शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

केजरीवाल: एक यशश्वी प्रयोग





-         डॉ. सुधीर रा. देवरे

     श्री अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. डिसेंबर दोनहजार तेराच्या दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या. छत्तीस जागांचे निर्भेळ यश मिळाले नव्हते तरी सत्तास्थानावर आम आदमी पक्ष पोचला होता. या घटनेवर तेव्हा अरविंद केजरीवाल या नावाचा मी ब्लॉग लिहिला होता. केजरीवालांना यावेळी सत्तर पैकी सदुसष्ट जागा मिळाल्यात. म्हणजे एकूण जागांच्या फक्‍त 3 जागा कमी मिळाल्या. एकूण पंच्चावन्न टक्के लोकांनी आम आदमी पक्षाला मतदान केले आहे. हे त्यांचे यश म्हणजे केवळ योगायोग नाही तर मोठ्या सायासाने मिळवलेले यश आहे.
      अ‍रविंद केजरीवाल यांच्याकडे भारतीय राजकारणातला एक प्रयोग म्हणून मी पाहतो. एक कर्मचारी वर्गातला माणूस, नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक कामात उतरतो. परिवर्तन नावाची एक एनजीओ काढून जनलोकपालाचा खर्डा बनवतो. अनेक समानधर्मा लोकांना जमवून आंदोलन करतो. आणि त्या आंदोलनात राजकारण्यांकडून राजकारणात येण्याचे आव्हान मिळताच ते स्वीकारून ते लिलया पेलवून दाखवतो, ही या लोकशाही देशातली फार मोठी घटना आहे.
      आधीच भारतात अनेक राजकीय पक्षांची खिचडी झाली आहे. असे अनेक पक्ष स्थानिक- प्रांतिय कारणाने यशश्वी होत असले तरी थोड्या फार लोकसभेच्या जागा मिळताच ते केंद्रात लुडबुड करू लागतात. अशा कोणत्याही आधीच अस्तित्वात असलेल्या पक्षात केजरीवाल न जाता स्वत:चा स्वतंत्र पक्ष स्थापन करतात हेच प्रंचड मोठे कष्टाचे काम होते.  प्रामाणिकपणा, पक्ष निधी जमवतानाचा पारदर्शीपणा, धनादेशने मिळवलेला निधी, कोणताही गुन्हेगारी शिक्का नसलेले आणि सर्वसामान्य लोकांतून आलेले उमेदवार, समाजकार्याची तळमळ, निगर्वी संभाषण, सामान्य लोकांशी जोडलेली नाळ, साधी राहणीमान, ‍ नकारात्मक प्रचार न करता लोकांच्या  गरजांना हात देणारे कार्यकर्ते आदी अनेक बाबींमुळे आम आदमी पक्ष सर्वसामान्य लोकांना आपला पक्ष वाटतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसाला केजरीवाल यांचे राजकारण भावते. अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष म्हणूनच देशातला राजकीय गणितातला एक प्रातिनिधीक घटक ठरतो. हा पक्ष भविष्यात केवळ दिल्लीपुरता प्रांतिय पक्ष न ठरता तो भारताचा राष्ट्रीय पक्ष ठरावा अशी आशा करू या. केजरीवाल यांच्याकडे  भारतीय राजकारणाचा एक यशश्वी प्रयोग म्हणून पहावे लागेल. आज हा पक्ष राष्ट्रीय नसला तरी त्याने पाडलेल्या पायंड्याने इतर पक्ष अंतर्मुख होऊन आत्मपरिक्षण करू लागले तर ही घटना उत्तम आणि लोकाभिमुख दर्जेदार राजकारणाची नांदी ठरू शकेल.   
