बुधवार, १ एप्रिल, २०२६

बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी

  

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

                     अहिराणी भाषा विस्तीर्ण भूप्रदेशात बोलली जाते. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या एकाच भाषेची कालांतराने वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी रूपे होत जातात. हे भाग एकमेकांपासून जितक्या लांब अंतरावर असतील तितका त्यांच्यातला भेद अधिक तीव्र असतो. आणि हे भाग एकमेकांपासून जितके जवळ असतील तेवढे त्यांच्यात साम्यही आढळते. त्यामुळे एखादी भाषा स्वत:च्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रदेशांत उत्क्रांत होत गेली तर तिची विभागपरत्वे अनेक रूपे झाल्याचे दिसते.
                     अहिराणी भाषा म्हणजे अभीर लोकांची भाषा असे समजले जाते. अभिरांची भाषा अभिराणी.अभीरचा अपभ्रंश अहिरआणि अभिराणीचा अपभ्रंश अहिराणी.अभीर नावाचे लोक प्राचीन काळापासून खानदेशात राहत होते असे उल्लेख अनेक ग्रंथांतून व शिलालेखांतून मिळतात. रामायण- महाभारतातही अभिरांचे उल्लेख येतात. इ. स. चौदाव्या शतकात अभीर लोकांची एक वसाहत खानदेशात असल्याचे शिलालेखांवरून दिसते. आजही खानदेशात अहिर शिंपी, अहिर ब्राह्मण, अहिर सोनार, अहिर कुणबी अशा जाती आढळतात. अहिरराव, अहिरे ही आडनावे आजही विपुल प्रमाणात दिसतात. प्राचीन काळी हे सगळे अभीर होते. खानदेश हा मूळचा अभीर किंवा अहिर यांचा प्रदेश.
                     अहिराणी धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यांत बोलली जात असली तरी तिचे बोलले जाणारे स्वरूप सर्वत्र सारखे नाही. धुळे हा अहिराणीचा केंद्रप्रदेश मानला जातो. नाशिक जिल्ह्यातील अहिराणी भाषेवर मराठीचा जास्त पगडा असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अहिराणी भाषेवर गुजरातीचा प्रभाव आहे. गुजरात सीमेला लागून असल्यामुळे हा प्रभाव नवापूर, नंदुरबार भागांत जास्त आढळतो. जळगाव जिल्ह्यातील अहिराणी भाषा वऱ्हाडी- वैदर्भी भाषेला जवळची वाटते.
                     अहिराणीवर अनेक जाती-जमातींच्या पोटभाषांचा हळूहळू प्रभाव पडत राहिल्याने ही भाषा सर्वसमावेशक झाली आहे. याच कारणामुळे अहिराणीत जाती-जमातीपरत्वे पोटभाषा तयार झाल्या आहेत. उदा. अहिराणी भिल्ली, पावरी, नेमाडी, गुजरी, बडगुजरी, लाडशिक्की, घाटोई, महाराऊ, तडवी, काटोनी, परदेशी, घाटकोकणी, डांगकोकणी, ठाकरी, वारली, लेवा पाटीदारी बोली, मुसलमानी बोली, भावसारी, रंगारी बोली, इत्यादी. दुसरीकडे आजची बागलाणी, तपांगी, खाल्यांगी, वरल्यांगी, डोंगरांगी, नंदुरबारी, दखनी, देहवाली असे प्रादेशिक भेदही तिच्यात दिसतात.
                     खानदेशातील भील, मावची, कोकणा, पावरा, ठाकर यांच्या बोलीभाषेवर अहिराणी भाषेचा प्रभाव जाणवतो. अशा स्थूल साम्यस्थळांमुळे सर ग्रियर्सन यांच्याकडून अहिराणीला भिल्ल लोकांची भाषा असे चुकीने संबोधले गेले. अहिराणी ही एका विशिष्ट जात-जमातीची बोलीभाषा नसून, खानदेशात वास्तव्य करणाऱ्या सर्वसामान्य लोकांची (सर्व जाती-जमातींची) लोकभाषा आहे.


अहिराणीचे काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील :

. धुळे, जळगाव जिल्ह्यातील अहिराणी भाषेत ळ बद्दल य वापरला जातो. मात्र नाशिक जिल्ह्यातील अहिराणीत ळ चा उच्चार च होतो. उदाहरणार्थ, नाशिक जिल्ह्यातला गुळ शब्द जळगावच्या अहिराणीत गुय होतो.

