मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

माणूस आणि एकलेपण

 


 - डॉ. सुधीर रा. देवरे

        माणूस नात्यागोत्यांच्या सहवासात एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडतं. विवाह समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, किमान वधूवरांचे दोन कुटुंबं आणि दोन मित्र त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. (आता वैकुंठ रथ असला तरी.) सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला मित्र- नातेवाईक लागतात आणि दु:खाचं सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे लोक लागतात.

         माणूस या जगात एकटा जगू शकेल? म्हणजे तो विनासंबंध- विनापाश असू शकेल? माणसाशी कोणतंही नातंसंबंध न ठेवता कोणी एखादा सुखात राहू शकेल का? माणसाशी कोणी कायम फटकून वागू शकतो? एखादा माणूस माणूसघाना असू शकतो का? एकलकोंडा असू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं नकारार्थी येतील. तरीही आपल्याला असं रोज कोणाबद्दल तरी ऐकायला मिळतं, अमूक एक माणूस एकलकोंडा आहे. अमूक एकाला एकटं राहणं आवडतं. अमूक एक माणूस आजूबाजूच्या माणसांत न मिसळता कायम आपल्याच कोषात गर्क असतो. आपल्याकडे माणसं येणं त्याला आवडत नाही आणि इतर माणसांकडे जाणंही तो हेतुत: टाळत असतो. वगैरे.

         अतिपरिचयात अवज्ञा म्हणून एखादा माणूस शेजार्‍यापाजार्‍यांशी फटकून वागत असेल वा वेळप्रसंगी भांडतही असेल, तरी तो माणसात मिसळणाराच असतो. एखादा माणूस माणसांच्या कळपात राहणं टाळत असला तरी तो आतून अनेकांशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात असतो. अपरिचित माणसाशी सोबती करावी असंच त्याला मनातून वाटत असतं. माणसाशी प्रत्यक्षात फटकून वागणारा माणूस हा आतून समाजाशी जुळवून घेणाराच असतो. कोणताही माणूस तमाम मानव समाजाविरुध्द नसतो. समाजातील काही प्रवृत्तींविरुध्द तो बंड करू शकतो. पण आख्या मानवजातीच्या विरोधात जाणारा माणूस अजून जगात जन्माला आला नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात एकटा मनुष्य राहणं म्हणूनच अशक्य घटना वाटते.

         आपला स्वत:चा स्वभाव विसरून आपण इतर लोक आणि त्यांचे स्वभाव हा नेहमी चर्चेचा विषय करतो. एखादा माणूस कसा एकलखुरा आहे, तो समाजापासून कसा फटकून वागतो, तो माणसात, समाजात कसा मिसळत नाही, नातेवाईकांकडे जात नाही, विवाह, अंत्यविधी आदी कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. अमूक हा आपण आणि आपलं घर भलं वा काम भलं असा झापडं लावलेल्या विचारांचा माणूस आहे, अशा प्रकारचं कोणाबद्दलचं तरी वक्‍तव्य आपण ऐकत आलो आहोत. असं आपल्या कळपात नसलेल्या माणसाबद्दल आपण बोलतो.

        माणूस हा निसर्गत:च समाजप्रिय प्राणी आहे. गरीब असो, श्रीमंत असो, आदिवासी ग्रामीण असो की शहरी सुशिक्षित असो. तो माणसाच्या कळपातच रमतो. कोणाकडे जात नसला तरी तो माणसांच्या वस्तीतच घर बांधतो. माणसाच्या गरजाच अशा आहेत की तो अंशत: का होईना परावलंबी आहे. पूर्णपणे स्वावलंबी नाही. त्याला कपडे शिवण्यासाठी शिंप्याकडे जावं लागेल तर डोक्याचे केस कापण्यासाठी नाभिकाकडे जावं लागेल. तब्बेत तपासण्यासाठी डॉक्टरकडे जावं लागेल तर जेवण तयार करण्यासाठी बाजारात-दुकानात नाहीतर आयत्या जेवणासाठी हॉटेलीत तरी जावं लागेल. कोणीही एकलखुरा माणूस जंगलात वा डोंगरात रहायला जात नाही. माणसांच्या गावात- शहरातच तो वस्ती करतो. म्हणजे प्रत्यक्ष ओळखीत अथवा येता जाता कोणाशी गप्पा मारण्यात तो रमत नसला, तरी आजूबाजूच्या माणसांचा कानोसा घेत आपल्या कोषात आपलं आयुष्य व्यतीत करत असतो. म्हणून मानवी संबंधांचा विचार कोणत्याही एका टोकाचा न करता साधकबाधक तारतम्याने सगुण-निर्गुणात्मक घ्यावा लागेल.

                    (‘सगुण- निर्गुण’ मटा, दि. 4-3-2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

    © डॉ. सुधीर रा. देवरे

     ब्लॉगचा पत्ता:  http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा