दीर्घ लेखातील मराठीचं भवितव्य : आपली जबाबदारी हा दुसरा भाग. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

अहिराणी, एकूण बोली आणि मराठी- भाग एक

 

  डॉ. सुधीर रा. देवरे

 

१.    भाषा मरते म्हणजे...

                       मराठी ही इथून तिथून एकच भाषा असली तरीही या एकाच भाषेत ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व स्तरातील लोकांना आपापली भाषा दिसते. शेतकर्‍याला आपली स्वत:ची भाषा दिसते. मजुराला आपली भाषा दिसते. तसंच बाराबलुतेदारांनाही आपापली भाषा दिसते. याचा अर्थ एकाच भाषेच्या रस्त्यातून चालताना आपापल्या गावात आपापले घरगुती शब्द लोकभाषेत सहज उपयोजित होत असतात. आपले व्यावसायिक शब्द त्यांच्या न कळत लोक भाषेत वापरत असतात.

                     केव्हा केव्हा इतिहासात भाषेला धार्मिक चौकटीतही बंदिस्त करण्याचा कर्मठपणा केला गेला. धर्म- पंथ- संप्रदाय यांनी आपल्या मत प्रचारासाठी लोकभाषा वापरलेली असते. भाषेतून धर्म-पंथ निर्माण होत नाहीत. म्हणून कोणतीही भाषा कोणत्याही धर्मा- पंथाची बटीक नसते. भाषेला केवळ उपयोजित केलं जातं. अमूक भाषा ही आमच्या विशिष्ट वर्गाच्या- धर्माच्या लोकांची भाषा आहे असा अहंमन्य आग्रह सुरू झाला की त्या परीघावरचे लोक त्या भाषेपासून दूर जायला लागतात. म्हणजेच त्या चौकटीबाहेर भाषा मरायला सुरूवात होते.

                     भाषा तत्ज्ञांच्या मते भाषेला कुळ बीळ काही नसतं. म्हणजे अमूक भाषेची जननी अमूक भाषा आहे वगैरे. ज्या त्या भाषा ज्या त्या परिवेशात लोकजीवनातून तयार होत असतात आणि उत्तरोत्तर सक्षम होत जातात. या मांडणीत तार्कीक तथ्य आहे. आज भाषा एखाद्या विद्यापीठात शिकूनही नीट कळत नाहीत तर आदिम अज्ञानी ग्रामीण लोकांना कोणाच्या अनुकरणानं भाषा बोलता येईल असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. संस्कृत भाषा ग्रामीण आदिवासी वा ज्या बहुजनांना उच्चारायला सांस्कृतिक बंदी होती, ज्या ग्रामीणांना वा खालच्या तीन स्तरांवरील लोकांना ती शिकता येत नव्हती, लिहिता येत नव्हती, उच्चारता येत नव्हती; (त्यांना ती शिकवूनही शिकता येत नव्हती, असं नव्हे तर ती ऐकायला, बोलायला, वाचायलाच सांस्कृतिक मनाई होती); अशा काळात त्या भाषेच्या अपभ्रंशानं आदिवासी बोली, लोकबोली वा इतर लोकभाषा तयार झाल्या असं म्हणणं म्हणजे भाषिक चेष्टा करण्यासारखं आहे.

                      मात्र मोठ्या भौगोलिक परिवेशात बोलल्या जाणार्‍या एखाद्या प्रमाणभाषेचं कालांतरानं स्थानिक अवस्थांतरही होत जातं. उदाहरणार्थ, पूर्वी खान्देशातील चार जिल्ह्यात जी अहिराणी भाषा बोलली जायची त्याच भाषेला प्रांताच्या नावावरून बागलाणी म्हणत आणि प्रदेशाच्या नावावरून खानदेशी म्हणत. परंतु आता बागलाणी ही अहिराणी भाषेचं अवस्थांतर झालेली काही तालुक्यांपुरती भाषा समजली जाते. तसंच खानदेशी भाषेचंही विशिष्ट भौगोलिक परिसरात अवस्थांतर झालं आहे.

                      बोली भाषेतले अनेक जुने शब्द दिवसेंदिवस लुप्त होत आहेत. ते लगेच आठवत नाहीत. पण एखाद्या प्रसंगानुसार ते शब्द जिभेवर आपोआप येतात. परवा एका लेखात रेडिओच्या सेलसाठी असं लिहिताना लहानपणी कायम येता जाता बोललेला मसाला शब्द अचानक जिभेवर आला. मग तो लेखात मुद्दाम जसाच्या तसा वापरला. तो वाचून अनेकांना आठवलं की बॅटरीच्या- रेडिओच्या सेलला पूर्वी बोलीभाषेत मसाला शब्द वापरला जायचा. लहानपणी ऐकलेला भोद शब्द आज मला अनेकांना विचारून शोधून काढावा लागला. बालपणी अनेकदा स्वत: उपयोजित करत असलेला शब्द मला आठवत नव्हता. ज्या माझ्या ग्रामीण भागात तो बोलला जायचा त्या मातीतही तो आज अनेकांना माहीत नव्हता. तसाच लावदुर्‍या लावणं हा वाक्‍प्रचार लहानपणी अनेकदा वापरला असूनही आठवत नव्हता. गावात गेल्यावर बालमित्राशी अहिराणीत बोलताना अचानक आठवला असे नाही, तर तो चक्क बोलताना माझ्याकडून उपयोजित झाला. याचा अर्थ तीस- चाळीस वर्षांपूर्वीची माझी भाषा मेली असं अधोरेखित होतं का? आज मी नवीन कात टाकलेली अहिराणी भाषा बोलतो. माझ्या भाषेचं दस्ताऐवजीकरण करण्यासाठी मला एकेक शब्द आज महत्प्रयासानं मिळवावा लागत असेल तर माझी भाषा जीवंत आहे, असं म्हणू शकतो का? भाषेचं नाव मला माहीत आहे. भाषेचा सांगाडा माझ्याकडं आहे. आणि भाषेचं क्रियापद प्रमुख म्हणून ते सुध्दा मला परंपरेनं माहीत आहे. मात्र त्या भाषेतला एकेक शब्द आठवून मला संपूर्ण वाक्य तयार करावं लागणार असेल तर माझी भाषा जीवंत आहे की नाही? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

                     भाषेच्या या अवस्थातंराला भाषा मरणं असं म्हणण्यापेक्षा भाषेचं जुनं शब्दभांडार सुप्तावस्थेत जाणं आणि नवनवीन शब्दसंचय उदयास येणं हे भाषेचं सुप्त अंग लक्षात घेतलं पाहिजे. (नवीन शब्द उदयास येण्यापेक्षा आजूबाजूच्या भाषेतल्या संज्ञा मोठ्या प्रमाणात भाषेत आदान होत राहतात. अहिराणीत आज मोठ्या प्रमाणात मराठी, हिंदी आणि इंग्रजी शब्दांचं आदान होत आहे.) भाषेत संपर्कात येणार्‍या इतर भाषांचा शब्दसंग्रह वाढत जातो. आपल्या शरीरातील जुन्या पेशी जशा मरतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात, तसंच भाषेतील शब्दांचं आहे. भाषा कालबाह्य शब्द संज्ञाची कात टाकून नव्यानं व्यवहारात सळसळत असते. म्हणजे कोणतेच शब्द तसे कालबाह्य नसतात. पण काळाच्या आधुनिकतेच्या मागणीसाठी आपणच जुने शब्द स्टोअररूममध्ये ढकलत इतर भाषांचं- शब्दांचं अनुकरण करत असतो. कालांतरानं असे खास आपले शब्द नेणीवेत पडून राहतात आणि सहज संवादातल्या वापरातून निघून जातात.