. गुजराथीचा अहिराणीवर खूप प्रभाव समजला जातो, मात्र असं नाही. काही शब्द आणि अहिराणीतल्या क्रियापदाचा अपभ्रंश गुजराथीशी नातं सांगतो. मराठीतल्या आहे व गुजराथीतल्या छे ऐवजी चारही जिल्ह्यातील अहिराणीत शे क्रियापद वापरतात.

. मराठीतल्या षष्ठीत चा ची चे वापरतात तर अहिराणीतील षष्ठीत ना नी ने आहे.

. अहिराणीत काही गुजराथी शब्दांचं प्रमाण ठळकपणे आढळतं. उदाहरणार्थ, आंडोर, डिक्रा, बे, ना नी ने, छे चा शे.

. अहिराणी भाषेत जोडशब्द जास्त प्रमाणात आढळतात. उदाहरणार्थ, तुन्हा, मन्हा, त्यास्ना, आम्ना, तुम्हना, धल्ला, धल्ली, ग्यात, सम्द, बऱ्हानी, बठ्ठ, व्हऊ आदी. 

६. मराठीतला पाहिजे शब्द बागलाणी अहिराणीत जसाच्यातसा वापरला जातो. मात्र नंदुरबार आणि चाळीसगाव परिसरात तो जोयीजे होतो. गुळ- गुय, दाळ- दाय असे काही प्रादेशिक बदल होतात. क्वचित ळ चा ड ही होतो.  
                     अहिराणी आज फक्त बोलीभाषा म्हणून उरली असली तरी या भाषेचा लिखित असा पहिला पुरावा इ. स. १२०६ चा मिळतो. चाळीसगावपासून दहा मैलांवर असलेल्या पाटण या गावातील श्रीभवानीच्या मंदिरात हा शिलालेख आहे. हा लेख ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पूर्वी ८४ वर्षांचा- म्हणजे शके ११२८ (सन १२०६) मधील आहे. राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी म्हटले आहे- ‘..अनेक भाषा ज्ञातृत्वाचा धागा फार प्राचीन आहे. ज्ञानेश्वराला संस्कृत, मराठी व बागलाणी भाषा येत असत.’ (‘राधामाधवविलासचंपूप्रस्तावना पृ. १४)
                     अहिराणीला एक वेगळा हेल असून वाक्प्रचारापासून म्हणींपर्यंत तिला वेगळाच खुमार आहे. पहिला फरक म्हणजे आहे या क्रियापदाऐवजी शेहे क्रियापद वापरण्याचा. लग्न कुठे आहे?’ हे वाक्य लगन कुठे शे?’ असे विचारले जाते. कुठे जाई ऱ्हायना?’ म्हणजे कुठे जात आहेस?’ अहिराणीतयेस, जास, बसस, करस, चालस, पळस, जेवसअसे शब्द आहेत.
                     भाषिक गमतीजमतीही भरपूर आहेत. जसे- एखादी व्यक्ती दुसऱ्याला म्हणेल- बशी घे.तेव्हा याचा अहिराणीतला अर्थ माहीत नसलेल्याला वाटेल की, चहा पिण्याची बशी आणायची आहे की काय! पण त्याचा अर्थ आहे- खाली बसून घे.तीच गोष्ट येसया शब्दाची. त्याचा अर्थ होतो-येतो.
कशे चालनं?’ (म्हणजे- कसं चाललंय?) या प्रश्नाला जथापत चालंन’ (ठीक चाललंय) असं म्हटलं जातं. जोइजेम्हणजे पाहिजे.’ ‘त्याचा’, ‘त्याची’, ‘तिचाऐवजी त्याना’, ‘त्यानी’, ‘तिनाअसे म्हटले जाते.
                     अहिराणीत खूप वेगळे शब्द ऐकायला मिळतात. जे शब्द प्रमाण मराठीत ऐकायला मिळत नाहीत. उदा. आंडोर म्हणजे मुलगा. आंडेर म्हणजे मुलगी. डिकरा म्हणजे पुतण्या. डिकरी म्हणजे पुतणी. कोणी म्हणेल- माले एक डिकरा आणि दोन डिकऱ्या शेतीस. फुई म्हणजे आत्या. सगळे अवगुण फुईवर लादले जातात. घरात एखादी मुलगी वेगळी वागायला लागली की म्हटले जाते, ‘आईवर ना बाईवर, जाई पडी फुईवर. फुवा / फुआ म्हणजे आत्याचे पती. हू / ऊ म्हणजे सून. मेव्हनभाऊ/ मेव्हन बहिन म्हणजे मामेभाऊ/ मामेबहीण. धडा/ धडी म्हणजे बाप/ आई अथवा बाप-आईच्या वयाचे.
                     अहिराणीत दिवसाला याळम्हणतात. याळभरम्हणजे दिवसभर. सऱ्याळम्हणजे सारा दिवस. याळ डोक्यावर येणेम्हणजे दुपार होणे. हातभर याळ राहणेम्हणजे दिवस संपायला थोडासा अवधी उरणे.
                    अहिराणीत खाद्यपदार्थाची नावेही भिन्न दिसतील.कोंडाळंम्हणजे थालिपीट. उदा. आज न्याहारीले कोंडाळा कयथात.’ ‘समारम्हणजे मसाला. भाजीत टाकण्यासाठी समार तयार करतात. लाल मसाला, काळा मसाला यांना लाल समार, काळा समार म्हणतात. अहिराणीतल्या म्हणीही मजेशीर आहेत. उदा. शेननं शेनफडं, मोठा घरमा इपडं(कष्टाशिवायची अपघाती श्रीमंती आली की त्या माणसाला गर्व होतो.), ‘येता जाता चरस नि सोमवार धरस' (दिवसभर खाणे सुरू असूनही उपवास असल्याचे भासवणे.), ‘गधडाले गुळनी चव (मूर्खाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही.), इ.
                     अहिराणीतील लोकवाङ्मयाची नुसती स्थूल यादी दिली तरी तिचा व्यापक आवाका लक्षात येतो. उदा. लोककथा, नीतिकथा, लग्नाची गाणी, ओव्या, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, भारुडे, झोक्यावरची गाणी, आखाजीची गाणी, बारातल्या शिव्या, विविध सणांवरील गाणी, भलरी गीते, मोटेवरची गाणी, खंडोबाची गाणी, तळी भरण्याची गाणी, इत्यादी.
                     अहिराणीतील लिखित वाङ्मयाचा पहिला उल्लेख लीळाचरित्रात मिळतो. ढासलं, रांधलं, पुंजं असे काही अहिराणी शब्दलीळाचरित्रात दिसतात. ज्ञानेश्वरांची एक बागलाणी गवळण प्रसिद्ध आहे. तसेच बागलाण नवरीचे रूपकात्मक अभंग व काही अहिराणी पदेही ज्ञानेश्वरांनी लिहिली आहेत..
अ) गवळण : तन्हा मराठी देश मन्ही बागलाणी भाष।
मन्हा रे कान्हा, मन्हा रे कान्हा।
ब) नवरीचे अभंग : करी वो अद्वैत मला केल्यो इसन्यो
सिहवर सिद्ध पुरासि गयो।
क) पदे  : यशोदेना बाय तान्हा मले म्हने हादू ले वो
मी तं बाई साधी भोई गऊ त्याना जवई।
                     बोलीभाषेत मुद्दाम कोणी ठरवून लिखाण करत नाही. बोलीभाषकांची प्रमाणभाषेकडे असलेली ओढ व वाचकांची वानवा यामुळे बोलीभाषा मातृभाषाअसूनही अनेक लेखक प्रमाणभाषेत लिखाण करताना दिसतात. अलीकडे वृत्तपत्रांतून अहिराणी भाषेत बऱ्याच प्रमाणात सदर लेखन होऊ लागले आहे. पण हे सर्व रुचिपालट म्हणून होते आहे की काय, अशी कधी कधी शंका येते. कारण त्यात भाषेबद्दलचे गांभीर्य क्वचितच दिसून येते. अहिराणी बोलायला, ऐकायला गोड अशी भाषा आहे :

बोली मन्ही अहिराणी
जशी दहिमान लोनी
सगळा पारखी ताकना
इले पारखं नही कोनी.

