रविवार, १ मार्च, २०२६

बोलीभाषांच्या श्रीमंतीचे जतन

  - डॉ. सुधीर रा. देवरे

 

                    २१ फेब्रुवारी हा आंतररार्ष्टीय मातृभाषा दिवस तर २७ फेब्रुवारी हा महाराष्ट्रातील मराठी भाषा गौरव दिवस’, या निमित्ताने बोलीभाषांच्या श्रीमंतीचे जतन हा लेख आज १ मार्च २०२६ च्या दिव्य मराठी, रसिक’ पुरवणीत प्रकाशित झाला आहे :

           

                    बोलीभाषा बोलायला आपण जिथेतिथे लाजत असतो, कारण आपल्याला आपल्या भाषेचाच कमीपणा वाटत असतो. हा न्यूनगंड आधी आपण आपल्यातून काढून घराघरात- गावात- शिवारात- शहरात आपली मातृभाषा असलेली बोली आपण सर्वांनी राजरोस बोलायला हवी.

                    भाषा ह्या नावातच लोकसंस्कृती, सण, जत्रा, लोकपरंपरा, लोकोत्सव, विधी, विधीनाट्य, रीती, रुढी, लोकदेव- देवता, खेळ, लोकजीवन ह्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. तसे पाहिले तर लोकसंस्कृतीतल्या सगळ्या घटनांतून- घटकांतूनच स्थानिक भाषांचा जन्म झालेला असतो. 

                    पारंपरिक लोकप्रथांमधून त्या त्या भागातल्या बोलींचा उगम झालेला आहे. त्या त्या भागात दरवर्षी ज्या वेगवेगळ्या विधी आपण करतो- पाळतो त्यातूनच पारंपरिक भाषेला संजीवनी मिळते. म्हणून आजही टिकून असलेल्या बोली ह्या आर्ष भाषा- जुन्या भाषा म्हणता येतील इतक्या त्या आदिम आहेत. अमूक ही भाषा अमूक भाषाची जननी आहे, अथवा अमूक ही बोली अमूक भाषेपासून तयार झाली अशी उलटी उत्पत्ती लावणे चूक आहे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

                    उदाहरणार्थ, अहिरानी बोलीत असे आजही अदमाशे दोनेकशे शब्द तरी नक्की सहज सांगता येतील, जे शब्द दुसर्‍या भाषेत कुठेच दिसत नाहीत. त्या शब्दांचा इतर भाषेतले धातू कोणाला माहीत नाहीत. त्यांची स्पष्ट व्युत्पत्ती लावता येत नाही. अशा खूप कारणांनी अहिरानीला आदिम भाषा म्हणता येईल, असे म्हणायला वाव आहे. पण आपण अजून तरी तशा आदिम भाषेचा दावा कोणाकडे केलेला नाही. सरकारकडे नाही की समाजाकडे नाही. एक शक्यता इथे बोलून दाखवली.

                    फक्त अहिरानीतच सापडतील असे काही आठवतील ते शब्द इथे मुद्दाम देत आहे : झोऱ्या, मोचडं, मेचडं, डांजनं, खरंदगड, पांचफळक, धुतरूंग, दारुदरफडा, झुलई, दडस, वरमाड, फुरका, वडगन, पोतारा, गागा, डाभुर्ल, सरमट, मट्यारं, बंग्या, साबडं, डिर, गेदू, कुटाना, गटाना, मोगरी, पिटनी, आबगा, येकलपाई, गवांदखाल, कचकाई, फिस्क, बुचकं, फिंद्रा - फिंद्री, फुई, फुवा, जीजी, मुऱ्हाळी, हू, बुचका, सुम, फसकारा, तोहमत, किलवाना, बावच्या, बऱ्हानी, बह्याळ, पट्यारा, लग्गर, हेंगाडं, खंतड, सुकाळीना, उकतं, ताम्हा, च्याहूर, वडांग, बंगळी, किलचन, आडेकडे, कवाड, बागेबागे, आग्या, कुश्टाळं, शे, सावटा, बठ्ठा, फोत्र, सोला, साक्रू, कोंडाळं, पाटोड्या, डुबुक वडा, टहाळबन, डोंगरखाल, हेटे, वऱ्हा, रावन्या, गंगूती, आवळ्या, कोली, सोळी, सांजोरी, किलचन, सानं, सरी, आवते, नाडा, पुल्हाळ, चावळनं, ढेंगडं, ढुब्ब, आंगडं, कुरधानं, मांजन्या, तमान, साबडं, भनका, चोधडी, वैरन असे खूप शब्द सांगता येतील. आणि प्रत्येक बोलीत असे आगळेवेगळे शब्दभांडार आहे.

