सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

फाशीचा वैचारिक फास




-         डॉ. सुधीर रा. देवरे

      (30 जुलै 2015 ला भारताच्या एका देशद्रोही गुन्हेगाराला फाशी झाली. परंतु काही लोकांकडून चुकीच्या पध्दतीने चर्चा झाल्यामुळे वातावरण काही प्रमाणात दुषित झाले होते. त्यात अजून भर नको म्हणून हा लेख त्यावेळी प्रकाशित केला नव्हता. कोणताही विषय कधी जुना होत नाही. पण प्रासंगिक विषयांवरच लिहिण्यावाचण्याची सवय आपल्याला वृत्तपत्रांनी लावून दिली. ती चुकीची आहे.)  
      भारताच्या कायद्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. ज्या ज्या वेळी भारतात एखाद्या गुन्हेगाराला फाशी दिली जाते त्या त्या वेळी फाशीच्या शिक्षेवर सर्वत्र उलटसुलट चर्चा होते. कोणत्याही विषयावर साधकबाधक चर्चा होणे हे जीवंत लोकशाहीचे सुसंस्कृत लक्षण आहेच. पण...  
      या पंधरा वर्षाच्या काळात न्यायालयांनी जवळ जवळ साडेतीनशेच्यावर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावली असली तरी फाशीची प्रत्यक्ष अमंलबजावणी फक्‍त चार कट्टर गुन्हेगारांवर झाली. पैकी एक पाशवी बलात्कारी तर तीन दहशतवादी होते. (या तिघांपैकी एक मूळ पाकिस्तानी तर दोन रस्ता चुकलेले उच्चशिक्षित भारतीय परंतु पाकिस्तानचे काम करणारे होते.) भारताचा कायदाच असा आहे की दहा गुन्हेगार शिक्षेशिवाय मोकाट सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये. त्यात दुर्मिळातल्या दुर्मिळ आणि अपवादात्मक अशा क्रूर गु्न्ह्यांसाठी आपली न्यायालये फाशीची शिक्षा ठोठावतात. बाकी अनेक खुन्यांनाही जन्मठेप होत असते. पैकी प्रत्यक्ष फाशी देतांना सरकारही फक्‍त अपवादात्मक क्रूरातल्या क्रूर कर्म्यांवरच ती लादतात. बाकी गुन्हेगार शिक्षा फाशीची झाली असली तरी जन्मठेप झाल्यासारखे तुरूंगात वावरत असतात.
      जगात चाळीस देश असे आहेत की त्या देशांत फाशीची शिक्षा दिली जात नाही. फाशी देणे हे मानवतेविरूध्द आहे असा एक मत प्रवाह आहे. आणि भारतानेही या चाळीस देशांच्या बाजूने जाऊन फाशीची शिक्षा रद्द करावी असे भारतातल्या काही विचारवंतांचे म्हणणे आहे. हा विचार वाईट नाही. मानवतेच्या दृष्टीने हे बरोबर असले तरी नेहमी दहशतवादाच्या छायेत वावरणार्‍या भारतात असा कायदा करणे हे देशहिताचे आहे की नाही हा सारासार विचार मात्र आपण करायलाच हवा.
      भारतात घडलेल्या दोन घटनांचा उल्लेख इथे केला की हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल: एकोणावीसशे एकोणनव्वद साली व्ही पी सिंग सरकार मंत्रीमंडळातील केंद्रिय गृह मंत्री मुफ्ती मोहम्मद सईद   यांची मुलगी डॉ रूबीनाचे काश्मीरमधून अपहरण करण्यात आले होते. त्या अपहृत मुलीच्या बदल्यात जीवंत पकडलेले पाकिस्तानी दहशतवादी आपल्याला सोडून द्यावे लागले. दुसरी घटना, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एकोणावीसशे नव्याण्णवला
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताचे विमान अपहरण करून कंधारला नेले. आपल्या तुरूंगातले चार पाकिस्तानी कट्टर दहशतवादी आपल्याला विमान प्रवाश्यांच्या जीवांच्या बदल्यात पुन्हा सोडून द्यावे लागलेत. नंतर त्याच दहशदवाद्यांच्या पाठबळाने मुंबईवर हल्ला झाला होता.
      या दोन घटना पाहता कट्टर दहशतवाद्यांना आपल्याला अशा पध्दतीने वेळोवेळी नामुष्कीने सोडून द्यावे लागणार असेल तर  न्यायालयाने फाशीची शिक्षा फर्मावताच देश सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वेळीच फाशी देणे इष्ट ठरू शकते. एकट्या दुकट्या दहशतवाद्यांच्या जीवाचा मानवतावादी विचार करताना त्यांचा ज्यांना (संख्येने प्रंचड असलेल्या निरपराध माणसांना) उपद्रव होतो, अशा माणसांच्या बाबतीत मानवतावादी दृष्टीकोन ठेवणेही अधिक रास्त असू शकते.
      मुंबई बाँब स्फोटातील मुख्य सक्रीय गुन्हेगार असलेल्या याकूबला फाशी दिल्याने फाशीच्या शिक्षेबाबत अशीच उलटसुलट चर्चा झाली. पण ही चर्चा पूर्वग्रहदूषित होती. मतांचे ध्रुवीकरण करत राजकारण करणार्‍या ओवेसी नावाच्या एका जातीयवादी धर्मांधळ्या नेत्याने या फाशीला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला. (याकूबच्या गुन्ह्याची तुलना दिल्ली दंगल, गुजराथ दंगल, मुंबई दंगल, इंदिरा गांधी हत्याकांड, श्रीकृष्ण आयोग, बाबरी मशीद प्रकरण आदींशी करण्याचा प्रयत्न झाला. पण तारतम्य बाळगले तर ही तुलना होऊच शकत नाही. हे सर्व युक्‍तीवाद हास्यास्पद होते. देशांतर्गत संघर्ष होणे वेगळे आणि शत्रू राष्ट्राच्या सहकार्याने देशाविरूध्द युध्द पुकारणे वेगळे.) त्यामुळे याकूबला आतून सहानुभूती असलेल्या काही धर्मांधळ्या माणसांनी उत्तेजीत होऊन या फाशी विरूध्द उघड उघड नाराजी व्यक्‍त केली. दहशतवादाला भुमीगत सहानुभूती असलेले लोक मात्र या घटनेने सपशेल उघडे पडलेत. दहशतवादाला कोणताच धर्म नसतो, हे विसरल्याने काही लोकांचे असे हसे झाले.
      या सर्व गदारोळात फाशीच्या शि‍क्षेला (ती कोणालाही असो) तात्विक विरोध असणारे लोकही या जातीय ध्रुवीकरणात विनाकारण ओढले गेलेत. म्हणजे कोणत्याच गुन्हेगाराला फाशी देऊ नये असे म्हणणारे मानवतावादी लोक आणि फक्‍त याकूबला फाशी देऊ नये असे म्हणणारे धर्मांधळे लोक हे एकाच माळेचे मणी आहेत असे चित्र निर्माण झाले.
      दाऊद, टायगर आणि याकूब हे मुंबई बाँबस्फोटाचे मुख्य गुन्हेगार आहेत. इथले बेरोजगार गरीब तरूण पाकिस्तानात नेऊन त्यांना ट्रेनिंग देणे, स्फोटासाठी आरडीएक्स सारख्या अतिघातक रसायनाचा वापर करणे, देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हादरे देणार्‍या अशा अनाधिकृत हवाला धंद्यातून बाँबस्फोटासाठी पैसे उपलब्ध करून देणे, आपल्या घरातून सर्व सूत्रे हलवणे, घरात स्फोटकांचा साठा करणे आणि या स्फोटांचे किती गंभीर परिणाम होणार आहेत याचे त्यांना ज्ञान असणे. उच्चशिक्षित असल्याने आपण नक्की काय करत आहोत याचे पुरेपुर भान या माणसाला होते. तरीही थंड डोक्याने आराखडा तयार करून आणि पाकिस्तानच्या सहकार्याने बाँब स्फोट घडवून पाकिस्तानात पळून जाणे अशा देश विघातक गुन्ह्यांना आपण पाठीशी कसे घालू शकतो? अशी भयावह पार्श्वभूमी असूनही इतक्या भारतीय लोकांची सहानुभूती या गुन्हेगाराला कशी मिळू शकते याचे आश्चर्य वाटले. याकूबवरची चर्चा ऐकून मला भीती वाटत होती, की हा याकूब आता दाभोळकर आणि पानसरे यांच्या पंक्‍तीत जाऊन बसतो की काय!   
      खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अशा जाती धर्माच्या चष्म्याने आपण पाहू लागलोत तर ज्या देशाच्या प्रायोजक‍त्वाने या देशात दहशतवाद पसरवला जातो त्या पाकिस्तानला आपण काय संदेश देत आहोत याचे तारतम्य या फाशीच्या चर्चेवेळी कोणालाच दिसून आले नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट घडली. अशा फालतू आणि दिशाहिन चर्चेमुळे काही धर्मांधळ्या लोकांनी उचल खाल्ली आणि ते न्यायाधिशांना निनावी धमकी देण्यापर्यंत पुढे गेलेत.
      पुरोगामी म्हणवणार्‍या एका संपादकाने आपल्या संपा‍दकीय अग्रलेखात अजून तेल ओतण्याचे काम केले. काहींनी मुंबई दंगलीची प्रतिक्रिया म्हणून बाँबस्फोट घडवले गेलेत असे युक्‍तीवाद केलेत. मुंबई दंगलीचा बाँब स्फोट घडवून सूड घेण्याचा अधिकार या तिघांना कोणी दिला? म्हणजे ज्यांनी दंगल केली, बरोबर तेच 257 लोक या बाँबस्फोटात मारले गेले, त्यातलेच शेकडो अपंग झाले आणि त्यांचेच करोडो रूपयांचे नुकसान झाले, असे त्यांचे तर्कट आहे की काय, समजायला मार्ग नाही. मुंबई दंगलीचा बदला म्हणून असा बाँबस्फोट घडवायचा जणू दाऊद- मेमनचा मूलभूत हक्कच आहे, असा कोणाचा समज व्हावा, अशा पध्दतीचे हे उथळ युक्‍तीवाद होते. भारतात लोकशाही आहे आणि अभिव्यक्‍ती स्वातं‍त्र्य आहे म्हणून आपल्या सोयीची कशीही चर्चा केली तरी चालेल असे काही वैचारिक गोंधळ घालणार्‍या लोकांना वाटत असावे. फाशीच्या शिक्षेच्या या वैचारिक फासाचे वातावरण भयावहच म्हणावे लागेल.     
      (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
  
      - डॉ. सुधीर रा. देवरे            
        इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

कुंभ मेळा




- डॉ. सुधीर रा. देवरे

      नाशिक कुंभ मेळ्याचे नारे वाजू लागलेत. एकोणा‍वीस ऑगष्ट 2015 पासून मुख्य सिंहस्थ पर्वण्या सुरू होतील आणि त्या सप्टेंबर अखेर असतील. विविध आखाड्यातले साधू, त्यांच्यातले शैव वैष्णव वैमनश्य, भगव्या कपड्यांपासून अंगावर अजिबात कपडे नसलेल्या दिगंबर साधूंसह नाशकात प्रचंड प्रमाणात साधूंचे आगमन झालेले आहे. काही साधू एसी रूममध्ये राहून फेसबुक व्हॉटसअॅप वर अपडेट आहेत तर काही पत्र्यांच्या शेडमध्येही राहतात. पैकी हिमालय बाबा नावाचे साधू एका मंत्र्याच्या आशीर्वादाने(?) अलिशान आश्रमरूपी महालात राहतात. या एकाच आश्रमासाठी दहा कोटी रूपये खर्च झाले असून सदैव दिवा प्रज्वलीत ठेवण्यासाठी बनवलेली नुसती वातच एक कोटी रूपयाची आहे. बाकी एसी पासून सर्व प्रकारच्या सुविधा या आश्रमात आहेतच. अशा अनेक थोर आणि थाटामाटात राहणार्‍या साधूंचे दुर्लभ दर्शन भाविकांना होईल. भाविकही अशा साधूंच्या दर्शनासाठी उतावीळ झालेले असतात.  
      साधूंच्या अलिशान ग्रामांसाठी हजारो एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली. अनेक डोंगर कापण्यात आले. असंख्य वृक्षांना बळी देण्यात आले. अशा पर्यावरणाच्या नाशासह शहर- रस्ते सुधारणांच्या नावाखाली प्रचंड मोठा निधी मंजूर होऊन तितकाच मोठा भ्रष्टाचारही होतो. या कुंभमेळ्यासाठी शासनाचे दहाहजार कोटी रूपये खर्च झाल्याचे ऐकले. एकीकडे हा श्रध्देचा प्रश्न म्हणावा, धार्मिक अध्या‍त्मिक बाब समजण्यात यावी तर अशा पवित्र स्थानी भेट देणार्‍या भाविकांकडून का साधू महंतांकडून चोवीस लाख कंडोमची मागणी कशी वाढते हा प्रश्न सतावणारा आहे.
      नाशिकच्या मागच्या कुंभ मेळ्यात- दिनांक 27 ऑगष्ट 2003 च्या महापर्वणीत एका साधूने हवेत चांदीची नाणी उधळली आणि ती नाणी मिळवण्यासाठी उडालेल्या भाविकांच्या झुंबडीतल्या चेंगराचेंगरीत तेहतीस लोकांना आपला प्राण गमवावा लागला. भाविकांचा हा कोणत्या प्रकारचा हव्यास असतो? देशभरातून नाशकात आलेल्या अनेक भाविकांनी अगदी जाणून बुजून आपल्या म्हातार्‍या आईबापांना 2003 च्या कुंभ मेळ्यात मोकळे सोडून ते आपल्या गावाला निघून गेले. भाविकांची ही कोणत्या प्रकारची भक्‍ती आहे? साधूंनी केलेल्या प्रदुषित पाण्यात अंघोळ करून आणि तेच पाणी तिर्थ म्हणून पिऊन पाप धुणार्‍या भक्‍तांची नक्की कोणती इयत्ता आहे?
      वारकरी संप्रदायातील सर्व संतांसहीत भारतातल्या अनेक थोर संतांनी कुंभ मेळ्यातील साधूंच्या अपप्रवृंत्तीवर घणाघाती टिका केली आहे. भांग, गांजा, चरस, अफू, चिलीम यांच्या नशेने कोणी साधू-संत कसा होऊ शकतो. साधू एकमेकांशी भांडतात. शैव- वैष्णव असा भेद करतात. आपल्याजवळ हत्यारे बाळगतात. शस्त्रांनी एकमेकांवर हल्ले करतात. पर्वणीतल्या अंघोळींवर बहिष्कार घालतात. अलिशान सोयीसुविधांसाठी रूसून बसतात. साध्वींचा विनयभंग करतात. महिला साध्वींना कुंभमेळ्यात स्थान नाही असे जाहीर करतात. साधूंमध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेच्या अनेक पायर्‍या आहेत. म्हणजेच हे साधू उचनीचता पाळतात. साधूंमध्ये पदे असतात. श्रेण्या असतात. त्या मिळवण्यासाठी खरेदी विक्री- लाचलुचपत असते. महामंडलेश्वर हे पद मिळवण्यासाठी केवळ साधूच स्पर्धेत असतात असे नाही तर बेअरबार चालवणारे धनवान- आजचे सचिदानंद बाबाही असतात. यापूर्वी राधे माँनेही हा सन्मान विकत घेतला आहे. विविध आखाडे आणि त्यांचे राजकारण राजकारण्यांनाही लाजवेल असे आहे. साधूंना अशा सर्वसामान्य लोकांसारखे षड्रीपूंनी घेरलेले असूनही भाविक आणि सरकार अशा साधूंपुढे का झुकतात ते समजत नाही. समाधानाची बाब इतकीच की राजकारण्यांसारखे आता एकेक बाबाही उघडे पडायला लागलेत.
      महाराष्ट्र पुरोगामी राज्य समजले जात होते. आता या राज्याला पुरोगामी म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. महाराष्ट्राने शिवाजी राजे, महात्मा फुले, शाहू, आगरकर, कर्वे, भावराव पाटील, आंबेडकर या सर्वांचा पराभव केला आहे. दाभोळकर, पानसरे आज रस्त्यांवर मारले जातात आणि मारणारे कोण ते आपल्याला वर्ष उलटूनही कळत नाही. केवळ सुधारणावादी महान द्रष्ट्यांनाच महाराष्ट्राने संपवले असे नाही तर नामदेव ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ गाडगेबाबा, तुकडोजी आदी संतांनाही महाराष्ट्राने संपवून टाकले.
      आजच्या सर्व सुधारकांनो, ध्यान देऊन ऐका, साधूंच्या वाट्याला जाऊ नका. साधूंचा भविष्यकाळ उज्वल आहे. इतका उज्वल आहे की, कदाचित उद्याचा भारताचा पंतप्रधान सुध्दा एखादा साधूच असेल! म्हणून तर आपल्या देशाचे नेते निवडून देणारे लाखो मतदार साधूंनी शाहीस्नान करून पवित्र केलेल्या गोदावरीत स्नान करण्यासाठी आपला जीव ओवाळून टाकतात. साधू या नावाला भारतात या पुढे खूप स्कोप आहे. सुधारणावाद्यांना नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या. वाद न घालता अंघोळ करून मोकळे व्हा.
      आतापर्यंतच्या सर्वच महान संतांनी कुंभ मेळ्यातील भोंदू पणावर कोरडे ओढले आहेत. मात्र नाशिकला लहानपणापासून पहात आलेल्या कुंभमेळ्यांचे दर्शन कविवर्य कुसुमाग्रजांनाही कसे वाटले ते मुळातून वाचण्यासारखे आहे. म्हणून त्यांच्या 'प्रवासीपक्षी'  काव्यसंग्रहातील "सिंहस्थ" या कवितेने या लेखाचा शेवट करणे सयुक्‍तीक ठरेल:
व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर ।
संताचे पुकार | वांझ झाले ||
रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढीग ।
दंभ शिगोशीग तुडुंबला ||
बँड वाजविती सैंयापिया धून ।
गजाचे आसन महंतासी ||
भाले खड्ग हाती नाचती गोसावी ।
म्हणे वाट यांस पुसावी अध्यात्माची ||
कोणी एक उभा एका पायावरी ।
कोणास पथारी कंटकांची ||
असे जपीतपी प्रेक्षकांची आस ।
रूपयांची रास पडे पुढे ||
जटा कौपिनांची क्रीडा आहे जळ ।
त्यात हो तुंबळ भाविकांची ||
क्रमांकात होता गफलत काही |
जुंपते लढाई गोसाव्यांची ||
येथे येती ट्रक तुपा-साखरेचे ।
टँकर दुधाचे रिक्‍त तेथे ||
यांच्या लंगोटीला झालर मोत्याची ।
चिलीम सोन्याची त्यांच्यापाशी ||
येथे शंभराला लाभतो प्रवेश |
तेथे लक्षाधीश क्‍त जातो ||
अशी झाली सारी कौतुकाची मात
गांजाची आयात टनावारी ||
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद ।
त्यापाशी गोविंद नाही नाही ||
     (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शुक्रवार, ३१ जुलै, २०१५