                    (लोकसत्ता, लोकरंग पुरवणी, १७ मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित लेख. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)  

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

रविवार, १ मार्च, २०२६

बोलीभाषांच्या श्रीमंतीचे जतन

  - डॉ. सुधीर रा. देवरे

 

                    २१ फेब्रुवारी हा आंतररार्ष्टीय मातृभाषा दिवस तर २७ फेब्रुवारी हा महाराष्ट्रातील मराठी भाषा गौरव दिवस’, या निमित्ताने बोलीभाषांच्या श्रीमंतीचे जतन हा लेख आज १ मार्च २०२६ च्या दिव्य मराठी, रसिक’ पुरवणीत प्रकाशित झाला आहे :

           

                    बोलीभाषा बोलायला आपण जिथेतिथे लाजत असतो, कारण आपल्याला आपल्या भाषेचाच कमीपणा वाटत असतो. हा न्यूनगंड आधी आपण आपल्यातून काढून घराघरात- गावात- शिवारात- शहरात आपली मातृभाषा असलेली बोली आपण सर्वांनी राजरोस बोलायला हवी.

                    भाषा ह्या नावातच लोकसंस्कृती, सण, जत्रा, लोकपरंपरा, लोकोत्सव, विधी, विधीनाट्य, रीती, रुढी, लोकदेव- देवता, खेळ, लोकजीवन ह्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. तसे पाहिले तर लोकसंस्कृतीतल्या सगळ्या घटनांतून- घटकांतूनच स्थानिक भाषांचा जन्म झालेला असतो. 

                    पारंपरिक लोकप्रथांमधून त्या त्या भागातल्या बोलींचा उगम झालेला आहे. त्या त्या भागात दरवर्षी ज्या वेगवेगळ्या विधी आपण करतो- पाळतो त्यातूनच पारंपरिक भाषेला संजीवनी मिळते. म्हणून आजही टिकून असलेल्या बोली ह्या आर्ष भाषा- जुन्या भाषा म्हणता येतील इतक्या त्या आदिम आहेत. अमूक ही भाषा अमूक भाषाची जननी आहे, अथवा अमूक ही बोली अमूक भाषेपासून तयार झाली अशी उलटी उत्पत्ती लावणे चूक आहे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

                    उदाहरणार्थ, अहिरानी बोलीत असे आजही अदमाशे दोनेकशे शब्द तरी नक्की सहज सांगता येतील, जे शब्द दुसर्‍या भाषेत कुठेच दिसत नाहीत. त्या शब्दांचा इतर भाषेतले धातू कोणाला माहीत नाहीत. त्यांची स्पष्ट व्युत्पत्ती लावता येत नाही. अशा खूप कारणांनी अहिरानीला आदिम भाषा म्हणता येईल, असे म्हणायला वाव आहे. पण आपण अजून तरी तशा आदिम भाषेचा दावा कोणाकडे केलेला नाही. सरकारकडे नाही की समाजाकडे नाही. एक शक्यता इथे बोलून दाखवली.

                    फक्त अहिरानीतच सापडतील असे काही आठवतील ते शब्द इथे मुद्दाम देत आहे : झोऱ्या, मोचडं, मेचडं, डांजनं, खरंदगड, पांचफळक, धुतरूंग, दारुदरफडा, झुलई, दडस, वरमाड, फुरका, वडगन, पोतारा, गागा, डाभुर्ल, सरमट, मट्यारं, बंग्या, साबडं, डिर, गेदू, कुटाना, गटाना, मोगरी, पिटनी, आबगा, येकलपाई, गवांदखाल, कचकाई, फिस्क, बुचकं, फिंद्रा - फिंद्री, फुई, फुवा, जीजी, मुऱ्हाळी, हू, बुचका, सुम, फसकारा, तोहमत, किलवाना, बावच्या, बऱ्हानी, बह्याळ, पट्यारा, लग्गर, हेंगाडं, खंतड, सुकाळीना, उकतं, ताम्हा, च्याहूर, वडांग, बंगळी, किलचन, आडेकडे, कवाड, बागेबागे, आग्या, कुश्टाळं, शे, सावटा, बठ्ठा, फोत्र, सोला, साक्रू, कोंडाळं, पाटोड्या, डुबुक वडा, टहाळबन, डोंगरखाल, हेटे, वऱ्हा, रावन्या, गंगूती, आवळ्या, कोली, सोळी, सांजोरी, किलचन, सानं, सरी, आवते, नाडा, पुल्हाळ, चावळनं, ढेंगडं, ढुब्ब, आंगडं, कुरधानं, मांजन्या, तमान, साबडं, भनका, चोधडी, वैरन असे खूप शब्द सांगता येतील. आणि प्रत्येक बोलीत असे आगळेवेगळे शब्दभांडार आहे.

