बुधवार, १ जुलै, २०२६

बोलींना चिडवण्याची भाषा


- डॉ. सुधीर रा. देवरे

                     भाषेसंदर्भात एका चुकीच्या अवतरणावर नाईलाजानं मला व्यक्त व्हावं लागलं. पण त्या अवतरणाची बाजू घेऊन (केवळ) प्रमाणभाषा प्रेमी असलेली आणि ते अवतरण प्रसारीत करणारी एक व्यक्ती माझ्याशी वाद घालू लागली. तो सर्व विसंवाद मुद्दाम साक्षेपी खाली देत आहे. मला न कळत माझी अचानक घेतलेली ही उध्दट मुलाखतही म्हणता येईल :

                    २७ फेब्रुवारी २०२३ ला कोणाचंही नाव नसलेलं खालील एक अवतरण समाज माध्यमांवर फिरू लागलं. तेच अवतरण एका बऱ्या वाचक व्हॉटसअप ग्रुपवर पुण्याच्या एका प्रमाणभाषा समर्थक वाचकानं टाकलं. ते मूळ अवतरण असं :  

‘‘न आणि ण,

श आणि ष,

ळ आणि ड,

चांदणीमधील च आणि चंद्रमधील च 

जहाजमधील ज आणि जीवनमधील ज

यांच्या उच्चारातील 

फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! 

बाकीच्यांणा मराठी भाशा दिणाच्या मणापासूण षुभेच्छा!!!’’

                    या फॉरवर्डेड पोस्टवर न राहवून मला लिहावं लागलं : मला वाटतं सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर) यांनी फेसबुकवर अशी पोस्ट टाकली होती. (चुकभूल देणं- घेणं.) ज्यानं कोणी असा मूळ (अ)विचार मांडला त्याचा हा तथाकथित शहाणपणा आहे. फक्त प्रमाणभाषा शुध्द आणि बहुजनांच्या बाकी भाषा- बोलीभाषा अशुद्ध. असा शुध्द- अशुध्दपणा अधोरेखित करण्याचा हा अतिशहाणा खोडसाळ प्रयत्न आहे. महाराष्ट्रात अंदाजे १०० बोलीभाषा बोलल्या जातात आणि त्यांत वरीलप्रमाणेच बरेचशे उच्चार होतात. म्हणजे वरचं अवतरण लिहिणाऱ्यानं असे उच्चार करणाऱ्या ग्रामीण लोकांचा उपहास केला आहे. असेच पण थोड्याफार बदलाचे उच्चार महाराष्ट्रातील सर्व बोलीभाषक आपल्या सहज नैसर्गिक भाषेत करत असतात. आपल्या मातृभाषेतले असे उच्चार करण्यात त्यांना अजिबात कमीपणा वाटायला नको म्हणून हा निरसन प्रपंच. वरील अवतरण वाचून तमाम बोलीभाषक बंधुंनी आपल्या मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता आपण आपली बोली जशी वापरतो, जशी बोलतो, तशीच ती मायबोली सहज बोलत रहावी. आपण तसं केलं तरच ही प्रमाणभाषा म्हणजे मराठी भाषा टिकेल आणि ती पुढं अधिक कसदार- बळकट- प्रवाही होत राहील...

                    असं मी व्यक्त होताच ग्रुपवर फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तीनं पुन्हा युक्तीवाद केला. त्या व्यक्तीनं तात्काळ माझ्या विरोधात लिहिलं : ‘बोलीभाषांना बोली म्हणूनच प्रेम मिळेल- प्रमाण भाषा ही अचूक संप्रेषणासाठी आवश्यक आहे. हा तथाकथित नव्हे- खरोखरचा शहाणपणा आहे. खानदेशीत कोणी 'मन वढाळ वढाळ' लिहिलं तर तुम्ही तिला खानदेशी म्हणाल का? असो. हे वाद पुरातन आहेत- आज कशाला उकरून काढायचे?’’

                    माझं उत्तर : बोलीभाषांना बोली म्हणूनच प्रेम मिळेल म्हणजे काय? असं प्रेम देऊन वा सहानुभूती दाखवून कोणी तथाकथित प्रमाणभाषक बोलींवर उपकार करणार आहेत का? सगळ्या बोलीसुध्दा अचूक संप्रेषणच करतात- अचूक संवाद साधतात. म्हणून तर त्या आदिम काळापासून जिवंत आहेत. मन वढाय वढायच म्हटलं पाहिजे हे तुम्ही कबूल करता. म्हणजेच बोली महत्वाच्या ठरतात आणि त्यांचे उच्चारही त्यांच्या नैसर्गिक हेलसह जसे आहेत तसेच ठेवले पाहिजेत. मराठी प्रमाणभाषा (वा कोणतीही प्रमाणभाषा) ही बोलींच्या पायावर उभी असते. (प्रमाणभाषा ही आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या अनेक बोलींच्या शब्द बळावर तयार झालेली कृत्रिम पण रूळलेली भाषा असते.) आपण म्हणता तसं आजही भाषेत सोवळंओवळं पाळलं- बोलींना हलक्यात घेतलं तर मराठीही संस्कृतसारखी लवकरच मृत भाषा होईल.

                    ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती : ‘बरं! मग काय म्हणू? मरण टाळण्यासाठी काहीही! विद्वान सर्वत्र ० ते!’’

                    मी : ही टिपणी अशोभनीय आहे. पण मी आपल्याला तशाच वाईट भाषेत उत्तर देणार नाही. शेतकऱ्यांना ग्रामीण भागात उच्चार शिकवायला तथाकथित उच्च भाषा बोलणारे लोक येतील का? आणि आले तरी त्यांनी ती का शिकावी? अथवा आपण ग्रामीण भागात जन्माला आला असता तर आपली हीच भूमिका असती का? ह्या संदर्भात उलट उत्तर असेही देता येईल... तथाकथित विव्दान फक्त पुण्यात ० ते!

                    तिसरी व्यक्ती : ‘सर, महाराष्ट्रातील लोकांकरता हा वाद ठीक. पण परकियांना जेव्हा मराठी शिकायची असते तेव्हा ती प्रमाण असायला हवी. आपण प्रमाण इंग्रजी शिकतो. इंग्लडमध्ये प्रांतवार भाषा नसेल का? बोली भाषा प्रमाण भाषेला समृद्ध करते. वरील वाद न संपणारा आहे. मी खेड्यातून आलोय.

                    मी : आपलं म्हणणं विशिष्ट संदर्भात बरोबर आहे. पण वर दिलेल्या त्या विशिष्ट टिपणीत बोलीभाषा बोलणाऱ्यांची स्पष्ट हेटाळणी केलेली आहे. म्हणून मी केवळ मराठी भाषेसाठी प्रतिक्रिया दिली. सामायिक भाषा बोलीकांनी बोलींकडं उदार दृष्टीनं पहायला शिकावं.

                    ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती : ‘‘का बरं? अशुद्ध सर्वच चालवून घ्यावं लागेल! असे अनर्थ तुम्हाला मान्यच झाले पाहिजेत. माझा मुद्दा आपोआप सिद्ध झाला बघा! तेवढाच मुद्दा होता! होय- शिकायला कष्ट का करू नयेत? बोलींची गोष्ट वेगळी. पण तुमच्या भूमिकेवरून चाललो तर मराठी मरणाआधीच मरेल! ज्ञानभाषा तर होणारच नाही- कारण तिला नेमकेपणाच नसेल.’’

                    मी : ‘काय सिध्द झालं आणि कसं? मुळी भाषेत शुध्द अशुध्द असं काही नसतंच. मराठी ही ज्ञानभाषा आजच आहे... बोलीच्या बोलीकांनी प्रमाणभाषा का शिकावी? त्यांची बोली ही त्या त्या ठिकाणी प्रमाणभाषाच आहे! तुम्ही बोली का शिकत नाहीत मग? कारण तुम्हाला त्याची आवश्यकता वाटत नाही. ग्रामीणांनाही म्हणूनच प्रमाणभाषा शिकायची गरज नाही. ग्रामीण लोक बोलतात ती बोली, त्या त्या लोकजीवनाची- लोकसंस्कृतीची- परिवेशातली नैसर्गिक भाषा असते. बोलींच्या पायावर प्रमाणभाषा उभ्या राहतात. बोली आहेत म्हणून प्रमाणभाषा आहे. बोली वगळल्या तर प्रमाण मराठी मरायला वेळ लागणार नाही.’