असुरी संपत्ती आणि अपंग






-         डॉ. सुधीर रा. देवरे

      दै. लोकसत्ता मध्ये वामनराव पै यांचं मंथन नावाचं एका चौकटीत येणारं दैनिक सदर सुरू होतं. अधून मधून या सदरावरूनही मी नजर फिरवीत असे. मात्र दिनांक 10-12-2003 च्या अंकातील मंथन वाचून मी हादरलोच. वामन पै यांनी या सदरात म्हटलं होतं, ज्यांनी अनिष्ट मार्गाने संपत्ती मिळवलेली असते त्यांची मुलं शरीराने अपंग आढळतात! बाप रे. काय वाक्य आहे पहा. प्रचंड संताप झाला. या माणसाशी मी प्रत्यक्ष बोलायचं ठरवलं. त्यांचा टेलिफोन नंबर आणि पत्ता मला मिळवायचा होता. आतल्याआत मी धुमसत होतो. वेळ न दवडता मी डॉ. वा. ना. तुंगार आणि नसिमा हुरजूक यांच्याशी या सदराबाबत फोनवर बोललो. आमच्या चर्चेतून सध्या तरी लोकसत्ताकडे पत्र लिहायचं ठरलं.
      दुसर्‍या दिवशी दिनांक 11-12-2003 चा लोकसत्ता येताच आधी मी मंथन वाचायला घेतलं. पुन्हा तेच. आज जीवनविद्येचं विवेचन थोडं वेगळं असलं तरी उदाहरण कालचंच जसंच्या तसं होतं. आदल्या दिवसाच्या विवेचनाचाच दुसर्‍या दिवशी विस्तार होता. सलग दोन दिवस या तथाकथित अध्यात्मिक माणसाने सर्व प्रकारच्या शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्‍तींवर चिखल फेकला होता, नव्हे हल्लाच केला होता. आता मात्र स्वस्थ बसणं शक्य नव्हतं.
      मी तात्काळ मुंबई लोकसत्ता कार्यालयाला फोन केला. कुमार केतकरांशी बोलायचं म्हणून सांगितलं. तेव्हा लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर होते. फोनवर बोलणार्‍याने इंटरकॉम दिला. कोण बोलतं म्हणून मला विचारलं. मी माझं नाव सांगितलं. ते म्हणाले, सर, केतकर बिझी आहेत. कृपया, माझ्याशी बोललात तर बरं होईल. मला सांगा काय सांगायचं ते. मी त्यांना मंथन सदरातील या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल थोडक्यात सांगितलं आणि वामनराव पैंचा पत्ता आणि फोन नंबर मागितला.
त्यांचा पत्ता व फोन नंबर माहीत नसल्यामुळे सांगता येणार नाही सर.
मग ते आपल्या दैनिकात सदर कसं काय लिहितात?
सदर आहे त्यांचं, पण त्यांच्याशी आमचा डायरेक्‍ट संबंध येत नाही.
मग आता काय करायचं?
आपण पत्र लिहा सर. आम्ही ते लोकसत्ता मध्ये छापू.
पत्र तर लिहितोच मी, पण त्यांच्याशीही मला बोलायचं आहे. आणि हे सदर मात्र ताबडतोब बंद व्हायला हवं. उद्यापासूनच.
सदर बंद करण्याबाबत मी केतकर साहेबांशी बोलतो. आपण पत्रही पाठवा.
      दिनांक 12-12-2003 च्या लोकसत्तात वामन पै चे मंथन सदर नव्हतं. आणि याच दिवसापासून ते सदर कायमचं बंद झालं. मी लोकसत्ताकडे जे पत्र लिहून पाठवलं होतं, त्या पत्राचा सारांश असा होता:
      दिनांक 10-12-2003 व 11-12-2003 च्या दै लोकसत्ता मधील वामनराव पै यांच्या मंथन नावाच्या सदरात अतिशय अनुचित उल्लेख आलेला आहे. ज्यांनी अनिष्ट मार्गाने संपत्ती मिळवलेली असेल, अशांची मुले शरीराने अपंग आढळतात असं जीवनविद्या सांगते! असं वामन पै यांनी या सदरात म्हटलं आहे. मग ज्यांनी अशी असुरी संपत्ती अनिष्ट मार्गाने मिळवलेली नसते, त्यांची मुले कशामुळे अपंग होतात? याचं उत्तर या जीवनविद्येने द्यायला हवे...
      ....परंपरेने बहुतकरून अतिशय गरीब घराण्यात पोलिओ होऊन शारीरिकदृष्ट्या अपंग झालेल्या व्यक्‍ती आढळतात. तसेच अंध, मूक, बधीर आदी अपंगत्वेही अशाच गरीब घराण्यात बहुतकरून आढळून येतात. श्रीमंत वा वामनरावांना अभिप्रेत असलेल्या आसुरी सांपत्तीक वर्गात तशी अपंग व्यक्‍ती आढळलीच तर ती अपवादाने आढळते. तरीही एखादी तथाकथित जीवनविद्या अशी निराधार व बाष्कळ विधाने करीत असेल, तर त्या विद्येची तात्काळ जाहीर होळी करायला हवी. अशी तथाकथित धार्मिकता- अध्यात्मिकता आणि तिच्या खांद्यावर उभे राहून खोर्‍याने पैसे ओढणारे वामन पै सारखे तथाकथित संत हे जोपर्यंत जगातून हद्दपार होत नाहीत, तोपर्यंत समानता व मानवधर्म इथे खर्‍या अर्थाने नांदणार नाही...
      वामन पै चे मंथन सदर लोकसत्तातून बंद झाले तरी हे पत्र मात्र लोकसत्ताने प्रकाशित केले नाही. नंतर त्यावेळी लोकसत्तातच काम करीत असलेल्या राजीव खांडेकर यांच्याकडून वामन पै चा पत्ता आणि फोन नंबर मी मिळवला. त्यांना खरमरीत पत्र लिहिले. त्याचे उत्तर अद्याप आले नाही. फोन केला तर वामन पै फोनवर कधीच आले नाहीत. ज्या ज्या वेळी फोन केला तेव्हा ते बाहेर दौर्‍यावर असायचे.
      (पंख गळून गेले तरी या माझ्या पुस्तकातील एका मुद्याचा संपादित अंश. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