                    अशा शब्दांसोबतच शब्दगोळे म्हणजे वाक्‍प्रचारसुध्दा अहिरानीत खूप वेगळे दिसतात : टुमनं लावनं, ल्हाव करनं, रव करनं, ल्हनं नसनं, खिजी पडनं, हाय उफस करनं, आग पाखडनं, उजारी देनं, दनकारी देनं, डाच्च करनं, दडी मारनं, पोटमा बळी येनं, खिजी पडनं, उखाळ्या पाखाळ्या काढनं, उन्हात पाडनं, रुशी बसनं, बुरची घेनं, सरमाई जानं, हात वढाखाल ऱ्हानं, पान लागनं, चिपडं पडनं, काकडा वल्हावनं, हालकी वडांग ऱ्हानं, दिवाबत्तीनी येळ, लावदुऱ्या लावनं, उफडाई उठनं असे कित्येक. आणि सगळ्याच बोलीत असे वेगळे धन सापडेल.

                    अहिरानीतले पारंपरिक मौखिक साहित्याची यादी सहज वाचली तरी तिचा पसारा लक्षात येतो. तो पसारा माझ्या अनेक पुस्तकांतून याआधी आला आहे.

                    असे सगळे शब्द, वाक्प्रचार, म्हणी, उखाणे, आण्हे, लोकगीते, लोककथा, लोकनृत्य, त्या त्या लोकबोलीतले कीर्तन, गोंधळ, वही असे पुष्कळ वेचून जपून ठेवावे लागेल, आवरुन ठेवावे लागेल, जतन करावे लागेल. याच्या पुढे अजून कोणता काळ कसा येईल कोणाला सांगता येईल? आणि हे भाषेचे धन एकदा बुडालं ना, आणखी जसेच्यातसे बाहेर जिवंत काढता येणार नाही. चाळीस- पन्नास वर्षांपूर्वी जे शब्द सहज जीभेवर यायचे, ते आज सहजासहजी येत नाहीत, तर कल्पना करा, हजार- पंधराशे वर्षांपूर्वीच्या शब्दांचे काय झाले असेल? आपापल्या बोलीभाषेतले असे असंख्य शब्द हरवले असतील. म्हणून आतातरी जागे होऊ. आज जे हयात आहेत ते शब्द याच्यापुढे जिवंत ठेवायचे असतील, तर आजचे हयात धन आपल्याला जतन (डाक्युमेंटेशन) करावे लागेल, तरच आताच्या सर्वच बोलीभाषा पुढच्या पिढीला जिवंत दिसतील.

                    यापुढे (एकाच भाषा पट्ट्यातली) इथली भाषा वेगळी आणि तिथली निराळी असा भेद भाषेत करायचा नाही. कोणतीही बोली कुठेही बोलली जात असेल तरी ती जतन केली पाहिजे. एकाच भाषेत थोडाबहुत भेदभाव होतो, तो करु नका. म्हणजे इथली भाषा अस्सल आणि तिथली भाषा नक्कल, असे खाजगीतही बोलू नका. तेव्हा बोलीभाषा टिकतील. जगातल्या कोणत्याही भाषेला कमी समजू नका. आपल्या व्यक्तीगत हौसमौजसाठी भाषेचे हलके राजकारण करू नका. केवळ प्रसिध्दीसाठीच्या राजकारणामुळे बहुतेक आपले स्वत:चे भले होईल, पण बोलीभाषांचे भले होणार नाही. भाषांचे इतके नुकसान होईल की ते कधीही भरुन निघणार नाही.      