                     आज सगळ्याच भाषांमध्ये इंग्रजी शब्दांची संख्या वाढताना दिसते. एखादा ब्रिटीश माणूस भारतात आला की त्याला सगळीकडं आपलीच भाषा ऐकून आपल्या घरीच आल्यासारखं वाटेल की काय, समजायला थोडी अडचण आली तरी. वाक्यातून इंग्रजी शब्द पेरत बोलण्याला हे उपरोधानं म्हटलं आहे, गांभीर्यानं नव्हे. कारण मराठी ही मराठी, इंग्रजी ही इंग्रजी आणि विशिष्ट बोली ही ती बोली म्हणूनच ओळखली जाणार आहे. (तरीही मराठीवर केवळ शब्दांचं नव्हे तर आख्ख्या हिंदी भाषेचं होत असलेलं अतिक्रमण आज चिंताजनक स्थितीत पोचलं आहे.) तिथापि अडगळीत पडलेल्या आपल्या भाषेतल्या शब्दांचं योग्य वेळी दस्तावेजीकरण झालं नाही तर आपल्या हातून बरंच काही सुटून जाणार आहे. म्हणून ‘जुनं ते सोनं’ जपत आपल्या भाषा (विशेषत: भाषेतले मूळ शब्द) जिवंत ठेऊया.

                    (काव्याग्रह’, भाषा दिवाळी विशेषांक २०२५ मधील अहिराणी, एकूण बोली आणि मराठी या प्रकाशित दीर्घ लेखातील भाषा मरते म्हणजे... हा पहिला भाग. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

हिंदी - मराठी वाद नाही, मुद्दा आहे!

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

                                                    

                      मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्याचा आनंद ओसरत नाही तोच बातमी आली, ‘‘महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्यात आला!’’ सुरूवातीला ह्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. मराठीची सक्ती करण्यात आली, अशी बातमी असावी, काहीतरी घोळ असावा, असं वाटून शहानिशा केली, तरीही बातमी खरी होती. मराठीला अभिजात भाषेचं राजरोस गाजर दाखवत मागच्या दारानं हिंदीला प्रवेश. हे आहे आपल्या राज्यकर्त्यांचं छुपं शैक्षणिक धोरण. एरव्ही भाषा, माणसं जोडण्याचं काम करतात, हेच पहिल्यापासून मांडत आलो. म्हणून हिंदी– मराठी हा वाद नाही, तर मुद्दा समजावा.

                    घडलेला घटनाक्रम असा : ३ ऑक्टोबर २०२४ ला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. आणि लगेच १० ऑक्टोबर २०२४ ला नव्या शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र राबवत पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला. साहित्यिक, विचारवंत, शिक्षणज्ज्ञ, भाषातज्ज्ञ यांच्या दबावामुळं दिनांक २२-४-२०२५ रोजी या निर्णयाला सरकारनं तात्पुरती स्थगिती दिली. कायमची दिली नव्हती, जीआर रद्द केला नव्हता. दिनांक १७ जून २०२५ ला मध्यरात्री सुधारीत जीआर काढण्यात आला. त्यात हिंदीऐवजी ३ री अन्य कोणतीही भाषा विद्यार्थी निवडू शकतो, मात्र अशी वेगळी भाषा घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमीतकमी २० असावी ही अट घालण्यात आली. थोडक्यात काय, तर हिंदीच सक्तीची भाषा आहे. २० मुलांपेक्षा जास्त मुलं तिसरी भाषा म्हणून इतर एकच भाषा निवडणार नाहीत. पालकांसाठी शेवटी प्रश्न मुलांनी मिळवलेल्या टक्केवारीचा असतो. म्हणून ते हिंदीला विरोध करून गुणांचे नुकसान करून घेणार नाहीत. महाराष्ट्रभर पुन्हा गदारोळ उठल्याने दिनांक २९ जून २०२५ ला हा निर्णय तात्पुरता रद्द केला आणि पुन्हा नव्याने एक समिती नेमली.

                     आतापर्यंतच्या माझ्या भाषाविषयक लेखांत आणि पुस्तकांमध्ये भाषांबद्दल जी मांडणी केली, त्यांत भाषा ह्या संवादासाठी म्हणजे विचारांच्या समन्वयासाठी असतात, माणसं एकमेकांपासून तोडण्यासाठी नाहीत, म्हणून कोणत्याही भाषांचा व्देष करू नये, सगळ्याच भाषांवर प्रेम करावं, भाषा या कोणाच्या शत्रू नाहीत, अशीच मांडणी केली आहे. आणि याच भूमिकेवर आजही ठाम आहे.