                    अशा शब्दांसोबतच शब्दगोळे म्हणजे वाक्‍प्रचारसुध्दा अहिरानीत खूप वेगळे दिसतात : टुमनं लावनं, ल्हाव करनं, रव करनं, ल्हनं नसनं, खिजी पडनं, हाय उफस करनं, आग पाखडनं, उजारी देनं, दनकारी देनं, डाच्च करनं, दडी मारनं, पोटमा बळी येनं, खिजी पडनं, उखाळ्या पाखाळ्या काढनं, उन्हात पाडनं, रुशी बसनं, बुरची घेनं, सरमाई जानं, हात वढाखाल ऱ्हानं, पान लागनं, चिपडं पडनं, काकडा वल्हावनं, हालकी वडांग ऱ्हानं, दिवाबत्तीनी येळ, लावदुऱ्या लावनं, उफडाई उठनं असे कित्येक. आणि सगळ्याच बोलीत असे वेगळे धन सापडेल.

                    अहिरानीतले पारंपरिक मौखिक साहित्याची यादी सहज वाचली तरी तिचा पसारा लक्षात येतो. तो पसारा माझ्या अनेक पुस्तकांतून याआधी आला आहे.

                    असे सगळे शब्द, वाक्प्रचार, म्हणी, उखाणे, आण्हे, लोकगीते, लोककथा, लोकनृत्य, त्या त्या लोकबोलीतले कीर्तन, गोंधळ, वही असे पुष्कळ वेचून जपून ठेवावे लागेल, आवरुन ठेवावे लागेल, जतन करावे लागेल. याच्या पुढे अजून कोणता काळ कसा येईल कोणाला सांगता येईल? आणि हे भाषेचे धन एकदा बुडालं ना, आणखी जसेच्यातसे बाहेर जिवंत काढता येणार नाही. चाळीस- पन्नास वर्षांपूर्वी जे शब्द सहज जीभेवर यायचे, ते आज सहजासहजी येत नाहीत, तर कल्पना करा, हजार- पंधराशे वर्षांपूर्वीच्या शब्दांचे काय झाले असेल? आपापल्या बोलीभाषेतले असे असंख्य शब्द हरवले असतील. म्हणून आतातरी जागे होऊ. आज जे हयात आहेत ते शब्द याच्यापुढे जिवंत ठेवायचे असतील, तर आजचे हयात धन आपल्याला जतन (डाक्युमेंटेशन) करावे लागेल, तरच आताच्या सर्वच बोलीभाषा पुढच्या पिढीला जिवंत दिसतील.

                    यापुढे (एकाच भाषा पट्ट्यातली) इथली भाषा वेगळी आणि तिथली निराळी असा भेद भाषेत करायचा नाही. कोणतीही बोली कुठेही बोलली जात असेल तरी ती जतन केली पाहिजे. एकाच भाषेत थोडाबहुत भेदभाव होतो, तो करु नका. म्हणजे इथली भाषा अस्सल आणि तिथली भाषा नक्कल, असे खाजगीतही बोलू नका. तेव्हा बोलीभाषा टिकतील. जगातल्या कोणत्याही भाषेला कमी समजू नका. आपल्या व्यक्तीगत हौसमौजसाठी भाषेचे हलके राजकारण करू नका. केवळ प्रसिध्दीसाठीच्या राजकारणामुळे बहुतेक आपले स्वत:चे भले होईल, पण बोलीभाषांचे भले होणार नाही. भाषांचे इतके नुकसान होईल की ते कधीही भरुन निघणार नाही.      

                    भाषेचा विचार करताना त्याच्या केंद्रस्थानी माणूस आहे, हे प्रथम लक्षात घ्या. माणूस माणसासोबत जोडत गेले की समाज तयार होतो. आणि हा समाज जोडण्यासाठी भाषेची गरज लागते. हे सर्व नीट लक्षात घेऊन आपण सर्व लोक एकमेकांशी जोडू. असे इथूनतिथून सर्व लोक जोडले गेले की मग भाषाही तग धरून उभी राहील. हे फक्त एखाददुसरी प्रमाणभाषेला लागू नाही. तसेच हे फक्त एखाद्या बोलीला लागू नाही. हे एकूणएक भाषेसाठी आपण बोलत आहोत. मग ती भाषा आजच्या मराठीसारख‍ी प्रमाणभाषा असो, अथवा जगातील कोणतीही आपल्याला बोलता न येणार्‍या भाषा असोत...