                    भाषेचा विचार करताना त्याच्या केंद्रस्थानी माणूस आहे, हे प्रथम लक्षात घ्या. माणूस माणसासोबत जोडत गेले की समाज तयार होतो. आणि हा समाज जोडण्यासाठी भाषेची गरज लागते. हे सर्व नीट लक्षात घेऊन आपण सर्व लोक एकमेकांशी जोडू. असे इथूनतिथून सर्व लोक जोडले गेले की मग भाषाही तग धरून उभी राहील. हे फक्त एखाददुसरी प्रमाणभाषेला लागू नाही. तसेच हे फक्त एखाद्या बोलीला लागू नाही. हे एकूणएक भाषेसाठी आपण बोलत आहोत. मग ती भाषा आजच्या मराठीसारख‍ी प्रमाणभाषा असो, अथवा जगातील कोणतीही आपल्याला बोलता न येणार्‍या भाषा असोत...

                    (दिव्य मराठी, रसिक’, पुरवणी १ मार्च २०२६ मधील प्रकाशित लेख. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)  

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

अहिराणी, एकूण बोली आणि मराठी- भाग तीन

 

 

- डॉ. सुधीर रा. देवरे


३. अहिराणीसह बोली परिवेशांची लोकसंस्कृती :

                     अहिराणी लोकसंस्कृती वा एकूण बोली भाषांची लोकसंस्कृती म्हणजे नेमकं काय? याबाबत आपण अतिशय वरवरचा विचार करून वर्णनात्मक स्वरूपात मांडणी करत अहिराणी लोकसंस्कृतीचं स्थूल स्वरूप सांगत राहतो. लोकजीवनातल्या ठळक बाबींचा उल्लेख करत अमूक अमूक या बाबी म्हणजे अहिराणी लोकसंस्कृती असं म्हणू लागतो. पण हा विषय आपण समजतो त्यापेक्षा खूप खोल, सूक्ष्म आणि व्यापक आहे, तो मुळातून समजून घेतला पाहिजे.

                     अभिर- अहिर- अहिराणी या सूत्रानुसार अभिर लोकांची भाषा अहिराणी हे आपण कधीच मान्य केलं आहे. आज नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि संभाजीनगरचा काही भाग ह्या जिल्ह्यांत अहिराणी बोलली जात असली तरी अभिर लोक पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजराथसह संपूर्ण उत्तर- वायव्य भारतात पसरलेले आहेत, आणि तिकडूनच ते बागलाणात- खान्देशात आले. ज्या त्या स्थानिक गरजेनुसार, ज्या त्या परिवेशातल्या बदलानुसार लोकांची स्थानिक भाषा बदलत गेली. आज विविध प्रांतात (महाराष्ट्राबाहेर) राहणारे अभिर त्या त्या प्रांतीय भाषा बोलतात. पण अशा सगळ्याच अभिरांत (म्हणजे आजच्या बहुजन समाजात) जी जात उतरंड तात्कालीक अभिजन वर्गानं जाणीवपूर्वक लादून बहुजनांचं शोषण सुरु केलेलं दिसतं, ते धर्मसत्तेतून कायमस्वरुपी आजही समाजसत्तेत दिसून येतं. हे शोषण फक्त अभिरांचंच झालं असं मात्र नाही, तर ते संपूर्ण भारतभर, अगदी दक्षिण द्राविड लोकांतही (स्थानिक मूळ रहिवाशांत) पुढं पध्दतशीरपणे होत राहिलं.