                     तरीही महाराष्ट्रात हिंदीची सक्ती पहिलीपासून करू नये, या मतावरही ठामच आहे. पूर्वी हिंदी विषय आठवीपासून होता. नंतर तो पाचवीपासून झाला. यापुढंही तो पाचवीपासून असायला हरकत नाही. खरं तर हिंदी हा विषय महाराष्ट्रात आठवीपासूनच सुरु करायला हवा आणि तो ऐच्छिक असला तरी हरकत नाही. याचं कारण असं की, महाराष्ट्रात मराठी भाषेचं नुकसान जेवढं इंग्रजीनं केलं नाही, तितकं हिंदीनं केलं आहे, ही वस्तुस्थिती आहे.

                     अशा प्रकारच्या टिपण्या त्या त्या वेळी समाज माध्यमांवर टाकताच हिंदी भाषकांनी, हिंदी- हितसंबंधितांनी, राज्यकर्त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी व शासकीय समित्यातील लोकांनी युक्तीवाद करायला सुरूवात केली. पैकी महत्वाच्या युक्तीवादांना उत्तरं देण्याचा प्रयत्न या लेखात करीत आहे.

                     तसे पाहिले तर भाषांचा संपर्क झाला की आदानप्रदान होतेच. पण नुकसान केले असे म्हणायचे असेल तर इंग्रजीमुळेच नुकसान अधिक झाले आहे. (यापुढील सर्व युक्तीवाद अवतरणात दिले आहेत.)

                     भाषांचं आदान प्रदान होणं आणि भाषा सक्ती करणं यात खूप मोठा फरक आहे. इंग्रजी इथली बोलीभाषा झालेली नाही, पण हिंदी ही बोलीभाषा म्हणून महाराष्ट्रात रूढ करण्याचा प्रयत्न राजकीय लोकांकडून पध्दतशीपणे ठरवून होत आहे. (मराठीचं जास्त नुकसान करणारी भाषा इंग्रजी की हिंदी हा मुद्दा पुढं उपयोजनातून आपोआप येत रा‍हील.)

                     भाषाविज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रभाव पडणे स्वाभाविकच आहे. पूर्वी फारसी, अरबी, पोर्तुगीज, इंग्रजी या भाषांचाही असा प्रभाव पडलेला आहेच की! मराठी माणसाने आपल्या भाषेचा योग्य आणि यथार्थ वापर करत राहायला हवा. तरच भाषा आपले मूळ रूप गमावणार नाही. अभिजात म्हणून ओळखली जाणारी माहाराष्ट्री- प्राकृत आज आपल्याला समजत देखील नाही. याचेही कारण हा भाषेचा प्रवाहीपणा आहे.

                     हा मुद्दा वरवर पाहता कोणाला योग्य वाटू शकतो. पण तसं नाही. मराठी भाषा नुकसानीचं कारण तात्कालिक- हिंदी पहिलीपासून सक्तीची करणं हा आहे. फारसी, अरबी, पोर्तुगीज ह्या भाषा तत्कालीन काळात इथं जाणीवपूर्वक शिकवल्या गेल्या नाहीत. (ह्या भाषेतले शब्द मराठीत आदान झालेत तरी मराठीची जागा ह्या भाषांनी घेतली नाही. हिंदी दिवसेंदिवस मराठीची जागा घेत आहे. वरील भाषा इथल्या होऊन आतापर्यंत समाजात मुरत राहिल्या असत्या तर त्यांनाही विरोध करावाच लागला असता. महत्वाचा मुद्दा असा की, मराठीला अभिजात दर्जा मिळताच तात्काळ त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी पहिलीपासून सक्तीची करण्यात आली, याचं कारण काय? महाराष्ट्रात मागच्या दारानं हिंदीची पध्दतशीरपणे पेरणी करत रूजवण्याचा हा प्रयत्न आहे का? अशी शंका घ्यायला जागा आहे.    

                     त्रिभाषा सूत्र आपण कधीचेच स्वीकारले आहे. म्हणून तसा विषय आला आहे. लोक इंग्रजीसोबत जर्मन, फ्रेंच शिकवत आहेत, त्यापेक्षा हिंदीचा व्यावहारिक उपयोग अधिक आहे.