                    ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती : ‘पुणे / मुंबई वगैरेचा प्रश्न नाही. मी संपादक आहे. नियतकालिक दोन्ही शहरातून चालवलं. शुद्धलेखनासाठी अपार कष्ट घेतले. इतर अनेक नियतकालिकांनीही. इथं अशुद्ध छापून येऊ देत का तुमचे लेख? तुम्हाला चालेल- वाचकांना चालणार नाही. बोली भाषेतले शब्दही नेमकेच लिहावे लागतील हा मुद्दा नाही पटला का? नियतकालिकामधे ग्रामीण लेखकांचे बोलीशब्द तसेच ठेवतो. लई ब्येसचं फार चांगलं करत नाही. पण ते  काय लिहिलंय ते कळायला तर हवं ना? ‘ळफी केस लिहून काय कळणार केस काय आहे ती!’’

                    मी : ‘ळफी केस म्हणजे काय? आपल्याला नक्की काय म्हणायचं ते नीट कळलं नाही. पण तरीही मुद्दा स्पष्ट करतो. समजा मी माझ्या अहिराणी भाषेतल्या लेखात वाक्य लिहिलं, पानी पी घिदं आनि बसनू मंग घरमा जरासा. हे वाक्य आपण जसंच्या तसं छापलं तरच ते योग्य राहील. पण तुम्ही शुध्द करण्याच्या तथाकथित प्रयत्नात (प्रुफ रिडींग करताना) हे वाक्य जर पुढील प्रमाणं दुरूस्त केलं, पाणी पी घिदं आणि बसनू मंग घरमा जरासा. तर हे तुम्ही दुरूस्त केलेलं वाक्य चुकीचं होईल. कारण अहिराणीत नाहीच, वापरतात. मराठीत वापरतात, म्हणून अहिराणीतही वापरावा असा आपला आग्रह दिसतो. हिंदी भाषेत जसा नाही तसा अहिराणीतही नाही. तीच बाब ची. म्हणून अहिराणीत भाषा हा शब्द लिहिताना भाशा असं लिहिलं तर ते अहिराणीत (तुमच्या म्हणण्याप्रमाणे) शुध्द राहणार आहे. वरील ज्या टिपणीवर आपली चर्चा सुरू आहे, त्या टिपणीत हा मुख्य घोळ आहे. त्या टिपणीत- टिपणी लिहिणाऱ्यानं तथाकथित सुशिक्षितपणा दाखवण्यासाठी भाषाशास्त्रच निकालात काढलं आहे. (भाषेत शुध्द- अशुध्द संकल्पना नाहीत, पण आपण तो शब्द पुन्हा पुन्हा वापरत आहात, त्या स्पष्टीकरणासाठी मला आपल्या शुध्द-अशुध्द संकल्पनेत हे लिहावं लागलं.)’

                    ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती : ‘मग ज्ञानभाषेत भोंगळ शब्दकळा चालणारच नाही. शैली या शब्दाला काही अर्थच राहणार नाही, वाटेल तसं लिहिलं तर. भाषेच्या सौंदर्याला का मुकायचं अशुद्धाच्या हव्यासापायी? हाही एक उपहासच- नव्हे, विटंबना जाणूनबुजून केलेली. माझी टिपणी तुम्हाला खटकली, तिथेच प्रमाणभाषा जिंकली! असो. जो जे वांच्छील तो ते लिहो... पण जो जसे लिहील तसे सर्वांनी चालवून घ्यावे ही मात्र अनर्थकारक भूमिका आहे.’’