                     या विशिष्ट कारस्थानात गुपचूप अनेकसूत्री कार्यक्रम राबवला गेला. यात स्थानिक बोलीभाषा मारणं, अथवा त्या भाषांची अशुध्द, गावठी अशी बदनामी करत त्यांच्या जागी संस्कृत भाषा ग्रंथांतून ठरवून प्रस्थापित- उपयोजित करणं, अथवा त्याच भाषेवर संस्कृतचा मुलामा चढवत प्रमाणभाषा- शुध्द भाषा म्हणून मिरवणं, स्थानिक ग्रामीण लोकदैवते नष्ट करणं, लोकदैवतं नष्ट होत नसतील तर अशा लोकदैवतांच्या भाकड अनैतिक खोट्या कथा- गोष्टी पसरवणं, त्यांचं अस्तित्व भ्रष्ट करणं, त्यांना तामसी म्हणणं, त्यांना अशिष्ट भक्षण करणारे ठरवणं, त्यांच्या मुर्ती विकृत बनवणं (उदा. गणपती आणि इतर बरेच.), अशिष्ट लोकांचे देव अशिष्ट असा प्रचार करणं, इतकं करूनही ते नष्ट होत नसतील तर त्यांचेच व्यापारीकरण सुरू करत त्यांच्याच नावानं व्यवसाय सुरू करणं, पुढं बहुजनांतल्या ऐतिहासिक महापुरूषांबद्दलही हेच धोरण राबवून आडमार्गानं त्यांना कमी लेखण्याची पध्दतशीर भूमिगत चळवळ- कुजबुज मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. समाजात आपले वर्गवर्चस्व प्रस्थापित होईल अशी व्यवस्था जाणूनबुजून निर्माण करण्याच्या अनेक गोष्टी विशिष्ट अभिजन वर्गाकडून सतत घडत राहिल्या आहेत, अजूनही होत आहेत. अगदी आधुनिक म्हणता येईल अशा आजच्या काळातही हे राजरोस सुरू आहे. या सगळ्यांचे पडसाद भाषेत पडत राहतात, मग ती शिव्यांची भाषा असो की स्तुतीची.

                     हे सांस्कृतिक थंड यादवी युध्द एकतर्फी असून ते प्रत्येकालाच जाणवत नाही. आपल्या अडाणीपणामुळं वा न्युनगंडामुळं अनेक लोक उच्चभ्रूंचं अनुकरण करत राहतात. असं करण्यात आपण आपल्या मूळ लोकसंस्कृतीशी प्रतारणा करतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. लोकसंस्कृतीशी फारकत घेत आपल्या भाषेचीही बहुजन वर्ग नाळ तोडू पहातो. आपल्या भाषेला अभिजन लोक अशुध्द, गावढंळ म्हणतात म्हणून बहुजन त्यांच्या भाषेचंही अनुकरण करू लागतो. आपले पारंपरिक कामं करताना वा बदललेली मजूरी करताना आपण इथल्या पारंपरिक व्यवस्थेचे बळी आहोत, हेही त्यांना कळत नाही. काबाडकष्ट करूनही ते दिखाव्याच्या अनुकरणात मस्त असतात. खस्ता खात कमवलेला पैसा, तथाकथित मुक्ती मिळवण्याच्या लालसेनं वा घरबसल्या पुण्याच्या गणनेसाठी, एखाद्या पोथीतून सांगितलेल्या विधीवर दान- दक्षिणेत सहज उधळून देतात.

                     ही लादलेली ऐतखाऊ व्यवस्था स्वानुभवातून ज्यांच्या लक्षात येते, ते लोक अशा शोषणाची मांडणी करू लागतात, पण हे प्रबोधन एकतर अतिसामान्यांपर्यंत पोचत नाही अथवा लोकांत पध्दतशीरपणे पसरवलेले पारंपरिक तथाकथित देवसंस्कार त्यांना लुबाडू वास्तवाची जाणीव होऊ देत नाहीत. यावर उपाय म्हणजे ज्यांचं थोडंफार वाचण्यापुरतं शिक्षण झालं आहे, त्यांनी जास्तीतजास्त वास्तविक वाचन करून आधी स्थानिक आणि नंतर सर्वदूरची मानवी लोकसंस्कृती नीट समजून घ्यावी, एवढीच अपेक्षा तटस्थतेनं करता येते. कारण जो लोकसंस्कृतीत मुरतो तो स्थानिक भाषेत रमतो.

                    या पार्श्वभूमीवर आजच्या अहिराणी लोकसंस्कृतीचं मूळ अभिरांच्या ऐतिहासिक सत्यतेनुसारचं दर्शन रूंद होत जातं. म्हणून लोकसंस्कृतीचा विचार करताना, लोकसंस्कृतीत अनुस्युत असलेल्या बाबी व्यापक अंगानं समजून घेतल्या पाहिजेत. यात कालबाह्य ठरू पाहणाऱ्या आजच्या धंदेवाईक धार्मिक संकल्पना दूर ठेवणं, एखाद्या विशिष्ट उच्च वर्गाचं प्राबल्य निर्माण करण्याचं कारस्थान व त्यांचं वर्चस्व झुगारुन देणं, अंधश्रध्दांचं कवच दूर सारत खरी आदिम- आर्ष लोकसंस्कृती जतन करणं, देवभोळेपणा सोडणं, बाबा-बुवा संस्कृतीकडं पाठ फिरवणं, चुकीचं दान ओळखणं, आपली मूळ लोकसंस्कृती बळकवणाऱ्यांवर प्रहार करत सर्वसामान्यांना यातून जागं करणं, त्यांचं प्रबोधन करणं आदींसहीत इथल्या- खास अहिराणी पट्ट्यातल्या मानवी मूलभूत जिनसा, आपल्याला या समृध्द लोकसंस्कृतीत यापुढं पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवायच्या आहेत.