                     त्रिभाषा सूत्र जे आधीपासून स्वीकारले आहे ते तसेच राहू देऊया ना मग. म्हणजे आतापर्यंत पाचवीपासून हिंदी सक्तीची होतीच. ती आता पहिलीपासून कशाला? मराठीला ओळखीची असलेली म्हणून लि‍हायला देवनागरी लिपी सोपी, बोलायला तर अजून सोपी आणि मराठीला जवळचेच असलेलं हिंदीचं व्याकरण, म्हणून महाराष्ट्रात हिंदी मोठ्या प्रमाणात व्यवहारात उपयोजित होत असते. त्यामुळं मराठीचं नुकसान होतं. जर्मन, फ्रेंच भाषेमुळं तसं अजिबात होत नाही.

                     हिंदी ही बहीण आहे खऱ्या अर्थाने आपली. एकच कूळ, एकच संस्कृती. म्हणून तिला विरोध नको.

                     असं असेल तर मराठी प्रांत- मराठी राज्य- मराठी भाषा म्हणून आपली स्वतंत्र ओळख कशाला? आपली भूमिका नक्की काय आहे? हिंदी संस्कृती मराठीत रूजवण्यासाठी हा खेळ आहे. हिंदीला इथली बोलीभाषा म्हणून रुढ करण्याच्या राजकीय प्रयत्नांना इथल्या सत्तेचं लांगूलचालन करणार्‍या काही लोकांचा पाठिंबा आहे. मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातून येणार्‍या लोकांच्या लोढ्यांची ही सोय आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील शिक्षणात मराठी सक्तीची असावी. बाकी भाषा ऐच्छीक असाव्यात. खरं तर मराठीतल्या सगळ्या बोलीभाषाच टप्याटप्यानं अभ्यासाला लावायला हव्यात. म्हणजे मराठी भाषा अजून समृध्द होईल.

                     हा दृष्टीकोन चुकीचा आहे. जर आपण हिंदीशी मैत्री केली आणि मराठी साहित्य हिंदीत घेऊन गेलोत तर आपले साहित्य राष्ट्रीय पातळीवर जाईल, मग ते हिंदीतून इतर भारतीय भाषांमध्ये जाईल, याचे चांगले उदाहरण म्हणजे मराठीतून हिंदीत अनुवादीत झालेली पुस्तके.

                     याच कारणासाठी आपल्याला हिंदी भाषेत बोलायचं- लिहायचं- रहायचं असेल तर मराठी भाषा कशाला? मराठी लेखकांनी जास्त वाचकांपर्यंत पोचण्यासाठी थेट हिंदीत वा इंग्रजीत लिहावं, असंही उद्या कोणी म्हणू शकेल. मग महाराष्ट्राची स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा- ओळख म्हणून इथं काय शिल्लक राहील? मराठी कशासाठी? आधी म्हटल्याप्रमाणेच भाषा जोडण्यासाठी असतात असंच आजपर्यंत लिहीत आलो. पण राजकीयदृष्ट्या हा हिंदी पट्टा करायचा घाट घातला जात असल्यानं महाराष्ट्रात हिंदी सरकारी पातळीवरून पध्दतशीरपणे थोपवली जात आहे, असं वाटू लागलं.

                     आपण प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टीने पाहणे सोडले पाहिजे. देशभर एकच भाषा असेल तर आपण प्रगती करू.  

                     म्हणजेच एक देश, एक भाषेचा तथाकथित नाराच आपण देत आहात ना. मराठी संस्कृती स्वतंत्रपणे नांदली पाहिजे असं आपल्याला वाटत नाही. मग देशातील विविधतेचं काय करायचं? स्थानिक लोकसंस्कृतीचं काय? लोकसंस्कृतीचं प्रतिबिंब भाषेत असतं. भाषा मेली म्हणजे स्थानिक लोकसंस्कृती मेली.  

                     मराठीला नोबेल पुरस्कार मिळू शकतो असे आपण नेहमी म्हणतो, पण नोबेलसाठी आपले साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल असे प्रयत्न केले जात नाहीत, अजून आपण हिंदीचा दुस्वास करीत बसलो आहोत.

