शुक्रवार, १ जुलै, २०२२

अहिराणी साहित्य परंपरा

डॉ. सुधीर रा. देवरे

 

           प्रास्ताविक : अनेक दिवसांपासून काही अभ्यासक अहिराणी लेखकांची सूचीची मागणी करत होते. तशी एक लघुसूची ढोलच्या पाचव्या अंकात (जानेवारी 2004) प्रकाशितही केली होती. पण त्यानंतर बरेच लेखक अहिराणीत लिहिते झाले. सूचीतले अनेक घटक व अहिराणी साहित्याची परंपरा माझ्या अन्य लिखाणात आलेली असल्यानं पुन्हा नव्यानं साहित्य सूची कशाला, असंही अनेकांना सांगून पाहिलं. पूर्वपरंपरेसह आजचे साहित्यिक यांची बेरीज करुन अहिराणी साहित्य परंपरा हे टिपण यातून तयार झालं. म्हणून ही केवळ सूची म्हणता येणार नाही :

          चक्रधर स्वामी : अहिराणीचा पहिला उल्लेख लिळाचरित्रात येतो. चक्रधर स्वामींसह तत्कालीन इतर महानुभावांनी ढासलं, रांधलं, पुंज आदी अहिराणी शब्द बोलण्यात वापरल्याचं दिसून येतं.

          ज्ञानेश्वर : संत ज्ञानेश्वर यांचे बागलाण नवरीचे रुपकात्मक अभंग प्रसिद्ध आहेत. याशिवाय श्रीज्ञानदेव यांचीच अहिराणी गवळण व काही अहिराणी पदं सापडतात. ज्या ज्ञानदेवांना बोली अरूपाचं रूप दाखवायचं होतं, त्यांनी बागलाणी (अहिराणी) भाषेत काव्य करून आपली प्रतिज्ञा पूर्ण तर केलीच पण बागलाणी बोलीही तेवढी प्रतिष्ठेची होती हेही त्यामुळं आपोआपच सिद्ध होतं. 

          जयराम पिंड्ये : राधामाधवविलासचंपू ऊर्फ शहाजी महाराज चरित्र हा ग्रंथ जयराम पिंड्ये या कवीचा आहे. हा ग्रंथ शके १५७५ ते १५८० च्या दरम्यानचा असावा. या ग्रंथात बागलाणी (अहिराणी) काव्याचाही समावेश आहे. ग्रंथात बागलाणी असा उल्लेख असून तिची प्रमुख भाषांमध्ये गणना केलेली दिसते. सदर ग्रंथ वि. का. राजवाडे यांनी संपादित केला असून त्याला अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली आहे. ‘‘...भाषा केवळ संस्कृत किंवा मराठी नसून फारशी, उर्दू, ब्रज, गुजराथी, बागलाणी, पंजाबी व कर्नाटकी अशा हिंदुस्थानातील बहुतेक प्रमुख भाषा आहेत... बागलाण हा त्या काळी महत्वाच्या देशात मोडत असे व तेथे बहुतेक लोक स्वतंत्र हिंदू राजे राज्य करीत असत, असा बागलाणीला जयरामने मान दिला.’’ (राधामाधवविलासचंपू, पृ. १३, १४) हे या ग्रंथातलं राजवाडे यांचं महत्वाचं अवरतण आहे.

          मोरिरचा भाट : शहाजी राजांच्या दरबारात ज्याने बागलाणीत स्तुती केली आहे, त्याचं नाव मोरिरना भाट’ (मोरिरचा भाट) असं आहे. त्यांचं काही काव्य उपलब्‍ध आहे. 

         जैन कवी निंबा : शके १६४८ मध्ये जैन कवी निंबा याने एक पोथी लिहिली असून या पोथीत अहिराणीया नावाचंच भक्तीपर व उपदेशपर एक अहिराणी गीत आहे. हे अहिराणी गीत पाच कडव्यांचं आहे. हा जैन कवी विदर्भातील असून त्याने अहिराणी शब्दांचा वापर केला आहे. तठे, जीनपास, तान्हा, मन्हा, त्याले, मन्ह, मननी असे शब्द त्यांच्या गीतात येतात... परंतु हे काव्य आज उपलब्ध होत नाही.

         कमलनयन : बागलाणीतून काव्य करणारे बागलाण तालुक्यात अजून एक कवी होऊन गेले. मुल्हेर जवळच्या अंतापूर या खेड्यातले ते रहिवासी होते. कमलनयनहे त्यांचं नाव होतं.  नयनमहाराजम्हणूनही ते ओळखले जात. कवी कमलनयनयांचा काळ १६८० ते १७५० हा होता. मुल्हेरचे श्री उद्धव महाराज यांचे ते पट्टशिष्य होते. त्यांनी लिहिलेलं काव्य कालांतराने नामशेष झालं. परंतु त्यांचा अभंगावलीनावाचा काव्यग्रंथ आजही मुल्हेर येथील श्री उद्धवस्वामी यांच्या मंदिरांच्या विश्वस्तांजवळ उपलब्ध आहे. अभंगावलीत १५०० ओव्या आहेत. त्यात ५ ते ६ बागलाणी - अहिराणी भाषेत पदं आहेत.