                     आजूबाजूचा समाज आपल्या मुठीत ठेऊ पाहणारे धर्म-वर्चस्ववादी लोक नेमकं याविरूध्द वागतात. ते स्थानिक लोकसंस्कृतीला विरोध करणारे असतात. त्यांना सर्वदूर आपलं प्राबल्य प्रस्थापित करायचं असल्यानं विविध लोकसंस्कृती, सांस्कृतिक विविधता, बहुभाषा, प्रांतियभाषा, बोलीभाषा, स्थानिक महात्म्य आदींना अशांचा सुप्त विरोध असतो. अस्तित्वात असलेल्या सगळ्याच विविध जीवन जाणिवांचे लोक त्यांना आपल्या कह्यात आणायचे असतात. अशा घटनांतून स्थानिक लोकसंस्कृतीचं सपाटीकरण सुरू होतं. म्हणून बहुजनांचे हित डोळ्याआड करणं, बहुजनांच्या भाषेला कमी लेखत आपली भाषा पेरणं, बहुजनांच्या लोकपरंपरा बाजूला सारत मुख्य धारेतल्या लोकपरंपरांचा उदोउदो करणं, बहुजनांच्या लोकदैवतांना हीन समजणं, प्रत्येक बाबतीत पुरोहिताकडून पूजा आवश्यक करणं, बाबा वाक्य प्रमाण मानणं आदी बाबी अहिराणी लोकसंस्कृतीसह सर्वदूरच्या बहुजन लोकसंस्कृतीला सुरूंग लावणाऱ्या आहेत.

                    या व्यतिरिक्त अहिराणीसह सर्वच लोकभाषेतील दुर्मीळ शब्द, वाक्प्रचार, उखाणे, म्हणी, ओव्या, विधी, लोककथा, लोकगीते, लोकवाद्य, लोकनाच इत्यादी पारंपरिक बाबीही अपेक्षित असल्या तरी फक्त याच गोष्टींना आपण लोकसंस्कृती म्हणू लागलो आहोत. पण आपण जे समजतो ते लोकसंस्कृतीचे काही घटक आहेत, पूर्ण लोकसंस्कृती नाही. स्थानिक लोकसंस्कृतीतून स्थानिक भाषा जन्म घेते, दुसऱ्या भाषेच्या उदरातून भाषेचा जन्म होत नाही अथवा एखाद्या भाषेचं अशुध्द- अशिष्ट रूप म्हणजे एखादी बोली, असं म्हणणं चूक आहे. अहिराणीसह सर्वच बोलीभाषा अशाच स्वयंभू आहेत. म्हणून अहिराणीसह विविध लोकसंस्कृतीतील मुळातली चौडी व्यापकता सगळ्याच अभ्यासकांनी समजून घेणं आवश्यक ठरतं.

                    भारतीय विविध प्रांतातील सर्वदूर असलेल्या अनेक स्थानिक लोकसंस्कृतींचा मागोवा घेत अभ्यास केला तर इतक्या प्रचंड विविधतेतील एकताही सहज लक्षात येते. अनेक तारा कुठं कुठं जुळताना दिसतात. आपल्याकडील अमूक लोकसंस्कृतीचा घटक, तिथल्या अमूक विधीशी जवळचा वाटू लागतो. म्हणून ज्यांना आपली स्वत:ची लोकसंस्कृती कळत नाही, ते स्वत:च्या परिवेशातही उपरे ठरतात आणि मूळ उपऱ्यांची गुलामगिरी करत राहतात! ह्या लोकसंस्कृतीच्या विविधतेचं सपाटीकरण होऊ न देता विविधतेची व्यापक लोकसंस्कृती जशीच्यातशी जपली पाहिजे. (उदाहरणार्थ, महाराष्ट्रात मराठीसह सर्व बोली जिवंत ठेवल्या पाहिजेत). अशा लोकसंस्कृतीतूनच स्थानिक बोलीभाषांचा नैसर्गिक प्रवाह खळाळत असतो. 