                    (दिव्य मराठी, रसिक’, पुरवणी १ मार्च २०२६ मधील प्रकाशित लेख. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)  

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

अहिराणी, एकूण बोली आणि मराठी- भाग तीन

 

 

- डॉ. सुधीर रा. देवरे


३. अहिराणीसह बोली परिवेशांची लोकसंस्कृती :

                     अहिराणी लोकसंस्कृती वा एकूण बोली भाषांची लोकसंस्कृती म्हणजे नेमकं काय? याबाबत आपण अतिशय वरवरचा विचार करून वर्णनात्मक स्वरूपात मांडणी करत अहिराणी लोकसंस्कृतीचं स्थूल स्वरूप सांगत राहतो. लोकजीवनातल्या ठळक बाबींचा उल्लेख करत अमूक अमूक या बाबी म्हणजे अहिराणी लोकसंस्कृती असं म्हणू लागतो. पण हा विषय आपण समजतो त्यापेक्षा खूप खोल, सूक्ष्म आणि व्यापक आहे, तो मुळातून समजून घेतला पाहिजे.

                     अभिर- अहिर- अहिराणी या सूत्रानुसार अभिर लोकांची भाषा अहिराणी हे आपण कधीच मान्य केलं आहे. आज नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि संभाजीनगरचा काही भाग ह्या जिल्ह्यांत अहिराणी बोलली जात असली तरी अभिर लोक पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजराथसह संपूर्ण उत्तर- वायव्य भारतात पसरलेले आहेत, आणि तिकडूनच ते बागलाणात- खान्देशात आले. ज्या त्या स्थानिक गरजेनुसार, ज्या त्या परिवेशातल्या बदलानुसार लोकांची स्थानिक भाषा बदलत गेली. आज विविध प्रांतात (महाराष्ट्राबाहेर) राहणारे अभिर त्या त्या प्रांतीय भाषा बोलतात. पण अशा सगळ्याच अभिरांत (म्हणजे आजच्या बहुजन समाजात) जी जात उतरंड तात्कालीक अभिजन वर्गानं जाणीवपूर्वक लादून बहुजनांचं शोषण सुरु केलेलं दिसतं, ते धर्मसत्तेतून कायमस्वरुपी आजही समाजसत्तेत दिसून येतं. हे शोषण फक्त अभिरांचंच झालं असं मात्र नाही, तर ते संपूर्ण भारतभर, अगदी दक्षिण द्राविड लोकांतही (स्थानिक मूळ रहिवाशांत) पुढं पध्दतशीरपणे होत राहिलं.

                     या विशिष्ट कारस्थानात गुपचूप अनेकसूत्री कार्यक्रम राबवला गेला. यात स्थानिक बोलीभाषा मारणं, अथवा त्या भाषांची अशुध्द, गावठी अशी बदनामी करत त्यांच्या जागी संस्कृत भाषा ग्रंथांतून ठरवून प्रस्थापित- उपयोजित करणं, अथवा त्याच भाषेवर संस्कृतचा मुलामा चढवत प्रमाणभाषा- शुध्द भाषा म्हणून मिरवणं, स्थानिक ग्रामीण लोकदैवते नष्ट करणं, लोकदैवतं नष्ट होत नसतील तर अशा लोकदैवतांच्या भाकड अनैतिक खोट्या कथा- गोष्टी पसरवणं, त्यांचं अस्तित्व भ्रष्ट करणं, त्यांना तामसी म्हणणं, त्यांना अशिष्ट भक्षण करणारे ठरवणं, त्यांच्या मुर्ती विकृत बनवणं (उदा. गणपती आणि इतर बरेच.), अशिष्ट लोकांचे देव अशिष्ट असा प्रचार करणं, इतकं करूनही ते नष्ट होत नसतील तर त्यांचेच व्यापारीकरण सुरू करत त्यांच्याच नावानं व्यवसाय सुरू करणं, पुढं बहुजनांतल्या ऐतिहासिक महापुरूषांबद्दलही हेच धोरण राबवून आडमार्गानं त्यांना कमी लेखण्याची पध्दतशीर भूमिगत चळवळ- कुजबुज मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. समाजात आपले वर्गवर्चस्व प्रस्थापित होईल अशी व्यवस्था जाणूनबुजून निर्माण करण्याच्या अनेक गोष्टी विशिष्ट अभिजन वर्गाकडून सतत घडत राहिल्या आहेत, अजूनही होत आहेत. अगदी आधुनिक म्हणता येईल अशा आजच्या काळातही हे राजरोस सुरू आहे. या सगळ्यांचे पडसाद भाषेत पडत राहतात, मग ती शिव्यांची भाषा असो की स्तुतीची.