          कमलनयनकवीने अभंगावली, स्तोत्रे, आरत्या दोहे अशा रचना केल्या आहेत. ते संत कवी होते. त्यांचे वंशज बुवाआडनावाचे होते.

          ग्रिअर्सन : सर जॉर्ज ग्रिअर्सन (१८५१- १९४६) यांनी भारतीय भाषांचा अभ्यास केलेला आहे. क्षेत्रविस्तार भाषांची संख्या आणि बहुविधता या दृष्टीनं त्यांनी केलेलं कार्य सर्वांत मोठं आणि महत्त्वाचं होतं. ही सर्व भाषिक माहिती ‘Lingustic Survery of India’ या नावानं खंडशः प्रसिद्ध आहे. त्यातील नवव्या खंडातल्या तिसर्‍या भागात ग्रिअर्सनने अहिराणीचा विचार केला आहे.

 अहिराणीतील आधुनिक साहित्य :

           अहिराणी लोकसाहित्यात खूप मोठा खजिना सापडतो तर प्राचीन- अर्वाचीन साहित्यात चक्रधर स्वामी, संत ज्ञानदेव, मोरिरचा भाट, कवी कमलनयन असे मोजकेच पण भारदस्त द्रष्टे आढळतात. पुर्वस्त्रोतांशी तुलना केली तर अहिराणी आधुनिक साहित्यात अजून खूप मोठी भर पडली नाही. पण काही लिखाण भविष्यासाठीचं आश्वासन नक्कीच आहे.

          कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (बहिणाबाईच्या कविता) अहिराणी वा खानदेशी असल्याचं उर्वरीत महाराष्ट्रात समजलं जातं. शालेय अभ्यासक्रमांत त्यांच्या कवितेचा उल्लेख अभ्यासक्रम मंडळांकडूनही अहिराणी- खानदेशी असल्याचा केला जातो. (बहिणाबाई चौधरी या अशिक्षित असूनही विस्मयित करणारे तत्वज्ञान त्यांच्या काव्यातून सहज अवतरतं. त्यांच्या जवळ जवळ सर्वच कविता, लोकगीतं आणि ओव्यांचा बाज सांभाळतात. तरीही ही कविता अहिराणी कितपत म्हणता येईल, हा प्रश्नही‍ नेहमीच उपस्थित होत आला.) बहिणाबाईची कविता अहिराणी कविता या संज्ञेनं संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखली जात असली तरी या कवितातल्या शब्दांमध्ये- उच्चारांमध्ये अहिराणी भाषा येत नाही. ही लकब खुद्द कवयित्रिची की त्या कवितेवर संस्कार करणार्‍या व्यक्तीची, हे लक्षात येत नाही.

          जळगाव जिल्ह्यातल्या काही भागात लेवा गणबोली नावाची बोली बोलली जाते. कवयित्री बहिणाबाईंची कविता ही लेवा गणबोली भाषेतली आहे, असं अलीकडे काही अभ्यासक त्यांच्या शोधनिबंधातून मांडू लागले आहेत. या अभ्यासकांचा आदर करुन बहिणाबाईच्या कवितांचा समावेश अहिराणी भाषेत केलेला नाही.

          विजया श्रीधर चिटणीस :  खानदेशी बोली : एक स्थानिक अभ्यास (धुळे जिल्ह्यातल्या मोहाडी या गावातल्या भाषेचा अभ्यास पुणे विद्यापीठात पीएचडी साठी सादर, १९८४, माध्यम इंग्रजी. प्रेस्टीज प्रकाशन, पुणे.)   

          दा. गो. बोरसे : अहिराणी लोकवाङ्मय संकलनाचं काम श्री. दा. गो. बोरसे यांनी मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला. जिभाऊ, अहिराणीची कुळकथा, खान्देश वाग्वैभव, लोकनाट्य, गिरजा, तापीतरंग, अजिंठ्याचे लेणे, (माध्यम मराठी). परंतु जे काम सर्व अंगांनी मोठ्या प्रमाणात व्हायला हवं होतं तसं ते झालं नाही. हे काम एकट्या दुकट्या व्यक्तीचं नक्कीच नव्हतं. श्री. बोरसे यांनी जिभाऊनावाची कादंबरी लिहिली. त्या कादंबरीची पार्श्वभूमी- भौगोलिक परिसर खानदेश असला तरी, आणि काही पात्रे अहिराणी भाषा बोलताना दिसत असले तरी तिचं निवेदन प्रमाण मराठीत झालेलं आहे. हीच लेखकाची मर्यादा आहे. एखाद्या लेखकानं प्रमाण मराठी भाषेत कादंबरी लिहावी आणि पात्रांच्या तोंडी कोकणी मिश्रित मराठी वा सातारी, कोल्हापुरी बोली वापरावी तसाच हा प्रयोग होता. श्री. बोरसे यांच्याच अहिराणीची कुळकथाया पुस्तकातूनही विशेष काही हाती लागत नाही. ‘‘श्रीराम अत्तरदे यांच्या सावलीच्या उन्हातव श्री. नारखेडे यांच्या अंजनीखेरीज तरी खानदेशी प्रादेशिक ललित कृती उपलब्ध नाही.’’ असा उल्लेख जिभाऊच्या प्रस्तावनेत दा. गो. बोरसे करतात. पण या उल्लेखातील दोन्हीही ललितकृती अहिराणी माध्यमात नाहीत. या कृती मराठी माध्यमातील आहेत.

          राजा महाजन : अहिराणीवर आणि अहिराणीत काही लिखाण. सूर्यानी लेक आणि गुन्हेगार (अहिराणी कथासंग्रह)

          कृष्णा पाटील : अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड - एक (सण आणि उत्सव) आणि खंड दोन (नाती- गोती) या ग्रंथांत लेख प्रकाशित. (माध्यम - मराठी). उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दोन्ही संदर्भ ग्रंथ. अहिराणी लोकवाङ्मयाचे संकलक. श्री. पाटील यांनाही संकलनाव्यतिरिक्त अहिराणी भाषेत ललित लिखाण करता आलं नाही. इतिहास संशोधन वगैरे क्षेत्रातही भरीव योगदान देता आलं नाही.

          देशीवादाचे लेखक श्री. भालचंद्र नेमाडे यांनी समीक्षासारख्या लिखाणातही रावण्या सारखा अहिराणी शब्द वापरण्याचं धाडस केलं. त्यांच्या मेलडी आणि देखणी नावांच्या कवितासंग्रहातही काही कवितांमध्ये अहिराणी शब्द- अहिराणी वाक्‍प्रचार जाणीवपूर्वक वापरलेले दिसतात. पण क्षमता असूनही त्यांची एकही संपूर्ण कविता अहिराणीत नाही. आणि संपूर्ण कादंबरी तर फार लांबची गोष्ट झाली.

          सदाशिव माळी : अहिरानी दर्शन (जीवनविषयक स्फुट ओव्या), संकलन, (शिवमूर्ती प्रकाशन, धुळे), (माध्यम : मराठी).

          डॉ. रमेश सूर्यवंशी : अहिराणी : भाषा वैज्ञानिक अभ्यास (अक्षय प्रकाशन, पुणे) हे महत्वाचं पुस्तक असून अहिराणी शब्दकोशातील (Dictionary), (अक्षय प्रकाशन, पुणे)  शब्दसंकलनाचं महत्वपूर्ण काम आहे. दिवसेंदिवस अहिराणीतील शब्द हरवण्याची जी नामुष्की ओढवत होती ती या शब्दकोशामुळं दूर होईल. यापुढं अभ्यासकांना तरी आता सहज उपलब्ध होऊ शकेल आणि अजून कोणाला यापासून प्रेरणा मिळाली तर राहून गेलेल्या शब्दांचाही दुसरा कोश उदयास येऊ शकेल असं वाटतं. अहिराणी म्हणी- वाक्प्रचार (संकलन, माध्यम - मराठी).       

          प्रस्तुत लेखक (डॉ. सुधीर देवरे) सुमारे पस्तीस वर्षांपासून अहिराणी भाषा संवर्धनासाठी चळवळ उभी करुन आपल्या लिखाणातून अहिराणी भाषा उपयोजित करीत आहे. अहिराणीच्या संवर्धन व जागृतीसाठी सटाण्यात (१९८५ पासून जवळजवळ अडीच वर्ष) रसिकनावाचं पाक्षिक सुरू ठेवलं होतं. १९९८ पासून बडोदा येथील भाषा संशोधन  केंद्राच्या भाषा प्रकाशन पुढाकारानं ढोलनावाचं पहिलं संपूर्ण अहिराणी माध्यम व अहिराणी लोकसंस्कृतीला वाहिलेलं संशोधनात्मक (जाहिरातींशिवायचं) नियतकालिक प्रस्तुत अभ्यासक संपादित करतो. आतापर्यंत ढोलचे मोजकेच अंक प्रकाशित झाले असूनही त्यांतून अहिराणी भाषा दस्तावेजीकरणाचं भरीव काम झालं आहे. प्रस्तुत लेखकाचा संपूर्ण अहिराणी माध्यम असलेला आदिम तालनं संगीत नावाचा अहिराणीतला पहिला कवितासंग्रहही (१ जुलै २००० साली, भाषा प्रकाशन, बडोदा) प्रकाशित झाला आहे. अहिराणी लोकपरंपरा’, (संदर्भ ग्रंथ -संकीर्ण, डिसेंबर २०११, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई.) अहिराणी लोकसंस्कृती (संदर्भ ग्रंथ, एप्रिल २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.)  अहिराणी गोत’, (अहिराणी दर्शन, मार्च २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.) अहिराणी वट्टा’, (अहिराणी कथा,मार्च २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.) अहिराणीच्या निमित्ताने: भाषा (भाषा संशोधन संदर्भ ग्रंथ, एप्रिल २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.) हे ग्रंथ प्रकाशित असून सा‍तत्यानं भाषाभ्यास- संशोधन- लिखाण सुरु आहे. (वरील सर्व ग्रंथ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ आहेत.) भाषा : व्याप्ती आणि गंड (भाषा संशोधन) आणि अहिराणी : भाषा, परंपरा आणि संस्कृती (भाषा संशोधन) हे ग्रंथ प्रकाशनाची वाट पहात आहेत. या व्यतिरिक्त प्रस्तुत लेखक ललित, वैचारिक आणि मराठी कवितेतही मुद्दाम योग्य त्या ठिकाणी अहिराणीतील महत्त्वपूर्ण शब्द उपयोजित करण्याचा अट्टहास धरतो. मी गोष्टीत मावत नाही’, (कादंबरी, २५ फेब्रुवारी २०१९, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. अहिराणी भाषा उपयोजन), सायको, (कादंबरी, फेब्रुवारी २०२१, तेजश्री प्रकाशन, इचलकरंजी. (अहिराणी भाषा उपयोजन), ‘सोन्याची शाळा (कादंबरी, नोव्हेंबर 2021, लोकवाड्‍.मय गृह, मुंबई. या कादंबरीतले संवाद ‍अहिराणीत आणि निवेदन मराठीत.) खानदेशचा सांस्कृतिक इतिहास (खंड-३) : संपादक : डॉ. मु. ब. शहा, का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे, जानेवारी- २००४, अहिराणीवरील दीर्घ लेख : अहिराणी भाषा : उत्पत्ती आणि इतिहास’, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण, (महाराष्ट्र, १७ ऑगष्ट २०१३, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.) यात प्रत्यक्ष सहभाग आणि पृष्ठ क्रमांक ६८ ते ८१ वरील अहिराणी भाषा वरील दीर्घ लेख.

          डॉ. बापूराव देसाई : अहिराणीतील काही लोकवाङ्मयाचं संकलन केलं आहे. पण डॉ. देसाई यांची आक्खी हयातीही संपूर्ण अहिराणी माध्यम असलेली कादंबरी प्रस्तुत अभ्यासकाला महत्त्वाची वाटते. अहिराणी असणं हेच व्यवहारात उपयोजित होऊ शकतं, असा संदेश या कादंबरीतून अहिराणी भाषिकांना मिळू शकतो आणि अहिराणीबद्दल विश्वासही दृढ करु शकतो.खानदेशी साहित्य सुरभि (संकलन), बनी कारे बापू (संकलन), खान्देशी संस्कृती’, (पानफूल प्रकाशन, जळगाव) आदी पुस्तकं प्रकाशित आहेत.

          संजीव गिरासे : लगीन’, (राजश्री प्रकाशन, पुणे), आगारी’, कथा, (सुधा प्रकाशन, जळगाव) आणि इतर लिखाण.

          डॉ. उषा सावंत : अहिराणी साहित्याच्या सोनियाच्या खाणी (खानदेशी स्त्री गीते’, प्रतिमा प्रकाशन, पुणे) आणि इतर लिखाण.

          देवीदास हटकर : अहिरराष्ट कान्हदेश पुस्तक आणि तंगा मंगा ना दंगा हे नाटक अहिराणी भाषेत प्रकाशित.

          डॉ. शशिकांत पाटील : अहिराणी लोक साहित्याचा अभ्यास’, (चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद)

          डॉ. म . सु . पगारे : अहिराणी लोकवाङ्‌मयातील लोकभाषा’, (प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव) आणि इतर संपादीत ग्रंथ.

          प्रा. शं. क. कापडणीस : अहिराणीचा संसार (लोकम्हनी), संघर्ष प्रकाशन, सटाणा.

          डॉ. सयाजी पगार : खानदेशातील ग्राम दैवते आणि लोकगीते’, (का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे)

          रामदास वाघ : याले जीवन आसं नाव’, म्हतारपननी काठी, तुना काय बापनं जास, ‘आख्यान’, वानगी’, माय नावना देव’, (प्राजक्ता प्रकाशन, नाशिक) आणि इतर पुस्तकं. गावशिव नावाचं एक मासिक संपादीत करून त्यातून अहिराणीतलं हलकं फुलकं साहित्य प्रकाशित केलं.

          सुभाष अहिरे :  गावनं गावपन’, (ललित, भावना प्रकाशन, धुळे), वयंबा (कवितासंग्रह), शांताई  आणि इतर पुस्तकं.

          डॉ. सुधाकर चौधरी : समाज भाषाविज्ञान : अहिराणी बोलीचा अभ्यास’, (अथर्व प्रकाशन, जळगाव) हे पुस्तक.

          डॉ. दिलीप धोंडगे : सांगनं नही पन सांगनं वनं दैनिक गावकरीतलं सदर.

          डॉ . बाळासाहेब गुंजाळ : अहिराणी म्हणी : अनुभवाच्या खाणी’, (शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)

          प्रा . भगवान पाटील : चांगभलं’, अहिरानी ललित लेखसंग्रह, (कस्तुरी प्रकाशन, अमळनेर), ‘संत मीरानी भक्ती’, (अहिरानीत अनुवाद, पानफूल प्रकाशन, जळगाव) ही पुस्तकं.

          प्रा. लतिका चौधरी : गलीनी भाऊबंदकी (कादंबरी), खान्देशी बावनकशी’, (दिशोत्तमा प्रकाशन, नाशिक), नियं आभाय (कवितासंग्रह, कस्तुरी प्रकाशन, अमळनेर) ही पुस्तकं.

          प्रा. शकुंतला पाटील रोटवदकर : मन्हगोत (ओवीगीते, उ.म.वि. संदर्भ ग्रंथ), अभिरानी (कवितासंग्रह), लग्नसोहळा (अहिराणी गीतांचं संकलन) ही पुस्तकं.

          श्रीमती विमल वाणी : रानमेवा’, खान्देशधन’, खान्देशनी संस्कृती (हे तीन कथासंग्रह) आणि अन्य काही संकलनं प्रकाशित.

          प्रकाश पाटील (पिंगळवाडेकर) : सटीना टाक या प्रदर्शित अहिराणी चित्रपटासह अजून काही चित्रपटांत अहिराणी गीतलेखन व संवादलेखन. (धुयाना दांडगो’, सात जनमनी साथ अप्रकाशित पुस्तकं.)

          आबा महाजन : मन्हा मामाना गावले जाऊ (बाल कवितासंग्रह, अथर्व प्रकाशन, जळगाव).

          एन. एच. महाजन : गावगाडा (कथासंग्रह, अनुराग प्रकाशन, शिरपूर) आणि इतर.

          डॉ. फुला बागूल : खारं आलनं’, (प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव) अहिराणी पुस्तकांवरील परीक्षणं, आणि इतर पुस्तकं.

          सुरेश राजाराम पवार : भगवतगीतेचा अहिराणीत अनुवाद.

          नानाभाऊ माळी : लाह्या (कवितासंग्रह, भावना प्रकाशन, धुळे).

          महेशलीला पंडित : आखो नियतकालिकाचे संपादन.

          रत्ना पाटील : गोट-पाटल्या (अहिराणी कथासंग्रह)

          एस. के. पाटील : अहिराणी वैभव नाट्यप्रयोग सादरीकरण.

          रमेश बोरसे :  आप्पान्या गप्पा’, (अभ्यासिका प्रकाशन, कन्नड), पुरनपोयी (कवितासंग्रह, राऊ प्रकाशन, धुळे) ही पुस्तकं.

                    उल्ले‍खित लेखकांव्यतिरिक्त अहिराणीसाठी झटलेल्या बर्‍याच व्यक्‍ती आणि संस्था आहेत. यात डॉ. रमेश वरखेडे, डॉ. मु. ब. शहा, डॉ. किसन पाटील, डॉ. आशुतोष पाटील, जगदीश देवपूरकर, विकास पाटील आदी व्यक्ती, आणि भाषा केंद्र- बडोदा (डॉ. गणेश देवींसोबत आम्ही मित्रांनी स्थापन केलेली एनजीओ), का. स. वाणी संस्था- धुळे, बहिणाबाई (उत्तर महाराष्ट्र) विद्यापीठातील मराठी विभाग- जळगाव, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ- कल्याण, अहिरानी साहित्य परिषद- धुळे आदी संस्थांची नावं घेता येतील. या व्यतिरिक्‍तही अनेक लोक नव्यानं आज अहिराणीत लिहू लागले. अनेक पुस्तकं अहिराणीत निघू लागलीत. यातून अहिराणीच्या भवितव्याचं चांगलं आश्वासन मिळतं.

          ताजा कलम : हे टिपण अपूर्ण असल्याची जाणीव आहे. अहिराणी लेखकांनी आपल्या व इतरांच्या प्रकाशित पुस्तकांची माहिती कळवावी म्हणजे सूची वेळोवेळी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करता येईल.

          हा अंक किंडलवर ईबुक स्वरूपातही स्वस्तात उपलब्ध आहे.

अंकाची लिंक : https://notionpress.com/read/sampruktt-likhan

          (‘संपृक्त लिखाण आखाजी- मे २०२२ च्या अंकात प्रकाशित. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/


बुधवार, १ जून, २०२२

सहावे सुख

 

          (‘संपृक्त लिखाण - मे २०२२ अंक एकला लिहिलेले संपादकीय)

                    दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून कोवीड-19 ने मानवी जीवन पूर्णत: नासवून टाकले. अनेक साहित्यिक, लेखक, कवी, गायक आदी कलाकारांसह आपले मित्र, नातेवाईक, तरुण व्यक्ती आपल्यापासून कायमच्या दूर निघून गेल्यात. प्रत्येकाची अशी एक तरी जवळची व्यक्ती या साथीने अचानक हिरावून नेली, की ती व्यक्ती आज हयात नाही यावर अजूनही आपला विश्वास बसत नाही. अशा या वैश्विक मानवी एकता दाखवण्याच्या काळातसुध्दा काही युध्दपिपासू सत्ता पृथ्वीला नष्ट करण्याची भाषा बोलत विध्वंस घडवत राहतात. तर दुसरीकडे धर्माचा बाजार मांडणारे लोक मानवी नात्यांचे ध्रुवीकरण करण्यात मग्न आहेत. मी (म्हणजे नागरिक) धार्मिक- अध्यात्मिक असेल, पण सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी लोक माझ्या धर्माचा भावनिक वापर करत असतील तर मी त्यांना तो का करु द्यावा? राजकारण्यांनो- सत्ताधार्‍यांनो, देशाचा विकास करणे, नागरिकांना विज्ञानवादी बनवत त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणे, रोजगार उपलब्‍ध करणे, किमान जीवनावश्यक सुविधा निर्माण करणे, आरोग्य सुविधा पुरवणे अशी तुमची कामे आहेत- तुमची ध्येयं अशी असली पाहिजेत. धर्माला धर्माच्या पवित्र जागी राहू द्या. तुम्ही विकासाचे राजकारण करावे. नागरिक जोडण्याचे काम करावे, तोडण्याचे नव्हे, व्देषाचे नव्हे! देशातले लोक हे आधी नागरिक आहेत, केवळ मतदार नाहीत याचे भान ठेवावे. पूर्वी काही विशिष्ट कारणांनी देशात कुठे जातीय- धर्मिय ताणतणाव वाढला तर नागरिक जातीयवादी व्हायचे. परंतु जबाबदार सत्ताधारी, लोकांना भाईचारा शिकवित. आता खुद्द सरकारांत सामील लोक, नागरिकांत भेदभाव करतात आणि नागरिक सत्ताधार्‍यांना भाईचाराच्या चार गोष्टी शिकवतात... कालाय...

                    आलेल्या सगळ्याच संधींचा पुरेपुर फायदा घेत काही भ्रष्ट प्रवृत्ती माणसांना अधिकृतपणे लुटत राहतात. अशा सर्वदूर बिघडलेल्या गढूळ वातावरणात संवेदनशील माणूस आपल्या कुवतीनुसार सामाजिक काम करत विचार मांडण्याशिवाय- विधायक अभिव्यक्ती आविष्कृत केल्याशिवाय खूप काही करू शकत नाही. भयंकर आणि किळसवाण्या वास्तवाचे फक्त पारायणे करण्यापेक्षा वास्तव उपयोजित आपल्या कलावादीसहाव्या सुखात गुंतवून घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे संपृक्त लिखाण हे नियतकालिक.     

                    वाड्.मयीन नियतकालिके बंद होत असल्याच्या काळात नवीन नियतकालिक सुरु करण्याचे धाडस करीत आहे. आवड असली की सवड मिळते तसे आवड असली की खर्चाकडे पहायचे नसते. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ते करीत राहणे म्हणजेच प्रगती. हातून साहित्य निर्मिती झाल्यावर लेखकाला जो निखळ आनंद मिळतो तो खरा स्वर्गीय आनंद! केवळ लिखाणच नव्हे, तर इतर साहित्यिकांचेही वेगळे आणि अभिजात साहित्य वाचून असाच निर्भेळ आनंद लेखकाला मिळत असतो. प्रत्येक लेखक स्वत:च्या साहित्य निर्मितीसोबत कायम अशा अभिजात साहित्याच्या शोधात असतो आणि अधूनमधून असे चांगले साहित्य त्याला आस्वादायलाही मिळत असते. अशा प्रथितयश साहित्यिकांसोबत अजून उजेडात न आलेल्या पण कसदार लिहीत असलेल्या नवोदितांतील अप्रकाशित साहित्याचा मोठ्या प्रमाणात शोध घेऊन ते प्रथम प्रकाशित करण्याचे श्रेय घेण्याच्या स्वार्थाने हे नियतकालिक सुरू करीत आहे. म्हणूनच हे नियतकालिक कोणत्याही विशिष्ट भौगोलिक परिसराचे, गटातटाचे असणार नाही. या नियतकालिकात एखादा कळप दिसणार नाही.

                    कोणत्याही प्रकारच्या चाकोरीबध्द वा इतर मुक्त आविष्कारांत पसरटपणा वा पाल्हाळ नसावे, आशयाची संपृक्तता असावी, असे मत असल्याने या नियतकालिकाचे नाव संपृक्त लिखाणनिश्चित करण्यात आले. भाषा केंद्र बडोदा पुरस्कृत ढोल नियतकालिक संपादनाचा मिळालेला आनंद गाठीशी असल्याने गुंतवून घेणे स्वस्थ बसू देत नव्हते. ढोल नियतकालिकाचे भारतीय लोकभाषा सर्वेक्षणात विलिनीकरण झाल्यापासून अशा एका पर्यायी नियतकालिकाचा विचार करत होतो, पण आर्थिक स्वायत्तता नसल्याने तो पूर्ण होत नव्हता. शेवटी स्वत: धाडस करून तो आज साकार होतोय.

                    मुखपृष्ठावरच्या लिखाण शब्दाला तांबडा रंग नाही. तो रक्ताचा रंग आहे. या अंकाच्या मुखपृष्ठावर ज्या चित्रकाराचे चित्र प्रकाशित झाले ते किरण मोरे ग्रामीण भागातील- अहिराणी पट्ट्यातील एक छोटे शेतकरी असून त्यांचे अद्याप एकही चित्र कोणत्याही नियतकालिकात प्रकाशित झालेले नाही.

                    नियतकालिकाचे निवेदन प्रसिध्द झाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात ईमेलने साहित्य येणे सुरू झाले. पण समाधान देईल असे साहित्य विरळ. मोठ्या प्रमाणात आलेले साहित्य नाईलाजाने बाजूला ठेवावे लागले. अनेक मित्रांनी साहित्य पाठवले. अनेक सुहृद नियतकालिकाबद्दल फोनवर बोलले. पण लोकनाथ यशवंत, जी. के. ऐनापुरे, सरदार जाधव, ‍दीपक बोरगावे आणि देवानंद सोनटक्के यांनी पैशांचे कसे?’ हे महत्वाचे विचारले. कारण पैसे असल्याशिवाय अशी हौस भागवता येत नाही, याचे भान या मित्रांनी पुन्हा आणून दिले.

                    म्हणून प्रकाशन खर्चासाठी न मागता मिळालेल्या देणग्या स्वीकारल्या जातील आणि त्यांचा नामोल्लेख अंकात केला जाईल, असे ठरवले. मात्र देणगी कोणाकडे मागितली नाही. देणग्यांबाबत पहिल्यांदाच इथे लिहीत असल्याने कसा प्रतिसाद मिळतो ते पाहू या. ह्या नियतकालिकाला कोणत्याही मंडळाचे अनुदान मिळाले नाही. कोणतीही संस्था, एनजीओ अथवा व्यक्ती या नियतकालिकाची आर्थिक पाठराखण करीत नाही. (तशी मागणीही कोणाकडे केलेली नाही.) नियतकालिकाची वर्गणी (वार्षिक, व्दैवार्षिक, त्रैवार्षिक, पंचवार्षिक, आजीव वगैरे) आगाऊ घेण्यात येणार नाही. प्रत्येक अंक त्या त्या वेळी कवी, लेखक, वाचक, प्राध्यापक यांनी थेट (ऑन लाईन) विकत मागवावेत अशी अपेक्षा आहे. अंकाचे मूल्यही उत्पादीत खर्चावर आधारित वाजवी आकारले आहे- यापुढेही कायम वाजवी आकारण्याचा प्रयत्न राहील. (तरीही अनुदानप्राप्त नियतकालिकांपेक्षा या अंकाची किंमत वाचकाला जास्त वाटू शकते. नोशन प्रेसच्या उत्पादीत खर्चानुसार कमीतकमी जी किंमत संगणक दाखवते, तीच आकारावी लागते.) कवी, लेखक, वाचक यांनी अंकाच्या एकापेक्षा जास्त- किमान दोन प्रती तरी मागवाव्या. आपल्यासाठी एक आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना विकत वा भेट देण्यासाठी एक. अंकाच्या दोनशेपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या तर (उत्पादीत खर्च वगळून) अंकात समाविष्ट झालेल्या साहित्यिकांना मानधन देता येईल. अंकांत फक्त पुस्तकांच्या, प्रकाशकांच्या, साहित्य संस्थांच्या, साहित्यिकांच्या, स्मृतीप्रित्यर्थच्या जाहिराती स्वीकारण्याचा विचार आहे. 

                    यापुढेही साहित्यकारांनी आपले सगळ्यात चांगले व निवडक अप्रकाशित साहित्य संपृक्त लिखाणसाठी पाठवत रहावे. पसंतीस उतरलेल्या साहित्याला प्रकाशित करु. संपृक्त लिखाणचे स्वरूप अर्धवार्षिक असेल. २०२२ पासून दरवर्षी दोन अंक आखाजी (मे) आणि दिवाळी (नोव्हेंबर) दरम्यान प्रकाशित होतील. धन्यवाद.

       संपृक्त लिखाण अंक मागवण्यासाठी लिंक: https://notionpress.com/read/sampruktt-likhan

          (‘संपृक्त लिखाण अंक पहिला - मे २०२२ ला लिहिलेले संपादकीय. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

रविवार, १ मे, २०२२

‘मर्मभेद’ नावाचं पुस्तक

 

 

-       डॉ. सुधीर रा. देवरे

 

                    माझं अवांतर वाचन शाळेत पाचवीला असल्यापासूनच सुरू होतं... नववीची वार्षिक परीक्षा झाल्यावर उन्हाळी सुट्ट्या होत्या. (म्हणजे तेव्हा वयाने अंदाजे चौदा वर्षांचा असेन.) या सुट्टीत एका मित्राच्या घरी बाईंडींग केलेलं एक जाडजूड पुस्तक दिसलं. त्याचं मामाचं गाव औरंगाबाद म्हणजे एक शहर होतं आणि मामाच्या घरात अडगळीत पडलेलं म्हणून त्यानं ते पुस्तक येताना बरोबर गावी आणलं होतं. मित्राला म्हणालो, हे पुस्तक मी वाचायला घेऊन जातो. पुस्तकाचं नाव होतं, मर्मभेद. आधीची आणि नंतरची पानं गायब होती तरी पुस्तक पूर्ण होतं. पण पुस्तकाच्या लेखकाचं नाव समजायला मार्ग नव्हता.

                    पुस्तक वाचायला सुरूवात केली आणि पुस्तकात पूर्णपणे तुडुंब बुडालो. तहान, भूक आणि बाहेर बालमित्रांसोबत खेळणं विसरून पूर्ण पुस्तक वाचूनच विसावलो. इतकं जाडजूड पुस्तक असूनही तेव्हा मी ते तीन चार दिवसात वाचून पूर्ण केल्याचं आठवतं. या पुस्तकानं खूप वेगळा निखळ आनंद दिल्याचं फक्त तेव्हाच नव्हे तर आजही तसंच वाटतं. (या पुस्तकाचा माझ्या मनावर झालेल्या गारुडामुळंच माझ्या पुतण्याचं नाव मी या कादंबरीतल्या राजपुत्राच्या नावावरुन कुणाल ठेवलं आहे. आणि एका नियतकालिकांत मी लिहिलेल्या धर्म आणि राजकारणावरील औपरोधिक सदरालाही मर्मभेद नाव दिलं होतं.)  

                    पुस्तकातली दमदार कमावलेली सौष्ठवपूर्ण भाषा, जबरदस्त शब्दफेक- वाक्यफेक, मोठमोठी संयुक्त वाक्य, कथानकात गुंगवून ठेवणारी कौशल्यपूर्ण वातावरण निर्मिती, उपरोधिक- उपहासिक संबोधनं, ढोंगी भाषणं, घटनांना कलाटणी देणारा नाटकीय ढंग, प्रचंड मोठ्या भौगोलिक क्षेत्रात घडणार्‍या घटनांचा पडसाद, राजकारणात टहाळबन दिसून येणारे एकाहून एक मोठे भंपक- लबाड नमुने आणि अशा वातावरणात तुरळक आढळणारे प्रामाणिक लोक. अशी काही नेमकी बलस्थानं या चाळीस वर्षांपूर्वी लहानपणी माझ्या खेडेगावात- विरगावात वाचलेल्या कादंबरीचे आजही सांगता येतील. कादंबरीत उपयोजित झालेल्या अनेक शब्दांचे अर्थ त्यावेळी माहीत नसूनही पुस्तकातल्या गहन शब्दांचं केवळ भावन होत ते शब्दधन मनावर गारूड करू लागलं होतं. ही कादंबरी लिहिण्यापूर्वी लेखकानं केलेला अभ्यास (त्या वयातही) लक्षात येत होता. लेखकानं राजघराण्यांचं खूप जवळून अवलोकन केल्याचं ध्यानात येत होतं. (त्यावेळी) हे पुस्तक वाचताना वाटत होतं, की या घडणार्‍या वास्तव घटना असाव्यात आणि त्या घटना घडतेवेळी लेखक तिथं स्वत: उपस्थित असावा. 

                    राजा, राजपुत्र आणि पाताळयंत्री (हा याच पुस्तकात मला पहिल्यांदा सापडलेला शब्द. अर्थ न समजूनही या कादंबरीतले असे अनेक शब्द मला भुरळ घालत होते.) राजकारणाची कटकारस्थानं अशी काहीशी कथा या कादंबरीची असली तरी संपूर्ण मांडणी मानवी प्रवृत्ती- विकृती, रूपकात्मक- प्रतिकात्मक असा लांबलचक पट असलेली. पुस्तकातल्या कथेचा प्रचंड मोठ्या आवाक्याचा विशिष्ट घाट आणि संस्कृतप्रचुर जड भाषाशैली असूनही तिच्या ओघवत्या धावनानुसारी प्रवाहीपणामुळं वाचकाला संमोहीत करत जबरदस्त गुंतवून ठेवणारी.

                    आज मर्मभेद कादंबरी वाचून चाळीसहून जास्त वर्ष झाली पण इतक्या ताकदीचं दुसरं पुस्तक अजून हातात आलं नाही. जी. ए. कुलकर्णींचा पिंगळावेळ कथासंग्रह वाचताना मात्र मर्मभेदच्या तोडीचं आपण वाचत आहोत, हे लक्षात आलं. विशेषत: स्वामी कथेशी या संपूर्ण पुस्तकाच्या शैलीची तुलना महत्वपूर्ण ठरेल. (इथं ही तुलना जरा जास्तीची वाटू शकेल. पण साहित्यमूल्य- कलामूल्यसंदर्भात ही तुलना करत नसून वातावरण निर्मितीसह केवळ संयुक्त वाक्य लिखाणशैलीबद्दल बोलतो.) 

                    तेव्हापासून आजपर्यंत हे पुस्तक केव्हा ना केव्हा मला सारखं आठवत आहे. माझ्या एखाद्या लेखातही या पुस्तकाचा याआधी ओझरता उल्लेख आला असावा. अनेक साहित्यिक मित्रांशी बोलताना या पुस्तकाचा आणि लेखक माहीत नसल्याचा मी उल्लेख केला आहे. अनेकांनी सांगितलं, की ते शशी भागवतांचं पुस्तक असावं. शशी भागवतांची इतर पुस्तकं माझ्या वाचनात आली नाहीत. अथवा मुद्दाम मागवून वाचायचं अजून राहून गेलेलं. कारण त्यांची इतर पुस्तकंही याच ताकदीची असतील का, वगैरे मनातल्या शंका.

                    युवकावस्थेत असताना काही मित्रांना सोबत घेऊन उत्साहानं विरगावला संदेश वाचनालय सुरू केलं होतं. माझी अनेक संग्रहीत पुस्तकं वाचनालयाला भेट दिली. हे पुस्तकही मित्रानं वाचनालयाला भेट दिल्याचं आठवतं. ते आता पुन्हा एकदा तरी वाचावं असं वाटल्यानं मी ते शोधण्याचा अलीकडे प्रयत्न करून पाहिला. पण ते पुस्तक वाचनालयात सापडलं नाही. चाळीस वर्षांपुर्वीच ते अतिशय जुन्या अवस्थेत प्राप्त झालं होतं.

           (१ एप्रिल २०२२ च्या थिंक महाराष्ट्र मध्ये प्रकाशित लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/