                    (काव्याग्रह’, दिवाळी- भाषा विशेषांक २०२५ मधील अहिराणी, एकूण बोली आणि मराठी या प्रकाशित दीर्घ लेखातील अहिराणीसह बोली परिवेशांची लोकसंस्कृती हा तिसरा आणि शेवटचा भाग. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)  

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

रविवार, ११ जानेवारी, २०२६

मराठी आणि महाराष्ट्र धर्म! (मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने)

 

 

  - डॉ. सुधीर रा. देवरे

                     हिंदीशिवाय दुसरी कोणतीही बोली मराठी भाषेची जागा घेऊ शकत नाही. म्हणूनच महाराष्ट्रात मराठीला हिंदीपासूनच जास्त धोका आहे! शब्दांचे आदान प्रदान होत भाषा प्रवाहित होतात, पण हिंदी माणसांसहीत हिंदी भाषा मराठीत एकतर्फी आदानच होत आहे, मराठीचे प्रदान कधी होणार? बाहेरची कोणतीही भाषा स्थानिक जनतेत प्रचलित असलेल्या एखाद्या भाषेला मारु शकत नाही, पण सत्तेतल्या वेगळ्या भाषिक प्रेमाच्या लोकांनी ठरवले तर ते कामकाजात जवळची भाषा बदलून (हिंदी- मराठी साम्य) स्थानिक बहुजनांची भाषा ठरवून मारू शकतात! महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची मातृभाषा मराठी आहे की हिंदी आहे? त्यांची मातृभाषा मराठी असेल तर या सत्तेला एवढा हिंदीज्वर येण्याचे कारण काय? मराठी सत्तेत ज्यांचे हिंदीचे प्रेम उतू जात असेल, त्यांचे मराठी राज्यात काय काम आहे? त्यांनी महाराष्ट्रातून चंबुगबाळे आवरून दिल्लीत वा उत्तर भारतात सत्ताकारण करावे. आधी मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म, सार्वभौम संयुक्त महाराष्ट्र प्रांत, नंतर काय ते! मराठी माणूस जसा न शिकता ऐकून हिंदी बोलू शकतो, तसा हिंदी भाषिक माणूसही ऐकून मराठी बोलू शकतो. पण तशी त्यांची इच्छाशक्ती नाही! जो इथे राहून मराठी जन्मभूमी- कर्मभूमीला होत नाही, तो दुसऱ्या प्रदेशाला वा भारताला कसा होईल? म्हणून महाराष्ट्रातील भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी मराठीसाठी एक होत मराठी व महाराष्ट्र विरोधी लोकांचा सत्तेतून कडेलोट करायला हवा!  

                    आज मराठीची झाली तशी हिंदी प्रातांत हिंदी भाषेची केविलवाणी अस्था झाली असती तर मी हिंदीच्या बाजूने असेच लिहिले असते! भाषा कोणतीही असो तिचा व्देष करता कामा नये आणि एखादी भाषा मारण्याचे प्रयत्न तर खूप असमंजसपणाचे ठरतात! महाराष्ट्र म्हणजे फक्त भूगोल नाही. (परप्रांतीय लोक इथल्या जमिनी विकत घेऊन इथला भूगोलही बदलणार आहेत.) महाराष्ट्राचा इतिहास, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि इथल्या अनेक घटकबोलींसह मराठी भाषा वजा केली तर शिल्लक शून्य राहील! मुंबईत मराठी भाषेत बोलायचे नाही, मग काय युपी बिहारात मराठी बोलाल का? लोकहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य कारकिर्दीपासून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आठवा, वाचा, अभ्यास करा. १०६ लोकांनी मराठी मुंबईसाठी हौतात्म्य पत्करले ते आठवा.   