मंगळवार, १४ जुलै, २०१५

वारी: महान संतांची पंढरी




- डॉ. सुधीर रा. देवरे

महाराष्ट्रातील एका कोपर्‍यात वसलेल्या पंढरपूर या छोट्या गावातील विठ्ठल या दैवताने आतापर्यंत जवळपास हजार वर्ष सर्व महाराष्ट्र ढवळून काढला. सातशे वर्षांपासून वारी सुरू आहे. या पंढरपूरातील विठ्ठलाने ज्ञानेश्वर, तुकारामसारखे महान संत या देशाला -जगाला दिले. अगदी बालपणापासून ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांबद्दल मला प्रचंड कुतुहलमिश्रीत ओढ आहे. पण वारकरी पंथातील केवळ एवढे चारच संत नाहीत. निवृत्ती, सोपान, मुक्‍ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, वेणाबाई, सेना न्हावी, चोखोबा, गोरा कुंभार, बंका महार, नरहरी सोनार आदी सर्वच संत की ज्यांची नावे एका बैठकीत आपल्याला आठवू नयेत. पारंपरिक जातिभेदाच्या चिखलात रूतलेल्या समाजात वारकरी संप्रदायाने अठरा पगड जाती जमातीचे लोक नुसते समानतेच्या पातळीवरच आणले नाहीत तर तथाकथित क्षुद्र लोकांना संतत्वही बहाल केले ही साधीसुधी घटना नाही. म्हणून वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील मोठा चमत्कार आहे, असे मला वाटते. लहानपणापासून कीर्तन, भारूड, भजन, अभंग, ओव्या हे माझे आवडते कार्यक्रम आणि साहित्य. लहानपणापासून आमच्या विरगावात जिथे कुठे कीर्तन असेल आणि ते कोणत्याही कीर्तनकाराचे असो मी ते कधीच चुकवले नाही. अगदी दुसर्‍या दिवशी शाळेची परीक्षा असली तरीही. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला लावणी असल्याचे सांगितले जाते. लावणी बदनाम आणि वाईट आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही. तरीही महाराष्ट्राची खरी पारंपरिक लोककला भजन, कीर्तन, भारूड, अभंग आणि ओवीच आहे असे मला वाटते.
पंढरपूरची वारी हा प्रकार माझ्यासाठी प्रचंड कुतुहलाचा. लहानपणापासून माझ्या गावात आणि इतरत्रही वारीसाठी निघणारे लोक मी जवळून अभ्यासत आलो. सर्व जातीतले आणि धर्माचेही वारीला निघणारे लोक पायी- अनवाणी चालताना दिसतात. देहूहून निघणारी तुकारामांची पालखी आणि आळंदीहून निघणारी ज्ञानदेवांची पालखी हे आजच्या वारीचे आकर्षण असते. वारीसाठी गाव ते पंढरपूर हे अंतर सुध्दा साधेसुधे नाही. देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हे अंतर दोनशे ते तीनशे किमी इतके येईल तर महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून पाचशे किमी पेक्षा जास्त अंतरावरून वारकरी काही ठरलेले मुक्काम करत पायी वारीला निघतात. धोतर, खादी- सुत वा मांजरपाटाचा पांढरा  सदरा, डोक्यावर पांढरी टोपी असा साधा पांढराशुभ्र पेहराव. (या टोपीला गांधी टोपी हे नाव मिळण्याच्या हजारो वर्ष आधीपासून वारकरी आणि महाराष्ट्रातले गावकरी ही टोपी आणि पांढराशुभ्र पेहराव परंपरेने वापरताना दिसतात. महाराष्ट्रातील लोकांची ही  पारंपरिक वेशभूषा आहे. महाराष्ट्रात कपाशीचे पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतले जात होते म्हणून इथला पारंपरिक पेहराव असा सुती पांढरा शुभ्र असावा. महात्मा गांधींच्या चरखाचा सुत कताईचा प्रभावही नंतरच्या काळात नाकारता येणार नाही.) गळ्यात मृदंगाची दोरी अडकवून दोन्ही हातांनी मृदंग वाजवणारे काही वारकरी, हातात टाळ, काठीला खोचलेला भगवा ध्वज, काही वीणाधारी, कपाळाला बुक्का. फुगडी खेळत, कान धरून उड्या मारत, अभंग, ओव्या, टाळ-मृदंग यांच्या तालावर आणि विठ्ठल नामाचा- हरि नामाचा गजर करत नाचत डुलत पुढे सरकणे अशी ही वारी. मुक्कामाच्या गावी कीर्तन. स्त्रियांचे नऊवारी लुगडे, डोक्यावरून त्या लुगड्याचा मोठा पदर आणि डोक्यावर तुळशीची कुंडी हे दृश्य मनाची मरगळ झटकून टाकते. वारकर्‍य्रात एकमेकांचा पाया पडणे ही प्रथा तर सर्वच भक्‍त समान पातळीवरचे आहेत, कोणीही कोणापेक्षा श्रेष्ट वा कनिष्ठ दर्जाचा नाही असा संदेश देते. वारकरी पंथात नकली संतांना स्थान कधीच नव्हते. आजही नाही. अंधश्रध्देला या पंथात कधीच थारा मिळाला नाही. संतांनीच अनेक वाईट प्रथांवर कोरडे ओढले आहेत. टीका केली आहे. ब्राह्मण्य, नवस सावस, कर्मकांड, अंगात येणे, बळी देणे, नैवेद्यासाठी कोबंड्या- बकरे मारणे याला विरोध केला आहे.
ज्ञानेश्वरांपासून संस्कृतातूत प्राकृताकडे येण्याचा प्रवाह सुरू झाला. भगवतगीता सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून त्यांनी गीता प्राकृतात म्हणजे मराठीत आणून भावार्थदिपिका- ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोचवली. तेव्हापासून महाराष्ट्रात थोर संतपरंपरा सुरू झाली. आणि नंतरच्या सर्व संतांनी मराठीत अभंग रचना केली, ओव्या लिहिल्या. मराठीत लिखित साहित्य- काव्य परंपरा ही संताची देणगी आहे. वारकरी संप्रदायामुळे प्रत्येक एकादशीला गावोगावी- खेडोपाडी घराघरात सामुदायिकरित्या हरिपाठ गायला जाऊ लागला: हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। असे लयबध्द शब्द कानावर पडत सकाळी जाग येऊ लागली. भोप्या- वासुदेवाचे पाळणे आणि हरिपाठाच्या लयबध्द ओव्यातील खणखणीत शब्द आठवताच मी अजूनही संमोहीत होत बालपणात रमतो. नंतर याच संतांच्या वाटेने जात विनोबा भावे यांनी गीतेच्या अनुष्टुभ् छंदातच मराठीत गिताई लिहिली. तुलना करणे चुकीचे असले तरी गिताईचा अनुवाद मूळ गीतेच्या पुढे गेलाय असे मला वाटते. साध्यासुध्या संस्कृतमुक्‍त शब्दांमुळे सहज कळणारा अर्थ आणि छंदातील मात्रा यांचा सुरेख संगम गिताईत जुळून आला आहे.