                    मी : ‘भोंगळ शब्दकळा वेगळी आणि बोलीभाषा वेगळी. बोली भाषेलाही स्वयंभू शैली आहे- स्वयंभू शब्द आहेत. वाटेल तसं लिहिणं म्हणजे चांगलं लिहिणं असं कोणी आणि केव्हा सांगितलं? कोणत्याच बोली भाषेत वाटेल तसं बोलणं वा लिहिणं नाहीच मुळी. भाषेच्या सौंदर्याला मुकायचं नसेल तर कोणत्याही भाषेकडं डोळसपणे आणि उदार दृष्टीनं पाहिलं पाहिजे.‍ तिरस्कृत पध्दतीनं व्यक्त होऊन नाही. पुज्यतेला आपण शून्यात गणलं म्हणून खटकलं. प्रमाणभाषेच्या विरूध्द मी केव्हाच लिहिलं नाही. माझी मराठी- प्रमाणभाषा तर जिंकलीच पाहिजे. प्रमाणभाषा हरावी असं माझं म्हणणं आहे हे तुम्ही कसं काय ठरवता? (मराठीच नव्हे तर इंग्रजी, हिंदी आणि उर्दुही जिंकावी. कोणत्याही भाषेचा व्देष नको.) पण माझ्या प्रमाणभाषेतल्या अनेक नैसर्गिक बोलींवर जर कोणी हेटाळणीनं बोलेल, तर ते मी मुकाट्यानं खपवून घेणार नाही. जगातल्या कोणत्याच भाषेवरची टीका मी सहन करू शकत नाही. जगातल्या सगळ्याच बोलींचा- भाषांचा आपण आदर केला पाहिजे व त्यांच्यातलं सौंदर्य समजून घेतलं पाहिजे. आजच्या सर्व बोली या भाषाच आहेत, असं आजचं जागतिक भाषाशास्र सांगतं.’

                    ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती : ‘‘मी खेड्यात गेले तर बोलताना त्यांना समजेलशा शब्दांतच बोलते- त्यांचा हेल काढून बोलते. तामिळनाडूत इंग्रजी बोलताना त्यांचे उच्चार / हेल वापरते. कारण कम्युनिकेशनसाठी ते आवश्यक आहे. त्यात हसण्यासारखं काही नाही.’’

                    मी : ‘बरोबर. आपल्या या भूमिकेचं स्वागत करतो. देवेगौडा पंतप्रधान होते, तेव्हा ते संसदेत कन्नड टोनमध्ये इंग्रजी बोलायचे. माझ्या इंग्रजी वा मराठी बोलण्यातही अहिराणी टोन असतो. आणि हे सर्व साहजिक असल्याचं आजचं भाषाशास्त्र सांगतं. टोन बदलला म्हणजेच भाषेचे उच्चार बदलतात. लेखाच्या सुरूवातीला दिलेलं ते विशिष्ट अवतरण म्हणजे आपण स्वत: उच्च आणि इतरांना कमी समजण्याची मानसिकता आहे. आज जातीवरून कोणाला उघडपणं चिडवता येत नाही, म्हणून काही लोक आता भाषेवरून चिडवू लागलीत की काय, अशी या अवतरणावरून शंका येते.’

या नंतर सदर व्यक्तीचे युक्तीवाद आले नाहीत.

                    भाषा कोणतीही असो, ती माणसाला जोडण्यासाठी आहे. संवादासाठी असते. तसेच कोणाला कळू नये म्हणून ती कृत्रिमपणे तयार होत नाही. आपल्या लोकसंस्कृतीचा परिवेश ती अनायासे उपयोजित करत असते. (आपल्या वर्तृळातच समजाव्या म्हणून काही मानवी गटात कृत्रिम भाषाही तयार केल्या जातात. पण अशा भाषा या भाषा नसतात आणि बोलीही नसतात.)  

                    एका गावापासून तर चार- चार जिल्ह्यात पाय पसरून बोलली जाते, ती त्या परिवेशाची बोली. एका गावात आणि एकच भाषा बोलणारे लोकसुद्धा आपापली खास भाषा बोलत असतात. एक म्हणतो, माझी भाषा शुद्ध आहे, दुसरा म्हणतो, माझी भाषा शुद्ध. असं म्हणणारे आपलं स्वत:चं अशुध्दपण जगजाहीर करत असतात.