                     हे सांस्कृतिक थंड यादवी युध्द एकतर्फी असून ते प्रत्येकालाच जाणवत नाही. आपल्या अडाणीपणामुळं वा न्युनगंडामुळं अनेक लोक उच्चभ्रूंचं अनुकरण करत राहतात. असं करण्यात आपण आपल्या मूळ लोकसंस्कृतीशी प्रतारणा करतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. लोकसंस्कृतीशी फारकत घेत आपल्या भाषेचीही बहुजन वर्ग नाळ तोडू पहातो. आपल्या भाषेला अभिजन लोक अशुध्द, गावढंळ म्हणतात म्हणून बहुजन त्यांच्या भाषेचंही अनुकरण करू लागतो. आपले पारंपरिक कामं करताना वा बदललेली मजूरी करताना आपण इथल्या पारंपरिक व्यवस्थेचे बळी आहोत, हेही त्यांना कळत नाही. काबाडकष्ट करूनही ते दिखाव्याच्या अनुकरणात मस्त असतात. खस्ता खात कमवलेला पैसा, तथाकथित मुक्ती मिळवण्याच्या लालसेनं वा घरबसल्या पुण्याच्या गणनेसाठी, एखाद्या पोथीतून सांगितलेल्या विधीवर दान- दक्षिणेत सहज उधळून देतात.

                     ही लादलेली ऐतखाऊ व्यवस्था स्वानुभवातून ज्यांच्या लक्षात येते, ते लोक अशा शोषणाची मांडणी करू लागतात, पण हे प्रबोधन एकतर अतिसामान्यांपर्यंत पोचत नाही अथवा लोकांत पध्दतशीरपणे पसरवलेले पारंपरिक तथाकथित देवसंस्कार त्यांना लुबाडू वास्तवाची जाणीव होऊ देत नाहीत. यावर उपाय म्हणजे ज्यांचं थोडंफार वाचण्यापुरतं शिक्षण झालं आहे, त्यांनी जास्तीतजास्त वास्तविक वाचन करून आधी स्थानिक आणि नंतर सर्वदूरची मानवी लोकसंस्कृती नीट समजून घ्यावी, एवढीच अपेक्षा तटस्थतेनं करता येते. कारण जो लोकसंस्कृतीत मुरतो तो स्थानिक भाषेत रमतो.

                    या पार्श्वभूमीवर आजच्या अहिराणी लोकसंस्कृतीचं मूळ अभिरांच्या ऐतिहासिक सत्यतेनुसारचं दर्शन रूंद होत जातं. म्हणून लोकसंस्कृतीचा विचार करताना, लोकसंस्कृतीत अनुस्युत असलेल्या बाबी व्यापक अंगानं समजून घेतल्या पाहिजेत. यात कालबाह्य ठरू पाहणाऱ्या आजच्या धंदेवाईक धार्मिक संकल्पना दूर ठेवणं, एखाद्या विशिष्ट उच्च वर्गाचं प्राबल्य निर्माण करण्याचं कारस्थान व त्यांचं वर्चस्व झुगारुन देणं, अंधश्रध्दांचं कवच दूर सारत खरी आदिम- आर्ष लोकसंस्कृती जतन करणं, देवभोळेपणा सोडणं, बाबा-बुवा संस्कृतीकडं पाठ फिरवणं, चुकीचं दान ओळखणं, आपली मूळ लोकसंस्कृती बळकवणाऱ्यांवर प्रहार करत सर्वसामान्यांना यातून जागं करणं, त्यांचं प्रबोधन करणं आदींसहीत इथल्या- खास अहिराणी पट्ट्यातल्या मानवी मूलभूत जिनसा, आपल्याला या समृध्द लोकसंस्कृतीत यापुढं पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवायच्या आहेत.