                     अशा पुरस्कारांसाठी मराठी सोडून अन्य भाषांचा आग्रह धरत असाल तर कशाला हवेत पुरस्कार? पुरस्कारांसाठी भाषा मारायच्या कटात आपण सामील होत आहात का? दक्षिणेकडे हिंदी नाही तरी तिथले साहित्यिक पुरस्कार मिळवतातच ना? संपूर्ण जगात प्रत्येक पंधरा दिवसांनी एक बोलीभाषा मरत आहे. एखाद्या क्षेत्रातील प्रमाणभाषा तिच्या हद्दीच्या बाहेर सक्तीनं प्रबळ होऊ लागली की आजूबाजूच्या बोलीभाषा मरू लागतात. हिंदीमुळं उत्तर भारताततल्या अनेक ग्रामीण, छोट्या समुदायांच्या व आदिवासी लोकांच्या बोलीभाषा आज संपल्यात जमा आहेत, ही वस्तुस्थिती आहे. जनगणनेत या भाषा गणल्या जात नाहीत. हिंदी सदृश्य वाटणार्‍या भाषांचा समावेश हिंदी भाषेत होत आहे. पण या वेगळ्या बोलीभाषा आहेत. हा मुद्दा भाषाभ्यासकांनी लक्षात घ्यायला हवा.

                     काही अमराठी राजकीय लोक, अशा मंडळींच्या नादी लागलेले मांडलिक असणारे महाराष्ट्रातले राजकारणी लोक, महाराष्ट्राचा हिंदी पट्टा बनवू पहात आहेत. आणि शासकीय मराठी मंडळांवर नियुक्त केलेले मराठी लोक तोंडाला कुलूप लाऊन बसले आहेत. नवरात्र, गरबा, छटपूजा, कावडयात्रा यासारखे उत्सव- विधी याआधी महाराष्ट्रात कुठं होत्या? लोकसंस्कृती आयात केली की भाषाही आयात होते. स्थानिक भाषेची जागा आयात लोकसंस्कृतीतून झिरपू लागते. उत्सवांना आलेलं उन्मादी किळसवाणं हिडीस रूपही याआधी इथं नव्हतं. थोडक्यात, महाराष्ट्राला हिंदी पट्टा बनवून स्थानिक लोकसंस्कृती नष्ट करून उत्तरभारतीय बनवायच्या प्रयत्नांचाच हा भाग आहे. पण बांधिलकी नसलेले मराठी राजकीय विरोधी पक्ष असोत की आपापल्या हस्तीदंती मनोर्‍यात मग्न असलेले मराठी साहित्यिक, याविरुद्ध काही बोलायला तयार नाहीत. बोलणार्‍या पण सत्ताहीन म्हणून सामान्य माणसाचा आवाज सार्वजनिकरित्या सर्वदूर पोचणार नाही, तो संघटीत होणार नाही, याची नीट काळजी घेतली जाते.

                     एक उदाहरण, आमच्या कॉलनीत इयत्ता दुसरी ते सहावीतले पाच सहा लहान मुलं आहेत. त्यात फक्त एकच हिंदी भाषक आहे. रोज संध्याकाळी गल्लीत खेळताना सर्व मराठी मुलं त्याच्याशी हिंदीत बोलतात. तो मुलगा मराठीत बोलताना मी एकदाही ऐकलं नाही. लहान मुलांकडून असे संवाद ऐकताना मी अचंबीत. त्या मुलाशी मुद्दाम मराठीत बोलून पाहिलं, त्यानं हिंदीत उत्तर दिलं. त्याच्या आईवडिलांशी मराठीत बोलून पाहिलं, ते हिंदीत बोलले. म्हणजे मराठी त्यांना समजतं, पण ते आपली भाषा सोडायला तयार नाहीत. हे कथन काल्पनिक नाही. हिंदी भाषा मराठीचं नुकसान करते, ते असं.

                     मी मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी सफाईने बोलतो आणि वाचतो. संस्कृत भाषेतही निष्णात आहे. सर्व भाषांवर प्रेम करतो. ही भाषा मराठीची वैरी अशी वृत्ती मला रुचत नाही. असाही एक युक्तीवाद.