          खरं तर भाषा ही भाषा असते. भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काही नसतं. आपल्या दृष्टीनं कोणी चुकीची भाषा बोलत असेल तर ती भाषा चुकीची नसून त्या व्यक्तीची ती खास भाषा असते. म्हणूनच भाषेबाबत अस्सल आणि कम-अस्सल असं काही नसतं. कोणाच्याही भाषेला शरण जात आपण स्वत:च वेळोवेळी स्वत:ला शुद्ध करून घ्यावं. म्हणजे कोणाच्या भाषेला नावं ठेवणं व आपल्या भाषेला आपणच शुद्ध म्हणणं आपल्या वाणीतून त्याज्य ठरेल. दोन व्यक्तीत वा दोन भिन्न भाषांत मैत्रीपूर्ण संवाद पूर्ण झाला की भाषा जिवंत होत जातात

                  ताजा कलम : वरील साक्षेपी निरसन लिहून झाल्यानंतर विविध भाषणात उल्लेखित प्रेमानंद गज्वी व भालचंद्र नेमाडे यांचे उद्‍गार समाजमाध्यमातून उपलब्ध झाले, ते इथं पुष्टी- संदर्भ म्हणून मुद्दाम देत आहे :

     ‘‘मराठी भाषा... बोलीभाषांच्या जिवावरच उभी आहे... पण ते विसरून प्रमाणभाषा स्वयंभू आहे असं... ’… वाल्यांना वाटत आहे! या प्रमाणभाषेलाच... अभिजात मराठी भाषा... मानण्याचा सुप्त डाव... ... वाल्यांच्या मनात आहे की काय अशी शंका वाटते!...’’ - प्रेमानंद गज्वी.

२.   ‘‘सुदैवानं आपल्याकडं ५० टक्के निरक्षर लोक आहेत, त्यामुळं ५० टक्के मराठीला धोका नाही. निरक्षर लोक आपली भाषा वाचवतील. पण साक्षर व सुशिक्षित सो कॉल्ड विव्दान यांच्यापासून मराठीला धोका आहे.’’ - भालचंद्र नेमाडे.

                    (सर्वधारा’, एप्रिल- मे- जून २०२६ च्या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) 

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

सोमवार, १ जून, २०२६

अलक : ८ अति लघु कथा

  

 

- डॉ. सुधीर राजाराम देवरे

 

१.      अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम

 

                    त्याचा मुलगा मित्राच्या शेततळ्यात पोहायला गेला होता. बुडून वारला. समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. विश्वासच बसेना. काय करावं सुचेना. कसं रडावं? शब्द फुटेना. हंबरडा आतल्याआत थिजलेला. त्याला शोक व्यक्‍त करता येईना. हातपाय गाळून बसला. लगेच समाजानं टोचत त्याला कार्यक्रम उद्युक्‍त केलं.

                    मोबाईलमधून त्यानं नातेवाईकांचे नंबर काढत फटाफट फोन केले. नातेवाईकांसोबत उभं राहून अंत्ययात्रेची तयारी केली. लाकूड, मीठ, घासतेल, तूप, मुरमुरे सर्व विकत घेऊन स्मशानात पोचवायची व्यवस्था केली. कापड आणलं. कुवारा मुलगा वारला म्हणून रुईशी लग्न लावायला ब्राह्मण आणला. पीएम करुन आणताच मुलाची अंघोळ घालून- लग्न लावून अंत्ययात्रा काढली. गल्लीनं मिरवत अमरधामात अग्नी द्यायचा कार्यक्रम साजरा झाला.

                    दुसर्‍या दिवशी सकाळी राख सावडण्याचा कार्यक्रम. दारावर येणार्‍या लोकांसमक्ष रडून शोक प्रदर्शनाचा कार्यक्रम. दहाव्याला डोक्याचे केस काढण्याचा कार्यक्रम. गंधमुक्‍तचा कार्यक्रम. नातेवाईकांना पंगत देण्याचा कार्यक्रम. अकराव्या दिवशी अकरा सवाष्णी जेऊ घालण्याचा कार्यक्रम. बाराव्याला दिवस म्हणतात. दिवसाला पुन्हा नातेवाईक- मित्रांना जेऊ घालण्याचा कार्यक्रम.

                    महिण्याचा पित्तर म्हणजे जेवणच. बारा महिने होईपर्यंत दर महिन्याला पित्तरांचं जेवण. शेवटी मुलाचा वर्षाचा पित्तर. वर्षश्राध्द. म्हणजेच पुन्हा जेवणाचा कार्यक्रम करुन बाप विसावणार.

                    बाप रे! दम लागून आला. मुलाच्या मृत्यूनंतरचे पारंपरिक कार्यक्रम करत बाप पार थकून गेला.

              - कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळं- ताणामुळं- कार्यक्रमांसाठी पैशांच्या कडकीमुळं- लोकसहभागामुळं- जेवणावळींच्या पक्तींमुळं मेलेल्या मुलाचा बाप, मुलगा वियोगाचं दु:ख सहज विसरुन जाईल, असं समाजाला प्रामाणिकपणे वाटत राहिलं.    

*

 

२. कार्यक्रम

 

हॅलो

हां बोला

माझी आई वारली

अच्‍छा, कार्यक्रम केव्हा आहे?’

*

 

३. मंदिरात

 

तो तेरा वर्षाच्या चिमुरडीला म्हणाला,

'मंदिरात येतेस का?'

छकुली रागाने फुत्कारली,

'काका, काय हो हे! शोबतं का तुम्हाला!'

(दिनांक : 13-04-2018, संदर्भ : कथुआ, जम्मू काश्मीर)

*

 

४. पायांशिवाय

 

      पायांशिवाय पायर्‍या चढायच्या...

*

 

५. पाया

 

                     एका माणसाला गावात घर बांधायचं होतं. आपल्या जागेची (प्लॉटची) त्याने साफसफाई करुन काटेकोर मोजून घेतली. घर मजबूत उभं रहावं म्हणून जमिनीत खोल पाया खोदला. पाया भरुन ओटा (प्लींथ) तयार केला.

                    भिंती बांधायला सुरुवात केली. लेंटल टाकली. वर पुन्हा भिंती बांधल्या. स्लॅप टाकला. वर पॅरॅफिट बांधलं. बाथरुम- टॉयलेट वगैरेही. घराच्या आतून गिलावा (प्लॅस्टर) करून घेतला. फरशी बसवून घेतली. हे सगळं आर्थिक ताण सोसता येईल तसं दीड वर्ष चाललं.

                    फरशी बसवून होण्याच्या दिवशी संध्याकाळी या माणसाचा शहरातला भाऊ गावात आला. घराजवळ येऊन माणसाला म्हणाला, ‘इतके दिवस लागतात? उद्यापासून मी बघतो. तू येऊ नको इकडे.’

                    दुसर्‍या दिवशी शहरातल्या भावाने दारे- खिडक्या आयते आणून घराला बसवले. घराला बाहेरुन गिलावा करुन घेतला. घराच्या चौकटीवर देवाची टाईल बसवली. दोन दिवस पाणी मारलं. पेंटर आणून आतून बाहेरुन रंग देऊन घर चकचकीत करुन घेतलं.

                    आणि गल्लीत उभं राहून तो ज्याला त्याला ओरडून सांगू लागला, ‘माझा भाऊ या घराचं काम दीड वर्ष करत बसला. मी पंधरा दिवसात करुन दाखवलं!’

                    तात्पर्य, ज्याच्या त्याच्यावर (म्हणजे कथा वाचकावर) सोपवलेलं बरं...

*

 

६. देढगुजरी भाषा

 

                    दूर देशीच्या दोन गारूडींच्या नादी इथले तीन माठे लागले.  गारूडी पुंगी वाजवायचे, डमरू वाजवायचे, टोपली दाखवायचे. आणि ते दोन ह्या तिघांसाठी गळ लावत आपसात म्हणायचे, ‘‘ह्या नावांढगा एंडरकोचा यमुरदा फारदा एक्करदा!’’ ऐकून न समजूनही तिघे आलटून पालटून मेंढूळ सरपटून संमोहित व्हायचे. आणि शेपटीकडून पळावं की तोंडाकडून, ते न कळून बर्‍याचदा जागच्याजागी वळवळत तात्काळ उत्तरायचे, ‘‘एस सर, जी जी!’’ गारूडी ह्या माठ्यांची पाठ थोपटायचे. सगळंच काम सांगता सोपवता ‘सू करानी छे’ हे पण सांगायचे. हाताच्या ओंजळी पुढं करत हे तिघे तात्काळ उत्तरायचे, ‘‘एस सर, जी जी!’’ गारूड्यांच्या शाबासकीसाठी हे माठे रोज उतावळे व्हायचे. भरलेल्या टोपल्यांसह पाठ थोपटून घेण्यासाठी पुढं तिघांचे तीनशे झाले...

                    ...दोन तीन वर्षांतच टोपल्या जाऊन टपल्या खात तिघांसहीत तीनशे तण्याठालटमें भरती करावे लागले! त्यांची देढगुजरी भाषा आता कोणालाच कळत नाही!

*

 

७. अस्मिता

 

                    ती घरातून बाहेर पडताना नवर्‍याला म्हणाली, मत मालूला देऊ ना?’

तो म्हणाला, साधूला दे.

ती म्हणाली, साधू, ना ओळखीचा ना पाळखीचा ना सामाजिक कामाचा. गुन्हेगारही आहे तो. मालूला देते. 

तो म्हणाला, मालू, जातीची ना पातीची ना धर्माची. साधूलाच दे.

ती घुटमळत मनधरणी करत म्हणाली, पण माझी मैत्रीण आहे. लोकांवर जीव ओवाळून कामं करणारी आहे. शिकली सवरलेली ज्ञानी आहे. मग कोणाला देऊ नक्की?’

तो ठामपणे म्हणाला, साधूलाच दे. कामं करणार नसला तरी जाती- धर्माचा माणूस पाहिजे! ती शिकलेली बाई काय कामाची? माणसानं कसं अस्मितेनं जगलं पाहिजे!   

*

 

. मुलगा आणि मुलगी खूप फरक पडतो

           

                    नाशिक पासून सव्वाशे किलोमीटरवर एक खेडं. त्या खेड्यातल्या मुलीला बारावी सायन्सची सीईटी द्यायची होती. मुलीला भाऊ नाही. बाप अंध. आईला शहरातलं काहीच कळत नाही अशी अडाणी. सीईटी परीक्षेसाठी नियोजन असं होतं :

                    :  नुकताच लग्न झालेला एक तरूण नातेवाईक नाशकात राहतो. त्याच्याकडे आई आणि मुलगी आदल्या दिवशी मुक्कामाला जाणार होती परीक्षेसाठी. त्याच दिवशी गेली असती तर परीक्षा सापडणार नव्हती.

                    पण सीईटीच्या दोन दिवस आधी त्या तरूण नातेवाईकाची बायको अचानक माहेरी गेली. आता मुलीच्या आईला आणि मुलीला पेच पडला, त्या तरूणाच्या घरी आपण मुक्कामाला जायचं कसं? तो एकटा. त्याच्या बायकोला काय वाटेल? तरूणाच्या आईबापांना समजेलच, त्यांना काय वाटेल? बाप म्हणाला, ‘मी येतो सोबत, आपण हॉटेलवर राहू.’ मुलगी नाही म्हणाली. ‘मी परीक्षा देऊ का तुमची काळजी करत राहू. बाहेर कसं थांबाल?’ आई आणि मुलीला पाठवून हॉटेलला रहायला सांगणंही त्याला जोखीम वाटली.

                    तरूणाच्या मनात पाप नाही. आपल्या मनात काही नाही. पण हा मनाचा खेळ चालला लोकलाजेस्तव. नातेवाईक काय म्हणतील? कोण कोण काय काय म्हणेल? अमूक काय म्हणेल? बाप मनात म्हणाला, मुलगी ऐवजी मुलगा असता तर आदल्या दिवशी एकटा जाऊन राहिला असता त्याच्या रूमवर. कोणी काहीही बोललं नसतं. कोणी शंका घेतली नसती!

                    आजपर्यंत आपण मुलगा आणि मुलगी भेद मानला नाही. पण प्रत्यक्षात किती मोठा फरक पडतो, हे आज कळलं!

                    (हंस दिवाळी अंक, २०२५ मध्ये प्रकाशित ८ अलक. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) 

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/