                     आजूबाजूचा समाज आपल्या मुठीत ठेऊ पाहणारे धर्म-वर्चस्ववादी लोक नेमकं याविरूध्द वागतात. ते स्थानिक लोकसंस्कृतीला विरोध करणारे असतात. त्यांना सर्वदूर आपलं प्राबल्य प्रस्थापित करायचं असल्यानं विविध लोकसंस्कृती, सांस्कृतिक विविधता, बहुभाषा, प्रांतियभाषा, बोलीभाषा, स्थानिक महात्म्य आदींना अशांचा सुप्त विरोध असतो. अस्तित्वात असलेल्या सगळ्याच विविध जीवन जाणिवांचे लोक त्यांना आपल्या कह्यात आणायचे असतात. अशा घटनांतून स्थानिक लोकसंस्कृतीचं सपाटीकरण सुरू होतं. म्हणून बहुजनांचे हित डोळ्याआड करणं, बहुजनांच्या भाषेला कमी लेखत आपली भाषा पेरणं, बहुजनांच्या लोकपरंपरा बाजूला सारत मुख्य धारेतल्या लोकपरंपरांचा उदोउदो करणं, बहुजनांच्या लोकदैवतांना हीन समजणं, प्रत्येक बाबतीत पुरोहिताकडून पूजा आवश्यक करणं, बाबा वाक्य प्रमाण मानणं आदी बाबी अहिराणी लोकसंस्कृतीसह सर्वदूरच्या बहुजन लोकसंस्कृतीला सुरूंग लावणाऱ्या आहेत.

                    या व्यतिरिक्त अहिराणीसह सर्वच लोकभाषेतील दुर्मीळ शब्द, वाक्प्रचार, उखाणे, म्हणी, ओव्या, विधी, लोककथा, लोकगीते, लोकवाद्य, लोकनाच इत्यादी पारंपरिक बाबीही अपेक्षित असल्या तरी फक्त याच गोष्टींना आपण लोकसंस्कृती म्हणू लागलो आहोत. पण आपण जे समजतो ते लोकसंस्कृतीचे काही घटक आहेत, पूर्ण लोकसंस्कृती नाही. स्थानिक लोकसंस्कृतीतून स्थानिक भाषा जन्म घेते, दुसऱ्या भाषेच्या उदरातून भाषेचा जन्म होत नाही अथवा एखाद्या भाषेचं अशुध्द- अशिष्ट रूप म्हणजे एखादी बोली, असं म्हणणं चूक आहे. अहिराणीसह सर्वच बोलीभाषा अशाच स्वयंभू आहेत. म्हणून अहिराणीसह विविध लोकसंस्कृतीतील मुळातली चौडी व्यापकता सगळ्याच अभ्यासकांनी समजून घेणं आवश्यक ठरतं.

                    भारतीय विविध प्रांतातील सर्वदूर असलेल्या अनेक स्थानिक लोकसंस्कृतींचा मागोवा घेत अभ्यास केला तर इतक्या प्रचंड विविधतेतील एकताही सहज लक्षात येते. अनेक तारा कुठं कुठं जुळताना दिसतात. आपल्याकडील अमूक लोकसंस्कृतीचा घटक, तिथल्या अमूक विधीशी जवळचा वाटू लागतो. म्हणून ज्यांना आपली स्वत:ची लोकसंस्कृती कळत नाही, ते स्वत:च्या परिवेशातही उपरे ठरतात आणि मूळ उपऱ्यांची गुलामगिरी करत राहतात! ह्या लोकसंस्कृतीच्या विविधतेचं सपाटीकरण होऊ न देता विविधतेची व्यापक लोकसंस्कृती जशीच्यातशी जपली पाहिजे. (उदाहरणार्थ, महाराष्ट्रात मराठीसह सर्व बोली जिवंत ठेवल्या पाहिजेत). अशा लोकसंस्कृतीतूनच स्थानिक बोलीभाषांचा नैसर्गिक प्रवाह खळाळत असतो. 

                    (काव्याग्रह’, दिवाळी- भाषा विशेषांक २०२५ मधील अहिराणी, एकूण बोली आणि मराठी या प्रकाशित दीर्घ लेखातील अहिराणीसह बोली परिवेशांची लोकसंस्कृती हा तिसरा आणि शेवटचा भाग. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)  

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/