                    एका चॅनलवर मुंबईच्या बाजारात निवडून निवडून अनेक परप्रांतीय लोकांची मुलाखत एवढ्यात पाहण्यात आली. अलीकडच्या काळात त्यांची बोलण्याची मग्रुरी, उध्दटपणा, उद्दामपणा, निलाजरेपणा लगेच लक्षात येत आहे. आम्हाला मराठी शिकायची गरज नसून यापुढेही शिकणार, बोलणार नाही असे सहज हिंदीत सांगतात. मुंबईतले वातावरण यापूर्वी इतके कधीच गढूळ झालेले नव्हते. काही परप्रांतीय लोक आतापर्यंत मराठी लोकसंस्कृतीत मिसळत नसले तरी याआधी स्थानिकांवर कुरघोडी करण्याइतके निर्ढावले नव्हते, आपण परराज्यात उपरे आहोत याची जाणीव त्यांना होती. आता मात्र ते मराठी माणसाला भाषेसह सगळ्याच क्षेत्रात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतल्या काही भागात मराठी लोकांना घरे विकत घेता येत नाहीत, भाड्याने मिळत नाहीत, काही आस्थापनात मराठी तरूणांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. राजरोस ‘मराठी तरुण नको’ अशा जाहिरातीही प्रकाशित होतात. परप्रांतीय लोक आम्ही भारतीय आहोत असे सांगत मुंबईत हक्काने राहू शकतात, पण आपल्याच प्रांतात मराठी लोक- तरूण परप्रांतीयांच्या कॉलनीत राहू शकत नाहीत, त्यांच्या आस्थापनात नोकऱ्या करू शकत नाहीत! या लोकांचा असा नेमका कोणता भारत आहे? कोणत्या राज्यघटनेनुसार हे सुरू आहे? मराठी माणसाच्या विरोधात त्यांच्या संघटना बांधल्या जात आहेत. महापालिका निवडणुकीत अमराठी लोक मोठ्या प्रमाणात उमेदवार असून एका राष्ट्रीय पक्षाने ४४ अमराठी उमेदवार उभे केले आहेत. मुंबई ताब्यात घेण्याच्या गोष्टी ते राजरोस करत आहेत. कोणाच्या वरदहस्ताने हे होत आहे? मराठी प्रांतीय म्हणून निवडून आलेले आपले सरकार आपल्यासोबत नसेल तर असेच होत राहील. मराठी लोकांच्या अस्मितेच्या स्वतंत्र प्रांतिक मान्यता मिळालेल्या महाराष्ट्र राज्यातल्या मराठी लोकांनी निवडून दिलेले सरकार स्थानिकांच्या बाजूने नाही?

                    मराठी भाषा, मराठी लोकसंस्कृती आणि स्थानिक अस्मितेच्या जतनासाठी महाराष्ट्राला सक्षम प्रादेशिक राजकीय पक्षाची गरज भासू लागली आहे का? मुंबईत महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवायचा असेल तर अमराठी उमेदवाराला (तो माणूस तुम्हाला आवडणाऱ्या पक्षातला असला तरी) मतदान करू नका! महाराष्ट्रातले धार्मिक सत्ताधारी लोक मराठी माणसाला हिंदू समजत नाहीत का? मग सरकारी पातळीवरून मराठी- हिंदी भाषिक झुंज लावण्याचे कारण काय? स्वार्थासाठी खेळलेली ही खेळी महाराष्ट्राच्या मुळावर येऊ शकते! लोकसभा- विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही हिंदू असता, मग मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी भाषिक हिंदूलोक शत्रू कसे होतात? लोकहो, डाव ओळखा आणि हाणून पाडा! मराठी सत्तेतला हिंदी टक्का जसा वाढत जाईल तसा हा मराठी प्रांत नामशेष होत जाईल! आणि ज्यांना हे मराठी स्वतंत्र अस्मितेचे प्रांतिक राज्य मान्य नसेल, त्यांना महाराष्ट्राच्या सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. कारण राज्याचा मूळ पायाच मराठी प्रांत असा आहे. तसे नसते तर एखाद्या हिंदी प्रदेशाला वा केंद्राला हे राज्य जोडले गेले असते.