या संत परंपरेतील शेवटचे संत म्हणजे गाडगेबाबा असे मी मानतो, असे मी दोनहजार चार सालात माझ्या एका सदरातील लेखात नमूद केले आहे. गाडगेबाबांनंतर वारकरी परंपरेत कोणी संत पहायला मिळत नाही. पण आज नकली संतांचा सर्वत्र सुळसुळाट- बुजबुजाट झाला असला तरी या नकली संतात वारकरी परंपरेतले संत नाहीत. चंगळवादी संतांची एक लाटच आज पहायला मिळते. देशात- विदेशात विमानाने प्रवास करणे, एसी गाड्यांतून फिरणे, आश्रमांच्या नावाखाली प्रचंड मालमत्ता कमावणे, भूखंड मिळवणे- बळकावणे, विविध महाविद्यालये उभारून देणग्या घेऊन प्रवेश देणे, योग शिबीरे- संत्सगांसाठी प्रचंड फी आकारणे आणि या सर्व व्यवसायाला देवत्वाचा- धार्मिक-अध्यात्मिक मुलामा देणे. म्हणूनच या प्रचंड मिळकतीतून सरकारी आय कर बुडवण्याची वृत्ती. भोळ्या-भाबड्या लोकांपासून व्याधींना कंटाळलेले आणि सुशिक्षित पण मानसिकतेने दुर्बळ बनलेले लोक अशा तथाकथित संताच्या कहेत जातात.
इथल्या कष्टकरी लोकांना संस्कृत समजत नाही म्हणून तात्कालिन तथाकथित कर्मठ पंडितांचा रोष पत्करून ज्ञानदेव- एकनाथांनी गीता भागवत मराठीत आणले आणि इतर अभंग रचनाही मराठीत केली. ज्ञानदेवांना अनुसरून नंतरच्या सर्वच संतांनी मराठीत अभंग रचना केली. तुकारामांनी तर कळस गाठला. ग्रामीण बोलीतील त्यांचे अभंग म्हणजे पहिली अस्सल ग्रामीण कविता ठरते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही संप्रदाय पुन्हा संस्कृताकडे का वळले ते समजायला मार्ग नाही. भगवद्‍गीता, त्रिकालसंध्या, गायत्री मंत्र, निवडक संस्कृत श्लोक व कृतक भाबड्या गोष्टी सांगत केवळ लोकांना बोलका पोपट बनवणारे काही संप्रदाय महाराष्ट्रात उदयास येऊ लागले आणि मध्यंतरीच्या काळात वारकरी संप्रदाय झाकोळल्यासारखा झाला. संस्कृतातून प्राकृताकडे नेणार्‍या संतांची विशाल दृष्टी आणि प्राकृतातून पुन्हा संस्कृताकडे नेणारी सांप्रदायिक संकुचित दृष्टी तपासून पहावी  लागेल. अशा काही संप्रदायांमुळे आता खेड्यापाड्यातून एकादशीच्या पहाटेला हरिपाठाचे शब्द कानावर पडत नाहीत. लोकांना आधुनिकतावादाला जवळचे वाटतील असे रोज नवनवे देव हवे असतात. रोज नवी चव हवी असते. त्यांचे कर्मकांडही आधुनिकतेला जवळचे हवे असते. लोकांच्या मानसिकतेला नेहमी वेगळेपणा भावतो आणि त्यांना अध्यात्माचा सोपेपणाही हवा असतो. काळाचा महिमा म्हणून, कालाय तस्माय नम: या न्यायाने नव्या नावाचा नवा देव भावायला लागतो. आणि नेमका त्याचाच फायदा नकली संत उठवतात.
वीस वर्षापूर्वीचे शिर्डीचे मंदिर आणि आजचे मंदिर यांची तुलना करून पाहू या.  त्या मंदिरात जीव रमायचा. जवळून दर्शन व्हायचे. पवित्रतेचा सुगंध दरवळायचा. मंदिराबाहेर थोडीफार झाडी झुडपं असल्याने नैसर्गिक प्रसन्न वातावरण होते. पण आता शिर्डीला जाऊन आलो तर तिथे जीव गुदमरू लागला. आपण पाहिलेले वीस वर्षापूर्वीचे हे मंदिर नव्हे असे वाटत होते. आधीच्या शिर्डीच्या कोणत्याही खुणा तिथे दिसत नव्हत्या. मंदिराचा प्रचंड आडदांडपणा अंगावर येत होता. मंदिर नव्हे तर ते प्रचंड कोंडवाड्यातील अक्राळ जंगल वाटू लागले. साईबाबांची मुर्तीही कोंडून ठेवल्यासारखी वाटली. तिथे कोणताही पवित्र सुगंध जाणवला नाही. या व्यावसायिक पांढर्‍या जंगलातून मी केव्हा एकदा बाहेर पडेल असे झाले. या उलट पंढरपूरचे मंदिर. तेच मंदिर. तोच पवित्रपणा. इतक्या सुबक प्राचीन मंदिराचा पाडाव करून जर कोणी तिथे आजचे भव्यदिव्य मंदिर उभारू पहात असेल तर वारकर्‍यांनी ते कधीच होऊ देऊ नये. कारण नुसते देवाचेच- मूर्तीचेच पावित्र्य नसते तर देवासोबत तो ज्या पवित्र पारंपरिक पुरातत्वीय वास्तुत प्राणप्रतिष्ठित झालेला असतो ते जसेच्या तसे जतन करणे हे तेवढेच महत्वाचे असते.
      रूढ अर्थाने मी आस्तिक नाही. देवाचे अवडंबर माजवणे मला मान्य नाही. मी देवांची दुकाने थाटण्याच्या व देवाच्या नावाने व्यावसायिक दुकानदारी करण्याच्या विरोधात आहे. पण वारकरी संप्रदायातील विठ्ठलाच्या निमित्ताने जर जगाला एवढे महान द्रष्टे संत मिळत असतील तर असे देव असणे किती आवश्यक आहे हे ही तेवढेच खरे. (माणूस जेव्हा देव होतो या माझ्या ग्रंथातील एका प्रकरणाचा संपादित अंश. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