                     कोणतीच भाषा कोणाची शत्रू नसते. अगदी उर्दूही नाही. (सत्तेतील एक विशिष्ट संघटना उर्दू भाषेचा व्देष करते, पण उर्दूचे देवनागरी रूप असलेल्या हिंदीचा महाराष्ट्रात ती पहिलीपासून आग्रह धरते, देशात असेही विनोद होत आहेत.) प्रश्न हा आहे की उत्तर प्रदेशात- मध्य प्रदेशात वा दिल्लीत मराठी पहिलीपासून सक्तीची करता येईल का? करता येत असेल तर महाराष्ट्रात हिंदी सक्तीला आमचा विरोध नाही!

                     नवोदय विद्यालयात पूर्वीपासूनच त्रिभाषा सूत्रानुसार सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी आणि अन्य कोणतीही भारतीय भाषा सक्तीची आहेच.

                     हो, केंद्रीय विद्यालय आहे ते. मराठी शाळा ह्या प्रांतीय आहेत. भाषावार प्रांत रचनेनुसार मराठी भाषिक आहेत. नवोदय विद्यालय सहावीपासून आहे, पहिलीपासून नाही. आपल्याकडे हिंदी  विषय आताही पाचवीपासून शिकवला जातोच. (म्हणजे हिंदीसाठी केंद्रीय नवोदय विद्यालयाच्या एक पाऊल पुढं आहोत आपण, म्हणजे महाराष्ट्र.) तो विषय केवळ पहिलीपासून आणि सक्तीचा करायला विरोध आहे. मराठी आणि हिंदीची एकच बाळबोध देवनागरी लिपी असल्यानं मराठीची जागा मोठ्या वेगानं हिंदी घेत आहे.

                    शिक्षण विभागाची स्थिती सध्यातरी "एक ना धड..." सारखी झालीय. म्हणजे "मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया!" अशी आहे. मला भाषा विषयावर जास्त कळत नाही. पण मराठी भाषेचे नुकसान आपणच केले आहे. बिहार, उत्तर प्रदेशातील भैय्यांशी आपणच हिंदीत बोलतो. त्यांच्याशी आपण मराठीत का बोलत नाही? आपली चूक आहे. दुकानांच्या पाट्या- नावे, अगदी मराठी प्रकाशकांच्यासुध्दा हिंदी- इंग्रजीत आहेत. ह्या ग्रंथ विक्रेत्यांना मराठी नावे सापडली नाहीत?’

                     या मताशी सहमत असून सुशिक्षित मराठी भाषकांचा यात खरा दोष आहे. मराठी सोडून मुद्दाम कुठंही मोडकीतोडकी हिंदी भाषा मराठी माणूस बोलू लागतो. सर्वसामान्य लोकांतही महाराष्ट्रात येणार्‍या उत्तर भारतीयांच्या लोंढ्यांविषयी ही प्रातिनिधीक प्रतिक्रिया म्हणावी लागेल.

                    हिंदी पहिलीपासून सक्तीच्या विषयावर हा लेख लिहीत असताना आताच पुन्हा नव्यानं बातमी आली, की एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रात पहिलीपासून सीबीएससी पॅटर्न लागू होत आहे. आता तर मराठीला आणि महाराष्ट्राला उतरती कळा लागलीच म्हणून समजावं. सीबीएससी पॅटर्न मध्ये मराठी विषय सोडून सर्व विषय हिंदीत ‍असतात. इथं मराठी भाषा सपशेल मागं पडणार आहे. महाराष्ट्राचा इतिहासही मागं पडणार आहे. कारण केंद्रीय विद्यालयातील इतिहासाचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय पातळीवरचा असणार. त्यात महाराष्ट्राचा इतिहास किती प्रमाणात असेल?    

                     सारांश, महाराष्ट्रात ज्या त्या विभागात जी ती बोलीभाषा- मातृभाषा पहिलीपासून सक्तीची करून मराठीधर्म रूजवला पाहिजे आणि हिंदी- सक्तीचा व सीबीएससी पॅटर्नचा फेरविचार करून हा निर्णय तात्काळ बदलायला हवा.

                    (तळटीपनियतकालिक, खंड १, १५ ऑगस्ट २०२५ च्या अंकात प्रकाशित लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/