                    आपली भाषा मारणारे, आपल्या भाषेतल्या शाळा बंद करणारे, मराठी शाळेच्या वास्तू उध्वस्त करणारे, पहिलीपासून त्रिभाषा सूत्राच्या नावाने हिंदी लादू पाहणारे, अमराठी लोकांना सर्व दरवाजे उघडे करुन देणारे, आपल्या लोकांना जगवणारी झाडे तोडणारे, आपणच निवडून दिलेले सरकार आपले का नाही, हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे! सरकार उत्तरदेही आहे की नाही? लोकसभेला हिंदू- मुसलमान करून, विधानसभेला मराठा- ओबीसी लढवून आणि आता मुंबई महापालिकेसाठी मराठी- हिंदी भाषा वाद उकरून निवडणूक जिंकण्याचा बेत जे कोणी करत असतात, ते लोक सामाजिक बांधिलकी पाळणारे नसतात, फक्त सत्तापिपासू ठरतात. म्हणून आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, हेच सत्य! बाकी सगळे असत्य! मराठी भाषा आणि मुंबई वाचवा. मुंबईत एकही परप्रांतीय निवडून यायला नको. परप्रांतियांचे, परराज्याचे लांगुलचालन करणारे आणि केंद्रात महत्वाचे पद मिळवण्यासाठी हिंदी भाषेला कुरवाळणारेही निवडून यायला नकोत. मग ते मराठी भाषिक असोत, परभाषिक असोत की कोणत्याही पक्षाचे! आपला धर्म- महाराष्ट्र धर्म! आपली अस्मिता, भाषा, लोकसंस्कृती मराठी! मुंबईत फक्त मराठी बोला!

                    संपूर्ण महाराष्ट्रातील आपापल्या गावात- शहरात (आपापल्या मातृभाषा बोलीसह) मराठी भाषा बोलली जाते. आपल्या गावातले काही नागरिक आपल्या कुटुंबात हिंदी सदृश्य भाषा बोलत असले तरी ती हिंदी नसते, त्यांची पारंपरिक बोली असते, पण हे नागरिक बाहेर आपल्याशी मराठी बोलतात, कारण ते मराठीच लोक आहेत. म्हणून त्यांच्याशी आपण हिंदीत न बोलता मराठीतच बोलावे. कोणत्याही दुकानात, हॉटेलीत, व्यवहारात, प्रवासात, फोनवर मराठीतच बोलावे. दुसऱ्या राज्यात गेल्यावर, दुसऱ्या राज्यातल्या व्यक्तीशी फोनवर अथवा काही दिवसांसाठी पर राज्यातून आलेल्या पाहुण्यांशी हिंदी बोलायला हरकत नाही.

                    आपली मुले, नातवं, पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असतील तर त्यांनी इंग्रजीत बोलायला हरकत नाही, पण आपली स्थानिक मायबोली आणि मराठीही त्यांना चांगल्या प्रकारे बोलता यायला हवी याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुले मराठी भाषिक असतात, शिक्षकसुध्दा मराठी भाषिक असतात, पण संवादाची भाषा मुद्दाम हिंदी वापरली जाते. असे का? पालकांनी जागरूकपणे हे शाळेला विचारले पाहिजे. एकतर शाळेत तुम्ही इंग्रजीतच बोला, इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषेत संवाद करायचा असेल तर तो संवाद मराठीत व्हायला हवा, हिंदीत नाही. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून आपल्याच भाषेचा व्देष करत हिंदी का बोलता? तुम्ही पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले आहे, हिंदी माध्यमाच्या नव्हे, हे लक्षात ठेवा.

                    मुंबई- ठाणेकरांनो आताच जागे व्हा, तुम्ही स्वत: अडचणीत सापडाल अथवा हा वणवा तुमच्या घरापर्यंत पोचेल तेव्हा तुम्हाला भविष्यात कधीतरी जाग येईल, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून मग्रूर परप्रांतियांना आणि त्यांना पायघड्या अंथरणाऱ्यांनाही पाडा. हिंदूचे राज्य म्हणून नव्हे, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे महाराष्ट्र राज्य १ मे १९६० ला अस्तित्वात आले आहे, याचे (संविधानानुसार) भान ठेवा. महाराष्ट्र धर्म वाचवा.

                    (अप्रकाशित लेख. मुंबई-ठाण्यातील लोकांना पाठवा. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

दिनांक : 11-1-2026

*