मंगळवार, ३० जून, २०१५

स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:






- डॉ. सुधीर रा. देवरे

      हे जग बदलण्याची वाट पहात बसू नका. जग बदलण्याच्या भानगडीतही पडू नका. आपण स्वत: बदला असे भाष्य आपल्याला अनेक आदर्शवत लोकांकडून ऐकायला मिळतं. आणि नेमक्या अशा लोकांकडून ऐकायला मिळतं की त्यातील काही लोकही दुसर्‍यांना नेहमी वाईटच म्हणत असतात. प्रवचनात, आख्यानात, कीर्तनात, भाषणात वा एखाद्या कार्यालयीन ट्रेनिंग सेंटरमध्ये असे हमखास शिकवले जाते. या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी सोबत एक दृष्टांत कथाही सांगितली जाते. ती कथा अशी:
      ‘‘ज्याला हे जग बदलायचे होते अशा एका माणसाने देवाची प्रार्थना करून देव प्रसन्न करून घेतला. प्रसन्न झाल्यावर देवाने त्या माणसाला विचारले, काय हवंय वत्सा तुला?  तो माणूस म्हणाला, मला जग बदलायचं आहे. त्यासाठी मला बळ दे. देव म्हणाला, तथास्तु. तुला वीस वर्ष देतोय मी. जा जग बदलून ये. वीस वर्षानंतर पुन्हा तो माणूस देवाजवळ आला. म्हणाला, जग खूप मोठे आहे म्हणून मला जग बदलता येत नाही, आता मी देश तरी बदलून पाहतो. देव म्हणाला, जा तुला पुन्हा वीस वर्ष दिली. तुझा देश बदलून ये. वीस वर्षानंतर तो परत येतो आणि देवाला सांगतो, देशही खूप मोठा आहे. देश बदलता येत नाही. देश बदलत नाही तर आता मी राज्य तरी बदलून पाहतो.
त्याला आपले राज्यही बदलता येत नाही. मग तो जिल्हा बदलायचं म्हणतो. नंतर तालुका व त्यानंतर गाव बदलू पाहतो. पण गावही बदलत नाही. स्वत:च्या घरातील माणसांची वृत्तीही त्याला बदलता येत नाही. म्हणून तो देवाला शरण येतो. देवाला सांगतो, कोणीच बदलत नाही म्हणून मी आता स्वत: बदलणार आहे. आणि तो बदलतोही.
देव हसतो. म्हणतो, समाज बदलू नका. स्वत:ला बदला. जगासारखे वागा.’’
      इथेच तर खरी गोम आहे. आपण बदलणं म्हणजे नेमके काय? कसे बदलायचे? लोकांप्रमाणे आपण वागणं म्हणजे आपण बदलणं. लाच घेणार्‍यांबरोबर जमवून घेण्यासाठी लाच घ्यायला सुरूवात करायची म्हणजे आपण बदलणं का? अशा प्रकारचे आपण बदलणं देवाला अभिप्रेत आहे का? भ्रष्टाचार्‍यांबरोबर जमवून घेणे म्हणजे भ्रष्टाचाराला साथ द्यायची? नंगटांमध्ये बदलून नंगट व्हायचं? दारू पिणारा आपल्या सांगण्यावरून दारू पिणे सोडत नसेल तर आपण त्याच्यासोबत दारू प्यायची? कोणतेही व्यसन करणारा व्यसनी आपले व्यसन सोडत नसेल तर आपण त्याच्यासारखे व्यसनी व्हायचे? जे दोष आपल्याला इतरत्र दिसतात त्यांच्यासारखे होऊन त्या दोषांना सामोरे जायचे, म्हणजे बदलणे? अथवा वाईट गोष्टींकडे डोळेझाक करायची? चांगलं शिकवायचं नाही आणि विरोधही करायचा नाही? अन्याय सहन करायचा? अन्याय पचवत जगायचे. समाज बदलायच्या भानगडीत न पडता आपण बदलायचे म्हणजे आपण त्यांच्यासारखे अवगुणी व्हायचे, असे सरळ सरळ हे दृष्टांत आपल्याला सांगतात. शिकवतात. असाही अर्थ या स्वत: बदलण्याच्या उपदेशात असू शकतो, तो नाकारता येणार नाही.
      आपला स्वभाव लोकांना आवडत नाही म्हणून तो बदलायचा. खरे बोलायची सवय असेल तर ती सवय बदलायची. तोंडावर गोडी गोडी बोलायचे. पाठ फिरताच निंदा नालस्ती करायची. सगळ्यांशी क्षुद्र राजकारण खेळायचे. लोकांना अडचणीत आणायचे. म्हणजे लोक आपल्याला चांगले म्हणतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. लोक आपल्याला घाबरतील. समोर येताच नमस्कार करतील. आपण लोकांसारखे बदलायचे म्हणजे असे बदलायचे का? का आपले सत्व कायम ठेवायचे, आपले तत्व जपायचे. आपण बदलायचे म्हणजे नक्की काय करायचे? हे सोपे प्रश्न नाहीत. खूप गहन आहेत. क्षुद्र राजकारणाला बळी पडणार्‍या लोकांनाच हे प्रश्न सखोल कळू शकतात. अनेक लोक अशा क्षुद्र राजकारणामुळे आपल्या आयुष्यातून उठले आहेत.
      सारांश, आपले आचार‍, विचार, तत्व, ज्ञान आपल्याला स्वत:ला भावत असतील. आपण स्वत: वाईट मार्गावर नाही. आपलेच वागणे योग्य आहे, अशी आपल्याला खात्री असेल तर आपला मार्ग सोडून दुसर्‍याच्या मार्गाने जाणे धोकादायक आहे. आपण आणि आपले काम भले. म्हणून आपल्यासारखे होण्यासाठी जग बदलणार नसेल तर आपण त्यांच्यासारखे कधीही होऊ नये. हेच गीतेत वेगळ्या शब्दात म्हटले आहे:
स्वधर्मे निधनं श्रेय:
परधर्मो भयावह: ।।
निदान मी स्वत: तरी गीतेतल्या या पदाचा असा अर्थ काढतो.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/