      लोक मौनालाच कंटाळतात असे नाही तर त्याच त्याच भाषणबाजीलाही कंटाळतात हे दिल्लीतल्या निकालांनी दाखवून दिले. भाषणबाजीतला विकास हा भुलभुलैया आहे आणि जमिनीवरचा अंजेडा वेगळा आहे हे नागरिकांच्या लक्षात आले. भाषणातला विकास देशात कुठेच दिसत नाही. फक्‍त आठ नऊ महिण्यातच केंद्र सरकारची आपल्याच तोंडून आत्मस्तुती वाढली आहे. (आणि मंदिर बाधंणे हा त्यावरचा कळस!) भ्रष्टाचार कमी झाला नाही. महागाई भडकली. संप्रदायिकता वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव अर्ध्यावर आले तरी पेट्रोल- डिझेल भारतात फक्‍त एकेक- दोन दोन रूपयांची स्वस्त होते. पेट्रोल- डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय किमतीनुसार ठरवण्याचे अधिकार भारतातल्या तेल कंपन्यांना दिल्यामुळे आज त्याचे परिणाम (कच्च्या तेलाच्या किमती पडल्यामुळे) जाणवत नसले तरी भविष्यात प्रचंड किमती वाढू शकतात.
      काळा पैसा जो स्वीस बँकेत असल्याचे सांगितले जात होते, तो कुठे गेला. ज्यांचा होता त्यांनी या गदारोळात तो तिथून काढून दुसरीकडे ठेवला की मुळात तो नव्हताच? आणि असला तरी तो देशात आणणे आंतरराष्ट्रीय कायद्याने इतके सहज शक्य आहे का? मुळात आपल्या देशातून काळा पैसा बाहेर जाऊ नये याची शासनाकडून कोणती खबरदारी घेतली जाते? (असा पैसा बाहेर पाठवणार्‍या खाजगी हवाला यंत्रनेकडूनच भारतातील सर्व राजकीय पक्षांनी पक्षनिधी घेतल्याचे यापुर्वीच उघडकीस आले आहे.) देशातलाच काळा पैसा शासनाला बाहेर काढता येत नाही तर परदेशात गेलेला पैसा आणणे कसे शक्य होणार?
      या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे हे यश आहे. आपच्या यशाने देशातील धार्मिक जातीय समीकरणांचे राजकारण बदलेल अशी आशा करता येईल. भारतातील सर्वसामान्य नागरीक धार्मिक आणि जातीय राजकारण करणार्‍या पक्षांना कंटाळले आहेत. आज दिल्लीत आप पक्ष नसता तर या सत्तर जागा भाजप आणि काँग्रेसमध्ये विभागल्या गेल्या असत्या आणि लोक या पक्षांना मानतात असा अर्थ त्यातून काढला गेला असता. खरे तर या दोन्ही पक्षांच्या प्रवृत्तीत खूप फरक नाही. स्वार्थासाठी हे दोन्ही पक्ष एक झालेले अनेक वेळा दिसून आले. लोक आता पर्यायांच्या शोधात आहेत. जिथे पर्याय असतो तिथे लोक पर्यायासोबत जातात.
      पारदर्शीपणाला महत्व, गुन्हेगारमुक्‍त उमेदवार, जातीयता- धार्मिकतेपासून अंतर आदी बाबी आप पक्षात आजतरी पहायला मिळतात. काही राष्ट्रीय नेत्यांनी केजरीवाल यांना नक्षलवादी ठरवण्यापर्यंत मजल मारली. पण असा प्रचार त्यांच्या अंगाशी आला. देशाच्या सर्वोच्चस्थानी असलेल्या नेत्याने अशा खालच्या स्तरावर (दोन्ही अर्थांनी) प्रचार करणे जनतेला आवडले नाही. केजरीवालांवर नक्षलवादी, गद्दार, देशद्रोही आदी व्यक्‍तिगत आरोप करून भाजपने नागरिकांची नाराजी ओढवून घेतली. ऐनवेळी राजकारणात उडी घेतलेल्या संधीसाधू लोकांनाही मतदारांनी ओळखले आणि त्यांना खड्यासारखे बाजूला सारले.    सारांश, दिल्लीतले आप पक्षाचे यश हा भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा विजय असून हा प्रयोग देशभर यशश्वी व्हायला हवा.
      (दिनांक 5 जानेवारी 2014 रोजी लिहिलेला अरविंद केजरीवाल हा ब्लॉगही http://sudhirdeore29.blogspot.com/2014/01/blog-post.html?spref=tw या लिंकवर इच्छुकांनी जरूर वाचावा. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)


     -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा